आपल्या बजेटमध्ये बसेल तेवढय़ाच स्क्वेअर फुटाचं घर घेऊन आहे त्यात आनंद मानण्याशिवाय अनेकांना पर्याय नसला तरी काहींना मात्र आपल्याला हवं तसं घर डिझाईन करण्याचं भाग्य लाभतं. अशाच एका भाग्यवंताने आपल्या कल्पकतेने आणि सौंदर्यदृष्टीने केलेले घर सजवण्याचे प्रयोग-

माणूस दिवसभर कितीही फिरला, भटकला तरी रात्री त्याला विसावण्यासाठी हक्काचं घर असावं लागतं. स्वच्छ सूर्यप्रकाश आणि मोकळी, खेळती हवा ही कोणत्याही घराची प्राथमिक लक्षणं सांगता येतात. अगदी टुमदार बंगला बांधता नाही आला तरी आपलंही छोटेखानी घर असावं, अशी प्रत्येकाचीच मनीषा असते. हा मानस पूर्णत्वास नेण्यासाठीच जणू प्रत्येकाची धडपड सुरू असते. घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडताना काहींना घरघरही लागते. पण, जेथून आपल्याला कोणी ऊठ म्हणू शकणार नाही अशी स्वत:च्या मालकीची जागा आणि हक्काचं विश्रांतिस्थान म्हणून घर या वास्तूकडे पाहिलं जातं. त्यामुळे अनेकांच्या आयुष्यात एकदाच होणाऱ्या घराची अंतर्गत रचना आणि सजावट अधिकाधिक चांगली कशी होईल, असा प्रयत्न असतो आणि त्या ध्यासापोटी अगदी न थकता वेगळे परिश्रम घेण्याचीही तयारी काही जण जाणीवपूर्वक घेताना दिसतात. असाच नावीन्यपूर्ण खडतर प्रयोग साकारला आहे, पुण्याच्या बिबवेवाडी येथील सुधीर पवार यांनी. व्यवसायानं इंटिरिअर डिझायनर आणि पॅ्राडक्ट डिझायनर असलेल्या पवार यांनी आपलं घर कसं निर्मिलं आहे याची सुरस कथा त्यांच्याच शब्दांतून ऐकणं हे जेवढं आनंददायी, तेवढंच हे घर पाहण्याचा आनंद काही निराळाच! एरवी व्यवसायाच्या निमित्तानं इतरांच्या वास्तूची अंतर्गत सजावट करणाऱ्या सुधीर पवार यांनी अधिक कलात्मकतेनं आणि सौंदर्यदृष्टीमध्ये भर पाडणाऱ्या रचनेनं आपलं घरकुल निर्मिलं आहे.

34-lp-realestateम्हटलं तर बंगला आणि म्हटलं तर गावाकडे असतो तसा चौसोपी वाडा, अशी सुधीर पवार यांच्या घराची रचना आहे. बाहेरून पाहताना जणू आपल्यासमोर एखादा प्रासादच उभारला आहे असं वाटतं. घराच्या बांधकाम साहित्यापासून ते अंतर्गत सजावटीचं काम अत्यंत काटेकोरपणानं आणि कोणत्याही स्वरूपाची तडजोड न करता करण्यात आलं आहे. आई-वडील, पत्नी, भाऊ, भावजय आणि मुलं असा १३ सदस्यांचा परिवार लवकरच या घरामध्ये वास्तव्यास येणार आहे. हे घर म्हटलं तर एकत्र कुटुंब असेल आणि म्हटलं तर दोन्ही भावांना एकाच छताखाली राहूनही आपलं खासगीपण (प्रायव्हसी) जपता येईल, अशा स्वरूपाची रचना करण्यात आली आहे. बिबवेवाडी येथील डोंगरमाथ्यावरील नऊ हजार चौरस फूट जागेपैकी सात हजार ८०० चौरस फूट जागेवर प्रत्यक्ष बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे या घराला वाडय़ाला असतं तसं अंगण, चौक अशी पारंपरिक रचना तर आहेच, पण त्याचबरोबरीनं बंगला असल्यानं सध्याच्या भाषेत सांगायचं, तर टेरेसदेखील आहे. डोंगरमाथ्यावर घर असल्यानं स्वच्छ सूर्यप्रकाश मिळतो आणि मोकळी अशी खेळती हवादेखील मिळते. एखाद्या हिल स्टेशनला आल्याचा अनुभव म्हणजेच ‘फील’ या टेरेसवर आल्यानंतर आपल्याला येतो. डोंगरमाथ्यावर बांधकाम करताना या घराच्या रचनेमध्ये डोंगरउताराचाही तेवढाच चपखल वापर करून घेतला आहे. द्रष्टेपणानं वास्तुशिल्प साकारताना हे घर ‘कुल’ राहील याचीही दक्षता घेतली गेली आहे.

