lp41नाटक म्हणजे मराठी माणसाचा जीव की प्राण. काळानुरूप नाटकांच्या विषयात, आशयात, सादरीकरणात बदल होत गेले आहेत. म्हणूनच आजच्या काळाचा विचार केला तर कुणालाही प्रश्न पडेल की आपली नाटकं पुढचं स्टेशन कोणतं घेणार?

परवा एक नाटक बघून घरी परत येत होते. ट्रेनमध्ये माझ्या बाजूच्या काकूंना गाढ झोप लागली होती. त्यांची मान सतत माझ्या खांद्यापर्यंत येत होती, त्या दचकून उठत होत्या. परत झोपत होत्या. ज्यांना पहिल्या स्टेशनला बसून शेवटच्या स्टेशनला उतरायचं असतं त्यांचं ठीक  असतं हो; पण ज्यांना ‘विलेपाल्रे, सांताक्रूझ’ अशा ठिकाणी उतरायचं असतं ना, त्यांचा ही झोप घात करते. तर त्या काकूंनाही अशाच एका स्टेशनवर उतरायचं होतं बहुधा. फजिती झालेले लोक नेहमी उतरताना आपल्याला उतरायचं स्टेशन मागे गेलं असं केवळ क्षणभर दाखवतात. मग फजिती कळू नये म्हणून मला इथेच उतरायचं होतं अशा आविर्भावात उतरतात. खर तर ट्रेनमधली पुढच्या स्टेशनची अनाउन्समेंट म्हणजे सगळ्या झोपाळू माणसांना जागं करायला असलेली सोय. पण त्यादिवशी त्या अनाउन्समेंटमध्येही काहीतरी गडबड झाली होती. त्यामुळे झोपेतून अचानक जाग्या झालेल्या  त्या काकूंना पुढील स्टेशन कुठलं हे  कळेना. त्या भांबावल्या. खिडकीच्या बाहेर सगळ्या बाजूने बघायला लागल्या. मग शेवटी सगळ्यांना धक्का मारत, कशाबशा उतरल्या. मीच हुश्श केलं.

माणसाला कुठं जायचं हे माहीत नसलं की कसं होतं ना? किंवा मग ठिकाण माहीत आहे, पण आपण तिथपर्यंत पोहोचतच नाही. बाप रे. स्टेशनच्या बाबतीत विचार केला तर काहीच वाटत नाही; कारण चुकलो तर बदलायची संधी आहे. मी नुकतंच नाटकात बघितलेलं दृश्य आठवलं. एक माणूस जवळजवळ एक अर्धा मिनिट रंगमंचभर काही तरी शोधत होता. त्याला त्याची गोष्ट काही सापडेना आणि मग पूर्ण रंगमंचभर अंधार झाला. खूप मोठा अर्थ दडलेला होता त्या ब्लॅक आऊटमध्ये. त्यातही त्या अंधारात अख्खा सेट बदलला गेला. नवल वाटलं मला. त्या कलाकाराला जे प्रकाशात सापडलं नाही ते यांना अंधारातसुद्धा कसं काय दिसलं? सवय? किंवा मांडून ठेवलेल्या गोष्टीत हरवलेली गोष्ट शोधायला वेळ नाही लागत. (हे माझ्या आईचं वाक्य आहे. जे मलाही वारंवार ऐकावं लागतं.)

तर मी अजून खोल विचारात गेले. आमच्या कॉलेजच्या दिग्दर्शकाने ‘चला सेट क्लीन’ अशी दिलेली ऑर्डर एकदम आठवली. तेव्हाही माझ्या मनात विचार यायचा की अशा क्लीन स्टेजवर का नाही नाटक केलं जात? कसा काय लागला असेल बुवा याचा शोध? मग आमच्या गावात होणारं दशावतार आठवलं. ते तर सतरंजीवर व्हायचं. मग स्टेज कसं बांधलं गेलं असे प्रश्न करत करत मी पोहोचले नाटकाकडे. म्हणजे जसा आपला प्रवास, आपली स्टेशन्स तसंच नाटकाचंही असेल का? असं म्हणत शोधावर निघालेले मी, माझ्या अल्पमतीला नाटकांचे लागलेले स्टेशन्स तुमच्यासमोर ठेवते आहे.

