मी शेंडेनक्षत्रासारखा एकटाच घुमत असायचो. त्या भ्रमणाचा एक मुक्काम ‘अनुपम’, ‘सम्राट’ किंवा ‘टोपीवाला’ असं जवळचं एखादी थिएटर असायचं. ‘राम-श्याम’ असं एक जाळं थिएटरही त्या काळात उपनगरात होतं. बकाल मनाची कंगाल माणसं अनेकदा आसपास बसलेली असत. ती स्वप्नं विकत घ्यायला स्वस्तात मस्त रंजनाला तिथं आलेली असत. पडद्यावरच्या यातना पाहून त्यांची मनंही मोकळी व्हायची. म्हणजे आसवं वाहू लागायची. आपलीच सुखदु:खं पडदा दाखवतो अशी भावना व्हायची. पैसेवाल्या पोरीबाळीही काळ्या बाजारात तिकिटं घेऊन राजेश किंवा अमिताभसाठी थिएटरचा काळोख जवळ करायच्या. आमच्या वाडीतल्या पपीला मात्र ‘शशी’ आवडायचा. मला पपी आवडायची. त्यामुळे मी ‘शशी’सारखं दिसायचा, तसा बेलबॉटम वापराचा प्रयत्न करायचो, पण जमायचं नाही. पपीला मी ‘बेबी नंदा’ समजू लागलो. तिच्या बापसाने एकदोनदा मला भयंकर दम भरला. मी गणितात कायम नापास होतो हे त्याला पपीनेच सांगितलं असावं. पण मला सांगा, हृदयापासून प्रेम करण्याचा गणितात फेल जाण्याशी संबंध काय? पण हे विचारायला पपीच्या अगडबंब बापासमोर मी इतका वेळ टिकत नसे. धूम ठोकत असे. त्याला टरकत असे. धूम ठोकण्याचे प्रकार दोनतीनदा झाले. धूम भाग १, धूम २, धूम ३ असे चित्रपट हल्लीही येऊन गेले म्हणे. त्या काळी प्रेमिकांचं वाहन ‘सायकल’ हे होतं. मला एका स्लोगन कवितेवर सायकल बक्षीस मिळाली होती, हे पपीचा बाप जमेत धरत नव्हता. ‘अनाडी तो अनाडी!’ असं मी म्हणायचो. अचलपूरच्या बारबुद्धे नावाच्या होऊ घातलेल्या तरुण शिक्षकाला अगणित पत्रं ‘पेन फ्रेंड’ म्हणून मी त्याकाळी पाठवायचो, पण हे पपी प्रकरण त्याच्यापासूनही मी लपवून ठेवलं होतं. कॅलेंडरं बदलत गेली आणि शशी, शम्मी मागे पडले. राजेश खन्नाचं सुपरस्टारपद ढासळलं. राज कपूरचा ‘जोकर’ इतका सरस आणि संगीतरचनांच्या दृष्टीने उजवा असूनही कोसळला. ‘लिबर्टी’सारख्या पॉश चित्रपटगृहाकडे जाऊन इंग्रजी बोलल्यासारखं करून इंग्लिश चित्रपट बघण्याची माझी आणि शाळासोबती पक्या प्रभूची हौस न्यूनगंडातूनच आलेली असावी. इंग्रजीला आपण कधी थेट भिडू शकत नाही. नडूही शकत नाही. एक ‘कॉम्प्लेक्स’ घेऊनच आपण सगळे भिडू, काम करतो. ‘फ्री प्रेस’च्या ‘बुलेटिन’मध्ये माझी इंग्रजी पत्रं छापून आल्यानंतर मला सॉलिडच काहीतरी गेट्र वाटलं होतं. ते कणसासारखे कोवळे दिवस उगवले, मावळले. ऋ तू पुढे पुढे सरकत निघून गेले. मिथुन चक्रवर्तीची शरीरयष्टी ‘मृगया’सारख्या सिनेमात सगळ्यांच्या नजरेत भरली होती. त्याच्यासारखं शरीरसौष्ठव कमावण्याचा प्रयत्न वाडीतली पोरं करत. तो गरीब लोकांचा अमिताभ होता, पण ती ‘उंची’ गाठू शकला नाही. ‘टारझन’ आल्यानंतर जिमला जाणाऱ्या जवान पोरांचा हेमंत बिर्जे हा आदर्श झाला. कोणताही मराठी तरुण अगदी आमच्या (गोरे) गावातला व्यायामपटू ‘संजीवा’ (दाभोळकर) जरी ‘जंगलब्युटी’सारख्या चित्रपटात पडद्यावर आला, तरी आमची टीचभर छाती अभिमानाने फुगायची. किमी काटकरला पाहून श्वास फुलायचे. आता आयुष्याच्या उतरणीवर वाटते, किती बालिश असतं तारुण्य! जीवनाच्या क्षणभंगुरतेची त्या चमकदार चढावावर जाणीवच होत नाही. कॉलेजात शिकून घेतलेला सात्र्चा ‘अस्तित्ववाद’सुद्धा आम्ही हसण्यावारी न्यायचो. काळ ही अशी शक्ती आहे की प्रत्येक ताऱ्याचं तेज फिकट बनवते आणि नंतरचा अंधार बिकट असतो. शांता हुबळीकरांचं वृद्धाश्रमातलं जीवन तर वृत्तपत्रातही छापून आलं होते. ‘कशाला उद्याची बात’ असं म्हणून चालत नाही नं बाप्पा! बचत, गुंतवणूक, पैसा राखून ठेवणं हे कलावंतानेही करायलाच हवं. साधना आणि नंदा जगाचा निरोप घेऊन गेल्या. तेव्हा माझ्या आसपास वावरणाऱ्या विद्यार्थिनींना कोकणात ठाऊकही नव्हतं की, त्या कोण आणि त्यांचं काय ग्लॅमर होतं! ‘साधना कट’ केवढा गाजला होता. सौंदर्य साबणांवर नंदाचा कर्नाटकी चेहरा दिसायचा. राजेंद्रकुमारच्या ड्रायव्हरचा मला माझा सिनेमावरचा लेख वाचून फोन आला, पण राजेंद्रकुमारच आजच्या पोट्टय़ांना ठाऊक नाही. त्याचं काय करायचं? माधव गवाणकर - response.lokprabha@expressindia.com