‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाचे यंदाचे सातवे वर्ष. यंदाही काही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थांची आम्ही गणेशोत्सवादरम्यान वाचकांना ओळख करून दिली. त्यात वंचितांना मायेची ऊब देत स्वत:च्या पायावर उभ्या करणाऱ्या, अक्षमांना सक्षम करणाऱ्या, दुर्मीळ ज्ञानभांडार जतन करणाऱ्या संस्थांचा समावेश होता. या संस्थांच्या कार्याला समाजातील दानशूरांचे पाठबळ लाभावे, यासाठी सुरू केलेल्या या उपक्रमाला यंदाही वाचकांचा भरभरून प्रतिसाद लाभला आहे. मदतीच्या धनादेशांचा ओघ आमच्या राज्यभरातील कार्यालयांकडे सुरू आहे. या संस्थांची पुन्हा थोडक्यात ओळख.

विद्यार्थी विकास योजना :

Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Wardha, dr babasaheb ambedkar jayanti, 15 days Campaign Launched , Caste Validity Certificate, Backward Class Students, caste validity for admission, caste validity for student,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पर्व, घ्या विशेष मोहिमेत जात पडताळणी प्रमाणपत्र
Nashik Education Department, Steps Up Efforts, Increase Voter, Turnout Through SVEEP Initiative, Systematic Voters Education and Electoral Participation program, students,
उन्हाळी सुट्टीतही एसव्हीईईपी उपक्रमासाठी धडपड
South East Central Railway Bharti 2024
SECR Bharti 2024 : १०वी, ITI पास विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी! रेल्वे अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, आजच अर्ज करा

‘सर्व शिक्षा अभियाना’मुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही दहावीपर्यंतचा शिक्षण प्रवास उत्तम गुणांनी पार करणारी गरीबाघरची गुणवत्ता उच्च शिक्षणाच्या टप्प्यावर मात्र पैशाचे सोंग आणता येत नसल्याने दुर्लक्षित राहते. इच्छा आणि क्षमता असूनही ही असामान्य गुणांची प्रतिभा केवळ आर्थिक कारणांमुळे कोमेजून जाऊ नये, यासाठी ठाण्यात सुरू झालेली ‘विद्यार्थी विकास योजना’ ही चळवळ आता राज्यातील २२ जिल्ह्य़ांत पोहोचली आहे. हातावर पोट असणाऱ्या, दिवसभराच्या मेहनतीतून केवळ पोटापुरते कमवू शकणाऱ्या कुटुंबातील राज्यभरातील शेकडो मुले-मुली या योजनेचा आधार घेऊन अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन आदी उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण करीत आहेत. वैयक्तिक स्तरावरील गुणवत्तेला उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारी ही योजना आता अधिक विस्तारित स्वरूपात राबवली जाणार आहे. त्यातून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अधिकाधिक गुणवंतांना शिक्षणासाठी मदत दिली जाईलच, शिवाय मराठी शाळांचे सक्षमीकरण, बळकटीकरण करून एकूणच शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महाराष्ट्रातील पुढील पिढय़ांचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षित करण्यासाठी प्रत्येक संवेदनशील व्यक्तीने या चळवळीत यथाशक्ती मदत करावी, असे आवाहन ‘विद्यार्थी विकास योजना’ संस्थेच्या संचालकांनी केले आहे.

धनादेश या नावाने काढा – सेवा सहयोग फाऊंडेशन (SEVA SAHAYOG FOUNDATION)

‘थिएटर अ‍ॅकॅडमी’

‘थिएटर अ‍ॅकॅडमी’ नाटय़संस्थेने ‘महाराष्ट्रीय मंडळा’च्या सहकार्याने ‘सकळ ललित कला संकुल’ साकारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. शालेय वयातील विद्यार्थ्यांवर ललित कलांचे संस्कार झाले तर कलांचा अभ्यास करून ही मुले त्यांच्या भावी जीवनात यशस्वी होतील, हा ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’चा संकल्प आहे. गेल्या दशकभरापासून ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’ने नाटय़निर्मिती आणि सादरीकरणाचे काम थांबविले आहे. मात्र नाटय़चळवळीच्या रूपात मूलभूत काम करताना काही महत्त्वाच्या गोष्टी राबविल्या आहेत. प्रसाद पुरंदरे यांच्याकडे संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा आल्यानंतर रंगभूमीविषयी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा श्रीगणेशा झाला.

