गोव्यातील भाजप सरकारचे मुख्यमंत्री
मनोहर पर्रिकर हे राजकारणाच्या पठडीबाहेरचे, आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व. आयआयटीमधून अभियंता झालेले, उद्योग-व्यवसायात असलेले आणि प्रामाणिकपणा व सचोटीशी कोणतीही तडजोड न करणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा लौकिक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेल्या या कार्यकर्त्यांला संघाची शिकवण आणि जडणघडणीतील योगदान महत्त्वाचे वाटते. गोव्यासारख्या छोटय़ा राज्याची धुरा हाकताना अगदी संघाचे कार्यकर्ते असल्यापासून जे अनुभव आले, जीवनमरणाचे प्रसंग आले, क्वचित एखाद्या प्रसंगी तडजोड करावी लागली, याबाबत पर्रिकर यांनी ‘लोकसत्ता आयडिया एक्चेंज’ मध्ये मनमोकळेपणे माहिती दिली. नो-पार्किंगमध्ये मुलाने गाडी उभी केल्यावर अगदी मुख्यमंत्री असतानाही दंड भरले. शुद्ध चारित्र्य आणि नैतिक अधिष्ठान असलेल्या व्यक्ती दुर्दैवाने कमी असणे, ही देशापुढील सर्वात मोठी समस्या असल्याचे परखड मत त्यांनी व्यक्त केले. अण्णा हजारेंचे आंदोलन, आयुष्यात जपलेली मूल्ये, पुढील वाटचाल याविषयी मनमोकळेपणे संवाद साधला. राजकारणातही शुद्ध चारित्र्य जपता येते, यावर त्यांचा विश्वास आहे. उलट, राजकारणात भ्रष्टाचार करण्याची वेळ आली, तर राजकारणाचाच आपण त्याग करू, असेही ते ठामपणे सांगतात. पर्रिकर यांच्या विचारमंथनाचे हे अंश..
प्रामाणिकपणा व चारित्र्याबाबत तडजोड नाही
प्रत्येक माणूस आकलन झालेल्या तत्त्वज्ञानानुसार आपल्या जीवनात काही तत्त्वे पाळतो. माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, पण प्रामाणिकपणा, चारित्र्य आणि मूलभूत तत्त्वांबाबत कोणतीही तडजोड मी करणार नाही. मी कोणतेही काम करून घेण्यासाठी कोणालाही लाच देणार नाही, असे व्यवसायात आल्यावर मी ठरविले होते. त्यानुसार आजपर्यंत आचरण केले आहे. त्यामुळे सुरुवातीला सहा महिने मला उद्योगासाठी वीज कनेक्शनही मिळाले नव्हते. पण मी पैसे दिले नाहीत. तरी मी आज उद्योगधंद्यात आहे. अगदी जीवनमरणाचा प्रश्न आला, तर व्यवसायात टिकून राहण्यासाठी तडजोड करीन. पण तशी वेळ येणार नाही. एकदाच अशी जीवनमरणाची वेळ आली होती तेव्हा केंद्रीय वीज प्राधिकरणाच्या आवश्यक परवानग्या मिळविण्यासाठी योग्य ती पावले टाकण्याची (लाच देण्याची) जबाबदारी मी माझ्या सल्लागारांवर टाकली होती. नाहीतर कंपनीच सुरू झाली नसती. त्या घटनेला अनेक वर्षे झाली. मुख्यमंत्री झाल्यावर तशी वेळ आली नाही. माझा व्यवसाय तांत्रिक क्षेत्रातील आहे. ऑर्डर मिळविण्यासाठी मी कधीही पैसे दिले नाहीत. राजकारण व व्यवसाय यात मी अंतर ठेवले आहे. नितीन गडकरी यांच्याबाबत ‘पूर्ती’वरून जे घडले, त्यात राजकारण आहे. मी काही चुका केल्या आणि ३०-४० वेळा दंडही भरले. अगदी मुख्यमंत्री असतानाही पाच-सहा वेळा मी दंड भरले. माझ्या मुलाने नो-पार्किंगमध्ये गाडी उभी केली होती. पण मी मुख्यमंत्री आहे, असे न सांगता दंड भरला. पोलीस अधिकारी सूर्यवंशीला येथे मारले, तसे मारायलाही गेलो नाही.