एक दंतकथा असे सांगते की, इंद्राने ब्रह्मदेवाला सांगितलं की, असं काही तरी निर्माण कर की जे डोळ्यांना आणि कानाला एकत्र आनंद देईल. म्हणून ब्रह्मदेवाने नाटक हे ‘दृकश्राव्य’ माध्यम समाजासाठी निर्माण केलं. रुळावर एक डबा आला. म्हणजे ट्रेनचं इंजिन लागलं म्हणायला हरकत नाही. कालांतराने इंजिनाला ‘कुशीलवांचा’ डबा जोडला गेला. पूर्वी राजांचे मोठमोठे यज्ञ व्हायचे. हे कुशीलव यज्ञात आलेल्या माणसांचं मनोरंजन व्हावं यासाठी त्यांना विविध कथा अभिनयासहित सांगायचे. याला अगदी नाटक नाही म्हणू शकणार; पण नाटकाच्या महत्त्वाच्या lp42अंगाची ही सुरुवात असू शकते. त्यानंतर बराच काळ ही ट्रेन याच रुळावरून भरधाव धावत होती. नंतर काही काळाने ‘अश्वघोषाने’ आपल्या स्टेशनवर तिला थांबवलं. त्याच्या थोडं पुढे गेलो की ‘भास’ या स्थानकावर आपली ट्रेन थांबली. या नाटककारांनी बरीच नाटकं लिहिली आणि ती सादरही झाली. इथपासून नाटय़ रंगभूमीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. अर्थात ही मराठी रंगभूमीची सुरुवात नव्हे; पण मुळातच ‘नाटक’ कुठून आलं? याची ही सुरुवात मानली जाते. सुरुवात झाली, पण ती एका चौकटीत बसवण्याची गरज निर्माण झाली आणि ती गरज भारतमुनींनी ‘नाटय़शास्त्र’ लिहून पूर्ण केली. ज्याला ‘नाटकाच्या ट्रेनने’ आपल्या पुढच्या प्रवासासाठी जणू गार्ड बनवलं. आता गाडी अशा एका स्टेशनवर थांबली की त्या लेखकाच्या प्रतिभेने तिला काही शतकं तिथेच थांबायला भाग पाडलं. तो लेखक होता ‘कालिदास’. कालिदासाचं ‘शाकुंतल’ ही काय अजरामर कलाकृती आहे, हे काही वेगळं सांगायला नको. बराच काळ ट्रेन तिथेच थांबली. बराच प्रेक्षकवर्ग भरला. पुढच्या पर्वात मात्र ट्रेन्सना मेगा ब्लॉक लागायला सुरुवात झाली. सारख्या ओवर हेड वायर्स तुटायला लागल्या, काही अपरिहार्य कारणामुळे गाडय़ा रद्द व्हायला लागल्या. प्रत्येक लेखकाला आता आपलं लिखाण सर्वोत्तम कसं ठरेल याची काळजी होती. त्यामुळे नाटकात काव्याचा भाग वाढायला लागला आणि मग सादरीकरणावर र्निबध येऊ लागले. आपल्याकडे जसा फक्त रविवार ते रविवार मेगा ब्लॉक असतात तसंच हे अडसरही फार काळ टिकले नाहीत. बरेच डबे पुढे पुढे लागत गेले. त्यात एक डबा लागला तो म्हणजे मराठी रंगभूमीचा आणि स्टेशन होतं सांगली. औंधकर राजांची राजवट, विष्णुदास भावे यांचा वरदहस्त, राजालाही नाटकाची रुची. त्यामुळे त्याने या ट्रेनमध्ये बसायचं ठरवलं. सीतास्वयंवर या नाटकापासून मराठी रंगभूमीची सुरुवात झाली असं मानलं जातं. अर्थात यात अनेक मत-मतांतरे आहेत. ती आपल्याकडे कधी नसतात? प्रत्येक जण सुरुवात आमच्यापासून झाली म्हणत होता. ट्रेनला मिळणारे सिग्नल्स थांबायला लागले. परिणाम काही वेगळे सांगायला नकोत. मग सगळ्या नाटकांचं मुख्य उद्दिष्ट शोधायचं असं ठरलं.

मकरंद साठेंनी आपल्या ‘रंगभूमीच्या तीस रात्री’ या पुस्तकात हे उद्दिष्ट उद्धृत केलं आहे. म्हणजे ते असं म्हणतात की नाटक हे त्या त्या समाजाचं रंगभूमीवरचं प्रतििबब आहे, हे ही नाटय़शास्त्रात सांगितलं आहे.

