२०१५ पर्यंतच्या बेकायदा इमारतींना सरसकट संरक्षण म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर! मुख्यमंत्र्यांनी ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतच्या सर्व अनधिकृत इमारतींना सरसकट संरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला, त्यावरून समाजातील त्रिस्तरीय घटकाच्या मनोवृत्तीचा प्रत्यय येतो. पहिल्या स्तरात श्रीमंत मंडळी येत असल्याने आदर्श घोटाळा, वन्यपशुशिकार प्रकरण, बेफाम ड्रायव्हिंग इत्यादी. त्यामुळे त्यांना आता कोणत्याही प्रकारचे भय वाटत नाही. याला कारण असे की, त्यांना तुरुंगातही व्हीआयपी वागणूक मिळते. द्वितीय स्तरावर जे मध्यमवर्गीय आहेत ते आपले जीवन व्यवस्थित कायदेशीर व्यतीत करण्याचे यत्न करतात आणि तृतीय स्तरावर जो समाज आहे तो म्हणजे अत्यंत गरीब श्रमजीवी होय. यांना राजकारण्यांनी अगोदरच चुचकारण्यास सुरुवात केली आहे. याचे उदाहरण म्हणजे झोपडय़ांना अभय! अशा अवस्थेमुळे झोपडय़ाचे प्रमाण कमी न होता ते दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यामुळे मध्यमवर्गीय लोकांनाही वाटू लागले की, प्रत्येक ५ ते १० वर्षांनंतर झोपडय़ा अधिकृत केल्या जातात. तेव्हा आपणही त्यामध्ये झोपडय़ांकरिता आपला पैसा कमविण्याचा उद्देश साध्य करून घ्यावा. अर्थात सरकारने जे श्रमजीवी लोकांसाठी चांगले केले आहे त्याचा विपर्यास न व्हावा, अन्यथा मला वाटते स्मार्ट सिटी म्हणून जी संकल्पना राबविण्याचे ठरविले आहे ते बारगळून जाईल. बिल्डर लोकांना असे वाटेल की, उगाचच वेडय़ासारखे कायदे पाळत बसलो.

ठाणे महानगरपालिका पावसाळा सुरू होण्यापूर्वी दर वर्षी जीवित हानी वाचविण्यासाठी सर्वेक्षण करते. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार धोकादायक इमारतींची संख्या गतवर्षांपेक्षा वाढलेली आहे. याचा प्रत्यय येण्यासाठी उपलब्ध आकडेवारी खालीलप्रमाणे-

उपरोक्त आकडेवारी पाहिली असता, निदर्शनास हे येते की, ठाणे शहरातील वागळे प्रभागात इंडस्ट्रियल पट्टा असल्याने तेथे धोकादायक व अनधिकृत इमारती असण्याची शक्यता नाकारता येत नाही; परंतु तद्नंतर नौपाडय़ासारख्या नावाजलेल्या ठिकाणच्या २६९ इमारतीसुद्धा धोकादायक आहेत. यास पुढील कारणे असण्याची शक्यता नाकारता येण्याजोगी नाही.

अधिक जुन्या इमारतींच्या सुरक्षिततेसाठी व सुरक्षित निवाऱ्यासाठी संरचनात्मक परीक्षण करणे अगत्य असल्याचे सक्त आदेश महानगरपालिकेने काढले असले तरी सोसायटय़ांच्या इमारतीचे संरचनात्मक परीक्षण करून घेण्यास टाळाटाळ होत आहे. या परीक्षणासाठी १२६ संरचनात्मक अभियंत्यांचे पॅनलदेखील तयार आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांत जेमतेम २०० इमारतींचे असे परीक्षण झाल्याची माहिती पुढे येत आहे. शहरात ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतीचा आकडा ४ ते ५ हजारांच्या घरात आहे. अशा प्रकारचे परीक्षण महापालिकेने करून द्यावे असा आग्रह नेहमीच धरला जातो, त्याकरिता सुमारे १०० कोटींचा भार महानगरपालिकेवर पडेल व हा भार महानगरपालिकेला पेलवणारा नाही.

इमारती धोकादायक होण्याची कारणे

  • इमारतीची वेळोवेळी डागडुजी न करणे,
  • इमारतीच्या रचनेमध्ये फेरफार होणे,
  • वाजवीपेक्षा जास्त बोजा लादणे,
  • इमारतीतील स्वच्छता न राखणे,
  • गॅलरीत ग्रिल लावून त्यामध्ये फुलझाडांच्या कुंडय़ा लावून व अवास्तव पाणी ओतून सज्ज्यास कमकुवत करणे. अशा कारणाने भिंती ठिसूळ होणे. (वृक्षप्रेमींनी वृक्षरोपण करावयाचे झाल्यास सोसायटीच्या कंपाऊंड वॉलच्या बाजूने वृक्ष लावावेत.)
  • ग्रिलमध्ये ठेवलेल्या कुंडय़ाचे पाणी कंपाऊंडमध्ये पडून कंपाऊंड दलदलीत होण्याची शक्यता असते व त्यामुळे तेथे घुशी लागल्याचे आपल्या अनुभवास येते. (शक्यतो संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या ग्रिलमध्ये कुंडय़ा ठेवू नयेत. त्यामुळे इमारतीस धोका पोहोचण्याचा अधिक संभव असतो.