उत्तराखंडमध्ये काँग्रेसला धक्का देत ज्येष्ठ नेते एन. डी. तिवारी यांनी बुधवारी आपला मुलगा रोहित शेखरबरोबर भाजपमध्ये प्रवेश केला. एन. डी. तिवारी आणि रोहित शेखर यांनी नवी दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. परंतु, तिवारी यांची दिशाभूल करण्यात आली असून त्यांना भाजपमध्ये प्रवेश केल्याचे माहितही नसेल, असा दावा तिवारी यांचे भाचे मनीष तिवारी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. ते म्हणाले, त्यांचे वय खूप झाले आहे. त्यांची शारीरिक आणि मानसिक स्थिती त्यांना साथ देत नाही. यासंबंधीचे तुम्ही त्यांचे वैद्यकीय अहवाल पाहू शकता. त्यांना स्वत:लाच भाजपमध्ये प्रवेश केल्याचे माहित नसेल. त्यांना एकट्याने विचारून पाहा, तुम्हाला त्याचे उत्तर मिळून जाईल, असे त्यांनी म्हटले. मी हैराण झालो आहे. मला वाटतं भाजपमध्ये प्रवेश करण्यावरून त्यांची दिशाभूल करण्यात आली आहे. ज्यांचा यामध्ये स्वार्थ आहे, त्यांनीच त्यांची दिशाभूल केली आहे, असे सांगत त्यांनी रोहित शेखर यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. हे खूप दुर्दैवी आहे. तिवारी कुटुंबीयांसाठी अत्यंत वाईट घटना आहे. तिवारी असे पाऊल उचलतील असे आम्हाला कुणालाच वाटले नव्हते. आम्ही देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढाई लढलेली आहे. ज्यांचे यात हित होते त्यांनीच हे केले आहे. त्यांना राजकीय फायदा हवा आहे, असे ते म्हणाले. तर दुसरीकडे रोहित शेखर यांनी मात्र याचा इन्कार केला असून माझ्या वडिलांना काँग्रेसकडून योग्य सन्मान दिला जात नव्हता असा आरोप केला. काँग्रेसला त्यांचा विसर पडला होता, असे ते म्हणाले. एन. डी. तिवारी यांनी भाजपचे सदस्यत्व घेताना त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी उज्वला तिवारी आणि मुलगा रोहित शेखर उपस्थित होते. तिवारी हे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. निवडणुकीपूर्वी ते भाजपमध्ये सहभागी झाल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जाते.