राष्ट्रवादी काँग्रेस जागावाटपाच्या मुद्द्यावरून अडून बसल्यास काँग्रेसला राज्यातील विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढवाव्या लागतील, असे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी दिल्लीत सांगितले. दिल्लीत शनिवारी झालेल्या काँग्रेस पक्षाच्या निवडणूक समितीच्या बैठकीत विधानसभेच्या १७४ जागांवरील उमेदवार निश्चित करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आडमुठेपणामुळे राज्यात स्वबळावर लढायची वेळ आल्यास, उर्वरित ११४ जागा लढण्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचा निर्णय सोनिया गांधीच घेतील असे माणिकराव ठाकरे यांनी बैठकीनंतर सांगितले.