डॉ. नंदू मुलमुले यांचे अभिनंदन. त्यांनी लिहिलेला ‘फिर भी जिये जाते हैं’ हा लेख वाचला. ९-१५ ऑक्टोबर जागतिक मानसिक सप्ताहानिमित्त आपण अन्वीकराच्या रूपाने समाजातील वास्तव वाचकांच्या समोर मांडलेत. एक दुर्लक्षित पण महत्त्वाच्या समस्येची जाणीव आपण करून दिलीत. अशा अनेक कुटुंबांना आपण आधार देत असल्याबद्दल अभिनंदन. - मारुती बनसोडे, नळदुर्ग, उस्मानाबाद मार्गदर्शक लेख ‘शिकू आनंदे..’ या सदरात २६ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेला ‘जाऊ व्यावसायिकांच्या भेटी..’ हा रती भोसेकर यांचा आणखी एक सुंदर लेख वाचला. नियमित शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमापूर्वी हल्ली मुलांना बालवर्गात दाखल केले जाते. बालवर्गाच्या मुलांमध्ये शाळेत जाण्याची गोडी निर्माण करणे तसेच मुलांच्या मनात शाळेविषयी आकर्षण निर्माण व्हावे या हेतूने ‘शिकू आनंदे’ च्या लेखिका या सदराद्वारे विविध प्रकारच्या उपक्रमांची माहिती देत असतात. या सदरातून बालवर्गासाठी विविध प्रकारचे उपक्रम आयोजित करणे, त्यात वर्गशिक्षकांसह, कधी कधी पालकवर्ग यांच्यासह बालवर्गातील मुलांनाही सहभागी करून ते उपक्रम कशा प्रकारे यशस्वी करून दाखविता येऊ शकतात याविषयी उपयुक्त अशी माहिती देत असतात. म्हणून खरे तर या सदरातील सर्वच लेख बालवर्गातील मुले, पालक यांच्यासह बालवर्गाच्या तमाम शिक्षकवर्गाला व इतर विद्यार्थ्यांनादेखील मार्गदर्शक आहेत. ‘जाऊ व्यावसायिकांच्या भेटी..’ या लेखातील उपक्रमामुळे भाषाविकासाचा केवढा तरी मोठा टप्पा मुलांना गाठता येणे शक्य आहे हा संदेश, लेखिकेने इतरांनाही दिला आहे. - रविकांत तावडे, नवी मुंबई निर्मितीचा खडतर प्रवास चतुरंगमधील ‘दृष्टीआडची सृष्टी’ या सदरामध्ये ‘आकांताला छेद देत जगताना’मधील कवयित्री व साहित्यिक नीरजा यांचे आत्मकथन अस्वस्थ करणारे आहे. स्त्री-साहित्यिक म्हणून समाजाकडे पाहताना स्त्रीला मिळणारे दुय्यम स्थान आणि तिची अस्मिता चिरडून टाकण्याचा सातत्याने होणारा प्रयत्न यामुळे ती अस्वस्थ होते. अशा वर्चस्वाला झुगारून देऊन प्रसंगी त्यांच्याशी सामना करण्याची तयारी ठेऊन बंडखोरी करणारी व तितक्याच बिनधास्तपणे आपले दाहक अनुभव कोणताही आडपडदा न ठेवता कवयित्री नीरजा यांची कविता - कथा परखडपणे व्यक्त होते. अस्वस्थता हाच साहित्यनिर्मितीचा मूलाधार असतो. कलावंत जितका अस्वस्थ, चिंतनशील तितकी त्याची कलाकृती उच्च दर्जाची निर्माण होते. स्त्रियांच्या शोषणाविषयी, त्यांच्यावर ओढवणारे कटू प्रसंग, मानहानी यामुळे येणारी अस्वस्थता, मनाची होणारी घालमेल तितक्याच ताकदीने व्यक्त करणे हे केवळ प्रतिभावंताचे काम असते. कवयित्री नीरजा यांचे आत्मकथन मनाला थेट भिडते आणि वाचकलाही अस्वस्थ करते. आजच्या बदलत्या वातावरणात इतक्या परखडपणे व्यक्त होणे ही प्रचंड साहसाची आणि अंत:प्रेरणेची बाब आहे. समाजातील सुशिक्षित, व्यावसायिक, नोकरदार, सामाजिक कार्यकर्ती अशा स्त्रियांना इतरेजनांकडून कटू प्रसंगांना सामोरे जाण्याची वेळ येते. अशा वेळी नीरजाचे साहित्य आत्मबल देण्याचे काम करते. साहित्यनिर्मिती करताना साहित्यिकाला कोणकोणत्या दिव्यातून जावे लागते. किती अस्वस्थता सोसावी लागते. मनाची कशी घालमेल होते याचे दाहक चिंतनही नीरजांनी व्यक्त केले आहे. समाजाने अंतर्मुख होऊन स्त्रियांकडे पहिले पाहिजे. परखडपणे, वास्तवतेचे भान ठेवून केलेले हे मुक्त चिंतन स्त्रियांनी