सरकार संशोधनासाठी खूप कमी गुंतवणूक करते हे सर्वज्ञात आहे. आजही आपण स्थानीय सकल उत्पन्नाच्या एक टक्क्यापेक्षा कमी गुंतवणूक करताना दिसतो. ही गुंतवणूक दोन टक्क्यांपर्यंत वाढविणे गरजेचे आहे. याशिवाय यासाठी केवळ सरकारवरच अवलंबून न राहता खासगी कंपन्यांनीही यामध्ये पुढाकार घेणे गरजेचे आहे. संशोधनाचा फायदा हा उद्योगांच्या विकासासाठी होतच असतो. यामुळे संशोधनातील गुंतवणूकही सरकारी पातळीवरच मर्यादित न राहता त्यामध्ये खासगी कंपन्यांनी त्यांचा सहभाग वाढविला पाहिजे.
याचबरोबर वैज्ञानिकांनीही केवळ पसे नाहीत म्हणून ओरड करू नये. विज्ञान संशोधन म्हणजे माणसाच्या कल्पकतेला प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे. केवळ पसे दिले म्हणून ते झाले असे होत नाही. यामुळे संशोधनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. मला आठवतंय की मी वयाच्या १७व्या वर्षी विज्ञान क्षेत्रात करिअर करायचे ठरवले होते. आज गेली ६० वष्रे विज्ञान संशोधनाचा आनंद लुटतो आहे. मी अमेरिकेत माझ्या पीएच.डी. साठी गेलो होतो तेव्हा मला खूप चांगले यश मिळत होते. पण तरीही मी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. कारण मी ज्या वर्षी महाविद्यालीन शिक्षण सुरू केले त्या वर्षी म्हणजे १९४७ साली भारत स्वतंत्र झाला, आणि दुसरे कारण म्हणजे माझी पहिली शिक्षिका आणि माझी आई तिच्यावर माझे जिवापाड प्रेम होते. मला आपल्या देशात जागतिक दर्जाच्या सुविधा देणाऱ्या संस्था आणि प्रयोगशाळा निर्माण करायच्या होत्या. अशा सुविधा आपल्या देशात निर्माण करून देशाला नवी दिशा देण्याची देशभावनाही माझ्या मनात त्या वेळेस होती. मी आजही सकाळी ४.३० ला उठून सुंदर गाणी ऐकून दिवसाची सुरुवात करतो. यानंतर प्रयोगशाळेत जातो. तेथे माझे काही विद्यार्थी आलेले असतातच. त्यांच्यासोबत मी प्रबंध लिहायला बसतो. सकाळची वेळ किंवा सुटीचे दिवस हे प्रबंध लिहिण्यासाठी खूप चांगले असतात असा माझा अनुभव आहे. त्यावेळी मी प्रबंध लिहिण्यासाठी खूप चांगला वेळ देऊ शकतो.
आज देशात सर्वात चांगले संशोधन हे रसायन शास्त्रामध्ये होत आहे. रसायन आणि औषध कंपन्या संशोधनात बऱ्यापकी काम करताना दिसतात. विशेषत आपल्या औषध कंपन्यांनी आरोग्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. रसायन शास्त्राच्या विविध पलूंमध्ये मी काम केलेले आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये मी कृत्रिम फोटोसिंथेसिझमवर काम करत आहे. यामध्ये चांगली प्रगती होत असून भविष्यात याचा उपयोग मोठय़ा प्रमाणावर होणार आहे. देशात नॅनो तंत्रज्ञान या क्षेत्रात खासगी कंपन्यांच्या मदतीने चांगल्या दर्जाचे संशोधन झाले आहे. या संशोधनातून विज्ञान क्षेत्राला खूप काही मिळाले आहे. यातील संशोधनामध्ये भारताचा क्रमांक जगात तिसरा लागतो. याबाबत आपण समाधान व्यक्त करायला हवे. पण इतर संशोधनातही आपण आघाडी घेण्याची गरज आहे. ही आघाडी इतके वर्षांत जमली नाही याबाबत मला केवळ सरकारला दोष द्यायला आवडणार नाही. कारण विज्ञानाला मागे सारण्यात समाजाचाही मोठा दोष आहे. जोपर्यंत समाजात विज्ञानाबद्दल आदर निर्माण होत नाही, तोपर्यंत वैज्ञानिक तयार होणे आणि त्यांना पोषक वातावरण मिळणे गरजेचे आहे. यासाठी शैक्षणिक संस्थासह समाजातील विविध घटक जबादार आहेत त्याचबरोबर सर्वाधिक जबाबदार हे वैज्ञानिकही आहेत. समाज विज्ञानाकडे येत नाही तर, वैज्ञानिकांनी समाजापर्यंत पोहोचले पाहिजे. हे जोपर्यंत पोहचत नाही तोपर्यंत समाज विज्ञानाकडे पोहोचणे कठीण आहे.
देशातील शिक्षणपद्धतीही आदर्श असली तरी त्यामध्ये आता आमूलाग्र बदल होण्याची गरज आहे. विशेषत शालेय शिक्षणात बदल होणे आवश्यक आहे. केवळ पुस्तकी शिक्षण वैज्ञानिक घडवू शकत नाही. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणारी शिक्षक मंडळी आज खूप कमी आढळतात. आजही देशातील बहुतांश ग्रामीण भागात सर्वच विधायकांसाठी चांगले शिक्षण मिळत नाही. यासाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. पण त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हायला हवी. आपल्याकडे ग्रामीण भागात जवाहर नवोदय विद्यालय योजना आहे. त्याची स्थापना मोठय़ा प्रमाणावर झाली पाहिजे. अशा संस्था जेव्हा उभ्या राहतील तेव्हाच आपण योग्य प्रकारे शिक्षण पुरवू शकतो. यातूनच चांगले विद्यार्थी घडतील आणि पुढे चांगले वैज्ञानिक. सध्या देशात ज्या काही संस्था आहेत त्यामध्ये अनेक हुशार आणि होतकरू विद्यार्थी आहेत. माझ्याकडेही असे अनेक विद्यार्थी आहेत, ज्यांना खरोखरीच काहीतरी करावयाचे आहे. देशात सध्या विविध सरकारी योजनांतर्गत चांगल्या संस्था उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम झाले की भविष्यातील संशोधक पिढी उभारण्याची आशा अधिक वेगाने होईल अशी आशा आहे.
संशोधक होण्यासाठी संयम हा गुण असणे आवश्यक आहे. जो सध्याच्या तरुण विद्यार्थ्यांकडे खूप कमी प्रमाणत आढळतो. त्यांनी संयम गमावू नये. सध्याची तरुणाई ही आपल्या कामासाठी कटिबद्ध असते. हा त्यांच्यातील खूप चांगला गुण आहे. यामुळे या गुणाला त्यांनी संयमाची जोड द्यावी. आपले ठरलेले ध्येय मिळेपर्यंत आपण काम करत राहावे. सध्याच्या तरुणाईकडून स्वतचा विकास करता करता पर्यायाने देशाच्या विकासाचाही विचार केला जात आहे. देशातील तरुणाईने मनात आणले तर आपला देश हा भविष्यात वैज्ञानिकांचा देश म्हणून ओळखला जाईल.