आत्मचरित्र ही एक अवघडच पायवाट असते. ती चालू पाहणाऱ्या लेखकाकडे धाडस लागतं आणि शहाणपणही लागतं. कथा आणि कादंबरी लिहिताना तुमचे व्यक्तिगत अनुभव जसेच्या तसे किंवा बदलून, पालटून पात्रांकरवी व्यक्त होऊ शकतात. आत्मचरित्र हे आत्मचरित्र असतं! तिथे अशी सोयीची वाट नसते. खूप आत्मचरित्रं ही नुसत्याच आठवणींची उतरंड मांडतात. पुष्कळ आत्मचरित्रांमध्ये अनुभव अस्सल असतात; पण त्यांची मांडणी कच्ची असते किंवा मग वकिलाने अशिलाची बाजू कोर्टात तावातावानं मांडावी तसा लेखक स्वत:ची बाजू मांडत बसतो. मुख्य म्हणजे, एकेकदा तर आत्मचरित्राचा गाभा – त्या निवेदकाच्या कामामागची कळ – तेच हरवलेलं असतं. जयंत नारळीकर हे माझे आवडते लेखक आहेत, पण त्यांचं आत्मचरित्र हे सरस नाही. त्यात प्रवास, सन्मान, पुरस्कार, आठवणी, माणसं, घटना, तपशील हे सारं आहे; पण कुठल्या प्रेरणेने माणूस वैज्ञानिक बनतो ते त्यात नाही. विज्ञानामागे जे कुतूहल असतं त्याची ठिणगीच त्या पुस्तकात नाही.

आणि म्हणून जेव्हा मी गंगाधर गाडगीळ आणि विश्राम बेडेकर यांच्या आत्मचरित्रांकडे वळतो तेव्हा मला त्यामध्ये सगळय़ात मोठं वेगळेपण जाणवतं ते असं की, जरी त्या दोन्ही पुस्तकांत माहिती, अनुभव आणि अगदी गॉसिपही असलं, तरी मुख्यत: त्यात त्या निर्मितीमागे काय प्रेरणा होत्या याचं उत्तम विश्लेषण आहे. म्हणूनच ती आत्मचरित्रं अस्सल झाली आहेत. वरवर विरुद्धधर्मी आहेत ती आत्मचरित्रं. बेडेकरांचं सगळं कसं फिल्मी शैलीत रंगवलेलं, नाटय़मयता प्रसंगागणिक आणणारं आणि ट्रॅजिक हिरोची हेतुपुरस्सर आठवण करून देणारं आत्मचरित्र – ‘एक झाड आणि दोन पक्षी’ या नावाचं. गाडगीळांचं ‘एका मुंगीचे महाभारत’ हे आत्मकथन निराळं – सावध, हात राखून वाचकाला काही देऊ पाहणारं, आतून हळवं, मानी, पण वरून भलतंच स्ट्राँग असल्याचा भास देणारं!

