पूर्वीच्या काळी कोकणात विविध धान्यांची साठवण करण्यासाठी बांबूपासून तसेच गवतापासून तयार केलेल्या साधनांचा वापर केला जायचा. ती साधने म्हणजे कणग, तट्टा, फाटा, मुडी, बिवळा इत्यादी. बांबूच्या वस्तू बनविणे हे कौशल्याचं काम असायचं आणि हे काम गावातले महार लोक करायचे. या वस्तू ते भाताच्या (धान्य) मोबदल्यात विकायचे, तर मुडी आणि बिवळा ही गवताची बांधली जायची. हे काम घरातलाच पुरुष करायचा. कणग ही तीन-साडेतीन हात उंच आणि दीड ते दोन हात रुंदीची असायची. अर्थात यापेक्षा लहान कणगीसुद्धा असायच्या. भात, तांदूळ, नाचणी इत्यादी धान्यांची साठवण करण्यासाठी वापरली जाणारी ही कणगी बांबूच्या पातळ बेळांनी विणली जायची. नवी कणग वापरण्यापूर्वी ती आतून बाहेरून शेणाने सारवून घेतली जायची. उन्हात चांगली वाळल्यावर तीत धान्य भरलं जायचं. भरून झाल्यावर कणगीच्या तोंडावर गवत पसरवून ते शेणाने लिंपलं जायचं. कणगीत खंडी-दोन खंडी भात मावायचं. त्यापेक्षा लहान कणगीला ‘कणगुल’ असं म्हटलं जायचं. तट्टा तट्टय़ाला ‘साठी’ असंसुद्धा म्हटलं जायचं. हा रुंद बेळांनी विणला जायचा. याची लांबी-रुंदी साधारणपणे आठ-नऊ फूट बाय पाच-सहा फूट असायची. याच्या अरुंद बाजूची टोके एकत्र करून बांधली की पिंपासारखा मोठा आकार व्हायचा. जिथे तट्टा ठेवायचा असेल तेथे जमिनीवर गवताचा थर पसरवून त्यावर बांधून तयार केलेला तट्टा ठेवला जायचा मग त्यात धान्य भरलं जायचं. याचं तोंड कणगीसारखंच गवत पसरवून शेणाने लिंपलं जायचं. तट्टय़ाचा तळसुद्धा शेणाने लिंपला जायचा. तट्टा बहुधा सधन शेतकऱ्यांच्या घरीच असायचा. करंड ‘करंड’सुद्धा बांबूपासूनच तयार केलेला असायचा. घट्टविणीचा आणि विरळविणीचा असे यात दोन प्रकार असायचे. घट्टविणीचा करंड हा बहुपयोगी असायचा तर विरळविणीचा करंड फक्त कांदे ठेवण्यासाठी वापरला जायचा. घट्टविणीच्या करंडाचा उपयोग प्रामुख्याने सुक्या मासळीचा साठा ठेवण्यासाठी व्हायचा. मासेमारीच्या वेळी पकडलेले मासे, खेकडे ठेवण्यासाठीसुद्धा याचा उपयोग व्हायचा. करंड हात सव्वाहात उंचीचा असायचा. त्याच्या गळ्यात दोरी बांधून तो काखेला लावता यायचा, तसाच टांगूनही ठेवता यायचा. फाटा ‘फाटा’ म्हणजे मोठय़ा आकाराची पाटी. याचा आकार पाच-सहा टोपल्या धान्य मावेल एवढा मोठा असायचा. ते सारवलेलं असायचं. याचा उपयोग तात्पुरत्या धान्य साठवणीसाठी तसेच धान्य वाहून नेण्यासाठी व्हायचा. मडकी ‘मडकी’ ही घागरीएवढीच आणि घागरीसारखीच असली तरी तिचं तोंड घागरीच्या तोंडापेक्षा मोठं असायचं. ही भात शिजविण्यासाठी, शेक्यांची मुठली उकडण्यासाठी, अंडी उकडण्यासाठी वापरली जात असली तरी तिचा साठवणीसाठीही उपयोग व्हायचा. कैऱ्या खारवण्यासाठी त्या मडकीत मिठाच्या पाण्यात ठेवल्या जायच्या. यालाच ‘खारातले आंबे’ म्हटलं जायचं. कैऱ्या कापून वाळवून केलेली भेतकं, आंबटाचे गोळे ठेवण्यासाठीसुद्धा मडकीचा वापर व्हायचा. घरातली कोंबडी अंडी घालायला लागली की मडकीत अध्र्यापर्यंत तांदूळ भरून त्यात अंडी ठेवली जायची. मुडी भात, तांदूळ, नाचणी, कुळीथ यांसारख्या धान्यांची साठवण मुडीमध्ये करण्यात यायची. मुडी ही भाताची मळणी केल्यावर मिळणाऱ्या गवताची बांधली जायची. हे मोठं कौशल्याचं आणि काही वेळा ताकदीचंही काम असायचं. मोठय़ात मोठी मुडी ही दहा कुढवांची बांधली जायची. अगदी लहान म्हणजे दोन-तीन कुडू धान्याच्या मुडीला ‘बिवळा’ म्हणायचे. बिवळा लहान मुडीला बिवळा म्हणत असले तरी हा बिवळा वेगळ्या आकाराचा असायचा. वरकसरीचं कुडू दीड कुडवापर्यंतचं धान्य तसंच काजूबिया ठेवण्यासाठी बांधला जायचा. हासुद्धा गवताचाच असायचा. खुंटीला टांगून ठेवण्यासाठी त्याला गवताचाच बंध असायचा. बिवळा बांधण्याचं काम स्त्रियासुद्धा करायच्या. तनस गवत ही जनावरांची वर्षभराची बेगमी असायची. या गवताचा साठा एका जागी ठेवणं आवश्यक असायचं. त्यासाठी गोठय़ाजवळच्या जागेत एक वीसेक हात उंचीचा खांब रोवला जायचा. त्याला सात-आठ हात उंचीचे तीन-चार टेकू लावले जायचे. त्या खांबांभोवती गवत अगदी पद्धतशीरपणे रचलं जायचं. यालाच ‘गवात भरना’ म्हटलं जायचं. गवत भरून झाल्यावर जी रचना तयार व्हायची तिला ‘तनस’ म्हटलं जायचं. माच पावसाळ्यासाठी लागणारी लाकडं (सरपण), शेणी आणि गुरांसाठी लागणाऱ्या करडाची (रानगवत) साठवण त्यासाठी खास माच रचून एखाद्या पडवीत किंवा खोपीत केली जायची. आता कोकणातल्या खेडय़ांचंही झपाटय़ाने शहरीकरण होत आहे. यातलं काहीच पाहायला मिळत नाही. ज्यांना माहीत नाही त्यांना प्रत्ययाचा आणि माहीत आहे त्यांना पुनप्र्रत्ययाचा अनुभव देण्यासाठी हा लेखनप्रपंच. चित्रे : रणजित दळवी प्रभाकर भोगले