माझ्या पदाचा वापर करून कोणतेही वैयक्तिक लाभ, सवलती घ्याव्यात असे मला कधीही वाटत नाही. मुख्यमंत्री म्हणून मला विमानप्रवासात श्रेणीवाढ करून घेण्याचा नियमानुसार अधिकार आहे. मी विमानप्रवास भरपूर करीत असल्याने विमान कंपनीकडूनही श्रेणीवाढ मिळू शकते. पण मी इकॉनॉमी श्रेणीतून विमानप्रवास करतो. मी सरकारी तिजोरीतून नाही, तर स्वत:च्या खिशातून वर्षांला ३ लाख रुपये विमान प्रवासावर खर्च केले आहेत. तुमचे वर्तन कसे आहे, ते प्रत्येकाने पाहिले पाहिजे. माझे अनुकरण कोणी राजकारणी करतील, असे वाटत नाही. पण संपूर्ण नाही, तरी ७०-८० टक्के तरी अनुकरण करतील. सरकारी तिजोरीतील पैसे वाया घालवू नये, असे नैतिक दडपण अन्य नेत्यांवर कदाचित येईल. निदान त्यांना तसे सांगण्याचा नैतिक अधिकार मला येईल, असे वाटते. नैतिक अधिकार हा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. जनशक्ती तुमच्यामागे असल्याशिवाय किंवा जनतेचा पाठिंबा असल्याखेरीज तुम्हाला कोणीही राजकारणात विचारणार नाही. नैतिक अधिकारातून जनशक्ती तुमच्या पाठीशी उभी राहते. लोकांचा पाठिंबा नसेल, तर त्यांचा दिगंबर कामत होतो. त्यांना जनाधार नव्हता, केवळ काही आमदारांचा पाठिंबा होता. महाराष्ट्रातील काही नेत्यांची अवस्था तशीच आहे. त्यामुळे एखादा नियंत्रणाबाहेर जातो. काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठा फरक आहे. भाजपमध्ये कोणी चुकीची गोष्ट केली, तर त्याला प्रमाणपत्र मिळणार नाही. त्याला हळूच बाजूला काढले जाते. केवळ राजकारणी, नोकरशहा यांनाच दोष देऊन चालणार नाही. जनतेमधील नैतिकता राजकारण्यांमध्ये प्रतिबिंबित होत असते. प्रसिद्धीमाध्यमे तरी संपूर्ण स्वच्छ आहेत का? मी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना केवळ एकदाच वैयक्तिक खर्चाने जेवण दिले आहे. मला प्रसिद्धीमाध्यमांसाठी काही करायचे असेल, तर वैयक्तिक लाभासाठी किंवा माझ्या बाजूने लिहिण्यासाठी काहीही करणार नाही. शासनाकडून प्रसिद्धीमाध्यमांसाठी काही योजना केल्या. माझ्या स्वेच्छाधिकारातून व वैयक्तिक लाभासाठी काही केले नाही.

राजकारणात मूर्तिपूजा होणारच
माझ्या बाबतीत ‘वन मॅन आर्मी’ असे बोलले जाते. त्याचे मी समर्थन किंवा स्पष्टीकरण करीत नाही. मला दररोजचे १६-१८ तास आणि आठवडय़ाचे सातही दिवस काम करण्याची सवय आहे. मी करीत असलेले शारीरिक कष्ट आणि बुद्धीचा गुणाकार केला, तर कर्तृत्वाच्या बाबतीत मी इतरांहून चारपट पुढेच जाणार. मी  स्वतच्या कामाचा वेग कमी करावा का? मुख्यमंत्री झाल्यापासून गेल्या दीड वर्षांत मी एकही दिवस आजारी पडलो नाही. ही दैवी देणगी आहे. मी रात्री उशिरापर्यंत काम करतो. माझ्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या कमी आहेत व स्वतसाठी कमी वेळ द्यावा लागतो. हीच बाब नरेंद्र मोदींच्या बाबतीतही आहे. भाजपशासित राज्यात मुख्यमंत्र्यांची कार्यक्षमता व प्रामाणिकपणा यातून वेगळे चित्र दिसते. माझे सहकारीही काम करतात. यंत्रणाही तयार करीत आहे. कोणाही मंत्र्यांच्या कामात मी हस्तक्षेप करीत नाही. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. मुख्यमंत्र्याचा सल्ला घ्यावा, असे मंत्र्याला वाटले, तर त्यात गैर काय? पूर्वी महाराष्ट्रात वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांची कामाची काय पद्धत होती? सरकार कामकाजाची पद्धत ठरविते आणि ते गेल्यावर पद्धत बदलते. मतदार हुशार असतात. ब्रिटिश जनतेने चर्चिल यांना युद्धासाठी निवडले. पण नंतर निवडले नाही. निर्गुण निराकार देवाची प्रार्थना करता येत नाही. सरकार म्हटले की व्यक्तीचा चेहरा आलाच. समोर मूर्त असल्याशिवाय पूजा करता येत नाही, राजकारणात मूर्तिपूजा होणारच. सरकारमध्ये दुसरा, तिसरा क्रमांक येणारच. पण चेहऱ्याशिवाय सरकार असूच शकत नाही. सरकारला चेहरा हवाच.

