जग वेगाने बदलत आहे. जगण्यातील प्रश्नांचे स्वरूप बदलत आहे. विज्ञान, वित्त आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांत वेगाने, अपेक्षांहून अधिक बदल घडत आहेत. भविष्यातल्या कल्पनातीत जगण्याची ही जणू नांदीच! अशा वेळी लक्षात घ्यायला हवे की, भविष्यातले प्रश्न आपण भूतकालीन साधनांच्या सहाय्याने सोडवू शकत नाही.. matiआणि म्हणूनच नव्या कल्पनांचे, नव्या शक्यतांचे स्वागत करायला हवे. येणारे दिवस अशा नाविन्यपूर्ण कल्पनांचे आहेत. कल्पना – आपले जगणे सुकर करू शकणाऱ्या, आव्हाने पेलण्याचे नवे मार्ग दाखविणाऱ्या. अशा सृजनशीलांना, प्रयोगवंतांना, त्यांनी साकरलेल्या नाविन्यपूर्ण कल्पनांना दाद देऊनच आज नव्या वर्षांचे स्वागत करू या.
हे ‘संशोधक’ आहेत महाराष्ट्राच्या मातीतील. त्यातील अनेकांकडे ना पदव्यांची भेंडोळी आहेत ना अद्ययावत प्रयोगशाळा. पण त्यांनी समस्यांचे संधीत रूपांतर केले. उपलब्ध साधनांच्या जोरावर अफलातून उत्पादन विकसित केले. असे उत्पादन जे विकले जाईल. जे त्यांच्या उत्पन्नाचे साधन बनेल आणि कित्येकांना उपयुक्तही ठरेल. अशा आपल्या मातीतील काही नवनिर्मात्यांवर एक नजर..

सायकलचा नांगर
जळगावच्या जामनेर तालुक्यातील गोपाळ भिसे यांनी अवघ्या १२०० रुपयांत सायकलच्या आधारे शेत नांगरणी यंत्र तयार केले आहे. त्यांच्या या अफलातून यंत्राविषयी..
e04शेतातील नांगरणी, वखरणी व तत्सम प्राथमिक कामांसाठी ट्रॅक्टर किंवा बैलजोडीची आवश्यकता असते. परंतु, अल्पभूधारक शेतकरी त्याचा भार पेलू शकत नाहीत. या परिस्थितीवर कल्पनाविष्कार आणि चिकाटीच्या जोरावर जळगावच्या जामनेर तालुक्यातील गोपाळ भिसे यांनी तोडगा काढला आहे. अवघ्या १२०० रुपयांत सायकलच्या आधारे भिसे यांनी निर्मिलेले ‘कृषिराज’ हे यंत्र शेतातील उपरोक्त कामे सफाईदारपणे करते. जिथे ट्रॅक्टर, बैलजोडीचा नांगरही काम करू शकत नाही, अशा ठिकाणीही हे यंत्र कामास येऊ शकते.
खडकाळ जमिनीत शेती करणे खचितच अवघड. शेतीसाठी अत्यावश्यक साधनसामग्री व अवजारांसाठी नेहमीच दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. या प्रतिकूल परिस्थितीवर ६४ वर्षांच्या भिसे यांनी अथक प्रयत्नान्ती मात करण्यात यश मिळविले आहे. सायकलच्या आधारे त्यांनी निर्मिलेले ‘कृषिराज’ आज आसपासच्या गावांतील २०० हून अधिक शेतकऱ्यांच्या शेतात काम करत आहे. इतकेच नव्हे तर, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, पंजाब या भागांतही त्याचा वापर होत आहे. शेंदुर्णी गावालगतच्या शेतात वास्तव्यास असणाऱ्या भिसे यांचे संशोधन थक्क करणारे आहे. बेताच्या आर्थिक स्थितीमुळे दोन e03एकर जमिनीची मशागत करणे ही इतरांप्रमाणे त्यांच्यासमोरील समस्या. नांगरणी, कोळपणी, वखरणी अशा कामांसाठी ट्रॅक्टर किंवा बैल मागवण्याचा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेरचा होता. ट्रॅक्टरच्या माध्यमातून होणारी कामे पाहून भिसे यांनी दुचाकी सायकलच्या मदतीने काही करता येईल काय, या दृष्टीने विचार सुरू केला. अथक प्रयत्न, आवश्यकतेनुसार बदल करत त्यांनी ‘कृषिराज’ची निर्मिती केली आहे. आज त्यांचे अत्यल्प खर्चात तयार झालेले हे यंत्र शेतीच्या विविध कामांसाठी वापरले जात आहे.
सायकलचे पुढील चाक, चिमटा, हॅण्डल, गज वाकवून त्याला त्यांनी लाकडी कोळप बांधले. पण पट्टी मोठी झाल्याने लोहाराकडून त्यांनी लोखंडी कोळप तयार करून घेतले. कोळपणीच्या कामाला सुरुवात झाली. सुरुवातीला काम करण्यास अडचणी आल्या. पुढे गरजेनुसार बदल करण्यात आले. चार इंचाचे ‘लोखंडी अँगल’ घेऊन पट्टीच्या साहाय्याने ते मागेपुढे होत राहतील अशी व्यवस्था करण्यात आली. यामुळे अगदी शेताच्या बांधावर ज्या ठिकाणी बैल किंवा ट्रॅक्टर काम करू शकणार नाही अशा ठिकाणी हे यंत्र सहज वापरता येऊ लागले. या यंत्रासाठी १२०० रुपये खर्च आला. या यंत्राच्या मदतीने बरीचशी कामे करण्यास त्यांनी सुरुवात केली.
