८ नोव्हेंबरला नोटाबंदी झाली आणि व्हाॅट्सअॅपवर जोक्सचा पूर आला. पंतप्रधान मोदी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर होणाऱ्या जोक्ससोबत आणखी काही जोक शेअर होत होते ते अनेक घरांमधल्या गृहिणींनी नवऱ्यापासून लपवून वाचवून ठेवलेल्या पाचशेच्या नोटा वाया गेल्याचे. काळा पैसा बाहेर पडो वा न पडो या सगळ्या गृहिणींच्या सेव्हिंगवरती मोठा घाला पडला असाच एकंदरीत सूर होता. देशाची अर्थव्यवस्थेची आकडेमोड जाऊ देत. पण सामान्या नागरिकांसाठी घरखर्चाचा हिशोब आणि साठवून ठेवलेले पैसे कितीतरी जास्त महत्त्वाचे असतात. हे एक मोठं प्रकरण असतं बरं! लग्नाआधी एकमेकांना 'गटवायला' या जोडप्याने जेवढ्या कल्पना लढवल्या नसतील तेवढ्या युक्त्या पैशांचे हे हिशोब लावताना केल्या जातात. आपल्या नवऱ्याचा डोळा चुकवून आपल्याच कुटुंबाच्या चांगल्या भविष्यासाठी अनेक गृहिणी पैसे वाचवून ठेवत असतात. आणि एका दिवशी ही सगळी रक्कम गायब झाली तर? आणि तीसुध्दा नजरचुकीमुळे? अमेरिकेत कॅलिफोर्नियात राहणाऱ्या लिंडा हाॅफमन यांनी एका सामाजिक संस्थेला त्यांच्या घरातले काही कपडे दान केले. त्यांचे आणि त्यांचे पती बाॅब हाॅफमन यांचे जुने पण चांगल्या स्थितीतले कपडे त्यांनी या संस्थेला दान केले. यानंतर काही दिवसांनी 'माझा हा शर्ट कुठे आहे?' असं विचारणाऱ्या आपल्या नवऱ्याला आपण तो शर्ट दान केला आहे असं लिंडा यांनी सांगितलं वाचा- हे नियम ब्रिटनची राणीसुध्दा मोडू शकत नाही! आणि एरव्ही कुठल्याही परिस्थितीत न डगमगणारे बाॅब हाॅफमन खाली बसून रडायला लागले. त्या शर्टाच्या खिशात ८ हजार डाॅलर्स होते! जवळपास ५ लाख रूपयांपेक्षा जास्तीची ही रक्कम एका क्षणात हाॅफमन जोडप्याच्या हातातून गेली होती. या दोघांचं लग्न झालं तेव्हा लिंडा हाॅफमन यांनी त्यांचं सहलीला जाण्यासाठी ड्रीम डेस्टिनेशन 'इटली' असल्याचं बाॅब यांना सांगितले होतं. आपल्या बायकोला ही इटली ट्रिप गिफ्ट द्यावी म्हणून गेली काही वर्ष हे पैसे बाॅब साठवत होते. आठ हजार डाॅलर्स जमा झाल्यानंतर ही ट्रिप करणं शक्य होतं. ज्यादिवशी ही रक्कम जमली त्यादिवशी त्यांनी ही रक्कम काढत तो लिफाफा आपल्या शर्टाच्या खिशात ठेवला आणि नेमका हाच शर्ट लिंडा यांनी त्यातल्या नोटांसकट दान केला! मग सुरू झाली धावाधाव. त्या सामाजिक संस्थेला या दोघांनी घाईघाईने फोन लावला. काही दिवसांपू्र्वी दान करण्यात आलेले. हे कपडे या संस्थेने पुढे पाठवून दिले होते! हाॅफमन कुटुंबाचं अवसानच गळालं. पण तिसऱ्याच दिवशी त्यांना फोन आला आणि तुमचं एन्व्हलप मिळालं आहे असं त्यांना या संस्थेच्या प्रतिनिधीने सांगितलं. हे तीन दिवस हाॅफमन कुटुंबीयांच्या आयुष्यातले अतिशय भयानक दिवस होते. पण सरतेशेवटी त्यांच्या स्वकष्टाचे पैसे त्यांना परत मिळाले. या अशा साध्या नजरचुकांनी आयुष्य होत्याचं नव्हतं होऊ शकतं. त्यामुळे जरा जपून! वाचा- हजारोंचा लवाजमा आणि ५०० टन सामान घेऊन सौदी राजा इंडोनेशियात दाखल