शेतकरी आत्महत्यांनी व्यथित होऊन नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे आणि इतर काही कलावंतांनी आपल्या परीने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पाऊल उचलले. त्यासंदर्भात नाना पाटेकर यांना लिहिलेले हे अनावृत पत्र-

प्रिय नाना,
नमस्कार! ‘कसा आहेस’ विचारायची गरज नाहीय. खरंच चांगला आहेस. भरल्यापोटी ढेकर देत ‘अन्नदाता सुखी भव’ असे कोरडेपणाने म्हणणाऱ्या आम्हा मध्यमवर्गीय पांढपेशांपेक्षा तू नक्कीच चांगला रे मर्दा. राबराब राबून आमच्या अन्नाची सोय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करतोयस. पुण्यकर्म आहे रे बाबा. त्यांची तातडीची गरज पूर्ण करतोयस याबाबत शंकाच नाही. काही काळापुरती निव्वळ तातडीची मदत करण्यापेक्षा त्यांना पुढे काही फलदायी उपाय वा कायमस्वरूपी मार्ग दाखवणे हे उद्दिष्ट असेल तुझे. एक मित्र म्हणून त्याबाबत माझे विचार मांडत आहे.

शेतकरी स्वावलंबी व्हावेत असं तुला वाटत असेल तर पुढील वस्तुनिष्ठ मुद्दय़ांचा विचार कर. सदरहू मुद्दे सधन शेतकऱ्यांना नव्हे तर कर्जबाजारी/दारिद्रय़ामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना विचारात घेऊन मांडले आहेत याची कृपया नोंद घे.

निरीक्षण आहे की कर्जबाजारी वा दारिद्रय़ामुळे आत्महत्या करणारे बहुतांश शेतकरी हे विशेषत: मराठवाडा, विदर्भ व इतर भागांतील आहेत. कोकण-पुणे-नाशिक-कोल्हापूर भागातील शेतकरी कर्ज वा दारिद्रय़ यामुळे आत्महत्या करताना फारसे आढळत नाहीत. कारणे अनेक, महत्त्वाचे हे की कोकणात पावसाळी शेतीपेक्षा आंबा, काजू, रातांबे, फणस, सुपारी, केळी, नारळ या फळबागांचे उत्पन्न तर, नाशिक-कोल्हापूर-पुण्यामध्ये केळी, द्राक्षबागा या फळांव्यतिरिक्त भाजी व फुले यांचे मोठे उत्पन्न आहे ज्याचा मोठा ग्राहकवर्ग महानगरांमध्ये वसलेला आहे. या उत्पन्नाला फार क्वचित पावसाच्या लहरींचा फटका बसू शकतो. उदाहरणच द्यायचे तर एकदा का आंब्या-काजूचे झाड उत्पन्न देऊ लागले की एखाद्या वर्षी पाऊस कमी-जास्त झाला तरीही कर्जबाजारी होण्यासारखा वा आत्महत्या करण्यासारखा प्रसंग नाही उद्भवू शकत. सावंतवाडीची जगप्रसिद्ध रंगीत खेळणी, कोल्हापुरी चप्पल, नाशिकची द्राक्षे-चिवडा यांना जागतिक बाजारात स्थान असल्यामुळे त्या संबंधाने अर्थार्जन करायची संधी त्या भागातील गरीब शेतकऱ्याला उपलब्ध होते.

मुंबई-ठाणे-पुणे-नाशिक-कोल्हापूर अशा महानगरांमधील अनेक व्यावसायिक/नोकरदार आजही आपापल्या गावांशी व्यवस्थित नाळ जोडून आहेत. गणपती, दिवाळी, जत्रोत्सव व उन्हाळ्याची सुट्टी या निमित्ताने मुंबई-ठाणे-नाशिक-कोल्हापूरमधून बऱ्यापैकी पैसा त्यांच्या मूळ गावी जातो. डिसेंबर ते मे या पावसाळा नसलेल्या ऋतूंमध्ये कोकणातून मुंबई-ठाण्यामध्ये दाखल होऊन केवळ कोकणी जत्रोत्सवामध्ये स्टॉल लावून संपूर्ण वर्षांचे उत्पन्न कमावणाऱ्या अनेकांना मी ओळखतो. याशिवाय कोकणामध्ये पर्यटन, कोकणी मेवा असे अनेक उद्य्ोग आहेत. शेतीव्यतिरिक्तचे हे उत्पन्न-स्रोत त्यांचा बऱ्यापैकी चरितार्थ चालवतात. त्या पाश्र्वभूमीवर मराठवाडा-विदर्भ येथे गरीब शेतकऱ्यासाठी असे पूरक उद्योग, उत्पन्नस्रोत आहेत असे दिसत नाही. नागपुरी संत्री हा छोटय़ा गरीब शेतकऱ्यांसाठी फार मोठे अर्थार्जनाचे साधन असेल असे वाटत नाही. मुळात उन्हाळ्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी ते मे-जूनदरम्यान मराठवाडा-विदर्भ येथील उष्मा काही काम करू देत नाही. या काळामध्ये कोणता उत्पन्नस्रोत त्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होऊ शकतो ते पाहू.

