स्त्री निर्भय होते ती मुख्यत: आर्थिक स्वातंत्र्य असेल तर. छोटे मोठे उद्योग सुरू करून स्त्रिया आज आत्मनिर्भयतेकडे वाटचाल करीत आहेत. ग्रामीण पातळीवर सुरू असलेल्या या छोटय़ा-मोठय़ा उद्योगांची आणि स्त्रीनेतृत्वाची ओळख करून देणारे हे सदर दर पंधरा दिवसांनी.

17चंद्रिका चौहान यांची ‘उद्योगवर्धिनी’ तिथल्या सुमारे तीन हजार स्थानिक स्त्रियांना आत्मनिर्भर करणारी ठरली असून लाखो रुपयांची उलाढाल असलेल्या ३१० उद्योजिकाही तयार झाल्या आहेत. रोज सुमारे तीन-साडेतीन हजार लोकांचा स्वयंपाक ‘उद्योगवर्धिनी’मार्फत केला जातो. इतकंच नव्हे तर उद्योगाबरोबरच ‘अन्नपूर्णा’ योजना आणि ‘मंगलदृष्टी’ योजनाही राबविण्यात येते.

bombay hc declare sawantwadi dodamarg corridor as ecologically sensitive
अन्वयार्थ : पुन्हा कान टोचले; आता तरी सुधारा..
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : सत्तेच्या राजकारणात व्यवसायाचे नुकसान
8 point 85 percent interest rate on fixed deposits by Bajaj Finance
बजाज फायनान्सतर्फे मुदत ठेवींवर ८.८५ टक्के व्याजदर
udyog bhavan marathi news, udyog bhavan loksatta marathi news
‘उद्योग भवना’ची नऊ वर्षांनंतरही प्रतीक्षाच! विकासकाच्या इमारती मात्र विक्रीसाठी सज्ज, ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ पद्धतीत विकासक फायद्यात

