अंजुम सैफी लवकरच न्यायाधीश होणार आहे. अंजुम लहान होती तेव्हा तिच्या वडिलांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबावर आर्थिक संकट कोसळलं, पण परिस्थितीपुढे हार न मानता छोटी अंजुम वडिलांचं स्वप्न पुरं करण्यासाठी मेहनत घेऊ लागली. उत्तर प्रदेशमधल्या लोकसेवा आयोगाच्या विधी विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेत अंजुमने यश संपादन केलं आहे.

जाणून घ्या भारतातील पहिल्या तृतीयपंथी न्यायाधीशाबद्दल

तिचं यश पाहण्यासाठी आज वडील जिवंत असते तर त्यांना आपल्या लेकीचा नक्कीच अभिमान वाटला असता. अंजुमचे वडील व्यापारी होते. व्यापारांकडून हफ्ते गोळा करणाऱ्यांच्या ते विरोधात होते. यावर त्यांनी आवाजही उठवला, त्यामुळे काही गुंडांनी त्यांची हत्या केली. वडिलांच्या हत्येनंतर कुटुंबावर मोठं संकट कोसळलं, अंजुमच्या भावाने कमी वयातच घरची जबाबदारी स्वीकारली. वडिलांच्या मारेकऱ्यांना धडा शिकवण्यासाठी अंजुमला पोलीस दलात भरती व्हायचं होतं. पण अंजुमने न्यायधीश व्हावं असं तिच्या वडिलांचं स्वप्न होतं. त्यामुळे तिने वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला सुरूवात केली. आर्थिक स्थिती बेताची असल्याने शिक्षण घेताना अंजुमला अडचणी येत होत्या. पण तिच्या भावाने सर्वप्रकारचं सहकार्य केलं, म्हणूनच अंजुम आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करू शकली.  अंजुम उत्तर प्रदेशमधल्या मुज्जफरनगर येथे राहते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या मुलींसाठी अंजुमला काम करायचं आहे.