अफझलखानाची फौज, दिल्ली की बिल्ली अशा शब्दांत ज्यांच्यावर टीका केली त्या भाजप दिल्लीश्वरांपुढेच सत्तेसाठी शिवसेनेने नमते घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या १५ वर्षांपासून सत्तेचा दुरावा सहन करणाऱ्या शिवसेनेने आता सत्तेत सहभागी व्हावेच असा दबाव नेत्यांकडून वाढल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करण्याचे ठरवले आहे. मात्र, तूर्तास भाजपचे महाराष्ट्र प्रभारी जे. पी. नड्डा यांच्याशी शिवसेना खासदार अनिल देसाई व माजी आमदार सुभाष देसाई प्राथमिक चर्चा करणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सत्ता खेचून आणण्यासाठी स्वबळाच्या बेटकुळ्या दाखवून झाल्यानंतरही निवडणुकीत मतदारांनी जागा दाखवल्याने शिवसेनेने नमते घेण्यास सुरुवात केली आहे. ‘मिशन १५१’च्या हट्टामुळे युती तुटली व सत्तेची संधी हुकली, अशी हुरहूर शिवसेना नेत्यांमध्ये आहे. भाजपला सत्तास्थापनेसाठी जागा कमी पडत असतील आणि ते सहकार्य घेण्यास तयार असतील तर मिळेल तो वाटा घ्यावा अशी शिवसेनेतील काही नेत्यांची भूमिका आहे. ताठर भूमिका घेऊन भाजपची अडवणूक केल्यास तसेच उपमुख्यमंत्रिपद वा महत्त्वाच्या मंत्रिपदांचा आग्रह धरल्यास भाजप जुमानणार नाही त्यामुळे नमते घ्यावे व विरोधी पक्षनेतेपद घेऊन पाच वर्षे सत्तेबाहेर राहण्यापेक्षा भाजपशी जुळवून घेण्याकडे शिवसेनेचा कल आहे. विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी राष्ट्रवादी भाजपला मदत करण्यास व बाहेरून पाठिंबा देण्यासही तयार आहे. शिवसेनेशिवाय भाजपचे काहीही अडत नाही हेच त्यातून अधोरेखित होणार असल्याने सत्तेत सहभागी व्हावे असे नेत्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रात युती तुटली तरी केंद्र सरकार व रालोआतून बाहेर पडण्याचा निर्णय मोदी यांच्याशी चर्चेनंतरच घेतला जाईल, असे ठाकरे यांनी आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे ते दिल्लीला जाऊन मोदी व अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे.शिवसेनेला पाने पुसणारअखंड महाराष्ट्राची हमी दिली तरच पाठिंबा देऊ, अशी भूमिका उद्धव यांनी सुरुवातीला घेतली होती. मात्र, भाजपने ती अमान्य केली. शिवसेनेशिवाय काही फरक पडत नसल्याने महत्वाची खाती त्यांच्याकडे दिली जाणार नाहीत अशी भाजपची भूमिका आहे. पण आता सत्तेबाहेर राहिल्यास पक्ष फुटेल किंवा नेते आणखी नाराज होतील व पक्षाची ताकद कमी होत जाईल. पाच वर्षे सत्तेबाहेर काढल्यास पक्षाची अडचण होईल. मुंबई महापालिकेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजप त्रास देईल, हा विचार करुन मिळेल ते पदरात पाडून घेण्याच्या तयारीत सेना असल्याची चर्चा आहे.