आजमितीस ‘कृषिराज’ यंत्रासाठी साधारणत: २६०० रुपये खर्च येतो. मात्र ट्रॅक्टर आणि बैलाच्या भाडय़ाच्या तुलनेत हा खर्च अत्यल्प आहे. याशिवाय हे यंत्र स्वयंचलित असल्याने त्यासाठी इंधन व तत्सम खर्चही लागत नाही. ‘कृषिराज’ हे यंत्र अल्पभूधारकांना वरदान ठरले आहे. त्याचा प्रसार झपाटय़ाने होत आहे. मात्र राज्य शासनाकडून अद्याप याची दखल न घेतल्याची खंत भिसे यांना सतावत आहे.
-चारुशीला कुलकर्णी

खडकाळ जमिनीत आपले यंत्र चालणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी खास व्यवस्था करून कुदळ व दांडा बसविला. शिवाय तीन अँगलचा आधार घेऊन त्यात दहा-बारा पट्टय़ा लावून तीन कुदळ बसविण्याची सुविधा केली. जेणेकरून कमी श्रमात अधिकाधिक नांगरणी होईल, याकडे लक्ष देण्यात आले.
सुगंधी संशोधन
डॉ. माधुरी शरण आणि डॉ. महेश्वर  शरण या दाम्पत्याने शेतीजन्य टाकाऊतून बहुउपयोगी दरुगधी शोषक बनवले असून त्यामुळे घरातील तसेच सार्वजनिक ठिकाणची दरुगधी रोखण्यात खूपच मदत होणार आहे.
e01सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या बहुतेक स्वच्छतागृहांचा दरुगधी हा जणू काही अविभाज्य घटक असल्याने अक्षरश: नाक मुठीत धरूनच त्याचा वापर करावा लागतो. एरवी एकमेकांपासून चार हात दूर ठेवले जाणारे भिन्न गुणधर्माचे पदार्थ टिकावेत म्हणून फ्रिजनामक शीतपेटीत नाइलाजाने एकत्र ठेवले जातात. अशावेळी कांदा आणि लसणीच्या उग्र वासापासून दूध कसे वाचवायचे असा प्रश्न गृहिणींना पडलेला असतो. मिश्र आहार घेणाऱ्या कुटुंबात तर शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ एकाच फ्रिजमध्ये असतात. ते कितीही झाकले तरी त्यांच्या गंधांची सरमिसळ होऊन सगळ्याचीच चव बिघडते, मात्र शरण दाम्पत्याने तयार केलेला हा दरुगधीशोषक फ्रिजमधील विविध पदार्थाचे गंध एकमेकांमध्ये मिसळणार नाहीत याची काळजी घेतो. त्यामुळे अगदी शेजारी ठेवलेले असले तरी दुधाला कांदा-लसणीचा वास येत नाही. e02कायम बूट पायात असणाऱ्या काहींच्या मोज्यांना दरुगधी येते. अॅसिडिटीचा त्रास असणारे वेळी-अवेळी बाहेर पडणाऱ्या गॅसच्या दरुगधीमुळे अपराधी मनाने वावरत असतात. या दोन्ही प्रकारांत हे दरुगधीशोषक उपकारक ठरू शकते. बुटांच्या सोलमध्ये हे दरुगधीशोषक बसविता येऊ शकते. पोटाचे विकार असणाऱ्यांनी दरुगधीशोषक डायपर वापरल्यास चारचौघांत त्यांना आत्मविश्वासाने वावरता येईल, तसेच लांबच्या विमान प्रवासात वातावरणातील प्रसन्नता कायम ठेवण्यातही हे दरुगधीशोषक उपयोगी ठरू शकेल, अशी माहिती डॉ. माधुरी शरण यांनी दिली.
कार्बनच्या गुणधर्माचा वापर
विशेष म्हणजे सहज उपलब्ध असणारे आणि एरवी टाकाऊ असणारे उसाचे चिपाड अथवा गवतापासून हे दरुगधीशोषक बनविले जाते. मुळात कार्बनमध्ये शोषून घेण्याचा गुणधर्म असतो. त्याला सूक्ष्मातिसूक्ष्म रूप देऊन त्याची शोषून घेण्याची ताकद कैकपटींनी वाढविण्यात येऊन हे पर्यावरणस्नेही दरुगधीशोषक (डिओडोरायझर) बनविण्यात आले आहे. काळ्या दंतमंजनासारख्या दिसणाऱ्या या दरुगधीशोषकाची उपयुक्तता गेले वर्षभर तपासण्यात आली. फ्रिज तसेच स्वच्छतागृहात ते साधारण सहा महिने काम करते. त्यानंतर तव्यावर गरम केले की त्यात साठून राहिलेला वायू वातावरणात निघून जातो आणि ते पुन्हा वापरण्यायोग्य बनते. सध्या बाजारात दरुगधी घालविण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या सुगंधी फवाऱ्यांपेक्षा हे दरुगधीशोषक कितीतरी स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे.