पण त्या दोन्ही आत्मकथनांमध्ये सामाईक आहेत ते त्यांचे आपापल्या निर्मितीचे अनुभव आणि त्याच्या प्रेरणा स्वत: जाणून घ्यायचे व इतरांना समजावून द्यायचे प्रयत्न. विश्राम बेडेकर दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडमधला अभ्यासक्रम सोडून भारतात बोटीने परतले. वाटेत युद्धझळा लागलेली ज्यू माणसं त्यांना बोटीत भेटली, दिसली. त्यांच्या ‘रणांगण’ या कादंबरीत चक्रधर या नायकाला दिसली, भेटली तशीच; पण तो मनात साचलेला अनुभव किती वेगळय़ा निमित्ताने लिखित झाला! बेडेकर परतले आणि सोलापूरला शासकीय नोकर करीत असलेल्या आपल्या पत्नीच्या – बाळूताई खरे ऊर्फ तत्कालीन वादळं ज्यांच्या पुस्तकानं उठवलेली त्या लेखिका विभावरी शिरुरकर – यांच्या सरकारी घरी पोहोचले. अस्वस्थ मनाच्या बेडेकरांचा बायकोबरोबर वाद झाला. जेवणाच्या टेबलावर त्यांनी बाळूताईंच्या लेखनाची खिल्ली उडवली. बाळूताईंनी फार वाद न घालता म्हटलं, ‘‘बोलणं सोपं असतं. आधी करून दाखवावं, मग बोलावं.’’ डिवचले गेलेले बेडेकर रेक्स या कुत्र्याला घेऊन गेले आणि रिकाम्या कागदासमोर पेन नाचवीत बसले. आणि मग एकाएकी धरण फुटावं तसे ते लिहिते झाले, ‘रणांगण’ कादंबरीचा जन्म झाला. ती सारी आठवण निर्मितीमागची प्रेरणा कधी कधी किती वेगळी असू शकते, त्या प्रेरणेला प्रत्यक्षात जागी करणारी टोचणी नवरा- बायकोच्या फुटकळ भांडणासारखीही असू शकते हे दाखवणारी आहे. पाण्याचा मोठा साठा असलेलं धरण असावं आणि ते साध्या ढगांच्या गडगडाटानं फुटावं असंही निर्मितीत कधी होतं.  माणसाचं मन अनुभवांचा साठा बांधासारखा अडवून ठेवत असतंच! या धरणावरून आठवलं बेडेकरांचंच ‘शेजारी’ या चित्रपटाचं स्क्रिप्ट! उपयोजित लेखनाची निर्मिती किती वेगळे आधार घेत होत असते! कथेत एक हिंदू आणि एक मुसलमान हवा; ते मित्र हवेत हे निर्मात्यानं बेडेकरांना सांगितलं होतं. मग ‘प्रभात’च्या बॅनरला भव्य सेट हवा म्हणून कथेत धरण येतं! धरण येतं म्हणून एक पात्र धरणाची कामं बघणाऱ्या इंजिनीयरचं बनतं! मग मैत्रीतली जवळीक आणि दुरावे येतात; घर- बायका- मुलं कथेत येतात. शेवटाला ‘प्रभात’ शैलीची ग्रँड ट्रीटमेंट हवी म्हणून बेडेकर धरण फोडण्याचा घाट घालतात आणि मग शेवटाला त्या पाण्याच्या लोंढय़ावर जिवंतपणी भांडलेल्या शेजारी मित्रांचे मृतदेह एकत्र हातात हात धरून वाहताना दिसतात! उपयोजित लेखनात सर्जनाची आगळी खुमारी असते. सीरियल्स लिहिणं हे कधीच सोपं नसतं आणि चांगला लेखक कादंबरी आणि सीरियल या दोन्ही गोष्टी त्यांचं वेगळेपण ध्यानात ठेवत चांगल्याच तऱ्हेने लिहितो. (वाईट लेखक दोन्ही वाईट लिहितो!) बेडेकरांनी केवळ स्वत:च्याच नाही, तर सर्जनाच्या अन्य कलाकारांच्या कहाण्याही किती नाटय़मयरीतीने सांगितल्या आहेत! एकदा शूटिंग करताना दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसलेले बेडेकर नायिकेच्या – शांता  हुबळीकर – यांच्या थंडपणामुळे वैतागलेले. त्यांचं कामात लक्ष नव्हतं असं बेडेकरांना वाटायचं. त्या दिवशी तर शांताबाई गंभीर सीनआधी रिहर्सल न करता जिलब्या खात बसल्या होत्या. बेडेकरांचा संयम संपला आणि त्यांनी नायिकेला धडा शिकवायला थेट शूटची आज्ञा दिली. लाइट्स आले, कॅमेरा चालू झाला. शांताबाई जिलब्यांचा पुडा साडीच्या निऱ्यांच्या घोळात लपवीत हसत सेटमागे पळाल्या आणि बेडेकरांच्या भाषेत, ‘‘आत गेल्या त्या हसत. जिलेबी लपवत. दहाच सेकंद झाली असतील. बाहेर पडल्या त्या डोळय़ांतून अश्रूंचा पूर वाहवीत.’’ ते वाचून आपल्याला निर्मितीचं एक वेगळं अंग दिसतं – तयार, आत्मविश्वासू. खरं काय होतं? शांता हुबळीकर या नायिकेच्या मनाच्या आत काय होतं? जिलब्यांकरवी व्यक्त होणारा आनंद, जगण्यावरचा लोभ? का दहा सेकंदांत डोळय़ांत पाणी यावं इतकं कोंडून ठेवलेलं दु:ख? धरणच तेही – कलाकाराचं. क्षणाक्षणाला आपली पुनर्रचना करीत राहणारं! माणसाचं प्रेम, मैत्री, पालकत्व हे सारे घटकही सर्जनाला खतपाणी घालत असतात, त्याला सामग्री पुरवतात, निमित्तही पुरवतात. बेडेकरांनी तर प्रेमाचे दहा उत्कट अनुभव घेतले. त्यांनी ते आत्मकथनात मांडलेही आहेत मोकळपणे. त्यांची पहिली पत्नी, बोटीवरची खरी किंवा खोटी हॅर्टा, बाळूताई, श्रीराम नावाचा घट्ट मित्र, हरी मोटे आणि बेडेकर यांचं मैत्री-नाटय़ (जे रामदास भटकळांनी त्यांच्या ताज्या पुस्तकात उलगडलं आहे.) हे सारे प्रेमानुभव त्यांनी निर्मितीला जोडण्याचा प्रयत्न केला. मग तो ‘शेजारी’सारखा चित्रपट असो, ‘टिळक आणि आगरकर’सारखं नाटक असो किंवा ‘सिलिसबर्गची पत्रे’सारखं प्रवासवर्णन असो, बेडेकरांनी ते सारे व्यक्तिगत अनुभव सर्जनाच्या कामाला जुंपले!

