विठ्ठलाला मुख्यमंत्र्यांचे साकडे

राज्यातील शेतकरी, वंचितांना न्याय देण्याचे सामथ्र्य दे, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांची शासकीय महापूजा केली. त्यानंतर विठ्ठल मंदिराच्या सभागृहात मानाचे वारकरी दांपत्य परसराम उत्तमराव मेरत आणि सौ. अनसूया परसराम मेरत यांचा सत्कार करण्यात आला. मेरत (वय ५४ वष्रे) आणि सौ. मेरत (वय ४५ वष्रे, रा. बाळसमुद्र, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मानाचे वारकरी म्हणून शासकीय महापूजेस उपस्थित राहण्याचा मान मिळाला.

महापूजा झाल्यानंतर श्री विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की मागील वर्षी मी, श्री विठ्ठलाच्या चरणी भरभरून पाऊस पाडण्याचे साकडे घातले होते. गेल्या वर्षी श्री विठ्ठलाच्या कृपेने राज्यभरात भरभरून पाऊस पडला. शेतकऱ्याचे उत्पादनही भरभरून आले. राज्य शासनाने नुकतेच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला साहाय्य देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्याला कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्त करण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यासाठी राज्य शासनाला बळ द्यावे. गोरगरीब, शेतकरी आणि वंचितांना न्याय देण्याचे सामर्थ दे, असे साकडे विठ्ठल चरणी केली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानाचे वारकरी परसराम मेरत यांचा तर अमृता फडणवीस यांच्या हस्ते  अनसूया मेरत यांचा सत्कार करण्यात आला. पंधरा हजार रुपयांचा धनादेश, वर्षभर प्रवासासाठी एसटीचा पास त्यांना देण्यात आला.

या वेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला तर दीपाली भोसले यांनी अमृता फडणवीस यांचा सत्कार केला. मंदिर समितीचे नूतन अध्यक्ष अतुल भोसले यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंधारणमंत्री राम िशदे, स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, राज्यमंत्री दीपक केसरकर, नगराध्यक्षा साधना भोसले, आमदार महेश लांडगे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

वारकरी संघटनेशी चर्चा करू : मुख्यमंत्री

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य आणि अध्यक्षाची नियुक्ती राज्य सरकारने केली. या समितीचे अध्यक्षपदी वारकरी सांप्रदायातील व्यक्ती असावी, अशी मागणी महाराज मंडळींनी केली. सोमवारी सायंकाळी माउलींची पालखी पंढरपुरात येत असताना महराज मंडळींनी ठिय्या आंदोलन करीत समिती बरखास्त करा, अशी मागणी केली. दीड तासानंतर आंदोलन मागे घेतले. या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणाले, की विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीतील काही सदस्यपदे रिक्त आहेत. या पदावरील नियुक्ती करताना वारकरी संघटनांशी चर्चा करूनच केली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

 ‘पंढरपूरच्या विकासासाठी कॅनडाची मदत’ 

पंढरपूरच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध आहेत. त्याच बरोबरीने नुकतेच कॅनडाच्या एक शिष्टमंडळाने भेट दिली. कॅनडा सरकारला १५ वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्त सांस्कृतिक विभाग राज्याच्या विकासासाठी मदत व निधी देण्यास इच्छुक आहेत. या चच्रेत पंढरपूरच्या विकासाला मदत देण्यास कॅनडाचे शिष्टमंडळ तयार झाले असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.