डॉ. महेश्वर शरण आयआयटीमध्ये प्राध्यापक, तर डॉ. माधुरी शरण रिलायन्समध्ये संशोधन आणि विकास प्रकल्पात संचालक म्हणून कार्यरत होत्या.
प्रशांत मोरे

उसाचा रस काढल्यानंत शिल्लक राहिलेली चिपाडे, नारळाचा काथ्या अशा कचरा ठरणाऱ्या वनस्पतिजन्य वस्तूंचे सूक्ष्मातिसूक्ष्म तंत्रज्ञानाच्या आधारे उपयुक्त उत्पादनात रूपांतर करण्याचे विविध प्रयोग ते करीत आहेत. दरुगधीशोषक हे त्यातील एक यशस्वी ठरलेले संशोधन आहे. त्याच्या पेटंटसाठीही अर्ज केला असून लवकरच ते बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल. त्यासाठी उद्योजकांशी बोलणी सुरू आहेत.
शेतमजूर ते ऊस निर्माता
शेतमजूर, शेतकरी ते संशोधक असा भानसहिवरा (ता. नेवासे) येथील विश्वनाथ बाळदेव चव्हाण यांचा थक्क करणारा  असा प्रवास आहे. जिद्द, कष्ट व पारंपरिक ज्ञानाच्या माध्यमातून निवड पद्धतीने त्यांनी उसाची नवी e07जात संशोधित केली आहे.
जा गतिकीकरणामुळे बौद्धिक स्वामित्व हक्काला विशेष महत्त्व आले. शेतकऱ्यांच्या बियाणे हक्काकरिता केंद्र सरकारने २००१ मध्ये पिकवाण संरक्षण व शेतकरी हक्क कायदा केला. जे शेतकरी नवीन बियाणे किंवा नवीन वाण संशोधित करतात, तसेच पारंपरिक बियाणाचे जतन व संवर्धन केलेले आहे, अशा शेतकऱ्यांना त्यांचे कार्य, अनुभव व योगदानाच्या आधारावर अधिकार देण्यात येऊन प्राधिकरणाकडे त्याची नोंदणी करण्यात येऊ लागली. देशभरातील सुमारे ५७ संशोधन केंद्रांवर त्याच्या चाचण्या घेण्यात येतात. चव्हाण यांनी संशोधित केलेल्या ज्ञानेश्वर १६ या उसाच्या जातीची नोंदणी करण्यासाठी पिकवाण संरक्षण हक्क प्राधिकरणाकडे नोंदणी करण्यात आली असून कोईमतूर (तामिळनाडू) व आगळी (केरळ) येथील ऊससंशोधन केंद्रावर त्यांच्या चाचण्यांचे काम अलीकडेच सुरू झाले आहे.
चव्हाण यांनी १९९७ मध्ये ज्ञानेश्वर कारखान्याकडून को.८६०३२ या जातीच्या उसाचे बेणे शेतात लागवडीकरता आणले. एक डोळा पद्धतीने त्यांनी लागवड केली. त्याचे बेणे अन्य शेतकऱ्यांनी शेतात लावण्यासाठी नेले. चव्हाण यांनी बेणे विक्रीचा धंदा सुरू केला. त्यातून शेतात ज्या उसाचे पान हे रुंद आहे, कांडी जोमदार आहे, रंग हिरवागार आहे त्याची निवड करून ते बेणे लावत असत. अशा पद्धतीने सुमारे १६ वर्षे त्यांनी निवड पद्धतीचे बेणे वापरले. रासायनिक खताऐवजी शेणखत, काडीकचरा याचा वापर केला. पिकाला थंड हवामान मिळावे म्हणून कडेने गिन्नीग्रास लावले. निवड पद्धतीमुळे उसाची नवीनच जात तयार झाली. या उसाच्या कांडय़ांना चिरा जात नाहीत, खोडकीड पडत नाही, उतारा वाढतो, पाण्याचा ताण सहन करते, तुरा येत नाही, वजन देते असे अनेक गुण आढळून आले. या उसाचे वाढे जनावरांना खाण्यासाठी चांगले असून उसात साखरेचे प्रमाण जास्त असल्याने गूळ तयार करणारे गुऱ्हाळवाले शेतकरी चव्हाण यांच्याकडून या उसाचे बेणे व रोपे घेऊन जातात. हा ऊस त्यांनी पुणे येथे एका प्रदर्शनात ठेवला. e08त्यानंतर विविध प्रदर्शनात तो शेतकऱ्यांच्या व संशोधकांच्या पसंतीला उतरला. ऊस विशेषज्ञ डॉ. ज्ञानदेव हापसे, डॉ. अशोक ढगे, डॉ. सुभाष िशदे यांच्यासह अनेकांनी उसाच्या या नव्या वाणाचे कौतुक केले. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात प्राधिकरणाचे केंद्र असून तेथे ज्वारी, बाजरी व हरभरा या पिकांच्या जातींच्या चाचण्यांचे काम चालते. शेतकऱ्यांच्या संशोधित तसेच जतन केलेल्या वाणांचे प्रदर्शन भरविण्यात आले. त्यामध्ये चव्हाण यांचा ऊस होता. ही नवी जात को.८६०३२ पेक्षा वेगळी असल्याने तिची प्राधिकरणाकडे नोंदणी करावी, असे सुचविण्यात आले.