संघाचे योगदान मोठे
माझ्या जीवनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिकवणुकीचे योगदान मोठे आहे. देशसेवा करण्यासाठी आणि समाजसेवा करण्यासाठी मी मुख्यमंत्री झालो आहे. ही संघाची शिकवण आहे. वैयक्तिक लाभासाठी मुख्यमंत्री झालो असतो, तर पदाचा वापर करून पैसा कमावला असता. मी आयआयटीत शिकलो. आयआयटी व राजकारणाचा तसा काही संबंध नाही. मी लहानपणापासून म्हणजे १९६७ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होतो. आयआयटीत अनौपचारिकपणे शाखा चालवायचो. मी म्हापसा येथे वयाच्या २४ व्या वर्षी सर्वात तरुण संघचालक होतो. गोव्यात भाजपला ०.४१ टक्के मते मिळाली होती. त्यामुळे भाजपला मदत करण्याची जबाबदारी देण्यात आली. लोकसभेसाठी पक्षाला उमेदवार मिळत नव्हता. मला उमेदवारी दिल्यावर घरी गोंधळ झाला. मी गोव्यात १० वर्षांत भाजपचा मुख्यमंत्री झाल्यावर राजकारणातून बाहेर पडेन, असे पत्नीला सांगितले. पण १० वर्षे झाल्यावर मी मुख्यमंत्री झालो, पण पत्नी हयात नव्हती. माझ्या जीवनात संघाचे मोठे योगदान आहे. माझ्याकडे संघटनकौशल्य होते. संघाचे काम गोव्यात चांगले आहे. गंगाजल रथयात्रा, राम जन्मभूमी आदी आंदोलनांत सक्रिय भाग घेतला. रामजन्मभूमीच्या आंदोलनास पाठिंब्यासाठी स्वाक्षरी घेण्यासाठी मगोपचे नेते रमाकांत खलप यांच्याकडे गेलो. तेव्हा मी सही केली तर भारताला पेट्रोल मिळणार नाही, असे त्यांनी सांगितले. प्रतापगडावर जाऊन शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन खाली आल्यावर त्यांनी अफझलखानाला श्रद्धांजली वाहिली होती. अशा दोन-तीन घटनांमुळे लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. धर्मनिरपेक्षता म्हणजे हिंदूंचा द्वेष असे नाही. गोव्यात कॅथलिकांची लोकसंख्या मोठी असून सामाजिक योगदानही चांगले आहे. गोव्यात त्यांच्यामुळे काँग्रेसची सरशी होत होती. १९९१ मध्ये भाजप नेते प्रमोद महाजन लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार शोधत होते. मला तिकीट मिळाले, निवडणूक हरलो, पण अनामत रक्कम राखली. पण नंतर आमदार म्हणून निवडून आलो. गोव्यात संघाच्या १०० शाखा होत्या. पण तरीही मतदान भाजपला न होता महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला होत होते. तेथे धर्मातराचा विषय जुना असला तरी आज तो नाही. सामाजिक जाणीव म्हणून इतिहास माहीत असायला हवा. कॅथलिक हिंदूमध्ये सामाजिक दुही नाही. मलाही हिंदू असल्याचा अभिमान आहे. पण प्रशासन सांभाळताना मी धर्मनिरपेक्ष आहे. हिंदू, मुस्लिम, कॅथलिक यांचे समान हक्क आहेत. मतदानाचा विचार करून एखाद्याचे लांगूलचालन करणे चुकीचे आहे. मी कोणत्याही धर्माचा तिरस्कार करीत नाही. संघातही हीच शिकवण दिली जाते. रामराज्याचा अर्थ काय? रामराज्य खरे तर भरताने केले. त्याने राजा म्हणून नाही, तर रामाच्या पादुका ठेवून विश्वस्त नात्याने राज्यकारभार केला. त्याच पद्धतीने राज्यकर्त्यांनी जनतेचे विश्वस्त म्हणून काम पाहिले पाहिजे. माझ्या वैयक्तिक पैशांमधून कदाचित वायफळ खर्च होईल. पण राज्याच्या तिजोरीतील एकही पै फुकट जात नाही. संघाच्या शिकवणीतून मी हे शिकलो. मुख्यमंत्रीपदावर दोन वर्षे राहूनही मला भ्रष्टाचार करण्याची वेळ आली नाही. राजकारणात भ्रष्टाचार करण्याची वेळ आली, तर मी राजकारण सोडेन.

