स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ‘सावरकर भुवन’ विषयी..
मुंबईच्या मध्यवर्ती असलेल्या दादरमधील काही इमारतींच्या नावांनी तेथील परिसराची ओळख होते. त्यामध्ये दादर पूर्वेकडील डॉ. आंबेडकरांचे निवास ‘राजगृह’, तर पश्चिमेकडील महापौर जावळे यांचा बंगला, मोडक बंगला, संगीतकार सी. रामचंद्र यांचे ‘साईसदन’, आचार्य अत्रे यांचे ‘आपटे हाऊस’, ग. दि. माडगूळकर व सुधीर फडके यांचे ‘शंकर निवास’, प्रबोधनकार ठाकरे यांचे शिवाजीपार्क येथील घर. या इमारतींना त्यांच्या लौकिकासह इतिहास आणि सांस्कृतिक पाश्र्वभूमी आहे. त्याचप्रमाणे शिवाजीपार्क येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या निवासाने पावन झालेली इमारत इतिहासाची आजही साक्ष देते. ही वास्तू म्हणजे महाराष्ट्राचं नव्हे तर साऱ्या देशवासीयांचे श्रद्धास्थान आहे. ७५ वर्षे पूर्ण झालेल्या या वास्तूला तसा इतिहास आहे आणि ही वास्तू म्हणजे हिंदुस्थानवासीयांना नवविचारांसह दिशादर्शन करणारे प्रेरणास्थान ठरले आहे.
शिवाजीपार्क येथे गेल्यावर डॉ. मधुकर बी. राऊत मार्गावर ‘बालमोहन विद्यामंदिर’ शाळेच्या बाजूला गेल्यावर पांढऱ्या रंगाची इमारत आपल्याला समोर दिसते. सावरकरांच्या अक्षरांची पाटी आपल्या नजरेसमोर येते. १० मे १९३७ रोजी सावरकरांची रत्नागिरीतील स्थानबद्धतेतून सुटका झाली व ते मुंबईला आले. मुंबईला आल्यावर प्रथम ते १९३७ साली दादर येथील गणेश पेठ लेन येथील ‘सावरकर भुवन’ येथील आपल्या स्वत:च्या घरात सर्व कुटुंबासमवेत राहिले. त्यानंतर त्यांनी आपले ‘सावकर भुवन’ विकून शिवाजीपार्क वसाहतीत प्लॉट नं. ७१ वरील जागेवर १९३७ साली इमारत बांधण्यास सुरुवात केली. इमारतीचे बांधकाम सुरू असेपर्यंत लेडी जमशेटजी रोडवरील ‘भास्कर भुवन’ या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर काही काळ कुटुंबासमवेत वास्तव्य केले. त्या वेळेस त्यांनी रु. ७५४८ या किमतीला सदर प्लॉट नगरपालिकेकडून घेतला. सुरुवातीस तळमजला व पहिला मजला, वर गच्ची अशी इमारतीची रचना होती. या इमारतीचे बांधकाम हिंदू कॉलनी येथील इंजिनीअर श्री. सुळे यांनी केले. जून १९३८ मध्ये ‘सावरकर सदन’ या वास्तूत सावरकर, त्यांच्या पत्नी यमुनाबाई (माई), कन्या प्रभात, पुत्र विश्वास, मोठे बंधू बाबाराव, धाकटे बंधू डॉ. नारायणराव, त्यांच्या पत्नी शांताबाई व त्यांची मुले राहावयास आले. हे सदन त्यांच्या स्वामित्वाचे होते. या ठिकाणी त्यांचे शेवटपर्यंत वास्तव्य होते. येथूनच त्यांनी हिंदूमहासभेच्या व्यासपीठावरून आपल्या ध्येयाच्या प्रचारार्थ हिंदुस्थानभर दौरे काढून प्रचार केला. सावरकर सदनात आल्यावर घरी गणपतीची स्थापना, नवरात्रात दुर्गा देवीची पूजा वगरे धार्मिक विधी पार पडत असत. त्यांनी घराभोवती फुलझाडे, शोभेची झाडे लावून फुलबाग बनवली होती. त्यांच्या पत्नी माई या सुवासिक फुलांचे हार करणे, दारात रांगोळ्या काढणे मोठय़ा हौसेने करत असत. गुढीपाडवा व दसऱ्याच्या दिवशी घरावर कुंडली कृपाणांकित भगवा ध्वज उभारून माई त्याची पूजा करत असत. वरील ध्वजाची व शस्त्रांची पूजा करावी असा सावरकरांचा दंडक असे. दररोज सायंकाळी स्वत: सावरकर बागेत येत असत व फुलझाडांची निगा राखत असत. समोर पायऱ्या चढल्यावर एक प्रशस्त हॉल आहे. येथे सावरकरांचे कार्यालय असून महत्त्वाच्या पाहुण्यांची भेट तेथे घेत असत. तेथे त्यांचे सहकारी बाळाराव सावरकर बसत. सन १९३८ ते १९४२ पर्यंत या इमारतीत सावरकरांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर व धाकटे बंधू डॉ. नारायण (दादा) सावरकर यांचे वास्तव्य होते. त्या प्रशस्त हॉलच्या बाजूला डावीकडील खोलीत श्री. भिडे व उजवीकडील खोलीत श्री. दामले हे भाडेकरू त्या वेळी राहत होते. उजवीकडे वर जाण्यासाठी एक लाकडी जीना असून तो आतील बाजूला आहे. याचे कारण- स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळी हल्ले होत असत. म्हणून इमारतीचा जीना कोणालाही दिसू नये म्हणून त्यांनी इमारत बांधताना तशी रचना केली. वर पहिल्या मजल्यावर जीना चढून गेले की समोर सावरकरांची खोली दिसते. या खोलीत आत गेल्यावर मोठा दिवाणखाणा व त्याला लागून बाल्कनी होती. उजव्या बाजूला सावरकरांची खोली, त्याच्या बाजूला त्यांच्या पत्नी- माईंची खोली व समोर स्वयंपाकघर अशी रचना होती. दिवाणखाण्यातून स्वयंपाकघर समोर दिसत असल्याने तेथे मध्ये पार्टिशन घातले होते. दारे-खिडक्या लाकडाच्या असल्याने मजबूत व भक्कम होत्या.
भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी सावरकरांनी तिरंगी ध्वज व कुंडली कृपाणांकित भगवा ध्वज इमारतीच्या गच्चीवर फडकवला. १९४८ साली गांधीजींच्या हत्येनंतर सावरकर सदनावर हल्ला झाला होता. तळमजल्याला उजव्या बाजूला इमारतीचा गुरखा व पहारेकरी राहत असे. इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी लोखंडाचे गेट लागते. १९६३ साली माई सावरकरांच्या निधनानंतर अंगणात तुळशीचे वृंदावन बांधण्यात आले. या वृंदावनावर माई सावरकर, सरस्वतीबाई सावरकर (येसूवहिनी) व ‘आत्मनिष्ठ युवती समाज’ या संस्थेच्या कार्यकर्त्यां महिलांची माहिती असलेला कोनशिला बसवल्या आहेत. या इमारतीला अनेक मोठमोठय़ा व्यक्तींनी भेटी दिल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशवराव हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, आचार्य अत्रे, सरदार आंग्रे, पां. वा. गाडगीळ, रँग्लर परांजपे, सुभाषचंद्र बोस, ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके, मामा वरेरकर, मास्टर तारासिंग, मोरारजी देसाई, मास्टर कृष्णराव, डॉ. पुरुषोत्तमदास टंडन, चिंतामणराव कोल्हटकर, सेनापती बापट, निर्मलचंद चटर्जी, प्रबोधनकार ठाकरे, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल श्रीप्रकाश, लता मंगेशकर असे अनेक मान्यवर तात्यांच्या भेटीस येत असत.
२६ फेब्रुवारी १९६६ रोजी सावरकरांचे निधन झाले त्या वेळेस खालच्या मोठय़ा दिवाणखान्यात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. लाखो लोकांनी सावरकरांचे अंत्यदर्शन घेण्यास त्या वेळी गर्दी केली होती.
या इमारतीत सध्या सावरकर कुटुंबातील त्यांची सून सुंदरताई सावरकर या राहत असून इतर भाडेकरूही राहतात. कालांतराने इमारतीत बदल होत गेला. सावरकरांच्या मृत्युपत्रानुसार जागेची वाटणी झाली. सध्या त्यांच्या कार्यालयाच्या जागी स्मारक असून तेथे त्यांना मिळालेली मानपत्रे, त्यांच्या वापरातील वस्तू, त्यांची पुस्तके, जुने फोटो अशा महत्त्वाच्या वस्तू आहेत. दरवर्षी त्यांची जयंती व पुण्यतिथी येथे साजरी होते. सुमारे २८ वष्रे सावरकरांचे या इमारतीत वास्तव्य होते. या स्वातंत्र्यवीरांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या वास्तूचे दर्शन एकदा तरी घ्यावेच!    
अमेय गुप्ते -vasturang@expessindia.com