आणि गाडगीळ? त्यांच्या सावध स्वभावाला जागत त्यांनी त्याच जातकुळीचे घेतलेले इंटेन्स अनुभव ‘एका मुंगीचे महाभारत’ या आत्मचरित्रातून सरळ बाहेर काढले आणि त्यांचं ‘आठवणींच्या गंधरेखा’ नावाचं स्वतंत्र पुस्तक केलं! उदाहरणार्थ, त्यातलं माधव आचवलांचं व्यक्तिचित्र. आचवलांच्या मैत्रीतून गाडगीळांची निर्मिती कशी सजग झाली, तिला शोधक फाटे कसे फुटले हे गाडगीळ स्वत:च त्या लेखात मांडतात. (आचवलांचं सवरेत्कृष्ट व्यक्तिचित्र म्हणूनही या लेखाचं महत्त्व आहेच.) पण मैत्रीच्या मर्यादा गाडगीळांनी दोन प्रसंगांत जाणल्या आणि त्याचा त्यांच्या निर्मितीवरच परिणाम झाला. ‘‘माधवला मी जितकं जवळ येऊ दिलं होतं, तितकं फार थोडय़ा लोकांना येऊ दिलं होतं. त्यालाही तसंच वाटत असावं अशी माझी कल्पना होती; पण मला असं आढळून आलं की, मित्र जोडण्याचा, जमा करण्याचा त्याला हव्यास होता. तेव्हा मी त्याच्यापासून दूर सरकू लागलो. आमचं भांडण असं कधीच झालं नाही. त्याच्याविषयी प्रेमाची, कृतज्ञतेची भावना अखेपर्यंत माझ्या मनात होती, आजही आहे.’’ गाडगीळांचं हे स्वगत किती निखळ आहे; तो अनुभव तुम्हा-आम्हाला परका नाही! पण पुढे विजया मेहता आणि गाडगीळ यांच्यात नाटकाच्या लेखनावरून वाद झाले आणि ते वाढत शेवटी श्री. पु. भागवत आणि गाडगीळांची मैत्री तुटली! (गाडगीळांनी त्यांचा ‘तलावातलं चांदण’ हा कथासंग्रह श्री. पुं.ना अर्पण केला होता, इतकी त्यांची मैत्री होती.) या घटनेनंतर गाडगीळांचा मैत्री या गोष्टीवरून विश्वास उडाला असं त्यांनी लिहिलं आहे. मग त्याचा त्यांच्या निर्मितीवर काही परिणाम झाला का? एरवी सविस्तर बोलणारे गाडगीळ इथे मूक झाले असावेसे वाटतात. माझी एक अभिनेत्री मैत्रीण मला म्हणालेली, ‘‘आशुतोष, प्रेम, मैत्री असं काही नसतंच!’’ गाडगीळही त्याच वळणावर आले होते का? त्यामुळे त्यांचं लेखनही वाचकांपासूनही अधिक सावध झालं का? आडवळणाने तो बदल ‘तलावातलं चांदणं’पासून खंबीर ‘दुर्दम्य’पर्यंत झाला का? कुणी सांगावं! पण गाडगीळांचा एकंदर कॅनव्हास हा बेडेकरांपेक्षा खूपच मोठा. त्यांचं धरणही हुशार; कधी कुठल्या दरवाजांच्या झडपा सोडायच्या हे कुशलतेने ठरवणारं. बेडेकरांच्या कथनात मुलांना स्थानच नाही. गाडगीळांनी फार सजगपणे सांसारिक अनुभव घेतले आणि सर्जनात घोळवले. त्यांचा बंडू हा अशा प्रेरणांमधूनच सुचला, असं त्यांनी आत्मचरित्रात स्पष्ट लिहिलंय. तरुण वय, संसारात नुकतेच पडलेले गाडगीळांचे मित्र, खादाडपणा, दंगामस्ती, नसते वितंडवाद, फटफजिती ही सारी बंडू-कथांची सामग्री होती आणि मुख्य म्हणजे, व्यक्तिगत आयुष्यापलीकडे निर्मितीची संकेतस्थळं असतात (हो, गुगलसारखी) हे त्यांच्या आत्मचरित्रात उत्तमरीतीनं दिसून येतं. एकदा कथा लिहायची होती गाडगीळांना. तर ते सरळ बॅकबेच्या समुद्रावर चालत चालत गेले आणि त्याच वेळी मनात ‘‘मला गोष्ट लिहायची आहे.. गोष्ट.. गोष्ट’’ असं वाक्य घोळत राहिले. तोवर रस्त्यात मधे वेडसरपणे वाटोळं वाटोळं फिरणारं एक कुत्रं त्यांच्या नजरेस पडलं. दुसऱ्या दिवशी झोपेतून उठले आणि तो सारा अनुभवच कथेत रूपांतरित झाला. (झोपेत आपली नेणीव काम करते आणि मग कथा सहज सुचते, असं गाडगीळांनी म्हटलं आहे. त्यांना कथा सुचल्या नाहीत की विषय घोळवत ते झोपून जात. उठल्यावर कथा सुचत असे!)  एकदा त्यांना जुन्या वळणाच्या बायकांवर लिहायचं होतं. त्यांच्या सावित्री आजीचा अनुभव त्यांच्या मनामध्ये रेंगाळत होता. त्याच दरम्यान पु. शि. रेग्यांच्या घरी झालेल्या पं. भीमसेन जोशी यांच्या मैफलीला गाडगीळ गेले. गाडगीळांनी भीमसेनांचं ‘बाबूल मोरा’ हे भैरवीतलं गीत ऐकलं. ते म्हणतात, ‘‘त्यांचा आवाज भैरवीपर्यंत थकला होता. त्या थकावटीतच त्याला एक गोडवा, भावनेची एक डूब प्राप्त झाली होती.. भैरवीच्या रूपातच जी एक आर्तता असते, हुरहुर असते, जो निरोप असतो ते सगळं त्या ‘बाबूल मोरा’त होतं.’’ आणि मग ते भैरवीचे सूर ऐकल्यावर त्यांना झरझर ‘अखेरचं सांगणं’ ही कथा सुचली. आता हेही रोचक आहे! एका कलेचा दुसऱ्या कलेच्या निर्मितीसाठी कसा उपयोग होतो हे नॉथ्रॉप फ्राय किंवा जेक्स् देरीदा यांसारख्या समीक्षकांनी जड, जटिल भाषेत (तिथे आवश्यकच!) सांगितलं आहेच, पण गाडगीळ जेव्हा असा अनुभव मांडतात तेव्हा ते केवळ आत्मचरित्र राहत नाही; ती आस्वादक समीक्षाही बनते.