अशोक तुपे

चव्हाण यांच्या उसात एकसारखेपणा असून त्यात वेगळेपण आहे. तसेच तो वैशिष्टय़पूर्ण आहे. कोईमतूर ऊस संशोधन केंद्रातील डॉ. ए. आण्णा दुराई, डॉ. करपया यांनी ते मान्य केले आहे. सर्व निकष व कसोटय़ांवर या उसाची जात उतरली तर शेतकऱ्याची प्रजाती म्हणून तिची नोंद राष्ट्रीय स्तरावर होईल.आज आíथकदृष्टय़ा त्यांची शेती नफ्याची झाली असून कर्जाची गरज त्यांना पडत नाही. विशेष म्हणजे त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची शेतीशास्त्राची पदवी घेतली.
सुगंधी संशोधन
स्वस्तात डायलेसिस
‘लाख’मोलाचा शेवगा
सौर राखणदार.. शेतीसाठी
अंडी उबवण्याचे ‘लघू’ यंत्र
शेतमजूर ते ऊस निर्माता
तांदळाला ‘गोरे’पण देणारे यंत्र
अंडी उबवण्याचे ‘लघू‘ यंत्र
अनिल गाढे याने विज्ञान आश्रमात असलेल्या पोल्ट्री विभागाला १००-१५० पिले हवी होती. पण ३०-३० हजार अंडी उबवण्याच्या क्षमतेची यंत्र असल्यामुळे ती मिळालीच नाहीत. या गरजेतून या कमी क्षमतेच्या मशीनचा जन्म झाला.
लहान पोल्ट्री उद्योजकांना एक समस्या नेहमी भेडसावते. दोन-चारशे पिले मिळतच नाहीत. मिळालीच तर e10त्यासाठी जास्त किंमत मोजावी लागते. कारण ३०-३० हजार अंडी उबवण्याच्या क्षमतेची यंत्र वापरून अंडी उबवणारी मंडळी मोठे ग्राहक पाहतात. काही हजारांत पिले घेणाऱ्यांनाच सेवा देतात. अशा वेळी लहान स्वतंत्र उद्योजकाने करायचे काय? विज्ञान आश्रमात असलेल्या पोल्ट्री विभागालाही १००-१५० पिले हवी होती. ती मिळालीच नाहीत. या गरजेतून या कमी क्षमतेच्या मशीनचा जन्म झाला.
कामाची सुरुवात झाली. नेटवरून माहिती मिळवली. अंडी उबवणी मशीनसाठी (इनक्युबेटर) वेगवेगळे घटक महत्त्वाचे ठरतात- तापमान किती, आद्र्रता किती, वगैरे.. स्थानिक साहित्य वापरून बॉडी तयार केली. पहिले मशीन बनवले, पण आद्र्रतेचे गणित चुकल्याने केवळ १२ टक्के अंडी उबवली. त्यात सुधारणा केल्यावर हे प्रमाण ९२ टक्क्यांवर गेले. पुढे व्यावसायिक उत्पादन तयार करण्यासाठी बदल करावे लागले. ते दिसायला चांगले हवे, त्याची बॉडी अशी हवी की त्याला e09कमी वीज लागावी. त्यातून एक हजार अंडी उबवणारे इनक्युबेटर तयार झाले. ते विजेवर चालते. त्यात असे बदल केले की १० तास वीज नसली तरी इन्व्हर्टरवर १० तास मशीन चालू शकेल. एका गावासाठी पुरेसे आणि चालवणारा त्याच्या बळावर ८-१० हजार रुपये कमाई करू शकेल, असे हे मशीन.
अभिजित घोरपडे

नावीन्य / वेगळेपण काय?
* विजेवर चालणारी १५० अंडी, ५०० अंडी, १००० अंडी अशी तीन क्षमतेची मशीन्स तयार.
* बॉडीला वॉटर हीटरसाठी वापरले जाणारे ‘पब इन्स्युलेशन’ वापरल्याने मशीन विजेविना जास्त काळ चालू शकते. वीजबिलही कमी येते.
* सोलर वॉटर हीटरवर चालणारे इनक्युबेटर नव्यानेच विकसित केले.

उपयोग काय?
* लहान क्षमतेच्या पोल्ट्री व्यावसायिकांसाठी उपयुक्त.
* एखाद्या पंचक्रोशीची किंवा तालुक्याची
पिलांची गरज भागू शकते.
* कमी क्षमतेच्या मशीन दुरून, हैदराबादवरून येतात. त्यामुळे देखभाल-दुरुस्तीसाठी अडून राहावे लागते. ही मशीन महाराष्ट्रातील असल्याने हा अडथळा दूर होतो.
