राज्यातील सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्तास्थापनेसाठी बाहेरून पाठिंबा देण्याचे निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतला आहे. पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी याबद्दल पत्रकारांना माहिती दिली. यावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार हेदेखील तिथे उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वीच प्रफुल्ल पटेल यांनी राज्यात पुढील सरकार स्थापण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस महत्त्वाची भूमिका बजावेल, असे ट्विट केले होते. त्याचाच पुढचा भाग म्हणजे या पक्षाने भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादी सत्तेमध्ये सहभागी होणार नसून, केवळ भाजपला बाहेरून पाठिंबा देणार असल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले.विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी ४३ जागांवर विजय मिळवण्याची शक्यता आहे आणि भाजपला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी २५ आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा पाठिंबा स्वीकारल्यास भाजपला शिवसेनेचीही मदत घेण्याची गरज पडणार नाही. आत्ता भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा स्वीकारून सत्तास्थापन करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.