जनतेमध्ये विद्युत नियमांचे पालन करण्याची जाणीव निर्माण होण्याच्या उद्देशाने केंद्रीय विद्युत प्राधिकरण, दिल्ली यांच्या तर्फे १ मे ते ७ मे दरम्यान संपूर्ण देशात विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. त्यानिमित्ताने..अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा भागवून सुखी व आनंददायी जीवन जगण्यासाठी नित्य विजेचा वापर करणे अत्यावश्यक झाले आहे. अशी ही आपल्या मानवी जीवनातील अत्यावश्यक असलेली विद्युत शक्ती सर्वसामान्यांना सहज उपलब्ध व्हावी म्हणून तिच्या वहन व वितरणासाठी निर्मिती केंद्रापासून तारमार्गाची व्यवस्था केलेली असते. सध्याच्या जमान्यात रोज नवीन विद्युत उपकरणे व साधने बाजारात येत आहेत. आपण दिवसेंदिवस आपले जीवनमान सुसह्य करण्यासाठी अशा उपकरणांवर अधिकाधिक अवलंबून राहात आहोत. त्याचप्रमाणे विद्युत अपघाताने जीवितहानी होण्याचे प्रमाण दरवर्षी वाढतच आहे.महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे अडीच हजार माणसे विद्युत अपघाताने दगावतात, जनावरे विद्युत शॉक लागून किती गेली याची तर गणतीच नाही. शॉर्ट सर्कीटमुळे लागणाऱ्या आगीत दरवर्षी कोटय़वधी रुपयांची मालमत्ता नष्ट होऊन प्राणहानीसुद्धा होत असते. वरील घटनांच्या चौकशीत असे आढळून आले, की यातील बहुतांशी अपघातांचे कारण विजेविषयीचे अज्ञान, बेफिकिरी किंवा फाजील आत्मविश्वास यांपैकी एक असू शकते.जनतेमध्ये विद्युत नियमांचे पालन करण्याची जाणीव निर्माण होण्याच्या उद्देशाने केंद्रीय विद्युत प्राधिकरण (Central, Electricity Authority) दिल्ली यांनी संपूर्ण देशात विद्युत सुरक्षा सप्ताह १ मे ते ७ मे या दरम्यान पाळावा असे निर्देश दिले आहेत.महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत काम करत असलेल्या विद्युत शाखेने २००१ ते २००४ पर्यंत सदर सप्ताह साजरा केला. ज्यात खालीलप्रमाणे विविध कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला होता.० मुंबई, पुणे वगैरे शहरांमध्ये सुरक्षा रॅली काढणे.० राज्यभर असलेल्या विविध चित्रपटगृहांमध्ये विद्युत सुरक्षेसंबंधांतील स्लाइडस् दाखवणे.० निरनिराळ्या वर्तमानपत्रातून या विषयावरील तज्ज्ञांचे लेख छापून आणणे.० शॉपिंग मॉल्स आणि इतरत्र विद्युत सुरक्षा या विषयावर पथनाटय़ सादर करणे.० शाळा-कॉलेजांमधून कार्यशाळा, चर्चासत्रे आयोजित करून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रशिक्षित करणे.० विद्युत कंत्राटदार, लिफ्ट व्यावसायिक इ.च्या मदतीने ‘विद्युत सुरक्षा संदेश’ ही छोटी पुस्तिका छापून प्रकाशन व वितरण करून जनमानसात विद्युत सुरक्षाबाबत जागरूकता (Awareness) निर्माण करणे.० विद्युत सुरक्षेची घोषवाक्ये (Slogans) व बॅनर्स तयार करून कारखाने व औद्योगिक क्षेत्र अशा महत्त्वाच्या ठिकाणी लावणे.० आकाशवाणी, दूरदर्शनसारख्या प्रसारमाध्यमांवरून या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मुलाखती, व्याख्याने, चर्चासत्रे इ. कार्यक्रम आयोजित करणे.