येत्या काळात कोणत्याही एकाच कलेच्या आधारे कलासंस्थांना उभे राहणे अवघड होत असून, सगळ्याच कलांच्या सहअस्तित्वाशिवाय कलांसंस्थांचे अस्तित्व टिकू शकणार नाही, असे लक्षात आल्यानेच ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’ या नाटय़संस्थेने सकळ ललित कलांना एकत्र आणण्यासाठी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची आखणी केली आहे. नाटक पाहताना टाळ्यांचा प्रतिसाद देणाऱ्या रसिक प्रेक्षकांकडून आता अर्थसाह्य़ाची दाद लाभली तर हा प्रकल्प लवकर पूर्णत्वास जाणार आहे.

धनादेश या नावाने काढा – महाराष्ट्रीय मंडळ  (MAHARASHTRIYA MANDAL)

आविष्कार

समाजातील मतिमंद मुलांच्या विकासासाठी गेली सुमारे तीन दशके झटणाऱ्या ‘आविष्कार’ या रत्नागिरीतील संस्थेमध्ये व्यवसायाभिमुख प्रशिक्षण दिले जाते. हातखंबा-रत्नागिरी रस्त्यावर मिरजोळे ‘एमआयडीसी’मध्ये असलेल्या या संस्थेमध्ये विविध वयोगटांची शंभराहून जास्त मतिमंद मुले सध्या शिक्षण घेत आहेत. बालवयात नैसर्गिक विधी स्वावलंबीपणाने करायला शिकवण्यापासून स्वयंरोजगारापर्यंत या मुलांची प्रगती घडवण्याचं प्रचंड आव्हान हे शिक्षक यशस्वीपणे पेलत आहेत. आत्तापर्यंत इथून सुमारे ८०० मुले बाहेर पडली आहेत. १८ वर्षांवरील मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांचं समाजात पुनर्वसन करण्यासाठी श्यामराव भिडे कार्यशाळेमध्ये स्टेशनरी, कागदी व कापडी पिशव्या, भेटकार्ड, मेणबत्त्या बनवणे, घरकाम, सुतारकाम, शिवणकाम, बागकाम इत्यादींचे प्रशिक्षण दिले जाते. दोनशेपेक्षा जास्त मुलांना या प्रकारे प्रशिक्षित करण्यात आले असून, त्यापैकी सुमारे ४० जण स्वत:चे व्यवसाय सुरू करून स्वावलंबी झाले आहेत. तसेच इथे तयार होणाऱ्या वस्तूंच्या विक्रीचे खास स्टॉल वर्षांतील निरनिराळ्या सणांच्या काळात लावले जातात. या मुलांना आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी बनवण्यासाठी उत्पादन केंद्र सुरू करण्यासाठी अर्थसाहाय्याची गरज आहे.

धनादेश या नावाने काढा – आविष्कार सोसायटी फॉर डेव्हलपमेंट ऑफ मेंटली हॅण्डीकॅप्ड

AVISHKAR  SOCIETY  FOR  DEVELOPMENT OF  MENTALLY  HANDICAPPED

शांतिवन

बाबा आमटे यांच्या प्ररणेतून आपल्या गावातील समस्येवर मात करायची या प्रेरणेने काम सुरू करणाऱ्या दीपक  आणि कावेरी नागरगोजे दाम्पत्याने बीड जिल्ह्यत सुरू केलेले ‘शांतिवन’ सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक तरुणांचे प्रेरणास्थान बनले आहे. या प्रकल्पात आता ३०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यात ८० मुली प्रकल्पात  निवासी आहेत. वेगवेगळय़ा परिस्थितीमध्ये वाढलेली मुले. कोणी तमाशा कलावंताचा मुलगा तर कोणी ऊसतोड मजुराची मुलगी. कोणी शाळेचे तोंड न पाहिलेले तर कोणी अर्धवट शाळा सोडलेली. शांतिवन वंचित मुलांना शिक्षणाचा मार्ग दाखवत आहे.   बीड जिल्ह्यतून दरवर्षी साखर कारखान्यांवर ऊसतोडीसाठी हजारो कामगार जातात. त्यांच्या मुलांसह विविध कारणांनी शाळेत न जाऊ शकणाऱ्या अनेकांसाठी दीपक नागरगोजे यांचे काम महत्त्वपूर्ण आहे. कोणत्याही आधाराशिवाय चालणाऱ्या प्रकल्पाला आता समाजाच्या आर्थिक सहकार्याची गरज आहे.