* खास लहान व्यावसायिकांचा विचार करून कमी क्षमतेच्या मोटारी वापरल्याने अधिक सोयीची.
‘लाख’मोलाचा शेवगा
दुष्काळ, अवकाळी पाऊस-गारपीट या संकटात इतर पिकांसारखे सरसकट नुकसान न होणाऱ्या शेवग्याच्या झाडाच्या ‘रोहित- १’ वाणाचे संशोधन करून  शेवगा शेतीला आंतरराष्ट्रीय परिमाण प्राप्त करून देणाऱ्या बाळासाहेब मराळे यांच्याविषयी..
शेवगा लागवडीचा आणि देखभालीचा वार्षिक खर्च असतो ३० ते ४० हजार रुपये आणि त्यातून मिळणारे वार्षिक उत्पन्न असते दीड ते अडीच लाखांच्या दरम्यान. दुष्काळ असो, गारपीट असो किंवा अवकाळी पाऊस e12असो, नुकसानीचे प्रमाण इतर पिकांपेक्षा तुलनेत कमी असते. अल्प पाण्यात येणारे हे पीक आहे, ज्यावर रोगराई पडण्याचा फारसा धोकाही नाही. तथापि, द्राक्ष आणि डाळिंबासारखे ‘ग्लॅमर’ शेवग्याच्या वाटय़ाला नसल्याने उत्पन्नासाठी सुरक्षित साधन म्हणून याकडे पाहणाऱ्यांची संख्या तशी कमीच आहे. यामुळे महाराष्ट्रात आजही ज्या शेवग्याच्या शेंगा विक्रीसाठी येतात, त्यात ६० ते ७० टक्के माल परराज्यातील असतो,’ ‘रोहित- १’ वाणाचे संशोधन आणि खास लागवड पद्धतीद्वारे शेवगा शेतीला आंतरराष्ट्रीय परिमाण प्राप्त करून देणारे बाळासाहेब मराळे सांगत होते.. त्यांच्या बोलण्यातून स्थानिक शेतकरी अडचणीत का सापडतो याची उत्तरे मिळत होती.

सिन्नर तालुक्यातील शहा गावातील बाळासाहेब मराळे यांचा शेवगा शेतीचा ‘मराळे पॅटर्न’ आज देशातच नव्हे तर, परदेशातही पोहोचला आहे. आकर्षक गर्द हिरवा रंग, गोड गर, अधिक टिकवण क्षमता, मध्यम लांबीच्या शेंगांना देशासह परदेशातील बाजारात मागणी असते. हे लक्षात घेऊन त्यांनी स्वत:च्या शेतात ‘रोहित- १’ वाण विकसित केले. तामीळनाडू कृषी विद्यापीठाने मराळे यांचे संशोधन मान्य करून त्यांच्e11या वाणाला अखिल भारतीय पातळीवरील सवरेत्कृष्ट शेवगा वाण म्हणून अधिकृत मान्यता दिली.
अनुभवाच्या जोरावर विकसित केलेली या लागवडीची पद्धत ‘मराळे शेवगा पॅटर्न’ म्हणून प्रसिद्ध आहे. या पद्धतीने लागवड केल्यास चांगले उत्पन्न हाती पडते. भारी जमिनीत १२ बाय सहा फूट अंतरावर लागवड केल्यास ६०० तर हलक्या बरड जमिनीत १० बाय सहा फूट अंतरावर ७०० झाडे बसतात. लागवडीनंतर पहिल्या सहा महिन्यांत उत्पादनास सुरुवात होते. मराळे यांनी ६६६.१ि४े२३्रू‘्रल्ल्िरं.ूे    या संकेतस्थळाद्वारे शेवगा शेतीचा प्रचार व प्रसार सुरू केला. ही माहिती पाहून जपानी शिष्टमंडळाने मराळेंच्या शेतीला भेट दिली. हे वाण घेऊन त्यांनी जपानमधील कुमिटोमो प्रांतात ८० एकरवर त्याची लागवड केली आहे. मागील १५ वर्षांत मराळेंची शेवग्याची शेती पाहण्यासाठी देश-परदेशातून सुमारे २० हजार शेतकरी व अभ्यासकांनी भेट दिली. अथक मेहनतीतून विकसित केलेले ‘रोहित- १’ वाण आणि लागवड पद्धतीचा देशभरातील हजारो शेतकऱ्यांना लाभ होत आहे. एकदा शेवगा झाडाची लागवड केल्यास पुढील १० वर्षे ते उत्पादन देते. आधीच्या वाणांचे आयुर्मान केवळ तीन ते सहा वर्षे असते. ही त्यांच्या संशोधनाची आणखी एक जमेची बाजू.
अनिकेत साठे

द्राक्ष वा डाळिंब पिकातून वर्षांतून एकदा उत्पन्न मिळते. नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास ते भरून काढण्यासाठी वर्षभराची वाट पाहावी लागते. तसेच द्राक्ष, डाळिंब यांचा एकाच वेळी हंगाम असतो. यामुळे बाजारभावाची शाश्वती नसते. शेवग्याचे मात्र तसे नाही. वर्षांतून दोन वेळा त्याचा हंगाम असतो. आठ दिवसांच्या अंतराने शेंगा काढाव्या लागत असल्याने बाजारभावात तेजी-मंदीचा फटका बसत नाही.