विद्युत सुरक्षा सप्ताहाचा मुख्य उद्देश हा जनसामान्यांमध्ये वीजसुरक्षा याबाबतचे अज्ञान काढून टाकून महत्त्वाच्या नियमांची माहिती करून देऊन सामान्य ग्राहकास त्यांच्या अधिकारांची जाणीव प्राप्त करून देणे हासुद्धा असल्यामुळे विद्युत ग्राहकास सुरक्षेबरोबरच त्यांच्या अधिकारांची माहिती होते. वर उल्लेख केलेल्या विविध उपक्रमांमधून ही माहिती कशी देता येते याचा तपशील खालीलप्रमाणे.१) सेफ्टी रॅली : यापूर्वीच्या सुरक्षा सप्ताहामध्ये जी रॅली मुंबई व पुण्यात काढण्यात आली होती त्यात शासनातील ऊर्जा विभागातील तसेच वीज मंडळातील अभियंते, विद्युत कंत्राटदार व अन्य व्यावसायिक, टाटा पॉवर, रिलायन्स, बेस्ट इ. वीज कंपनीचे कर्मचारी तसेच शाळा-कॉलेजातील विद्यार्थ्यांचाही सहभाग लाभला होता. त्यांच्या हातात विद्युत सुरक्षाबाबतीत संदेशांच्या (Slogans) बॅनर्स व पाटय़ा होत्या त्यातील मजकूर जाणाऱ्या-येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता. त्यातील ‘काही’ नमुने खालीलप्रमाणे-विद्युत अपघाताचे एकच कारण।सुरक्षा साधनांचे व उपायांचे विस्मरण।।Electricity is a good servant,but a Bad Master.!!कार्य आमुचे नियम आचरणाचे,ध्येय आमुचे शून्य विद्युत अपघातांचे।घेऊ वसा हा ज्ञानप्राप्तीचामंत्र जपू हा वीज सुरक्षिततेचा२) प्रदर्शनी स्टॉल्स : मुंबईमध्ये चर्चगेट, सी.एस.टी., मुंबई सेंट्रल व ठाणे येथे, पुणे येथील डेक्कन जिमखाना बस डेपोसमोर, तसेच नागपूर, औरंगाबाद, नाशिक, इ. ठिकाणीही असे प्रदर्शनी स्टॉल्स लावले गेले आणि ते संपूर्ण सप्ताहभर लोकांना वीज नियमांची माहिती देऊन विद्युत सुरक्षा प्राप्त करण्याबाबतचे मार्गदर्शन करीत होते. या स्टॉल्सवर ध्वनिक्षेपकावरून सतत सुरक्षेबाबतची माहिती व संदेश देण्यात येत होते. त्याचप्रमाणे माहितीपत्रक व सुरक्षा कार्डाचे वाटपही लोकांना करण्यात येत होते, हजारो स्त्री-पुरुषांनी या स्टॉल्सना भेट दिली.३) विद्युत सुरक्षा संदेश : विद्युत सुरक्षा संदेश या पुस्तिकेचे प्रकाशन एकाच वेळी टिळक स्मारक मंदिर पुणे, गुलमंडी औरंगाबाद, इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअर्स सभागृह, नागपूर व चर्चगेट स्थानक मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर पुस्तिकेत घरगुती वीज ग्राहक, औद्योगिक तसेच शेतकरी ग्राहकांसाठी विद्युत सुरक्षा कशी मिळवता येईल याबाबतच्या टिप्स देण्यात आल्या होत्या. ऊर्जाबचत तसेच लिफ्ट सेफ्टीबाबत सूचनांचाही समावेश आहे. दुर्दैवाने कुणास विद्युत धक्का बसल्यास त्यांना Frist Aid काय द्यावी, अशा विद्युत सुरक्षेच्या मौलिक सूचना नागरिकांसाठी दिल्या आहेत.४) दूरदर्शनवर महाचर्चा : विद्युत सुरक्षा सप्ताहादरम्यान दोन वेळेस महाचर्चा हा एक तासाचा कार्यक्रम आयोजित मुंबई दूरदर्शनच्या या कार्यक्रमात शासकीय अधिकाऱ्यांसोबत टाटा पॉवर व बी.एस.ई.एस कंपनीचे अभियंते व कामगार सहभागी झाले होते. त्यानंतरच्या वर्षांत (२००३) मध्ये स्टुडिओमध्ये ग्राहकांमधून निवडलेले काही लोक यांच्या सुरक्षेबाबतच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी संबंधित विद्युत निरीक्षक म्हणून मी, मुख्य अभियंता व वीज कंपनीच्या जनरल मॅनेजरना बोलावून एक तासाचा Awareners Programme दोन वेळेस संपूर्ण राज्यात दाखविण्यात आला.