उत्तर प्रदेशातील देवरियातील प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर थेट निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या उत्तर प्रदेशातील वीज पुरवठ्याबद्दलच्या विधानाला अखिलेश यादव यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'पंतप्रधानांनी विजेच्या तारांना हात लावून त्यात करंट आहे की नाही, हे तपासून पाहावे,' असे म्हणत अखिलेश यादव यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. 'आम्ही वाराणसीत २४ तास वीज देत आहोत. पंतप्रधान खोटी विधाने करुन लोकांची दिशाभूल करत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी गंगा मातेची शपथ घेऊन उत्तर प्रदेशात वीज दिली जाते आहे की नाही, ते सांगावे,' असे आव्हान अखिलेश यादव यांनी दिले आहे. 'पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेऊन गरिब आणि मजुरांना त्यांच्याच पैशांसाठी रांगेत उभे केले. बँकेसमोर उभे राहिलेल्या लोकांना जीव गमवावा लागला,' असे म्हणत अखिलेश यादव यांनी नोटाबंदीवरुन पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. पैसा काळा नसतो, तर व्यवहार काळा असतो, असेही अखिलेश यांनी म्हटले आहे. 'नोटाबंदीनंतर बँकेबाहेर उभे राहिल्यामुळे जीव गमवावा लागलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना समाजवादी पक्षाच्या सरकारने दोन दोन लाखांचे अर्थसहाय्य दिले. भाजपकडून जनतेला फक्त खोटी आश्वासने दिली जातात आणि स्वप्ने दाखवली जातात. त्यामुळे लोकांनी सावधान राहायला हवे,' अशा शब्दांमध्ये अखिलेश यादव यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. पंतप्रधान मोदी सूट घालतानादेखील नक्कल करतात, असे म्हणत अखिलेश यादव यांनी पंतप्रधानांना टोला लगावला. 'जो पक्ष सरकार स्थापन करणार असतो, त्या पक्षाला शेवटच्या टप्प्यात सर्वाधिक मतदान होते,' असेदेखील अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.