इन अ वे, बेडेकरांच्या आत्मचरित्रातही ती तशी बनते! तिथे चित्रपट, अभिनय आणि साहित्य हे सारेच डिस्कोर्स एकवटतात. ती दोन्ही आत्मचरित्रं ही फक्त आत्मचरित्रं नाहीत. निर्मिती प्रक्रियेचे ते दस्तऐवजही आहेत! अत्यंत मोलाचे! इतक्या सहजपणे कुणी स्वत:च्या निर्मितीकडे त्रयस्थ नजरेतून पाहिलेलं नाही. आपल्या धरणांचे आपणच इंजिनीयर झाले हे दोघे लेखक! त्यांनी धरणामागचा विशाल अनुभवाशयही त्या आत्मचरित्रात मांडला; त्यांच्या धरणांची जडणघडण कशी झाली तेही मांडलं; पण वरून पाऊस कधी पडेल हे त्यांच्या हातात नव्हतं; कुणाच्याच नसतं. निर्मितीचा पाऊस हे कोडंच आहे. मी घेऊन बसलोय ही दोन पुस्तकं आणि ते कोडं न्याहाळतो आहे. मागे सॅम हंट या मला नुकत्याच आवडलेल्या गायकाचं खर्जातलं गाणं लागलंय. सॅम गातोय रस्त्यात अवचित भेटलेल्या तरुणीची कहाणी. त्या तरुणीचं संमोहन तगडं आहे, आवाहक आहे.

‘’I met a girl, She crossed the street

She crossed my heart, she lit me up.’’

चेतवलंच, पेटवलंच तिने त्याला! गाडगीळांना आणि बेडेकरांना त्यांच्या प्रतिभेनं निर्मितीच्या ओढीनं पेटतं ठेवलं तसंच. त्या दोघांना त्यांची प्रतिभा अशीच अवचित भेटली, सर्जनाला तिनं त्यांना उद्युक्त केलं आणि मग – She lit them up! ती सर्जक धग दोघांच्या या आत्मकथनांमध्ये वसते आहे आणि सॅम हंटचं गाणं ऐकत शांत बसलेल्या माझ्यापर्यंत अलगद पोचते आहे! माझ्या धरणाची झडप किलकिली करते आहे!

डॉ. आशुतोष जावडेकर – ashudentist@gmail.com