अडवाणींबाबत बोललोच नाही
ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याबाबत मुरलेल्या लोणच्याच्या उपमेमुळे गदारोळ झाला होता. पण मी अडवाणींबाबत बोललोच नव्हतो, तर सचिन तेंडुलकरसंदर्भात ती उपमा दिली होती. पण इकडची वाक्ये तिकडे जोडून वेगळाच अर्थ काढण्यात आला. सचिनने श्रीलंकेविरुद्ध १३८ धावा केल्या होत्या. त्याबाबत विचारता लोणचे मुरले की चांगले लागते, पण मर्यादेपेक्षा ठेवले की खराब होते, असे मी त्याच्याबाबत बोललो होतो. अडवाणींबद्दल नंतर पुढे वेगळ्या मुद्दय़ांवर बोललो होतो. दोन्ही मुद्दे जोडून लोणच्याचे उदाहरण अडवाणींबद्दल दिल्याचे सांगण्यात आले. ते चुकीचे होते. मी सचिनचा चाहता आहे. पण आता बस्स झाले, त्याने निवृत्त व्हायला हवे, असे लोकांनी म्हणू नये, असे वाटले होते.

 न्यायव्यवस्थेतही भ्रष्टाचार शिरेल
खाण उद्योग चालविणे ही न्यायालयाची जबाबदारी नसून आमची आहे. मी लोकांना उत्तरदायी आहे. प्रशासन चालविणे ही सरकारची जबाबदारी असून न्यायालयाची नाही. आम्हाला आमचे काम करू द्या, हेच सर्वोच्च न्यायालयाला मी सांगितले आहे. ज्यांनी गैरव्यवहार केले, ते सरकार बदलले आहे. आम्ही अहवाल देतो व तपासावर तुम्ही नियंत्रण ठेवा, असे न्यायालयास स्पष्ट केले आहे. निविदा काढण्याची वेळ न्यायालयांना आली नाही, म्हणून तेथे भ्रष्टाचार नाही. पोलिसांच्या बदल्याही तांत्रिकदृष्टय़ा महासंचालक करतात, मग पोलिसांच्या कृतीला गृहमंत्री जबाबदार कसे? केवळ राजकारणी भ्रष्टाचारी असे बोलले जाते. पण प्रशासकीय किंवा पोलीस अधिकारी आणि न्यायालयाने नेमलेले अधिकारी स्वच्छ असतातच असे नाही. त्यामुळे प्रशासन चालवायला लागले, तर भ्रष्टाचाराची कीड न्यायालयासही लागेल. राज्यघटनेने प्रत्येक घटकाची जबाबदारी ठरवून दिली आहे. नोकरशहांनी आपल्या मर्यादा ओलांडू नयेत, राजकारण्यांनी न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप करू नये आणि न्यायालयाने प्रशासन चालवू नये. नाही तर न्यायव्यवस्थेतही भ्रष्टाचार शिरेल. हे अधिक धोकादायक आहे.