चंद्रिका चौहान यांनी सोलापुरात आयोजित केलेल्या एका स्त्री मेळाव्यात सुमारे साडेसात हजार स्त्रिया जमल्या होत्या. तिथे त्यांनी जाहीर केलं, ‘‘कडकभाकरी उद्योग सुरू करतो आहोत.’’ खरं तर त्या आधी फक्त पंढरपूरच्या वारीच्या वेळच्या तीन हजार कडक भाकऱ्यांची एकच ऑर्डर त्यांच्या संस्थेनं पूर्ण केली होती, पण त्यांनी जाहीर केलं आणि त्यांना रोजच्या पंचवीस कडक भाकऱ्यांची पहिली ऑर्डर मिळालीही. तेव्हा भाकऱ्यांची किंमत, आकार काहीही ठरलं नव्हतं. पण एकदा करायचं ठरवलं की मागे वळून पाहायचं नाही, हा चंद्रिका चौहान यांचा मंत्रच असल्यानं त्याप्रमाणे हे सगळं जमवून भाकरी उद्योग सुरू केला गेला. त्यांच्या या वृत्तीमुळेच त्यांच्या ‘उद्योगवर्धिनी’तून ३१० उद्योजिका तयार झाल्या असून आणि तीन हजार जणींना आर्थिक पाठबळ मिळालं आहे.
मूळ गुजरातचे असलेलं चंद्रिकाताईंचं कुटुंब १९८३ मध्ये सोलापुरात स्थायिक झालं. त्यानंतर पती शंभुसिंग चौहान यांच्या आजारपणामुळे घरात आर्थिक चणचण व्हायला लागली झाली. त्यामुळे चंद्रिकाताईंनी १९९२ मध्ये शिलाईकाम व शिवण क्लासेस सुरू केले. एम्ब्रॉयडरी, मेंदी अशी जोडकामेही सुरू झाली. एका हितचिंतकाच्या सुचवण्याप्रमाणे झोपडपट्टीतही शिलाई केंद्र सुरू केलं. त्यामुळे तिथल्या स्त्रियांना रोजगार मिळाला. टॉवेलला टिपा मारणं, कापडी पिशव्या शिवणं आदी उद्योग त्यांनी स्त्रियांना मिळवून दिले. या कामातून खूप ओळखीही झाल्या. या शिलाई केंद्रातून सुमारे साडेचार हजार स्त्रिया शिवणकाम शिकल्या.
वेळ-काळ न बघता अनेकांना मदत करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे तिथल्या विभागात चंद्रिकाताई खूप लोकप्रिय झाल्या. या लोकांच्या आग्रहामुळे कुठलाही प्रचारखर्च न करता त्या सलग दोनदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या. दहा र्वष नगरसेवक म्हणून काम करताना स्त्रियांच्या अडचणी त्यांना कळल्या. नडलेल्यांना मदत करत ओळखीतून अनेक कामं जोडून देता आली. त्या म्हणतात, ‘‘कामं करताना माणसं एकमेकांशी जोडून देते, पण पैशाला मात्र कधीच हात लावत नाही. पैसा बिघडवतो.’’ दहा वर्षांनंतर त्यांना वाटलं की आता राजकारण पुरे. मग त्यांनी अगदी ठरवून समाजकार्यालाच वाहून घेतलं.
मनुष्यबळ हे या उद्योगासाठी महत्त्वाचं. त्यांनी स्त्रियांशी बोलायला सुरुवात केली. लिंगायत समाजाच्या स्त्रियांशी बोलताना त्यांच्या लक्षात आलं की, त्यांना आर्थिक अडचणी होत्या, पण त्यांना बाहेर काम करायला परवानगी नसायची. मात्र त्या घरच्या घरी स्वयंपाक करू शकत होत्या. त्यामुळेच त्यांना पंढरपूरच्या वारीची ती ३००० भाकऱ्यांची ऑर्डर मिळवून दिली. शिवाय सोलापूरची प्रसिद्ध शेंगाचटणी बनवण्यास सुरुवात केली आणि स्वयंपाकाची कामं वाढतच गेली.
कामं इतकी वाढली की त्याचं नीट नियोजन करायचं तर संचालक मंडळ हवं, असं चंद्रिकाताईंना वाटायला लागलं. नियोजन करणाऱ्या स्त्रियांनाही मोबदला मिळायला हवा, या उद्देशाने १४ स्त्रियांनी मिळून स्वत:चे पैसे घालून २००३ मध्ये ‘उद्योगवर्धिनी’ या संस्थेची स्थापना केली. २००८ मध्ये शुभराय मठाची जागा मिळाली आणि ‘पाखर संकुल’ या संस्थेची साथही मिळाली. आता ‘उद्योगवर्धिनी’ संस्थेच्या मार्फत अनेक ठिकाणी पोळीभाजी केंद्रे चालवली जातात, अनेक धाब्यावर भाकरी आणि चटणी पोचवली जाते. रोजच्या भाकऱ्यांच्या, जेवणाच्या ऑर्डर्स असतातच. वालचंद कॉलेजची मेस, सिव्हिल हॉस्पिटलमधले पोळीभाजी केंद्र अशी अनेक ठिकाणची कामे घेतली जातात. तीन महिने टिकणारी कडक भाकरी, शेंगा चटणी, कुरडया, पापड, भरल्या मिरच्या, शेंगापोळी, शेवया, सांडगे असे पदार्थ विविध बचत गटांच्या मार्फत बनवले जातात आणि बाजारात विक्रीला ठेवले जातात. रोज सुमारे तीन-साडेतीन हजार लोकांचा स्वयंपाक ‘उद्योगवर्धिनी’ मार्फत केला जातो. टनावारी दिवाळी फराळ करून त्यांची देश-परदेशात विक्री आणि गरजवंताना वाटपही केलं जातं.