आत्मसात केल्यास त्याही मुख्य प्रवाहात येऊन महत्त्वाची कामगिरी बजावू शकतील. हिरवी ओल काळजात जपून ठेवली तर आकांतांना छेद देणं कोणत्याही काळात शक्य होऊ शकेल हा आशावाद फार मोलाचा आहे. - शहानवाज मुल्ला, इस्लामपूर, सांगली हृदयद्रावक प्रसंग आठवला ‘जगू आनंदे’ ही लेखमाला वाचत असताना निव्र्याज मनाने वर्षांनुवर्षे साठविलेली नाती डोळ्यांसमोर येतात व नकळत हृदयाचे कप्पे उघडले जातात. ३ डिसेंबरच्या पुरवणीतील अंजली श्रोत्रिय यांचा ‘स्पर्श’ हा लेख वाचला आणि २० वर्षांपूर्वीचा तो हृदयद्रावक प्रंसग आठवला. १९९६ मध्ये स्टेट बँकेच्या कल्याण शाखेमध्ये वैयक्तिक बँकिंग विभागाचा व्यवस्थापक म्हणून काम करीत असताना एक व्यक्ती मुदत ठेवीचे सर्टिफिकेट घेऊन आली. ती मुदत ठेव एका वृद्ध माणसाची होती व मुदत संपल्यामुळे त्या ठेवीचे पैसे हवे होते. चौकशी केल्यावर समजले की, खरी ठेवीदार व्यक्ती एका वृद्धाश्रमात असून ती आजारी होती. ते पैसे अर्थात वृद्धाश्रमातच भरण्यासाठी हवे होते. एकंदरीत प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी एका शनिवारी मी प्रत्यक्ष अंधेरी येथील ‘होली फॅमिली’ वृद्धाश्रमात गेलो. संध्याकाळी सहाची वेळ होती. गेटमधून आत शिरताना प्रथम नजर गेली ती तिथल्या बाकांवर बसलेल्या काका मंडळींवर. त्यांच्याशी काहीच काम नसल्यामुळे मी दुर्लक्ष करून पुढे चाललो होतो. परंतु अचानक ही मंडळी चहुबाजूंनी जमा झाली. क्षणभर मी गोंधळून गेलो. माझ्याशी हस्तांदोलन करण्यासाठी प्रत्येक हात पुढे येत होता व सोबत ‘गुड इव्हिनिंग’चे मिठ्ठास शब्द कानी येत होते. सगळ्यांशी हात मिळविल्यावर मी तेथील अधिकाऱ्याला भेटायला गेलो. काम झाल्यावर आत शिरताना अनुभवलेला प्रसंग त्या अधिकाऱ्याला सांगितला. ते ऐकल्यावर तो अधिकारी हसून म्हणाला, ‘‘हे नेहमीचेच आहे. येथे कोणी फिरकत नाही. जर तुमच्यासारखा एखादा आलाच, तर त्यांच्या दृष्टीने ते एक ‘सावज’ असते. ‘गुड मॉर्निग, ‘गुड इव्हिनिंग’चा बहाणा करून ते तुम्हाला भेटतात. त्यांना हवा असतो फक्त तुमचा स्पर्श, जो त्यांच्या मुलाबाळांनी झिडकारलेला असतो.’’ हे ऐकल्यावर खाली मान घालून मी परतलो. मात्र त्या प्रसंगानंतर जेव्हा आठवण येते तेव्हा मी मुद्दाम या वृद्धाश्रमाला भेट देतो. ती फक्त या नव्या नात्यातून मिळालेल्या आत्मिक स्पर्शसुखासाठी. जिथे नि:स्वार्थी मने असतात, तिथेच उगवतात प्रेमाची ही छोटी रोपटी! अशा नव्या नात्यांची आज प्रत्येक घरात गरज आहे. - सूर्यकांत भोसले, मुलुंड पूर्व संवेदनशील मनाचे हृद्गत ‘मनातलं कागदावर’ या सदरातील स्वप्नजा पंडित यांचा १९ नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेला ‘आठवणीत तुझ्या’ हा लेख वाचताना डोळे पाणावले. या लेखातून त्यांनी त्यांच्या बहिणीच्या सांगितलेल्या आठवणी मनाला स्पर्शून जाणाऱ्या आहेत. या आठवणींमधून व्यक्त झालेले कारुण्य, भावनिक अस्वस्थता वाचकांच्या मनात एक प्रकारचे काहूर निर्माण करते. सदैव आपल्या सान्निध्यात असलेल्या प्रिय व्यक्तीचे आजारपणाच्या निमित्ताने या इहलोकातून निघून जाणे किती क्लेशदायक असते हे लेखिकेने समर्पक शब्दातून सांगितले आहे. हा लेख म्हणजे संवेदनशील मनाचे हृदगतच होय. असे म्हणावे लागेल. सुख दु:खांकित अशा मानवी जीवनात भावनाशील वृत्तीचे महत्त्व लेखिकेने यातून सूचित केले आहे. चतुरंग पुरवणीमधून विविध विषयांबद्दल अभ्यासपूर्ण लेखातून मिळालेली माहिती