‘ नानाभवोसम्पन्नं नानवस्थान्तरात्मकम्

लोकवृत्तानुकरणं नाटय़मेतन्मयाकृतम्  १२२

त्या काळातला समाज म्हणजे विष्णुदास भावे यांच्या काळातला समाज हा कसा होता? तर नुकताच पेशव्यांचं राज्य संपुष्टात येत होतं, इंग्रज भारतात शिरत होते. इंग्रजांना आपल्यावर वर्चस्व गाजवायचं होतं म्हटल्यावर त्यांनी भारतीय संस्कृतीला कमी लेखायला सुरुवात केली. भारतीय अस्मिता पायदळी तुडवली जात होती. मग अशा अस्मिता गमावून बसलेल्या लोकांना पुन्हा चेतवण्यासाठी नाटकाचा आधार घेतला गेला. या नाटकातून काय दाखवलं गेलं तर मुख्यत्वे आपली भारतीय संस्कृती आणि दुष्टांचा संहार. दशावतार हा त्यातलाच एक प्रकार. समाजाची अस्मिता जागवण्यासाठी नाटकाचा उपयोग केला गेला. आता यातला इंद्र कोण आणि ब्रह्मदेव कोण हे आपण ठरवायचं.

इथे ट्रेनला सुसाट गती मिळाली. आणखी एक डबा जोडला गेला तो म्हणजे ‘संगीत रंगभूमीचा.’ या डब्याची पकड जबरदस्त होती. अण्णासाहेब किर्लोस्कर, विद्याधर गोखले यांसारख्या अनेकांनी ट्रेन चा ताबा आपल्या हातात घेऊन तो समर्थपणे पेलला.

काळ बदलत गेला, समाज बदलात गेला. त्याच रुळावरून ‘प्रसारमाध्यमांची’ ट्रेनही धावू लागली. एकाच रुळावरून दोन्ही ट्रेन कशा काय धावणार? बरं प्रेक्षकवर्गही सरळसोट प्रसारमाध्यमांच्या ट्रेनमध्ये जाऊन बसला. एकीला बाजूला करावं लागतंय की काय या भीतीने सगळेच कलाकार ग्रासले. समाजाची नक्की स्थिती तेव्हा समजण्यासारखी नव्हती. प्रतििबब पडायला आराशावरची धूळ साफ होती नव्हती. बराच काळ हा वाद चालू होता. त्याचं उत्तरं आता कुठे तरी मिळतंय. म्हणजे दोन्ही ट्रेन एकाच रुळावर आहेत. फक्त नाटकांची ट्रेनला प्रसारमाध्यमांची ट्रेन फॉलो करतेय. नाटकांचे होणारे चित्रपट हे त्याचंच एक उदाहरण. बरं हा प्रश्न सुटला कसा? तर समाजाची गरज ओळखली गेली. म्हणजे आधी जसं समाजाला पारतंत्र्यातून बाहेर काढणं आणि स्वत:ला सिद्ध करणं ही गरज होती. तशी आता ‘नातेसंबंध’ ही समाजाची गरज बनू लागली. आता ट्रेन ‘या’ स्टेशनवर आहे. ‘पसा’ ही सुद्धा माणसाची गरज एक वेळ पुरवली जाऊ शकते. पण माणसाला माणसाची असलेली गरज पुरवणं दुर्मीळ. म्हणजे अगदी आताची वाडा चिरेबंदी, गोष्ट तशी गमतीची, कार्टी काळजात घुसली, षष्ठ, आम्ही सौ कुमुद प्रभाकर आपटे, कोबीची भाजी, बी हॅपी डोन्ट वरी अशी किती तरी नाटके ही नातेसंबंधावर आधारित आहे. म्हणजे या नाटकातून नातेसंबंध दृढ होण्याचा विश्वास प्रेक्षकांना मिळतो आणि प्रेक्षकांची गर्दी वाढते.

तर या नाटकांचा शोध का लागला तर माणसाला वर्तमानात आणण्यासाठी आणि पर्यायाने समाजात प्रबोधन घडवून आणण्यासाठी. यास्तव सुरू झालेला नाटकाचा प्रवास आज एका सुजाण प्रेक्षकांनी भरलेल्या, कलाकारांनी भरलेल्या स्टेशनवर आहे. तो थांबलेला नाहीच आहे. उलट पुढील स्टेशन कुठलं, असं विचारत विचारत पुढे सरकतो आहे. हे स्टेशन पुन्हा आपल्या समाजाच्या गरजेवर आहे. आता असलेली गरज पूर्ण झाली की पुढची गरज आणि पुढचं स्टेशन. कुठलं असेल? बहुधा ‘तंत्रज्ञान व्यसनमुक्ती.’ नाही? ठीकेयविचार करू. चला कामाला लागू. पुढचं स्टेशन कुठलं?
ऋतुजा फडके – response.lokprabha@expressindia.com