आज ‘उद्योगवर्धिनी’च्या शेंगा चटणीला सरकारकडून भौगोलिक मानांकन (जी.आय.) मिळालं असून ही चटणी ‘सोलापूर शेंगा चटणी’ या नावाने फूड मिनिस्ट्रीतर्फे बाजारात विक्रीसाठी आणली जाणार आहे. सोलापुरात रोज तब्बल तीन हजार किलो चटणी बनवली जाते. त्याचे मानक ठरवले जाऊन एका प्रतीची आणि चांगल्या गुणवत्तेची चटणी लवकरच देश-परदेशात उपलब्ध होईल.
एखादी व्यक्ती जेव्हा मोठं काम उभं करते तेव्हा तिच्यामागे कुटुंबाची साथ असावी लागतेच. चंद्रिकाताईंच्या कुटुंबातील सर्वानीच ‘उद्योगवर्धिनी’ला वाहून घेतलं आहे. घरातला प्रत्येक जण या कामात गुंतलेला आहे. त्यांची दोन्ही मुलं, मुलगी आणि पती या सगळ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घेतलेल्या आहेत. इतकंच नव्हे तर ‘उद्योगवर्धिनी’बरोबर काम करणाऱ्या सर्व स्त्रिया हा त्यांच्या कुटुंबाचाच भाग आहेत. आज सुमारे ३००० स्त्रिया ‘उद्योगवर्धिनी’सोबत काम करतात.
‘उद्योगवर्धिनी’चे अजून एक महत्त्वाचं वैशिष्टय़ असं की, हा इतका मोठा व्यवसायाचा पसारा आपला खिसा भरण्यासाठी न वापरता समाजासाठी वापरला जातो. एकदा एका आजोबांनी त्यांच्याकडे जेवण मागितलं. मात्र बिल दिल्यावर ते चिडले. त्यांच्याशी बोलल्यावर चंद्रिकाताईंना समजलं की, ते तीन दिवस उपाशी होते. त्यांच्या घरी मालमत्तेसाठी वाद झाले आणि त्यातून त्यांना मारहाणही करण्यात आली. हे ऐकून चंद्रिकाताईंना फारच वाईट वाटलं. त्या वेळी त्यांनी त्या आजोबांना जेवायला घातलंच पण या प्रसंगामुळे त्यांनी रोटरीमार्फत ‘अन्नपूर्णा योजना’ सुरू करून शंभर गरीब निराधार आजी-आजोबांना मोफत जेवण द्यायला सुरुवात केली.
वसतिगृहात अठराव्या वर्षांनंतर राहायची सोय नसते. त्याप्रमाणे त्यांच्या येथील अंध मुली निराधार होतात. तसंच तिथल्या निराधार वृद्ध स्त्रियांनाही आधार हवा होता. त्या दोघींची एकत्रित सोय व्हावी यासाठी ‘मंगलदृष्टी योजना’ सुरू केली गेली. या अंध मुलींना चटणी बनवणं, मालाचे पॅकिंग करणं अशी कामं देऊन स्वयंपूर्ण व्हायला मदत केली जाते. ‘उद्योगवर्धिनी’च्या मदतीतून बचत गट करताना स्त्रियांनी कर्ज घ्यायचं नाही, असं सांगितलं जातं. सुरुवातीला ‘उद्योगवर्धिनी’तून मदत केली जाते आणि स्त्रिया हळूहळू ते पैसे फेडतात.
‘उद्योगवर्धिनी’ सोडून कोणी जात असेल तर त्याने फक्त स्वत:चा व्यवसाय करण्यासाठीच जायचं. पुन्हा दुसरीकडे जाऊन नोकरी करू नये, असा आग्रह चंद्रिकाताई धरतात. त्यातूनच अनेक मोठे उद्योग आज उभे राहिले आहेत. सुरुवातीला ‘उद्योगवर्धिनी’च्या मदतीने छोटी सुरुवात करत स्वत:च्या पायावर उभे राहून लाखो रुपयांत उलाढाल करणाऱ्या सुमारे ३१० उद्योजिका आज सोलापूर आणि आसपासच्या गावात अभिमानाने जगत आहेत. चंद्रिकाताई आणि ‘उद्योगवर्धिनी’च्या अथक कार्याने आज सुमारे अकरा हजार स्त्री या संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत.
इतक्या भरीव कार्याची दखल विविध संस्थांनी घेतली नाही तरच नवल. चंद्रिकाताईंना आतापर्यंत स्त्री उद्यमी अ‍ॅवॉर्ड-दिल्ली (२०१५), अभिजीत कदम मानवता पुरस्कार-(२०१५), गगन सदन तेजोमय सन्मान-मुंबई (२०१३), प्राज महा आंत्रप्रनर अ‍ॅवॉर्ड (२०१२) या व अशा सुमारे १४८ पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं आहे.
समोर आलेली प्रत्येक संधी व्यवसायात रूपांतर करताना त्यांचं ध्येय मात्र त्यांना पक्कं ठाऊक आहे. त्या म्हणतात, ‘‘आम्हाला बचत गटांच्या मालाचे मार्केटिंग करून विक्रीसाठी सुपरमार्केटसारखे माध्यम उपलब्ध करून द्यायचं आहे. ‘उद्योगवर्धिनी’ने स्वत:चा व्यवसाय करायचा नाही तर उद्योजिका तयार करायच्या आहेत. आत्तापर्यंतच्या प्रवासाने हेच दाखवून दिलं आहे.

आयुष्याचा आणि करिअरचा मूलमंत्र
‘‘प्रत्येक स्त्रीच्या हाताला काम हवं, तिला स्वाभिमानानं जगता यायला हवं. कुटुंबातली एक स्त्री स्वत:च्या पायावर उभी राहिली तर ती संपूर्ण कुटुंबाला उभं करते.’’

उद्योग करू इच्छिणाऱ्या तरुणींसाठी
‘‘समोर येणाऱ्या कोणत्याही कामाला कधी नाही म्हणू नका. कष्ट करून जेवा, फुकट काही घेऊ नका आणि कुटुंब आणि सग्यासोयऱ्यांना घेऊन पुढे चला.’’

(विशेष आभार – फोटो सर्कल सोसायटी – ठाणे)
swapnalim@gmail.com