डिसेंबर ते मे या पावसाळा नसलेल्या ऋतूंमध्ये मुंबई-ठाण्यामध्ये बांधकामे जोरात सुरू असतात. पूर्वी त्यासाठी बहुतांशी मजूर हे बिहारमधून उपलब्ध असत. मात्र इथल्या व तिथल्या काही सामाजिक-राजकीय कारणापोटी बिहारमधून मुंबईला येणारी मजूरसंख्या सध्या मोठय़ा प्रमाणावर रोडावली आहे. महानगरांमधील बांधकाम क्षेत्रामध्ये सध्या मजूर-गवंडी यांची फार मोठी वानवा निर्माण झाली आहे. वास्तविक यात मेहनतानादेखील बऱ्यापैकी असतो. एक साधा प्रशिक्षित मजूर/ हेल्पर/ बिगारी महिन्याला किमान १० हजार रुपये कमवू शकतो तर प्रशिक्षित गवंडी किमान २५ हजार. साइटवरच सोय असल्यामुळे राहण्याचा खर्च त्यांना येत नाही. बिहारी कामगारांच्या कमतरतेच्या पाश्र्वभूमीवर सध्या काही बांधकाम साइट्सवर कोकण-घाटावरील मजूर-गवंडी काम करताना दिसत आहेत आणि तरीही बांधकाम मजुरांची भरपूर गरज मुंबई-ठाण्यामध्ये सध्या आहे.

हीच बाब ध्यानात घेऊन मराठवाडा-विदर्भ भागातील शेतकऱ्यांनी डिसेंबर ते मे या बिगरपावसाळी ऋतूमध्ये मुंबई-ठाण्यामध्ये येऊन बांधकाम साइट्सवर काम करून बऱ्यापैकी पैसा कमवावा. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नामधील मोठा हिस्सा प्रधानमंत्री जन-धन योजनेमधून आपल्या गावी कुटुंबीयांना चरितार्थासाठी पाठवून त्यातील काही रकमेची जाणीवपूर्वक योग्य मार्गाने बचत करून पावसाळ्यामध्ये बी-बियाणे-खते-औजारे यासाठीची तरतूद ते करू शकतात. जून ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये गावी शेती करावी. बचत केलेले पैसे हाताशी असतील तर ऐन पावसाळ्यामध्ये कुणाकडे अवाच्या सवा व्याजाने कर्ज रकमेसाठी हात पसरण्याची वेळ नाही येणार. यामुळे त्यांची फार मोठी प्रगती होईल की नाही हे सांगता आले नाही तरी कर्जबाजारीपणामुळे येणारे दारिद्रय़, आत्महत्या नक्की टळतील.

हे मी काही वेगळे सांगत नसून अनेक बांधकाम साइट्सवर जाणून घेतलेला ‘बिहार पॅटर्न’ आहे.  बिहार वा उत्तर प्रदेशातील बांधकाम मजुरांकडून साइटवर चांगले व दर्जेदार काम करवून घ्यायचे असेल तर आपले सूर त्यांच्याशी जुळवणे फार आवश्यक असते. तसे ते जुळले की मग आपण सांगू ते काम आपल्याला हवे त्या पद्धतीने त्यांच्याकडून करून घेणे सोपे पडते. याच उद्देशाचा एक भाग म्हणून साइटवरील काम संपल्यावर मी अनेक वेळा संध्याकाळी त्यांच्याबरोबर गप्पा करत बसतो. त्यांच्या गावाची-कुटुंबीयांची पाश्र्वभूमी जाणून घेताना लक्षात आलेला हा पॅटर्न आहे. त्या बांधकाम मजुरांची माहिती घेताना माझ्या असे लक्षात आले की मुळात ते शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांपैकी ज्यांचे मोठे व एकत्रित कुटुंब (अनेक भावंडे) आहेत तिथे त्यांनी कर्जबाजारी अथवा दारिद्रय़ामुळे आत्महत्या केल्याचे उदाहरण नाहीय. मुख्य कारण हेच की एकत्र कुटुंबामध्ये जे अनेक शेतकरी भाऊ/ नातेवाईक/ काका-पुतण्या असतात त्यापैकी गरजेप्रमाणे काही कुटुंबीय व्यक्ती गावी राहून शेती करतात, दूध-दुभते वा अन्य व्यवसाय सांभाळतात. बाकीच्या व्यक्ती मुंबई-ठाणे वा अन्य महानगरांमध्ये जाऊन बांधकाम साइट्सवर मोफत राहून भरपूर मेहनत करून बऱ्यापैकी पैसा कमावतात व बचत करून नियमितपणे गावी पाठवतात. पावसाळ्यामध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये काम मंद असते तेव्हा नेमकी गावी शेतीसाठी मजुरांची गरज असते त्या वेळी गावी जाऊन बचत करून पाठवलेल्या पैशांमधून बी-बियाणे-खते-औजारे एवढेच नव्हे तर त्या पैशातून ट्रॅक्टरसारखे साधन खरेदी करून शेतीची कामे ते करतात. शेतीचे काम संपले की साधारण दिवाळीच्या दरम्यान परत मुंबईमध्ये येऊन बांधकाम क्षेत्रामध्ये कार्यरत राहतात. महत्त्वाची बाब म्हणजे पावसाळा हा शेतीचा मुख्य मोसम ते समजतात. म्हणूनच पाऊस नसेल तेव्हा हे मेहनती शेतकरी बांधकाम मजूर बनून अर्थार्जन करतात. हाच ‘बिहार पॅटर्न’ होय.

