त्यांना इतिहास होता, संस्कृती होती, परंपरा होत्या. त्यांना त्यांचं राज्य होतं, जमीन होती, घरदार होतं. समृद्ध, सुखी, समाधानी लोक होते ते. पण अचानक त्यांचा वर्तमान हिसकावला गेला. त्यांचं भविष्य पुसलं गेलं.. का? काश्मीर हा १९४७ पासूनच चर्चेचा नि चिंतेचा विषय राहिलेला आहे. हा प्रश्न तुम्हीआम्ही सर्व भारतीयांनी स्वत:लाही विचारायला हवा की आपल्याला तेथील सृष्टीसौंदर्याचीच चिंता आहे की आपल्याच देशात निर्वासितांचं जिणं जगणाऱ्या काश्मिरी पंडितांबद्दलही काही माया आहे? त्यांच्याविषयी लिहिणे फॅशनेबल नाहीय का? की त्यांच्याबद्दल लिहिले, बोलले की आपल्या धर्मनिरपेक्षतेला तडा जातो? आजवर वेगवेगळ्या विचारसरणीची सरकारे आली, पण कुणीही पंडितांना त्यांच्या मूळ घरी स्थापित करू शकलेलं नाही. घरं, जमिनी, नोकऱ्या देण्याच्या वल्गना झाल्या, पण प्रत्यक्षात फारसे काही झाले नाही. ते जम्मू, दिल्ली वा विदेशात जाऊन राहत आहेत. इथे शरणार्थी म्हणून आलेल्या ज्यूंना जशी अनेक शतकं लोटली तरी इस्रायलचे प्रेम नि आस्था होती तशीच ओढ नि तडफड काश्मिरींची होतेय. आज हा विषय आठवायला दोन- तीन कारण आहेत. पहिले, पंडितांना त्यांचा प्रदेश सोडून १९ जानेवारी २०१७ ला २७ वष्रे होतील. दुसरं कारण, नुकतीच मुंबईत प्रकाशित झालेली राकेश कौल यांची ‘लास्ट क्वीन ऑफ काश्मीर’ ही कादंबरी आणि तिसरे एक हजार वर्षांपूर्वीच्या नि आजही विद्वत्जनांत आदराचे स्थान असलेल्या अभिनवगुप्त या अलौकिक विद्वानाच्या स्मृतिजागराच्या निमित्ताने मुंबईत एशियाटिक सोसायटीत झालेले चर्चासत्र. या तीन कारणांनी मला हे जाणवलं की आपण काश्मीरबद्दल किती अज्ञानी आहोत. आपण जगभरातील निर्वासितांविषयी प्रेम दाखवतो, सहानुभूती, करुणा बाळगतो. पण आपल्याच देशातील या राज्यातील लोकांवर अनन्वित अत्याचार झाले, त्यांच्या स्त्रियांची विटंबना झाली. त्यांचे जिणे त्रासदायक करून, त्यांच्यावर नाना तऱ्हेची दडपणं आणून त्यांना काश्मीर खोरे सोडायला भाग पाडायची प्रक्रिया अनेक वष्रे चालू होतीच, पण त्या रात्री (१९ जानेवारी) मात्र जिवंत राहण्यासाठी पळून जाणं गरजेचं झालं होतं. घरंदारं सोडून त्यांना रातोरात पळ काढावा लागला नि आपण ढिम्म शांत बसलो आहोत. चर्चाही करत नाही की तसं करण्याने आपल्या वैचारिकतेला बाधा पोहोचते? कारणं जाणून घेतलीत आपण? त्या प्रदेशाचा इतिहास, माणसं समजून घेतलीत? दहा लाख लोक आपल्याच देशात शरणार्थी झाले. एका परीने म्हणता येईल की म्हणून काय झालं आपल्याच देशात आहेत ना ते? आपल्या अनेक योजना, धरणं, विकास संकल्पनातून लोक आपल्या मातीतून उखडली जात आहेत. मग ते शहरीकरण असेल वा दहशतवाद असेल. अधिक चांगल्या जीवनमानासाठी लोक देश सोडून जातातच की त्यात काय एवढं मोठंसं? काश्मीर राज्याने हजारो वर्षांपासून बाहेरील लोकांची आक्रमणं सोसली आहेत. ऐतिहासिक काळापासून राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक हल्ले इथे होत राहिलेत. तरी तेथील सामाजिक धागे मजबूत राहिलेत. िहदू, बौद्ध आणि मुस्लीम