धनादेश या नावाने काढा – भवानी विद्यार्थी कल्याण प्रतिष्ठान (BHAVANI VIDYARTHI KALYAN PRATISTHAN)

आम्ही आमच्या आरोग्यासाठी

नक्षलवाद्यांचे प्राबल्य असलेल्या क्षेत्रात राहून आदिवासींच्या उत्थानासाठी काम करणे हे आव्हान मोठेच. मात्र, डॉ. सतीश गोगुलवार आणि शुभदा देशमुख या ध्येयवादी दाम्पत्याने गडचिरोलीत आदिवासींमध्ये आत्मभानाची ज्योत पेटविली आणि त्यांच्या सक्षमीकरणाचा मार्ग सुकर केला. आदिवासींच्या विविध समस्या सोडविण्यासाठी ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ ही संस्था स्थापन करणाऱ्या या दाम्पत्याचा कुपोषणाविरोधातील लढा शहरी भागापर्यंत पोहोचला आहे. कुपोषणाच्या समूळ उच्चाटनाची या दाम्पत्याची योजना असून त्यासाठी अर्थसाहाय्याची गरज आहे.

या संस्थेने अपंगांनाही स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी उपक्रम आखले आहेत. काही वर्षांपासून नागपुरात ही संस्था अपंगांना प्रशिक्षण देते. आता त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याचा संस्थेचा मानस आहे.

धनादेश या नावाने काढा – आम्ही आमच्या आरोग्यासाठी  (AAMHI  AMCHYA  AROGYA  SATHI)

‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ सोशल चेंज’

प्रमाणापेक्षा कमी वजनाने जन्मलेल्या मुलांना मध्यम वयात हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब असे विकार आपसूक जडतात, असे निरीक्षण आहे. सशक्त मुले जन्माला यावीत, त्यांच्या अवयवांची पूर्ण वाढ व्हावी, अवयव सुदृढ व्हावेत आणि मध्यम वयात विकार जडू नयेत, यासाठी ‘सेंटर फॉर दी स्टडी ऑफ सोशल चेंज’ (सीएसएससी)या संस्थेने अभ्यास सुरू केला. गर्भधारणेपूर्वीच दूध, पालेभाज्या आणि फळांचा प्रमाणित, पोषक आहार पुरविण्यास सुरुवात केली. ज्या महिलांना किमान तीन महिने हा आहार घेतला त्यांनी जन्म दिलेल्या बाळांचे वजन अन्य बळांच्या तुलनेत वाढल्याचे आढळले. सध्या या प्रयोगाच्या दुसऱ्या टप्प्यात या मातांनी जन्म दिलेल्या सुमारे १८०० बालकांच्या शारीरिक वाढीसोबत बुद्धिमत्ता विकासाची चाचणी सुरू आहे.

केवळ ‘सरस’च नव्हे तर सुदृढ व सक्षम समाज धडविण्यासाठी सीएसएससी हा संस्था गेल्या चार दशकांहून अधिक काळ मुंबईतील वस्त्यांमध्ये निरपेक्षपणे कार्य करीत आहे. संस्थेच्या सहभागापासून थोरा-मोठय़ांची प्रेरणा व सहभाग साभलेल्या या संस्थेने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यांच्या कामाची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. संस्थेच्या कामाचा आवाका जेवढा वाढत गेला तसे त्याच्या पूर्ततेसाठीचा निधी उभा करणे हे मोठेच आव्हान आहे.

धनादेश या नावाने काढा – सेंटर फॉर द स्टडी ऑफ सोशल चेंज (Centre for the study of social change)

माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान

पुण्याच्या संजीवनी केळकर लग्न होऊन सांगोल्यात आल्या आणि ग्रामीण भागाशी त्यांची ओळख होत गेली. तालुक्यातल्या त्या पहिल्या महिला डॉक्टर..तोवर पुरुष डॉक्टरांशी बोलण्याच्या संकोचातून तालुक्यातील महिला आपली दुखणी तशीच, अंगावरच झेलत कुढत होत्या, हे त्यांच्या लक्षात आले आणि डॉक्टरकी करतानाच, महिलांच्या भावविश्वाशीही नाते जुळत गेले. अनेक महिला एकत्र आल्या आणि १९७९ मध्ये एका कामाला सुरुवात झाली. ‘माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’ या नावाने रुजविलेले ते रोपटे जोपासण्यासाठी ‘मिळून साऱ्या जणी’ कामाला लागल्या आणि सोलापूर जिल्ह्यतील कायमच्या दुष्काळाने ग्रासलेल्या सांगोला तालुक्यात एक काम उभे राहिले. माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान नावाच्या या संस्थेला आता जवळपास ४० वर्षे झाली आहेत.

स्थानिक आमदार गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेच्या पुण्याईचे पाठबळ लाभलेल्या या संस्थेचे आता एका विशाल कार्यवृक्षात रूपांतर झाले आहे. महिला बचत गटांपासून आरोग्य, शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, कलोपासना आणि अभिव्यक्ती असे अनेक उपक्रम संस्थेत सुरू झाले आहेत. स्त्री शिक्षण, स्वयंरोजगार, बालकांचा व्यक्तिमत्त्व विकास, संगणक शिक्षण, विज्ञान प्रयोगशाळा, मदानी खेळ, विक्री केंद्रे, शेती क्षेत्रातील वेगवेगळे प्रयोग, जलसंधारणाची कामे, यातून तालुक्याचे समाजजीवन बदलू लागले आहे.

 धनादेश या नावाने काढा – माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान mata balak utkarsha pratishthan

‘रचना ट्रस्ट

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात १९६८ पासून काम करत ‘रचना ट्रस्ट’ने स्वतची वेगळी ओळख निर्माण केली. समाजवादी विचारांनी कार्य करणाऱ्या मंडळींनी संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. सध्या हे कार्य भास्कर पटवर्धन, सुलक्षणा महाजन, डॉ. शोभा नेर्लीकर, निरंजन ओक आदी विश्वस्त पदरमोड करत नेटाने पुढे नेत आहेत. आदिवासी मुलींचे शिक्षण व नोकरदार व निराधार महिलांचा संस्थेने साकल्याने विचार केला. गोरगरीब आदिवासी मुलींसाठी वसतिगृह, आश्रमशाळा, परिचारिका महाविद्यालय तर नोकरदार महिलांसाठी वसतिगृह, निराधार महिलांना आधार देण्यासाठी अल्प मुदतीचे निवासस्थान आदी प्रकल्पांची उभारणी केली. सद्य:स्थितीत मुलींच्या वसतिगृहात ८७ मुली, आश्रमशाळेत ४३४ विद्यार्थी, परिचारिका महाविद्यालयात ७८ आदिवासी विद्यार्थिनी आणि अल्प मुदतीच्या निवासस्थानात ३० हून अधिक महिला वास्तव्यास आहेत. कौटुंबिक हिंसाचारामुळे घर सोडावे लागलेल्या विवाहिता,  परित्यक्ता, द्विभार्या, विधवा आदी आपद्ग्रस्त महिलांना सुरक्षित निवारा व प्रशिक्षण देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले जाते. मात्र, वंचितांना आधार देणाऱ्या या आधारवडास आर्थिक आधाराची गरज आहे.

धनादेश या नावाने काढा –  रचना ट्रस्ट ( Rachana Trust)

महाराष्ट्र आरोग्य मंडळ

साने गुरुजी यांच्या कार्यापासून प्रेरित होऊन डॉ. सि. तु. ऊर्फ दादा गुजर यांनी डॉ. बाबा आढाव आणि आपल्या दोन डॉक्टर मित्रांच्या सहकार्याने ११ जून १९६० रोजी  हडपसर येथे महाराष्ट्र आरोग्य मंडळ आणि साने गुरुजी आरोग्य केंद्राची स्थापना केली. गोरगरीब रुग्णांना रुग्णसेवा देण्याच्या उद्देशातून स्थापन झालेल्या या संस्थेने ग्रामीण विकास आणि शिक्षण क्षेत्रातही भरीव योगदान दिले आहे. रक्तातील अनुवांशिक घटकांमुळे उद्भवणाऱ्या ‘सिकल सेल अ‍ॅनीनिया’ या जनुकीय आजाराच्या गोरगरीब रुग्णांवरील उपचार आणि या विकाराच्या उपचारांबाबत संशोधन करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य मंडळातर्फे स्वतंत्र रुग्णालयाची उभारणी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. अंकलखेडा (ता. चोपडा, जि. जळगाव) येथे हे रुग्णालय उभारण्यात येणार असून हे शिवधनुष्य पेलण्यासाठी संस्थेला समाजातील दानशूरांकडून अर्थसाह्य़ाची अपेक्षा आहे.

धनादेश या नावाने काढा – महाराष्ट्र आरोग्य मंडळ (maharashtra aarogya mandal)

पुणे नगर वाचन मंदिर

‘पुणे नगर वाचन मंदिर’ संस्थेने दुर्मीळ ग्रंथांच्या जतनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून, डिजिटायझेशनच्या माध्यमातून संस्थेने आतापर्यंत पन्नास हजार पृष्ठांचे ज्ञानभांडार संगणक प्रणालीच्या साहाय्याने जतन करून ठेवले आहे.

दुर्मीळ ग्रंथाच्या जतनाचा हा प्रकल्प केवळ पुणे नगर वाचन मंदिरापुरताच मर्यादित राहू नये, असाही संस्थेचा मानस आहे. वाई, सोलापूर, कोल्हापूर यासह ज्या गावांमध्ये जुनी ग्रंथालये आहेत, तेथील ग्रंथसंपदाही जतन करून ठेवावी लागणार आहे. आर्थिक बाबींचा विचार करता हे काम छोटय़ा ग्रंथालयांना शक्य होणार नाही, अशी त्यांची स्थिती आहे. ही परिस्थिती ध्यानात घेऊन अशा ग्रंथालयांमधील ग्रंथसंपदेचेही डिजिटायझेशन पुणे नगर वाचन मंदिराकडून करून देण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यासाठीचा खर्च पुणे नगर वाचन मंदिर करणार असून या प्रकल्पाबाबत विविध ग्रंथालयांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा सुरू असून त्या ग्रंथालयांनी या योजनेला मन:पूर्वक प्रतिसाद दिला आहे.  मात्र, हे ग्रंथ जतन होणार आहेत समाजाच्या साथीने, समाजाच्या सहकार्याने.

धनादेश या नावाने काढा – पुणे नगर वाचन मंदिर  (pune nagar vachan mandir)

चेतना अपंगमती विकास संस्था

बौद्धिक अक्षम मुलांना सर्वागाने सक्षम बनवण्याचा वसा कोल्हापुरातील ‘चेतना अपंगमती विकास संस्थे’ने हाती घेतला आहे. सुमारे तीन दशकांपूर्वी स्थापन केलेल्या या संस्थेने या मुलांना मायेची ऊब दिली, नवी भरारी घेण्यासाठी सक्षम बनवले.

बौद्धिक अक्षम बालकांना शिक्षण-प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करण्यात या संस्थेची कामगिरी मोठीच. समाजात अशा प्रकारच्या बालकांबद्दल गैरसमज आणि पालकांमध्ये न्यूनगंड अधिक. मात्र, या मुलांना शिक्षण-प्रशिक्षणातून सक्षम करतानाच पालक आणि नागरिकांचे संस्थेद्वारे प्रबोधनही करण्यात येते. पालक-शिक्षक संघ हा घटक संस्थेत कार्यरत आहे. या माध्यमातून मुले आणि पालकांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘गतिमंदत्व : गैरसमज व वास्तव’ हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून व्याख्याने, शिबिरे, चर्चासत्रे, परिसंवाद असे विविध उपक्रम संस्था राबवते. अशा मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन कसे करावे, याचेही मार्गदर्शन संस्थेकडून केले जाते. मात्र, संस्था अद्याप कायमस्वरूपी जागेच्या शोधात असून, संस्थेचा गाडा इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी दानशूरांची गरज आहे.

धनादेश या नावाने काढा – चेतना अपंगमती विकास संस्था ( chetana apangmati vikas sanstha )

धनादेश येथे पाठवा..

एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग, मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय  

संपादकीय विभाग, प्लॉट  नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, मआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय    

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय       

संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४.  ०२०-६७२४११२५

नाशिक कार्यालय       

संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१.  ०२५३-२३१०४४४

नागपूर कार्यालय    

संपादकीय विभाग, प्लॉट नं. १९, ग्रेट नागरोड, उंटखाना, नागपूर – ४४०००९, ०७१२ झ्र् २७०६९२३

औरंगाबाद कार्यालय       

संपादकीय विभाग, १०३, गोमटेश मार्केट, गुलमंडी, औरंगाबाद. दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३४६३०३, २३४८३०३

नगर कार्यालय       

संपादकीय विभाग, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१-२४५१५४४/२४५१९०७

दिल्ली कार्यालय     

संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा – २०१३० उत्तर प्रदेश. ०११- २०६६५१५००