* अण्णांचे आंदोलन योग्य, पण दिशा चुकीची
लोकायुक्ताच्या मुद्दय़ावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या आंदोलनांमुळे देशाचे नुकसान झाले आहे. त्यांचा मुद्दा व मागणी योग्य आहे, पण दिशा चुकीची आहे. लोकायुक्त हा भ्रष्टाचाराच्या रोगावरील एकमेव इलाज आहे, असा सर्वसामान्य जनतेचा समज त्यांनी करून दिला. अनेक प्रभावी नियंत्रण यंत्रणांप्रमाणे लोकायुक्त ही यंत्रणाच आहे. या पदाचे यश हे अन्य कोणत्याही यंत्रणेच्या यशापयशाप्रमाणेच आहे. लोकायुक्त कदाचित चांगला व स्वच्छ चारित्र्याचा असेल. पण त्यांचे कर्मचारी व अधिकारी चांगले असतीलच असे नाही. प्रामाणिक आणि स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्ती सर्व क्षेत्रात हव्या आहेत. पण दुर्दैवाने देशात अशा व्यक्ती मिळत नाहीत. ही देशापुढील सर्वात मोठी समस्या आहे. माझ्या मुख्यमंत्री कार्यालयात तीन जागा रिक्त आहेत. कारण मुख्यमंत्री कार्यालय हे महत्त्वाचे आणि अधिकार असलेले कार्यालय आहे. तेथे काम करणारा अधिकारी कार्यक्षम तर हवाच, पण तो स्वच्छ चारित्र्याचा आणि प्रामाणिकही असला पाहिजे. त्याने पदाचा दुरुपयोग करता उपयोगी नाही. या निकषांनुसार पात्र व्यक्ती न मिळाल्याने तीन पदे मी अजून रिक्तच ठेवली आहेत. नियमांचे पालन केले पाहिजे, असे अगदी वाहनचालकालाही मी सांगतो. पण त्याने नो-पार्किंगमध्ये गाडी उभी केली, तर दोष मुख्यमंत्र्यांवरच येतो. तुमची कुवत किंवा क्षमता, प्रामाणिकपणा आणि निर्णयक्षमता याआधारे तुम्ही सुप्रशासन देऊ शकता आणि त्यावर तुमचे यशही अवलंबून असते. चारित्र्य हे सर्वात महत्त्वाचे आहे. उपलब्ध यंत्रणेत राहूनच तुम्ही चांगले काम करून दाखवू शकता. व्यक्तीची बाह्य़ वर्तणूक, व्यक्तिमत्त्व यांना भुलून तुम्ही फसवू शकता. बाह्य़ गोष्टींवरून तो चांगला वाटला, तरी प्रत्यक्षात तो तसा असेलच असे नाही. एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाची भुरळ पडली नाही तरी त्याच्याकडे प्रामाणिकपणा व हुशारी असू शकते. माझी वागणूकही सुरुवातीला थोडी कडक होती. पण मी माझ्यात सुधारणा करीत व्यक्तिमत्त्व घडविले आणि आता खूपच सौम्य झालो.  

 *  स्वेच्छाधिकाराचा दुरुपयोग नको
मुख्यमंत्र्यांना स्वेच्छाधिकार हवेतच. पण ते काळजीपूर्वक वापरले पाहिजेत. तुम्हाला मिळालेली शिकवण व विचार कसे आहेत, यावर तुमचे स्वेच्छाधिकार तुम्ही कसे वापरता, हे अवलंबून असते. मुख्यमंत्री निधीतून मी आतापर्यंत करोडो रुपये वाटले आहेत. पण सर्व रक्कम धनादेशाने दिली आहे. माझे कर्मचारी किंवा त्यांचे नातेवाईक यांना हे पैसे दिले नाहीत. योग्य गरजूंनाच ती रक्कम दिली जाईल, याची काळजी घेतली. त्याचे मला समाधान आहे. एकाही पैचा दुरुपयोग केलेला नाही किंवा अपात्र व्यक्तीला मदत दिलेली नाही. शेवटी कुणावर तरी विश्वास ठेवला पाहिजे. मी गोव्यातील जनतेलाही सांगितले आहे की, तुम्ही सरकारवर विश्वास ठेवा
तरच वेगाने विकास होईल. गोव्यात काही गट सरकारविरोधात असंतोष किंवा नकारात्मक वातावरण निर्माण करीत असतात. वर्तमानपत्रे सोडली, तर खासगी दूरचित्रवाणी, वाहिन्याही देशभरात नकारात्मक वातावरण तयार करतात. ते विकासाला बाधक आहे. ज्याने चुकीचे केले, त्याला शिक्षा व्हायलाच हवी. पण प्रत्येक राजकारणी वाईटच असतो, अशी प्रतिमा तयार करणे किंवा प्रत्येकाला एकाच पारडय़ात तोलणे चुकीचे आहे. अनेकांनी लोकांसाठी चांगले कार्य केलेले आहे.