आपले महाराष्ट्रीय, मराठवाडा व विदर्भातील शेतकरी पाऊस नसेल तेव्हा काय करतात? कोणत्या मार्गाने अर्थार्जन करतात? हा प्रश्न मी एका शेतकऱ्याला एकदा विचारला होता. त्याचे उत्तर होते ‘पाऊस नसेल तर शेतकरी काय करील बाप्पा? ते बसूनच राहील ना भाऊ.’ या माझ्या शेतकरी बांधवांनी स्वत:च्या प्रगतीसाठी ‘बिहार पॅटर्न’ आत्मसात करावा. कर्जबाजारी झाल्यामुळे, खिशात पैसे नसल्यामुळे हताश होऊन आत्महत्या करण्यापेक्षा व कुटुंबाला देशोधडीला लावण्यापेक्षा हे नक्कीच चांगले. माझ्या शेतकरी बांधवांनी हा पॅटर्न वापरून पाहावा. यासाठी आपल्यासह एखादी समाजसेवी संस्था एकत्र येऊन त्यांना नियोजनपूर्वक मदत करू शकतो.

स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत पाण्याचे सुयोग्य नियोजन न झाल्यामुळे केवळ शेतीवर अवलंबून असलेल्या छोटय़ा शेतकऱ्यांचे शेती-उत्पन्न हे पूर्णपणे पावसाच्या पाण्याच्या लहरीवरच अवलंबून असते. लक्षात घ्या इतर कोणत्याही व्यवसायातील सर्वात महत्त्वाचा घटक हा कुणाच्या लहरीवर अवलंबून नसतो. सलग काही वर्षे पाऊस-पाणी योग्यरीत्या होऊन शेतीचे उत्पन्न सलगपणे व्यवस्थित मिळाल्याचे उदाहरण सापडणार नाही. देशामध्ये खरंच अच्छे दिन आणायचे असतील तर यावर फार मोठे संशोधन होण्याची तीव्र गरज आहे. शासकीय मानसिकता असेल तर ते नक्की होऊ शकते. खैर.

मरणारा सुटतो.. पाठीमागे राहणाऱ्यांचे फार मरण होत असेल रे नाना. त्यांचे अश्रू पुसायचा प्रयत्न करत आहेस. चांगले आहे. नक्कीच स्पृहणीय काम. मात्र त्यांच्यावर ही वेळच येऊ नये म्हणून त्यांना काही चांगला मार्ग दाखवायचे काम तुझ्या हातून व अन्य इतर अनेकांकडून व्हावे असे वाटते म्हणून हा लेखनप्रपंच.

जेवण सुरू करण्यापूर्वी नव्हे तर संपल्यावर तृप्तीचा ढेकर देताना ताटाला नमस्कार करून ‘अन्नदाता सुखी भव’ असं म्हणायचे संस्कार झालेत आपल्यावर. तृप्त शरीराने मन:पूर्वक दिलेला आशीर्वादच तो. पण ताटातील नुकताच संपवलेला भात ज्या शेतकऱ्याने घाम गाळून पिकवला असेल तोच शेतकरी त्याच वेळी फास लावून जीव देत असेल तर काय अर्थ आहे त्या आशीर्वादाला?

कुणी आता काय करत आहे? पूर्वी का नाही केले? आत्ताच का? हेच का व तेच का? हे सर्व बाजूला ठेवून आपल्यासाठी अन्न पिकवणाऱ्या आपल्या बांधवांसाठी सकारात्मकतेने एकत्र येऊया. आपल्याला जमेल ते, जमेल तसे योगदान देऊ या. मी स्वत: बांधकाम क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. तुझ्यासह एखाद्या समाजसेवी संस्थेने पुढाकार घ्यावा. ज्या शेतकऱ्यांना बिनपावसाळी मोसमामध्ये मुंबई-ठाण्यात बांधकाम क्षेत्रामध्ये मेहनत करून अर्थार्जन करायची इच्छा असेल त्यांच्यासाठी आपण व्यवस्थित नियोजन करून देऊ शकतो. हे काम मी करेन विनामूल्य व सामाजिक बांधीलकी म्हणून. तुझ्यासह इतर कुणाला या संदर्भात माझ्या अनुभवाचा फायदा हवा असेल, मार्गदर्शन हवे असेल तर स्वागत आहे.
तुझाच
महेश यशराज
महेश यशराज – response.lokprabha@expressindia.com