‘लहानपणापासून गावाकडचं घर आणि तेथील वाडासंस्कृती हे माझं केवळ आकर्षणाचं केंद्र राहिलं असं नाही, तर या घराशी माझा ऋणानुबंध जुळला. हे घर पाहतच मी लहानाचा मोठा झालो. त्यामुळे आपलं घर करताना तो ‘फील’ आला पाहिजे हे पक्कं डोक्यामध्ये होतं.’ सुधीर पवार यांनी या घराच्या निर्मितीमागची कथाच उलगडायला सुरुवात केली.

ते सांगतात, ज्याला आपण गोष्ट किंवा स्टोरी म्हणू शकतो ते न सांगतादेखील डोळ्यांना दिसणं आणि त्याची प्रचीती येणं याला रचनात्मक कौशल्य किंवा डिझाइन म्हणतात. सन २००४ मध्ये मी ही मोकळी जागा विकत घेतली तेव्हा डोंगर आणि मोकळं रान असंच या जागेचं स्वरूप होतं. तळजाईचा डोंगर आणि पलीकडे सिंहगड दिसायचा. निसर्गामध्येच राहता यावं हा घराच्या निर्मितीमागचा उद्देश होता. पश्चिमेची बाजू असल्यामुळे आणि रस्त्यापासून उंचावर असल्यानं स्वच्छ हवा आणि मोकळा वारा मिळतो. उन, वारा, पाऊस याचा विचार करुन त्यानुसार घराची मांडणी केली तर मिळणारं स्वास्थ्य आणि मानसिक आनंद हा कोणत्याही ‘फाइव्ह स्टार’पेक्षाही हवाहवासा असतो.

35-lp-realestateरचना करताना हवा खेळती राहणं हे प्राथमिक उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे. सूर्यप्रकाश सर्व कोपऱ्यांमध्ये पोहोचणं, सभोवतालच्या निसर्गाचा ‘व्हय़ू’ पकडणं आणि ऋतुमानातील बदल अनुभवता येणं या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं आहे. वाडासंस्कृतीमध्ये चौक हा पायाभूत घटक आहे. ज्यामुळे घरामध्ये सर्व ठिकाणी प्रकाश आणि हवा खेळती राहते. हा चौक वेगवेगळ्या  प्रकारे (मल्टिफंक्शनल स्पेस) वापरता येतो. घरातील लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्ती असे सारेच आपापल्या परीनं आनंद घेत असतात. झाडं आणि पाणी या बाबी अंतर्गत सजावटीमध्ये सौंदर्य निर्माण करतात. हे एका अर्थानं आर्किटेक्चरल गिमिक असंही म्हणता येईल.

घराचा दरवाजा हा पूर्वाभिमुख आहे. त्यानंतर व्हरांडा लागतो. मुख्य प्रवेशद्वारापाशी आल्यानंतर चौकामध्ये समोर झाड दिसतं. पानांचा हिरवेपणा आणि सुगंधित फुलांनी येणाऱ्यांचं स्वागत म्हणजे वेलकम करणं इतकं हे साधं आणि सरळ प्रतीक आहे. आत आल्यानंतर चौकातून उजवीकडे दिवाणखाना म्हणजेच हॉल आणि डावीकडे ग्रंथालय आहे. झाडाच्या सान्निध्यात बसून शांतता आणि सुवास घेत आराम करणं किंवा वाचन करणं हा हेतू साध्य करता येतो. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात साधेपणानं ताणतणावमुक्त करण्याचं हे ठिकाण आहे. सभोवती जुन्या पारंपरिक शैलीतील पेंटिंग येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करतं. आळंदी ते पंढरपूर हा वारीचा प्रवास विकास आठवले यांनी या पेंटिंगमधून चितारला आहे. वारी हा मराठी अस्तित्वाचा मूळ पाया आहे. रंगरूपानं भगवा आणि श्वेत हे वारकऱ्याचा पेहराव दर्शवीत असून, हे चित्र या दोन रंगांमध्येच आहे.

या वास्तूमध्ये फिरताना वेगळ्या प्रकारची सकारात्मक ऊर्जा आणि चांगले विचार आपल्या सभोवती जाणवतात. घराच्या मधोमध दोन्ही बाजूला लाकडात असलेले स्तंभ पाहावयास मिळतात. मूळ उद्देश हा राजमार्गाचा असणारा संबंध. जागेच्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे असलेला उतार आणि कोठेही भराव न घालता त्याचा योग्य रूपानं वापर करून निसर्गाच्या वेगवेगळ्या स्वरूपाचा आणि दृश्यांचा आनंद घेता येतो. चढणं आणि उतरणं कंटाळवाणं आणि कष्टदायक न होता छोटय़ा टप्प्यांमध्ये विभागणाऱ्या पायऱ्या हे वैशिष्टय़ वापरलं आहे. टेरेस हे या घरातील सर्वोच्च उंचीचं स्थान असलं तरी ते मुख्य सभागृहाशी अशा पद्धतीनं जोडलं गेलं आहे की ते वेगळं वाटतच नाही. त्यामुळे संपूर्ण परिसराच्या दृश्याचा आनंद घेता येतो. जसजसे खाली उतरत जातो तसतसे एकेक पदर उलगडत जावेत त्याप्रमाणे बदल जाणवतात. या घरात एकत्र कुटुंबपद्धती पाहावयास मिळते, तरी प्रत्येकाचं वेगळेपण शाबूत राहतं. स्वतंत्र स्वयंपाकघर तसेच पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे भारतीय बैठक की ज्याला लाकडाचं फ्लोअिरग चबुतरा रूपानं दिसतं. जिथं घरातील सर्व मंडळी दिवसभराची कामं बसल्याजागी करू शकतील. भाजी निवडणं, मुलांचा अभ्यास घेणं, पाहुण्यांचा पाहुणचार, घरावर लक्ष ठेवणं हे सहजतेनं साध्य होऊ शकतं. घरातील सर्वच जणांचा विचारांची देवाणघेवाण करण्याच्या माध्यमातून आपल्यातील ऋणानुबंध घट्ट व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे. पूर्णपणे आधुनिक गोष्टींनी असलं तरीही जुन्या घरातील स्वयंपाकघराची आठवण करून देणारं असंच आहे.