*  जातीपातीशी संबंधच आला नाही
जेव्हा तुम्ही लोकांना वेगळ्या नजरेतून बघता, तेव्हा जात हा विषय येतो. जेव्हा मी आयआयटीमध्ये गेलो, तेव्हा एकदा जीएसबी आहेस का, अशी जातीची विचारणा झाली होती. तेव्हा मला माहीत नाही, असे सांगितले होते. घरी व संघाच्या शाखेत सर्वाना समान वागणूक असे. माझ्या आईच्या मैत्रिणी सर्व जातिधर्माच्या होत्या. राजकीय जीवनात कुठेही माझ्या जातीकडे पाहून कोणतेही वेगळे अनुभव आले नाहीत. तुमच्यासाठी कोण प्रामाणिकपणे काम करतो, हीच जात समाजाला समजते. चांगले किंवा वाईट अशा दोनच बाबी मला समजतात. माझ्या उद्योगासाठी एकदा मला इलेक्ट्रिकल मोटर्स हव्या होत्या. मुंबईत एका व्यापाऱ्याकडे किंमत ठरविल्यावर त्याने पैसे मागितले. मी धनादेश दिल्यावर त्याने तो नाकारला. मला तो अपमान वाटला. पैसे नसल्याने माझा धनादेश वटला नाही, असे अजूनपर्यंत कधीही झाले नाही. पण मी विचार केल्यावर मला माझेच वागणे चुकीचे वाटले. तो व्यापारी योग्य होता व अन्य गिऱ्हाईकांप्रमाणे त्याने मला वागणूक दिली होती. त्याला माझा प्रामाणिकपणा कसा माहीत असणार? पण गेल्या ३-४ वर्षांत माझा प्रामाणिकपणा अनुभवल्यावर त्याच्याशी चांगले संबंध निर्माण झाले. यामुळे मला जातीचा उपयोग कधीच करण्याची वेळ आली नाही. गोव्यातील खाण उद्योगात सारस्वत समाज असला तरी तेथे पैसे हीच जात आहे.
राष्ट्रीय राजकारणात रस नाही
मला राष्ट्रीय पातळीवर किंवा दिल्लीच्या राजकारणात अजिबात रस नाही. तेथे राजकारण घाण झाले आहे. तिकडे तुम्ही कोणाचाही चेहरा पाहून भुलू नका. ‘पूर्ती’मध्ये काय राजकारण झाले? आता सगळे कुठे गेले. तेथे काही गट किंवा लॉबी राष्ट्रीय राजकारणात हस्तक्षेप करीत असतात. मी स्पष्टवक्ता असल्याने अनेक वादंग निर्माण होतील. मतदार विचारी आहे. वृत्तपत्रे साधकबाधक विचार करीत असली तरी दूरचित्रवाणी वाहिन्या उथळ आहेत. अभिनेता संजय दत्तच्या माफीवर किती तास चर्चा केली. बॉम्बस्फोट तपासातील एका गुप्तचर अधिकाऱ्याशी माझी चर्चा झाली. संजयच्या सहभागाची माहिती उघड केली तर त्याची पाच वर्षांची शिक्षा माफ करावी, असे कोणी म्हणणार नाही.

नैतिकतेचे धडे नकोत
स्वत: खाऊ नका आणि कोणालाही खाऊ देऊ नका. पण राजकारणात कोणाच्याही मागे लागू नका. प्रत्येकाच्या मागे जाऊन नैतिकतेचे धडे देण्याची आवश्यकता नाही. एखादी गैर बाब समजल्यावर गप्प बसावे, असे नाही. यंत्रणा सुधारावी. सरकारी कामाची बिले काढण्यात महाराष्ट्रात भ्रष्टाचार होतो व टक्केवारी द्यावी लागते. गोव्यात १०० टक्के बिले आरटीजी माध्यमातून काढली जातात. भ्रष्टाचाराचा प्रश्नच नाही.
छंद जोपासायचे आहेत
मी समाजासाठी भरपूर केले असून मलाही आता निवृत्तीचे वेध लागले आहेत. आता स्वत:साठी काही करावे, असे वाटत आहे. वाचन, शेती, मत्स्यपालन आदींमध्ये रस आहे. ज्यांना नवनवीन संकल्पना राबविण्यात आनंद आहे, त्यांना हे आवडणारच. मी घराच्या परसदारी अनेक कृषिप्रयोग केले आहेत. मिरच्या, किलगड, कांदे, केळी आदी पिके घेतली आहेत. ‘बी’तून निर्मितीचा आनंद बघायला आवडते. त्यातूनच कल्पनाशक्ती येते.
 या कार्यक्रमाचे व्हिडीओ पाहण्यासाठी – http://www.youtube.com/LoksattaLive येथे भेट द्या.