५) आकाशवाणी व इतर मीडिया : पुणे व मुंबई रेडिओवर संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून सप्ताहामधील विविध उपक्रमांबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. रेडिओवरील या कार्यक्रमास सर्वाची विशेषत: ग्रामीण भागातून लोकांची खूप दाद मिळाली.वरीलप्रमाणे कार्यक्रम २००४ पर्यंत शासन पुरस्कृत या स्वरूपात होत होते, परंतु त्यानंतर काही अपरिहार्य कारणांमुळे महाराष्ट्रात हा सप्ताह पाळणे जवळजवळ बंदच पडले होते, परंतु विद्युत सुरक्षेचे काम हे सुरूच होते. विद्युत अपघात व शॉर्ट सर्किटमुळे लागणाऱ्या आगींचे प्रमाण मात्र वाढतच होते. त्यामुळे लोकजागृती करणे आवश्यक आहे व पुन्हा लोकांमध्ये विद्युत नियम व सुरक्षेची जाणीव निर्माण करण्यासाठी विद्युत सुरक्षा सप्ताह पूर्वीप्रमाणे पुन्हा साजरा करावा असे मला व काही विद्युत कंत्राटदार आणि व्यावसायिकांना वाटले व नोव्हेंबर २०१४ मध्ये पुण्यामधे एक ‘विद्युत सुरक्षा मंच’ या नावाने एक अनोखी चळवळ (movement) उभी राहिली. या फोरममध्ये विद्युत सुरक्षेविषयी जाण व तळमळ असणारे विद्युत सल्लागार, कंत्राटदार, इंजिनीअरिंग कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक, वीज कंपनीचे अभियंते, काही शासकीय अभियंते, सजग नागरिक मंच असे मान्यवर आहेत. १ मेपासून सुरू होणारा ‘विद्युत सुरक्षा सप्ताह’ पुणे-मुंबईपासून सुरू करण्याचा या मंचाचा निर्धार आहे आणि त्याप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. वर उल्लेख केलेले बहुतांश उपक्रम हाती घेऊन जनमानसात विद्युत सुरक्षेबाबत जाणीव निर्माण करून ‘शून्य अपघाताकडे’ या मंचाची वाटचाल सुरू आहे. विविध ठिकाणच्या विद्युत संच मांडण्यांमधील सबस्टेशन्सवरील त्रुटी (defects) ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. त्याबाबत योग्य ती कारवाई करून संबंधितांवर एक ‘दबाव गट’ तयार करून लोकांना विद्युत सुरक्षित ठेवणे हे मंचाचे ध्येय आहे. त्यांची Website असून ती www.vidyutmanch.org.मित्रांनो कुठलाही अपघात असो, त्याची प्रमुख कारणे तीन आहेत. १) नियमांचे उल्लंघन २) निकृष्ट देखभाल (Poor Maintenance) आणि ३) बेफिकिरी क्र. २ व ३ हे माणसाच्या स्वभावाशी निगडित आहेत. ज्यात प्रशिक्षणाची गरज आहे. क्र. १वरील नियम या बाबतीत लोकांना माहिती अशा सुरक्षा सप्ताहात विविध उपक्रमांद्वारे दिली जाते. नियमांचे योग्य पालन केल्यास बहुतांश (Majority)) प्रमाणात सुरक्षा प्राप्त होते. रोड सेफ्टी, फायर सेफ्टी व इंडस्ट्रिअल सेफ्टीलाही हे लागू आहे. लोकहो असे म्हणतात की, ''Accidents do not happen, they are caused'' आणि सत्य हे आहे की नियमांचे उल्लंघन व Poor Maintenanceयामुळेच अपघात घडतात व त्यास कारणीभूत असणाऱ्यांवर कडक कारवाई केली तरच अपघातग्रस्तांना न्याय मिळेल/ मिळायलाच हवा. प्रकाश कुलकर्णीविद्युत सल्लागार आणि सदस्य, राष्ट्रीय सुरक्षा परिषद,plkul@rediffmail.com