जय म्हणजे उमरेड-क-हांडलामधला रजनीकांतच. त्याचा रुबाब, त्याची ऐट, त्याच्या अदा, त्याचा आवाज सगळ्यांवरच लोक वेडे असत. सर्वसामान्य माणसे असोत की सेलेब्रिटी, सगळेच त्याला याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी उत्सुक असत. पण गेल्या १८ एप्रिलपासून तो बेपत्ता आहे. हे म्हणजे अघटितच. एखाद्या वाघाची पाहता पाहता शेळी होऊ शकते. उभ्या महाराष्ट्राने हे पाहिलेले आहे. पण एखादा वाघ असा गायब होणे हे म्हणजे आक्रितच. ते कशामुळे झाले, जय नावाचा हा तरणाबांड वाघ असा एकदम कुठे गेला याचा कुणालाही पत्ता नाही. मध्यंतरी वनमंत्री मातोश्रीवर एका वाघासह जाताना दिसले होते. तेव्हा अनेकांना हायसे वाटले होते, की सापडला जय. पण नंतर तो फायबरचा वाघ असल्याचे समजले. मातोश्रीला खूश करण्याची वनमंत्र्यांची ती क्लृप्ती होती. ती कितपत साध्य झाली हे समजू शकले नाही. मात्र त्यातून एक नक्कीच झाले, की आता मातोश्रीमध्ये कागदी वाघ आहे असे कोणीही म्हणू शकणार नाही. म्हणायचेच असेल, तर फायबरचा वाघ आहे असे म्हणावे लागेल. जय मात्र हाडामांसाचा वाघ आहे. सहजासहजी शेळी होणाऱ्यातला तो नाही की त्याने वाघाचे कातडेही पांघरलेले नाही. त्यामुळे प्रबळ स्पर्धा निर्माण झाली म्हणून तो आपले जंगल सोडून अन्यत्र जाणार नाही. तेव्हा उमरेडमधील वाघांची संख्या वाढल्याने तो आपला अधिवास सोडून गेल्याचा वनअधिकाऱ्यांचा दावा चुकीचाच म्हणावा लागेल. पण अन्य कोणा वाघाला नव्हे, तर एखाद्या सिंहाला घाबरून तर तो निमूट निघून गेला नसेल, हा प्रश्न येतोच. शिवाय त्याला आपल्या दहा हजार किमी परिसराच्या राज्यातील इतरांच्या धनदौलतीवर डल्ला मारण्याची खोड जडली होती. अगदी गाडीला जुंपलेले बलही त्याने ठार केले होते. त्यामुळे त्याला अनेक शत्रू होते. त्यांतील कोणी त्याचा काटा तर काढला नाही ना असाही एक संशय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वन्यप्रेमी आहेत. म्हणजे वाघ-सिंहाच्या जबडय़ात हात घालून त्यांचे दात मोजणे हा त्यांचा आवडता खेळ आहे. त्यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घातले पाहिजे. जयच्या गळ्यात राज्याच्या वनखात्याने दोनदा रेडिओ पट्टा अडकवला होता. पण तो खराब झाला आणि जय अधिकाऱ्यांचा डोळा चुकवून उंडारण्यास मोकळा झाला. ही वर्तणूक शिस्तीचे भोक्ते असलेल्या मुख्यमंत्र्यांना नापसंत असेल, तर त्यांनी जयच्या गळ्यात भक्कम अशी रेडिओ कॉलर बसवावी. त्याच्या नख्या कापाव्यात. पंख कातरावेत. परंतु आधी हे तपासकाम सीबीआयकडे सोपवावे. जयला शोधावे आणि त्याचबरोबर त्याच्या निघून जाण्याच्या कारणांचाही पत्ता लावावा. त्यासाठी जयबरोबर वावरणाऱ्या अन्य वाघ वा वाघिणींकडे चौकशी केली तर बरेच काही समजू शकेल. काहीही असो. जयचा तपास हा लागलाच पाहिजे. अखेर तोही राज्याच्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहे.