गेल्या काही महिन्यांत सांगलीतील खिद्रापुरेसारख्या डॉक्टरने घातलेला धुमाकूळ, सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांवर झालेले हल्ले, नाशिकमधील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने केलेले अवैध गर्भपात अशी काही प्रकरणे वैद्यकीय क्षेत्रात गाजली. डॉक्टरांवर हल्ल्याचे प्रकार काही थांबत नाहीत. डॉक्टर आणि समाज यांचे नातेच दूषित न होण्यासाठी दोन्ही बाजूंनी कोणती पावले उचलावीत, याचा हा ऊहापोह.. वैद्यकीय क्षेत्राविषयी समाजाने गेल्या तीन महिन्यांत कधी न अनुभवलेली अनागोंदी अनुभवली. डॉक्टरांवर होणारे हल्ले, त्यानंतर डॉक्टरांचा संप, माध्यमे - डॉक्टर यांची भांडणे, सरकार - न्यायव्यवस्था यांच्याशी डॉक्टरांचा संघर्ष अशी ही न संपणारी साखळीच त्यातून निर्माण झाली. याची कारणे, लेखाजोखा जो तो आपापल्या दृष्टिकोनातून मांडत असला तरी ही गाठ नेमकी सोडवायची कोणी आणि कशी याबद्दल ठाम विचार मात्र अजून नीटसा पुढे येताना दिसत नाही. वरून सारे शांत झालेले वाटत असले तरी वा वणव्यात ज्यांनी कोणी उडी घेतली त्यांच्या जखमा अजून तशाच आहेत आणि निखारे अजून विझलेले नाहीत. या सगळ्या वातावरणात सगळ्यात गंभीर गोष्ट जर कुठली जाणवत असली तर ती ही की साधे, समंजस लोक या डॉक्टरांवरील हल्ल्यांचे समर्थन करताना दिसत होते. सर्वसामान्य रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा हा मानसिक प्रवास नक्कीच डॉक्टर, समाज व स्वत: रुग्णासाठीही घातक आहे. या तुफान दगडफेकीत सर्वानीच काही वेळ मागे हटून शांतपणे विचार करण्याची गरज आहे. अनेकांच्या दृष्टीने हा फक्त ढिसाळ सार्वजनिक आरोग्य व्यवस्थाच नव्हे तर खासगी वैद्यकीय सेवेत होणाऱ्या कुचंबणेवरचा राग आहे; पण हा राग इतका पराकोटीचा असू शकतो का, की एके काळी वर्णद्वेषावरून आफ्रिकेत कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णीयांमध्ये उसळलेल्या जीवघेण्या धुमश्चक्रीचे स्वरूप त्याला यावे. हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा आफ्रिकेत तो मार्गी लावण्यासाठी अखेर मानवी हक्कांचे उल्लंघन झालेल्या गुन्ह्य़ांमध्ये आरोपी व पीडित, त्याचे कुटुंब यांच्यात समोरासमोर संवाद घडवून प्रकरणे निकाली काढण्याची पद्धत रुजवली. याला ट्रथ रीकन्सिलिएशन (३१४३ँ १ीूल्ल्रू’्रं३्रल्ल) असे नाव देण्यात आले. एकमेकांना शिक्षा देण्याची सूडभावना वाढीस लागू नये असा याचा हेतू होता. आज डॉक्टर - रुग्ण - समाज हे वाद नेमक्या अशाच निसरडय़ा कडय़ावरून जात आहेत. अशा प्रकारे वैद्यकीय क्षेत्रावर किंवा डॉक्टरवर रागावलेल्या असमाधानी रुग्णाला व डॉक्टरला समोरासमोर बसवणे अव्यवहार्य वाटत असले तरी वैचारिक पातळीवर हे घडवून आणावे लागणार आहे. आज हल्ल्यांची नीट मीमांसा केली तर हल्ला होऊन राग निघालेल्या डॉक्टरचा रुग्णाच्या राग निर्माण करणाऱ्या समस्येशी थेट संबंध नाही; पण तशी सूड भावना व कडीच डॉक्टर व रुग्ण दोन्ही बाजूंनी निर्माण होत चालली आहे. ती कडी तोडण्याची दोन्ही बाजूंनी कोणाला तरी सुरुवात करावी लागणार आहे. मला कधी तरी कुठल्या तरी डॉक्टरने फसवले किंवा अमुक एका सरकारी रुग्णालयाने मला पुरेशा व्यवस्थेअभावी नाकारले म्हणून मी एखादी संधी शोधून डॉक्टरांवर हल्ला करायचा हा विचार असमंजस आहे. ‘मला कधी तरी कुठल्या तरी रस्त्यावर एका वाहतूक पोलिसाने त्रास दिला म्हणून मी माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक पोलीस रुग्णाला आता नाकारणार’ अशा स्वरूपाची ही भावना आहे. दोन्ही बाजूंनी ही भावना वाढीस लागत गेली तर सामाजिक स्वास्थ्याकडे समाजाचा प्रवास निश्चित आहे. आपल्याकडे वैद्यकीय क्षेत्राशी निगडित गोष्टींची समज अजूनच कमी आहे. एखाद्या भोंदू डॉक्टरकडून चुकीच्या उपचाराने अत्यवस्थ असणाऱ्या मृत्युशय्येवरच्या रुग्णाला व्हेंटिलेटरवर टाकण्याआधी त्या भोंदू डॉक्टरची परवानगी घ्या, अशी गळ नातेवाईक इंटेन्सिविस्ट (गंभीर रुग्णांचे उपचार करणारा डॉक्टर) यांना घालतो. याचा दुसरातिसरा मित्र - नातेवाईक रुग्ण त्याच्या पूर्वानुभवाच्या रागातून डॉक्टरवर हल्ला करतो. शासकीय रुग्णालयात या सूडासाठी अहोरात्र राबणारा सर्वात कनिष्ठ निवासी डॉक्टर सावज ठरतो. मुळात यातून हल्लेखोरालाही ‘या हल्ल्यातून वैद्यकीय क्षेत्राला सुधरवू या’ अशी काही थोर भावना मनात नसते. या समस्येबद्दल समाजाला दिशा देण्याचे नेतृत्व हे डॉक्टरांनाच स्वीकारावे लागणार आहे. या वेळी कधी नव्हे ते डॉक्टर वर्गही त्याच आक्रमकतेने या गोष्टींचा विरोध आणि त्याविरुद्ध संघटित संघर्ष करताना दिसला. यात अगदी हल्लेखोराला किंवा अमुक एकाला कोणीही डॉक्टरने उपचार देऊ नये इतका टोकाचा भावनिक उद्रेक डॉक्टरांमध्ये होताना दिसला व याची कारणेही तशीच होती; पण हा संघर्ष करत असताना संघर्षांच्या मार्गातून परत शासन, न्यायव्यवस्था आणि माध्यमे या तिन्ही स्तंभांनी डॉक्टरांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. याचे रूपांतर हा वर्ग अधिक असुरक्षित व अधिक संघटित होताना दिसला; पण ही संघटित ऊर्जा संप आणि समाजमाध्यमांतील मोहिमांइतपतच सीमित असलेली दिसली. जर हा प्रश्न खऱ्या अर्थाने सोडवायचा असेल तर डॉक्टरांच्या संघटना व सहिष्णुता प्रस्थापित करू पाहणाऱ्या सर्व समविचारी व्यासपीठांना या पलीकडे जाऊन पावले उचलावी लागतील. डॉक्टरांच्या संघटनांना त्यांच्या कार्यपद्धतींचा व संघर्षांच्या मार्गाचा फेरविचारच नव्हे तर त्यात आमूलाग्र बदल करावे लागतील. याची सुरुवात डॉक्टरांनी प्रामाणिकपणे काही गोष्टींची कबुली देऊन करावी. हो, आम्हीही याच समाजाचा घटक आहोत आणि हो, आमच्याही क्षेत्रात काही अनैतिक चालीरीती, घटक, ब्लॅकशिप्स आहेत. डॉक्टर संघटनांना व सर्वच डॉक्टरांनी गावोगाव आपणच आपल्या क्षेत्रावर नैतिक, वैचारिक व संघटित दबाव आणून हे करावे लागणार आहे. हे आजवर होऊ शकले नाही म्हणूनच कट प्रॅक्टिससारख्या प्रथांपासून वैद्यकीय क्षेत्र मुक्त होऊ शकले नाही. डॉक्टर हा वर्ग व्यावसायिकदृष्टय़ा केंद्रित (फोकस्ड) व प्रेरित आहे. म्हणून असे अंतर्गत नैतिक दबावतंत्र (े१ं’ स्र्’्र्रूल्लॠ) निर्माण केल्यास त्याचा आपल्याला वैयक्तिक व्यावसायिक फटका बसेल या धास्तीने डॉक्टरांचा वर्ग अशी अंतर्गत व्यावसायिक नियमन करायला धजावत नाही; पण अशी व्यवस्था निर्माण झाल्यास यामुळे आपल्याच क्षेत्राचा दीर्घकालीन फायदा होणार आहे हे डॉक्टरांनी लक्षात घ्यायला हवे. यात दुसरा अडसर म्हणजे हा वर्ग वरून संघटित दिसतो, पण उच्च बौद्धिक पातळीमुळे श्रमजीवी वर्गाप्रमाणे निर्णय झाला की, त्याची मीमांसा न करता फक्त अंमलबजावणी असे अजून या क्षेत्रात होत नाही. याबरोबर एक मोठा बदल डॉक्टर व संघटनांना करावा लागणार आहे तो म्हणजे डॉक्टर व त्यांच्या संघटनांनी अधिक समाजाभिमुख आणि लोकाभिमुख होण्याचा. सध्या भरारी पथके खासगी रुग्णालयांची तपासणी करत आहेत, जी आवश्यकच आहे. अशीच तपासणी खासगी डॉक्टरांनी एक नागरिक म्हणून आपापल्या गावातील शासकीय रुग्णालयांची करावी व त्याचे पोस्टमॉर्टेम रिपोर्ट जनतेसमोर, मुख्यमंत्र्यांसमोर मांडावेत. याशिवाय नैसर्गिक, सामाजिक संकटांच्या काळात, विविध साथींच्या काळात आम्ही या संकटकाळात तुमच्यासोबत आहोत हे समाजाला दाखवून द्यावे. वैद्यकीयच नव्हे इतर सामाजिक समस्यांच्या सोडवणुकीत वैद्यकीय क्षेत्राचा सक्रिय सहभाग असला पाहिजे व तो जाणवलाही पाहिजे. हे सर्व केवळ प्रतिमानिर्मितीसाठीच नव्हे तर मनापासून घडायला हवे. याचा अर्थ शिबिरे व अव्यवहारी, भंपक मोफत सेवेच्या कल्पना राबवायच्या असे मुळीच नाही. नियमित व्यवसाय करताना आपल्या व्यावसायिक सीमारेषांची नम्रपणे समाजाला जाणीवही करून द्यायला हवी. संपाच्या पलीकडे समाज सोबत येईल अशा संघर्षांच्या नव्या पद्धती वैद्यकीय क्षेत्राला जन्माला घालाव्या लागतील आणि डॉक्टरांसारखा बौद्धिक वर्ग हे नक्कीच करू शकतो. समाज सोबत येणे ही खूप दूरगामी प्रक्रिया असणार आहे. डॉक्टरचे व्यावसायिकीपण, त्याची श्रीमंती, त्याचे बौद्धिक वर्चस्व मान्य करून समाजासोबत यायला वैद्यकीय क्षेत्राला खूप संघटित आणि नियोजनबद्ध सामाजिक वावर आणि सकारात्मक सामाजिक सहभाग नोंदवावा लागणार आहे. राजकीय नेते व एका वर्गाने तो लोकांना भुलवून (लग्न, दहावे, अंत्यविधींना हजेरी लावून) केला आहे. हाच सहभाग वैद्यकीय क्षेत्राला आपल्या क्षेत्राची अंतर्गत साफसफाई करून व वेगळ्या विधायक मार्गातून, कार्यातून करावी लागेल आणि आपला सामाजिक बुद्धय़ांक (२्रूं’ ०४३्रील्ल३) वाढवावा लागणार आहे. यातून त्यांनी त्यांच्या व्यावसायिकतेला धक्का लावावा असे मुळीच नाही. एकूणच हे दशक सामाजिक उन्मादाचे दशक ठरले आहे. या सगळ्या सामाजिक उन्मादात मात्र वैद्यकीय क्षेत्राचा एक महत्त्वाचा घटक निराश होऊन वैद्यकीय व्यवसायापासून लांब चालला आहे. तो म्हणजे सर्वसामान्य, प्रामाणिक, बुद्धिवान डॉक्टर. हाच आज आरोग्य क्षेत्राची सत्तर टक्के धुरा वाहतो आहे. अनैतिक कृत्यांचा त्याने कधी विचारही केला नाही आणि त्याने हल्लेही सोसले. त्याला व सामाजिक स्वास्थ्याला वाचवायचे असेल तर डॉक्टर व रुग्ण दोन्ही बाजूंनी कोणाला तरी जुने सगळे विसरून नवी सुरुवात करावी लागणार आहे. amolaannadate@yahoo.co.in