स्वस्तात डायलेसिस
डायलेसिससाठी भारतीय बनावटीचे उपकरण अत्यंत वाजवी दरात बनविणाऱ्या पुरुषोत्तम पाचपांडे यांची ही यशोगाथा.. या संशोधनासाठी त्यांना पेटंटही प्राप्त झाले असून यामुळे डायलेसिसचा खर्च गरीब रुग्णांच्या आवाक्यात आला आहे.
बुलढाण्यातील खरबडी हे पुरुषोत्तम पाचपांडे यांचे जन्मगाव. त्यांच्या वडिलांचा वेल्डिंगचा व्यवसाय होता तर आई शेतात राबणारी. घरची परिस्थिती तशी बेताचीच. अशा परिस्थितीत वाढलेल्या पुरुषोत्तमने किडनी  vv03साफ करणाऱ्या भारतीय बनावटीच्या यंत्राची निर्मिती करण्याचे आवाहन लीलया पेलले. स्वस्त अशा ‘स्मार्ट क्लीन’ या डायलेसिस रिप्रोसेसिंग यंत्रणेची निर्मिती करणाऱ्या पुरुषोत्तमचा बुलढाणा ते ठाणे व्हाया आयआयटी या प्रवासाची कहाणी अफलातून आहे.
माणसाच्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांमध्ये किडनीचा समावेश होतो. शरीराच्या आरोग्याचे संतुलन राखण्याचे मुख्य काम किडनीमार्फत केले जाते. किडनी निकामी झाल्यास डायलेसिस अथवा प्रत्यारोपणाशिवाय इतर पर्याय नसतो. आजही डायलेसिस करायचे तर त्यासाठी परदेशी बनावटीच्या महागडय़ा यंत्रसामग्रीवर अवलंबून राहावे लागते. अनेक छोटय़ा रुग्णालयांमध्ये अशा प्रकारची महागडी यंत्रसामग्री ठेवणे शक्य नसते. त्यामुळे किडनी साफ करणाऱ्या स्वस्त दरातील यंत्राची समाजाला अत्यंत गरज होती. पुरुषोत्तम पाचपांडे यांच्या संशोधनाची दखल घेत अंधेरीस्थित एका कंपनीने त्यांना यंत्रनिर्मिती करण्यासाठी मदतीचा हात दिला. डायलेसिससाठी भारतीय vv02बनवटीच्या यंत्राची निर्मिती करण्यासाठी पाचपांडे यांना दोन वर्षांची मुदत आणि आवश्यक निधी देण्याची तयारी दाखवली. देहराडून येथील हिमालय मेडिकल इन्स्टिटय़ूट आणि मुंबईतील आयआयटी येथील संशोधन प्रयोगशाळेत वर्षभराच्या मेहनतीने पुरुषोत्तम पाचपांडे यांनी ही अवघड कामगिरी यशस्वीपणे पार पाडली. या संशोधनाचे पेटंट पुरुषोत्तमच्या नावे नोंदवले गेले आहे. परदेशामधून चार ते पाच लाखांना विकत मिळणारे हे यंत्र पुरुषोत्तम यांच्या संशोधनाद्वारे अवघ्या ३५ हजारांमध्ये तयार करण्यात यश प्राप्त झाले. हे यंत्र भारतात हे यंत्र अवघ्या एक लाख १० हजार रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.
औरंगाबाद येथून इलेक्ट्रॉनिक्समधून पदविका प्राप्त केलेल्या पुरुषोत्तम पाचपांडे यांना थेट आयआयटीत संशोधन करण्याची संधी मिळाली. त्याचे असे झाले, डिपार्टमेन्ट ऑफ सायन्सद्वारे राज्यातील ग्रामीण भागात काही संशोधनप्रकल्प राबविण्यासाठी निवड करण्यात येत होती. त्यात निवडल्या गेलेल्या तिघांमध्ये पुरुषोत्तम यांचा समावेश होता.. या प्रकल्पाअंतर्गत त्यांना आयआयटीत संशोधन करण्याची संधी मिळाली. या प्रकल्पाअंतर्गत त्यावेळेस आयआयटीत सौर ऊर्जेवर चालणारे दिवे, मोटारचा वेग नियंत्रण करण्यासाठीचे संशोधन, लोखंडावर प्रक्रिया करण्यासाठी उपयुक्त ठरणारे संशोधन अशा अनेक बाबतीत संशोधन सुरू होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका खासगी कंपनीमध्ये पुरुषोत्तम यांना नोकरी मिळाली. मात्र, या कंपनीत परदेशी कंपन्यांनी बनवलेल्या यंत्रांची हुबेहूब नक्कल केली जायची. ते न पटल्याने पुरुषोत्तम यांनी दुसरी नोकरी शोधली. त्या कंपनीला आपल्या संशोधनाची माहिती दिली आणि त्यातूनच किडनी स्वच्छ करणाऱ्या ‘स्मार्ट क्लीन’ या यंत्राची निर्मिती शक्य झाली.
