शीर्षकाने चकित झालात ना? नव्हे नव्हे- सिक्वेलचं नाव नाही हो! आमच्या शिकवणीला कॉइन करून आम्ही असं संबोधलंय. भन्साळी दादांची नवी कलाकृती पाहून पेशव्यांचा इतिहास, बाजीराव आणि मस्तानी याविषयी आमची मेंदूकुपी एनरिच होऊ लागली. एक नक्की तमाम हिंदी भाषिक वर्गाला बाजीरावाचं, इतिहासातल्या या गौरवशाली पर्वाबद्दल कौतुक वाटतंय..

भन्साळींनी ते कसं मांडलंय हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं नाही कारण मोठय़ा पडद्यावर एका मराठी योद्धय़ाचा प्रवास ते प्रथमच पाहात आहेत. मात्र त्याच वेळी भन्साळींनी तमाम मराठी भाषिक प्रेक्षकांचा रोष ओढवून घेतलाय. सिनेमा कसा पाहावा यासाठी एरव्ही प्रभात चित्र मंडळाचं रसास्वाद शिबीर अटेंड करावं लागतं. या चित्रपटाने बसल्या बैठकीतच आम्हाला कैक नव्या गोष्टी उमगल्या. फ्रेम म्हणजे काय, ऐतिहासिक घटनांवर चित्रपट पाहताना पटकथा कशी लिहावी, त्यात गाणी असावीत काय, त्यांचे शब्द काय असावेत, भरजरी आणि भव्य कॅनव्हास कसा मांडावा अशा असंख्य सिनेमॅटिक गोष्टींची पाठशाळाच झाली आमची समाजमाध्यमांवर. नागरिकशास्त्रात आम्ही स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचे कित्ते गिरवले होते.

या चित्रपटाने ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ नावाचा मोठाच चॅप्टर अ‍ॅड झाला दप्तरी. ‘हा कसला बाजीराव, हा तर निव्वळशंख वळू’ ही प्रतिक्रिया वाचून आम्ही दिङ्मूढ झालो. पेशवेकालीन कपडेपट कसा होता, युद्ध जिंकून आल्यावर पेशवे विजयाचं सेलिब्रेशन कसं व्हायचं, पेशव्यांच्या काळी अखंड भारत नावाची कॉन्स्पेट अस्तिवात होती काय असा सवाल सजग नेटिझन्सनी केला आहे. बाजीराव मस्तानी हा बॉलीवूड मसालापट आहे, कुणाला तो इतिहासावर आधारित वाटला तर तो योगायोग समजावा ही प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. भन्साळींनी चित्रपट करण्यापूर्वी प्रमोद ओक यांचं ‘पेशव्यांचा इतिहास भाग १ आणि २’ वाचलं असतं तर बरं झालं असतं. ज्या बाजीरावांना इतिहासात कुणीही कुठल्याही लढाईत हरवलं नाही त्यांना भन्साळींनी तीन तासांत हरवलं, असा शेरा नोंदवण्यात आलाय. काही अभ्यासकांनी द. ग. गोडसे यांच्या ‘मस्तानी’ पुस्तकातला उतारा सादर करत चित्रपटातली विसंगती मांडली आहे. एका मित्राची प्रतिक्रिया ऐकून आम्ही खुर्चीतून पडायचे बाकी राहिलो- रणवीर सिंग बाजीरावांची भूमिका करत होता की बाजीराव रणवीर सिंगची भूमिका करत होते हेच चित्रपट संपेपर्यंत कळलं नाही. या सगळ्यावर एका कोटीने कडी केली- भन्साळीने बाजीरावाबरोबरच आपल्या मोजक्याच उरलेल्या समर्थकांचीही बघा कशी ‘वाट लावली’. एकीकडे तृतीयपर्णी विश्वातून रणवीरवर कौतुकाचा वर्षांव होतोय आणि दुसरीकडे मराठी माणसं टीकेचा भडिमार करत आहेत, अशा वित्रित्र कोंडीत आमचा न्यूजफीड अडकला. मग आमिरभाऊंचा सल्ला आठवला- निगेटिव्ह बरं असतं तब्येतीला, चित्रपटाच्या. मग हे चाललंय ते बरोबरंच की..

पण एक आहे राव! नववी ‘ब’मध्ये असताना पायथागोरसचे प्रमेय मिटक्या मारत सोडवणारे इतिहासाच्या सनावळ्या पाहिल्या की नाक मुरडायचे. या चित्रपटाच्या निमित्ताने इतिहासातल्या या धगधगत्या पर्वाशी आपला कनेक्ट दाखवण्याचा मंडळींचा प्रयत्न समोर आला. याचं श्रेय नि:संशय भन्साळींच्या लीलांना!

claimer- सदरहू मजकुराची जबाबदारी अस्मादिकांचीच आहे, त्याचे खापर अन्य कोणावर फोडू नये.