वाचकांना वाचनाचे खरे समाधान मिळवून देते. - द. श्री. कुलकर्णी, नगर अनुल्लेख खटकला १२ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेला ‘परंपरा खाद्यसंस्कृतीची’ हा विमला पाटील यांचा लेख चांगलाच आहे, पण त्यात कमलाबाई ओगले यांच्या ‘रुचिरा’चा अनुल्लेख खटकला. ‘रुचिरा’ १९७० मध्ये प्रसिद्ध झाले. ‘अन्नपूर्णा’ १९७३/७४ मध्ये आले. तोवर ‘रुचिरा’च्या सहा आवृत्त्या निघाल्या होत्या. आजही ‘आजी’ काय सांगत, असं म्हणत ‘रुचिरा’मध्ये संदर्भ बघितला जातो. मंगला बर्वे यांना, त्यांच्या पुस्तकांना कमी लेखत नाही, पण लेख अपूर्ण वाटतो. - प्र. रा. गोखले परिसंवाद व्हायला हवेत ‘काळजाचा तुकडा’ हा मृणालिनी चितळे यांचा ५ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेला लेख मनाला खूप भावला. नवीन पिढी म्हणजे नववृद्धांवर नातवंडांची जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आली आहे. याचा ऊहापोह फार सुदंर रीतीने मांडला आहे. आजचे आजी-आजोबा साधारणपणे सत्तर टक्के स्वत:च्या पैशांवर जगत आहेत. या वयात पर्यटनास जाणे किंवा सिनेमा, नाटक पाहणे या त्यांच्या इच्छा असतात. परंतु यावर त्यांना मुरड घालावी लागते. बहुतांशी वृद्ध मंडळीच्या स्वत:च्या जागा आहेत. हल्लीच्या तरुण वर्गाला घर घेणे परवडत नसल्यामुळे ते स्वत: मुलाला व सुनेला आपल्या घरात राहण्यास सांगतात, ही एक व्यावहारिक तडजोड करतात. परंतु ही नातवंडे जरी दुधावरची साय असली तरी त्यांना सांभाळता सांभाळता नाकी नऊ येते. ही मुले स्वत: धडपडतात, मस्ती करतात व त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला तर हल्लीच्या सुनांना राग येतो. त्यामुळे आजी-आजोबांच्या मानसिक स्वास्थ्याला तडा जातो याबाबत कोणाचेही दुमत नसेल. या नातवंडांना सांभाळताना मनात एकसारखी अनामिक भीती असते की ही मुले मैदानावर खेळायला गेली व जर ती खेळता खेळता पडली तर त्यांचे आई-बाबा आजी- आजोबांवर नातवंडांच्या समोर रागवतात. असे असेल तर नातवंडांचे आजी-आजोबांवर प्रेम कसे राहणार? नातवंडे आदर कसा करतील? हा एक मोठा प्रश्न आ वासून उभा राहतो. पूर्वीच्या आजी-आजोबांना अशी भीती नव्हती. त्यामुळे ते शिस्त लावण्यासाठी व मुलांच्या मनावर संस्कार घडविण्यासाठी सदैव तयार असत. नातवंडांवरच्या प्रेमामध्ये आजच्या नववृद्धांच्या मनात फरक पडला नाही, परंतु आजच्या तरुण पिढीतील काही मुले व सुना आई-वडिलांचा, सासू-सासऱ्यांचा मान राखत नाहीत. अतिशय उर्मट वागताना दिसतात. या तरुण पिढीच्या वर्तनावर परिसंवाद व्हायला हवेत. त्यासाठी सामाजिक संस्था पुढे आल्या पाहिजेत तरच कौटुंबिक संस्था टिकून राहतील अशी आशा वाटते. - उज्ज्वला मालाडकर, पवई, मुंबई अभिमानास्पद कामगिरी १९ नोव्हेंबरचा मृदुला बेळे यांचा ‘संशोधनाच्या प्रांगणात’ हा लेख फारच भावला. संशोधन हा आपला प्रांत नाही अशी बऱ्याच सुशिक्षित स्त्रियांची विचारसरणी आहे, पण आता वैद्यक क्षेत्र किंवा संगणकविषयक तंत्रज्ञान यामध्ये स्त्रियांचे प्रमाण वाढत आहे, ही फारच आनंदाची बाब आहे. स्त्रियांनी आपल्या बुद्धिमत्तेचा आदर करून फक्त सामाजिक आणि मानसिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकून न राहता संशोधनासारख्या क्षेत्रात देशाला प्रगतीपथावर नेणाऱ्या विषयाकडे लक्ष द्यावे. संशोधनामध्ये पेटंट मिळविलेल्या बऱ्याच स्त्रिया आहेत. त्या सर्वाचे मन:पूर्वक अभिनंदन. - गणपतराव शिलारकर, नाशिक रोड