स्नानगृहामध्ये म्हणजेच बाथरूममध्ये कुंड ही संकल्पना घेऊन छोटासा स्वििमग पूल आणि त्याला जोडूनच टब आहे. तांब्यामधील गोमुखातून पडणारं पाणी हे त्याचं वेगळेपण. त्यामुळे आल्हाददायक वाटतं आणि प्रसन्नता लाभते. चौपाळय़ावर किंवा पाराखाली बसून घरातील माणसं गुजगोष्टी करू शकतात. शयनगृह ही खासगीपण जपणारी आहेत. लहानांपासून ते वडीलधाऱ्यांपर्यंत सर्वाना अनुषंगून असलेली रंगसंगती आणि फर्निचर यांचा मिलाफ साधला आहे. उतरत्या छपराचं घर हे मराठी माणसाचं प्रतीक असून त्याचा वापर इथं केला आहे. फॅमिली हॉल किंवा होम थिएटर हे निसर्गाशी जोडलेलं आढळतं. पाण्याचा पाट आणि त्यावर असलेला लाकडी पूल, समोर असलेला िदडी दरवाजा, ज्यामुळे पाण्यावरून चालण्याचा आणि पाण्यात पाय सोडून बसण्याचा आनंद लुटता येतो. घरातील मंदिर हे शांततापूर्ण स्थान. भविष्याच्या दृष्टीनं कुटुंबातील सदस्यसंख्या वाढली तरी ती सामावून जाईल, अशीच घराची रचना करण्यात आली आहे.

‘घर असावं घरासारखं नकोत नुसत्या भिंती’ असं म्हणताना या घराच्या भिंती या कर्नाटक शैलीतील ब्लॉक पद्धतीनं केलेल्या आहेत. ज्यामुळे कोठेही कॉलम किंवा बीम (तुळई) पाहावयास मिळत नाही. िभतीमधून आणि फर्निचरमध्येच त्याचं रूपांतर केलं आहे. बाहेरील वातावरण ध्यानात घेऊन ‘हॉलो’ या पोकळ पद्धतीच्या विटांचा वापर केला आहे. वाडा म्हटलं की लाकडीकाम आणि दगडकाम हे ओघानं आलंच. नगरहून बेसॉल्ट हा कातळ दगड मागवण्यात आला असून, घडीव काम करून त्याची रचना मांडण्यात आली आहे. हा दगड कणखर असल्यानं त्याची झीज किंवा मोडतोड होत नाही. त्यामुळे राज्यातील काही ठिकाणी या दगडातील वास्तुकला पाहावयास मिळते. सध्याच्या परिस्थितीला न परवडणारं लाकूड वापरलं आहे. रिसायकल मटेरियल म्हणून लाकडाचा उपयोग केला असला तरी त्याचा कमीतकमी वापर कसा होईल हे कटाक्षानं पाहिलं आहे. रिलायन्स मिलमधील लाकूड वापरूनच फर्निचर केलं आहे. त्यामुळे इतक्या वर्षांनंतरही त्या लाकडाची गुणवत्ता कायम ठेवण्यामध्ये यश आलं आहे. जमिनीवरील फरशी म्हणजेच फ्लोअिरग हे साधं, परंतु कोठेही चमकदार किंवा भडकपणानं केलेलं नाही. त्यासाठी खास केरळहून मागवलेला टेराकोटा टॉलचा वापर केला आहे. या फरशीनं रक्तस्राव सुरळीत होतो. त्याचप्रमाणे सांधेदुखी होत नाही. आपल्या संस्कृतीमध्ये घरात चप्पल परिधान केली जात नाही. संगमरवर किंवा व्रिटीफाइड फरशी ही त्रासदायक ठरू शकते. अशा परिस्थितीमध्ये टेराकोटा ही फरशी उन्हाळय़ात थंड आणि थंडीमध्ये गरम राहून माणसाच्या शरीराचं संतुलन राखण्यास मदत करते.
विद्याधर कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com