१ ऑक्टोबरला प्रसिद्ध झालेला नीलिमा किराणे यांचा ‘साक्षात्कारी क्षण’ हा लेख वाचला नि माझ्याही अंगावर आठवणीने काटा आला. मीसुद्धा त्या दिव्यातून गेले आहे. एका स्त्रीला जेव्हा आपल्या सगळ्यात सुंदर अवयवाचा त्याग करावा लागतो, तेव्हा तिच्या मनाचे काय होत असेल ते तीच जाणो, पण त्या सांगतात तसे त्या एका क्षणालाच खूप महत्त्व आहे. जेव्हा आपल्याला कळते की आपला आजार कोणता आहे; त्या वेळेस आपल्यावर आभाळच कोसळते. त्यातूनही सावरून आपण शस्त्रक्रियेलाही तयार होतो. पण त्यानंतर कधीही भरून न येणारी जागा पाहून मनातल्या मनात कढ फुटतात. बरं हे दु:ख कोणाला सांगूनही उपयोग नसतो. कारण आपल्या आप्तस्वकीयांना आपला जीव वाचला हे जास्त महत्त्वाचे असते. त्या क्षणाला मनावर दगड ठेवावा लागतो. आपले मन आणि त्यातील दु:ख मनातच सोसावे लागते.

मॅटिल्डा ॅन्थनी डिसिल्वा, वसई

अनेक राधांसाठी नवीन दृष्टिकोन

नीलिमा किराणे यांचा ‘साक्षात्कारी क्षण’ हा लेख वाचला. या लेखाचे शब्दांत वर्णन किंवा कौतुक करणे अशक्य आहे. हा लेख ज्याक्षणी वाचून पूर्ण झाला, त्याक्षणी एक वेगळाच साक्षात्कारी क्षण मी अनुभवला. राधाने ज्या धैर्याने, संयमाने त्या क्षणाशी सामना केला आणि लेखिकेने तो क्षण वाचकांसमोर ज्या पद्धतीने मांडला, त्यामुळे अशा अनेक राधांना नवीन दृष्टिकोन मिळाला. लेखिकेने वाचकांच्या मनातील एक हळवा कप्पा हळूच उघडला आहे.

प्रज्ञा घोडके, पुणे

प्रामाणिकतेची वानवा

२४ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेला मृणालिनी चितळे यांच्या ‘मोठं सत्य’ या लेखात दिल्याप्रमाणे अमृता प्रीतम व इमरोज हे आदर्श झाले, कारण पवित्र बंधनात अडकल्यावर, शपथेवर बंधन स्वीकारल्यावरसुद्धा इतका प्रामाणिकपणा आढळत नाही. पारदर्शक, प्रामाणिकतेची वानवा हेच खरे दुखणे आहे. व्यक्तिगत स्वार्थ यात आडवा येतो आणि सर्व बिघडून जाते. समाजात बरेचसे नाइलाजाचे पाईक असतात. समान हक्क नैसर्गिक असला तरी त्याच्यावर चढलेली परंपरेची पुटे सततच्या प्रबोधनाने हटतील.

रामचंद्र महाडिक, सातारा