दरम्यान, त्यांनी वैज्ञानिक प्रयोग शिकवणाऱ्या  ‘चिल्ड्रन टेक सेंटर’ संस्थेची स्थापन केली.  या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ‘रोबो लॅब’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रमही हाती घेण्यात आला आहे.
श्रीकांत सावंत

तांदळाला ‘गोरे‘पण देणारे यंत्र
अनिल गाढे हा मूळचा नगर जिल्हय़ातील श्रीरामपूरचा. तो २००३मध्ये पाबळ येथील विज्ञान आश्रमात आला. तिथे मिळालेल्या शिक्षणातूनच लोकांच्या गरजेनुरूप त्याने नावीन्यपूर्ण गोष्टी विकसित करण्यास सुरुवात केली.
बा जारात मिळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र तांदळापेक्षा हातसडीचा तांदूळ आरोग्यासाठी चांगला असतो. अलीकडे शहरी भागातून हातसडीच्या तांदळाला मोठी मागणी असते. पण तो मिळतो कुठेतरी एखाद्या प्रदर्शनात. e10तोसुद्धा बराच महाग. पाहिजे तेव्हा मिळेलच याचीही खात्री नसते. यातून मार्ग काढण्यासाठी अनिल गाढे या तरुण संशोधकाने प्रयत्न सुरू केले आणि जन्म झाला हाताने चालवता येणाऱ्या तांदूळ सडण्याच्या मशीनचा! अर्थात राईस पाउंडिंग मशीनचा. हाताने चालणारे हे मशीन तासाला १२ ते १८ किलो तांदूळ सडते, तर विजेवर चालणारे मशीन तासाला ६० किलोपर्यंत तांदूळ सडू शकते. सध्या हे मशीन काही बचतगट वापरत आहेत, पण त्याची किंमत पाहता ही यंत्रे गावागावांत आणि हातसडीचा तांदूळ घरोघरी पाहायला मिळाला तरी आश्चर्य वाटायला नको!
अडथळय़ांवर मात
हल्ली लोक आहार व आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत. त्यामुळे हातसडीच्या तांदळाची (ब्राऊन राईस) मागणी वाढली. पूर्वी तो मिळायचा. घरोघरी उखळात सडला जायचा. आता आधुनिक यंत्रामुळे तो पांढराशुभ्र बनला. गाढे यांच्या मशीनमुळे हातसडीच्या तांदळाची उणीव भरून निघेल. पण ते विकसित करताना अनेक अडथळय़ांचा सामना करावा लागला. सुरुवातीला मशीन केले ते होते, कांडप यंत्राप्रमाणेच. तेव्हा तांदूळ जास्त तुटायचे. पुढे रबर वापरून तांदूळ सडण्याची ‘रोल पद्धत’ वापरली. त्यात ठराविक जातीचे तांदूळच व्यवस्थित vv04सडले जायचे. कठीण गावरान तांदळामुळे रबर खराब व्हायचे. बासमतीसारख्या लांब तांदळाचेही तुकडे व्हायचे. हा दोष दूर करण्यासाठी पुढची पद्धत विकसित केली. ती होती ‘प्लेट पद्धत’, जात्याप्रमाणे रबरी पाती असलेली. त्याच्यामुळे लांब तांदूळही व्यवस्थित सडला जाऊ लागला. बहुतांश ठिकाणी ही मशीन्स महिला चालवणार आहेत, त्यामुळे त्यांच्या ताकदीचा विचार करून मॉडेलमध्ये अनेक बदल करावे लागले. पुढचा अडथळा होता, बऱ्याच प्रमाणात तांदूळ सडलेच न जाण्याचा. या मशीनमध्ये ६५ ते ७० टक्के तांदूळच सडले जायचे. मग प्लेट्सवरील दाब वाढवण्याची व्यवस्था केली आणि अपेक्षित परिणाम झाला व ९०-९५ टक्के तांदूळ सडले जाऊ लागले.
या यंत्राची किंमत : हाताने चालवले जाणारे- १० हजार रुपये; वीज व हाताने चालणारे- १६ ते १८ हजार रुपये.
या मशीनचा उपयोग एखाद्या कुटुंबाला किंवा बचतगटाच्या महिलांना व्यवसाय करणे शक्य आहे.  या मशीनच्या सहाय्याने आरोग्यदायी हातसडीचा तांदूळ मिळतो, तोसुद्धा सध्या मिळणाऱ्या हातसडीच्या तांदळापेक्षा कमी किमतीत.
अभिजित घोरपडे

या यंत्राचे वेगळेपण म्हणजे   बाजारात हातसडीचा तांदूळ करणारे हे पहिले यंत्र. एकावेळेस तांदूळ  तयार करण्याची क्षमता कमी, पण तांदळाचा दर्जा मात्र उत्तम मिळतो. उखळात मात्र तांदळाचे बारीक तुकडे होतात. हे मशीन हाताने चालवता येते आणि वीज वापरूनसुद्धा वापरता येते. यंत्र तयार करण्यासाठी अनिलने बाजारात उपलब्ध असलेले सुटे भाग वापरले. त्यामुळे किंमत कमी ठेवणे शक्य होते.
