१९मार्चच्या पुरवणीतील ‘एकला चलो रे’मधील वासंती वर्तक यांचा लेख वाचला. खूप आवडला
मुली शिकल्यामुळे या कुटुंबास चांगले दिवस येऊ शकले हे सत्य ठळकपणे समोर आले आहे. तसेच मुसलमान लोक हेही आपल्या समाजाचेच घटक आहेत ही गोष्ट तुम्ही या लेखाद्वारे अधोरेखित केली आहे. या मुली इतर मुसलमान मुलींना शिकण्यास प्रवृत्त करीत आहेत हे म्हणजे सोन्याहून पिवळे.
या लेखामुळे आणि या मुलींच्या प्रयत्नांमुळे अधिकाधिक मुसलमान मुलींना शिकावेसे वाटेल, अशी मला खात्री आहे.
सध्या रुबिना पटेल यांचे लेख वाचतो आहे. त्याही या समाजातील महिलांच्या उन्नत्तीसाठी खूप धडपड करीत आहेत, त्यांच्याशी संपर्क साधल्यास या दोघींच्या हिताचे होऊ शकेल.
– सुरेश देवळालकर, हैदराबाद.

सामंजस्य महत्त्वाचे
‘दिल्या घरची’ सुद्धा आहे, ‘म्हातारपणाची काठी!’ या लेखातली मुलामुलींनी आपल्या आईवडिलांच्या उतारवयात काळजी घेण्याबद्दलच्या कायद्यातल्या तरतुदींची माहिती नक्कीच उपयुक्त आहे. आईवडिलांची काळजी घेणं हे मुलांना किंवा मुलींना कायद्याने सक्तीचं करण्यापेक्षा ते त्यांना मनातूनच वाटलं पाहिजे. तसं मुलांना वाटावं याची मानसिक तयारी आईवडिलांना बऱ्याच आधीपासून करायला पाहिजे. आईवडिलांची काळजी कोणी घ्यावी, कशी घ्यावी हे प्रश्न वेळेवर कुटुंबात व विशेष करून भावंडात चíचले गेले असले तर ते सामंजस्याने सुटतील, असं वाटतं. प्रश्न शेवटी नुसता कायद्याचा नाही तर कौटुंबिक नाती व सौख्य टिकवण्याचा आहे.
सर्वात शेवटी हा प्रश्न आईवडिलांच्या मालमत्तेच्या वाटणीवर येऊन ठेपतो.
त्यासाठी सुद्धा कुटुंबातील आईवडील व मुले यांच्यातल्या मनमोकळा संवाद जरुरीचा आहेच,
नाही का?
– लता प. रेळे, मुंबई.