..आणि हा एक वेगळा सूर. नेमाडेंबरोबरच त्यांना पुरस्कार देणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्कार समितीवरही टीका करणारा..मराठी संस्कृती आणि मराठी साहित्य यांच्या मध्य प्रवाहापासून नेमाडे कायमच फटकून राहिले आहेत. पुरस्कारांचीही एकेकाळी त्यांनी भरपूर टिंगल केली आहे. पुरस्कार देणाऱ्या संस्था आणि पुरस्कार स्वीकारणारे लेखक यांच्याविषयी नेमाडे कधी आत्मीयतेने बोलले नव्हते. साहित्य अकादमी सन्मानाबाबत त्यांनी धोरण बदलले. सध्या तर पुरस्कार स्वीकारण्याचा सपाटाच त्यांनी लावला आहे. नेमाडे यांनी हा सन्मान स्वीकारणे योग्य नाही. यापूर्वी मराठीमध्ये वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) आणि िवदा करंदीकर यांना ज्ञानपीठ सन्मान मिळाला होता. नेमाडे यांनी ‘बिढार’ कादंबरीमध्ये (आवृत्ती ४ थी, पान ४१) या तीन लेखकांची किती असभ्य भाषेत नालस्ती केली आहे हे ज्ञानपीठ पुरस्कार समितीला माहीत नसले तरी मराठी वाचक विसरले असतील असे वाटत नाही. पुन्हा उच्चारू नयेत अशा भाषेत त्यांनी कुसुमाग्रजांविषयी लेखन केले हे मी नोंदवू इच्छितो. या तीन लेखकांनी स्वीकारला तसा ज्ञानपीठ सन्मान स्वत:ही स्वीकारून नेमाडे औचित्यभंग का करीत आहेत. कारण ज्ञानपीठ समितीने नेमाडेंची निवड करून त्यांना या तीन लेखकांच्या पंक्तीमध्ये बसविले आहे. माझ्या मते नेमाडेंनी ज्ञानपीठ स्वीकारू नये किंवा या तीन लेखकांचे मराठीला असलेले योगदान आणि त्यांचे मोठेपण जाहीरपणे मान्य करावे. ज्या ‘कोसला’ कादंबरीमुळे नेमाडेंचे नाव प्रकाशात आले ती कादंबरीसुद्धा (कै.) रा. ज. देशमुख यांच्याशी ‘खांडेकरांसारखी कादंबरी मी महिनाभरात लिहून दाखवीन’ अशी वल्गना करूनच नेमाडेंनी लिहिली होती. ज्ञानपीठ समितीने ज्या हिंदूू कादंबरीची निवड केली आहे त्या हिंदूमध्येसुद्धा ग्रामीण जीवनावरची तीनेकशे पाने वगळता नेमाडे यांचा जो विखारी ढंग दलितमुक्तीच्या चळवळी, स्त्रीमुक्तीचा विचार, माणसाची उत्क्रांती आणि एकूणच ज्ञानमूलक संशोधन करणारे व त्यांचे संशोधन हा कोणत्या सभ्य लिखाणाच्या मर्यादेत बसू शकतो असाही प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. लेखकांची निवड करताना ज्ञानपीठ समिती कोणाकडून माहिती घेते याचाही खुलासा झाला पाहिजे. त्या लेखकाचे पूर्वीचे लेखन, त्याची सांस्कृतिक भूमिका, िहसक वा अिहसक भाषाशैली, समाजातल्या शोषितांबद्दलची सहानुभूती असणे वा नसणे या मुद्दय़ांचा विचार समिती करत नसावी. नाही तर समितीने नेमाडे यांची निवड केली नसती. इतर सर्व पुरस्कारांप्रमाणे ज्ञानपीठ सन्मानही एका विशिष्ट कंपूच्या हाती गेला आहे, असे म्हणावे लागते.विनय हर्डीकर