सौर राखणदार.. शेतीसाठी
व्यवसायाने जैववैद्यकशास्त्राचा अभियंता असलेल्या अविनाश जाधव यांच्या नव्या संशोधनाने  शेतकऱ्यांना उभारी दिली आहे. वन्य प्राण्यांपासून होणारे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी अतिशय कमी दरात त्यांनी सोलर फेन्सिंग यंत्रणा तयार केली.
मानव-वन्यजीव संघर्षांचा आलेख गेल्या काही वर्षांत उंचावला आहे. गाव आणि जंगलातील कमी होत असलेले अंतर हे त्यामागचे एक कारण आहे. याच जंगलालगत गावकऱ्यांची शेती आहे. एकीकडे रानडुक्कर, vv05नीलगाय, हरिण, सांबर यांसारख्या तृणभक्ष्यी प्राण्यांमुळे हाती आलेल्या पिकांचे नुकसान आणि दुसरीकडे या तृणभक्ष्यी प्राण्यांच्या मागावर असलेल्या वाघ आणि बिबटय़ाची शेतातील दहशत शेतकऱ्यांना सहन करावी लागत आहे. सुमारे ७५ टक्के शेतपीक केवळ या वन्यप्राण्यांमुळे शेतकरी गमावत आहे. वन खात्याला सांगावे तर  म्हणावी तशी दखल घेतली जात नाही. राज्य आणि केंद्राच्या वन खात्याकडून ‘सोलर फेन्सिंग’चा सल्ला दिला गेला खरा, पण दुष्काळ आणि नापिकीमुळे आत्महत्येच्या मार्गावर असलेला हा शेतकरी अडीच लाख रुपयांपासून सुरू होणारा ‘सोलर फेन्सिंग’चा पर्याय कसा वापरू शकतील?
पण अविनाश यांच्या नव्या संशोधनामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. चौफेर आणि चौकस बुद्धीच्या अविनाशने तब्बल दीड वर्षे राबून बॅटरीवर चालणारी स्वस्त व सौर कुंपण यंत्रणा तयार केली आहे. याचा प्रयोग तीन वर्षांपूर्वी त्यांनी आधी स्वत:च्याच शेतावर केला आणि तो यशस्वीही ठरला. त्यांनी दीड वर्षे सातत्याने सुधारणा करत यशस्वी ठरलेली त्यांची ही यंत्रणा शेतकऱ्याच्या आवाक्यातीलvv07 आहे. या यंत्रणेतून बसणाऱ्या विजेच्या झटक्याने वन्यप्राण्याचा बळी जात नाही तर बसणाऱ्या झटक्यामुळे वन्यप्राणी पुन्हा त्या शेताकडे ढुंकूनही पाहात नाही. त्याच्या स्वत:च्या शेतातल्या या प्रयोगाकडे बघून आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही या यंत्रणेचे महत्त्व  पटले. अवघ्या १५ हजारांत तयार होणारी ही ‘सोलर फेन्सिंग’ची यंत्रणा आता विदर्भच नव्हे तर पुणे, बीड, शिर्डी, शेगाव, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, वर्धा, पश्चिम महाराष्ट्रासह झारखंड, उत्तराखंड, मध्य प्रदेश, पंजाब आणि राजस्थानातही पोहोचली आहे. या यंत्रणेचे विशेष म्हणजे जनावर या ‘सोलर फेन्सिंग’च्या जवळ गेले की आपोआप सायरन वाजायला लागतो आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जनावर असल्याचे कळते. ही यंत्रणा रिमोटवरूनच नव्हे तर मोबाइलवरूनसुद्धा ऑपरेट करता येते. विशेष म्हणजे ही यंत्रणा वन खात्याच्याही तेवढीच उपयोगाची आहे. जंगलात लावलेल्या ‘कॅमेरा ट्रॅप’ला हे ‘सोलर फेन्सिंग’ जोडता येते. यामुळे कॅमेऱ्यासमोरून वन्यप्राणी किंवा शिकारी जरी गेला तरी कंट्रोलरूममध्ये बझर वाजतो आणि कॅमेऱ्यात ट्रॅप झालेला तो वन्यप्राणी किंवा शिकारी याचे त्वरित छायाचित्र त्या कंट्रोल रूममधल्या मॉनिटरवर पोहोचते. त्यामुळे शिकाऱ्याने कॅमेरा तोडफोड करण्याचा प्रयत्न केला तरीही त्याचे छायाचित्र मात्र आधीच वन खात्याजवळ पोहोचलेले असते.
राखी चव्हाण

शेतातील बुजगावण्यापासून प्रेरणा घेऊन अविनाशने एक ‘रोबो’ तयार केला आहे. शेतात पीक आले की पाखरांचाही तेवढाच त्रास होतो. हा रोबो स्वयंचलित असून पाखरे असो वा जनावरे, फटाक्यांच्या आवाजासह इतर वेगवेगळ्या आवाजांनी त्यांना दूर सारतो. सर्व दिशांना फिरणारी रोबोची मान स्वयंचलित छायाचित्रे घेत असल्यामुळे शेतमाल चोरांवरही वचक राहतो.