धर्मानुयायांचे वास्तव्य इथे शेकडो वर्षांपासून आहे. काश्मीरीयत ही त्यांची ओळख होती, आहे. पाकव्याप्त भारतात उपद्रव करण्याच्या आणि बॅ. जिनांच्या मुस्लीम देशाच्या कल्पनेचाच हा परिपाक आहे यात शंका नाही. म्हणूनच काश्मीर आमचा आहे, हा धोषा नि पाकिस्तानच्या नापाक इराद्यांचे बळी झाले आहेत काश्मिरी पंडित!! तेथील पाकधार्जण्यिा लोकांनी तरुणांना फितवलंय. आपल्या बाजूला करण्याच्या वृत्तीचा तिथल्या जहाल धर्मवादी विचारांचा प्रभाव हलके हलके तरुणांवर पडू लागला, पाडला गेला. त्यांना बहकावले गेले. काश्मीर खोरे हा भाग पाकिस्तानने धर्माच्या आधारे आपला असल्याचा दावा सुरू केला. काश्मीरचे रक्त सांडत राहिले ते आजतागायत वगरे.. आज त्याबद्दल नाही लिहीत कारण ते रोजच आपण वाचतोय. भारतीय जवान शहीद होताहेत. सामान्य स्त्री-पुरुषांना सन्य नि दहशतवाद दोहोंच्या दंडेलीला तोंड द्यावे लागत आहे. मी दोन मुद्दे मांडू पाहतेय. १९९० च्या जानेवारीत काय झाले? ‘काश्मीर आमचे म्हणजे मुस्लिमांचे आहे. ‘आम्हाला आमचा पाकिस्तान पाहिजे तुम्हा पुरुषांवाचून, तुम्ही इथून निघून जा, फक्त तुमच्या बायका इथे ठेवा.’ अशा अपमानजनक, मानहानीकारक घोषणांनी वातावरण दूषित झालं होतं. सर्वत्र अशा अर्थाचे फलक, घोषणा लिहिल्या गेल्या होत्या. अर्थात हे काही एका रात्रीत झालं नव्हतं. त्या अगोदरपासूनच पंडितांना धमक्या येत होत्या. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. आपलं घरदार, वाडवडलांची भूमी, व्यवसाय, नोकऱ्या सोडून का नि कुठं जायचं? पण परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत गेली. कुणाकडून ठोस मदतीची शक्यता राहिली नाही. एकामागून एक िहदू पंडितांच्या घरांवर हल्ले सुरू झाले. कोणतीही सरकारी यंत्रणा त्यांच्या मदतीला येत नव्हती. हे लोक समृद्ध, सुशिक्षित, नोकरदार होते. त्यांचा समाजात प्रभाव होता. त्यांना लक्ष्य केलं जाऊ लागलं होतं. त्यांच्या नोकऱ्या धोक्यात येत होत्या. हे सारं का होत होतं? तर ते िहदू होते म्हणून. हे सत्य आपल्यासारख्या सर्वधर्मसमभाव बाळगणाऱ्यांनाही (सेक्युलरवाद्यांना) नाकारता येत नव्हतं. ते नि:शस्त्र होते नि आजही तसेच आहेत. ते जगत नव्हे तर सोसत होते. आपलं अस्तित्व गमावत चालले होते. आपली घरं, पिढीजात भूमी सोडून ते का जातील? अपराध काय? पण कुणी दखल घेतली नाही, आजही घेतली जात नाहीय. आज किमान ते आपला वारसा देशवासीयांसमोर मांडत आहेत. त्या वेळी (१९९०) ज्येष्ठ पत्रकार रवीशकुमारने काश्मिरी पंडितांना बोलतं केलं होतं. ती चर्चा यूटय़ूबवर ऐकून आजही काटा येतो. भलेही खूप मोठय़ा संख्येने लोक मारले गेले नाहीत. त्यांनी आपल्या दैन्याचे प्रदर्शन जगासमोर केलं नाही, ते व्होटबँक नाहीत. बंदूकधारी नाहीत. आशावादी आहेत. आपल्या घरी परत जायची वाट पाहत आहेत ते. काश्मीरची भौगोलिक सीमा पाहता त्यांच्या राज्यातच आहेत, पण आपल्या घराचे स्वप्न मनात घेऊन परागंदावस्थेत जगत आहेत. त्यांचं दु:ख समजून घेणार आहोत का? राजकीय स्तरावर त्यांना पुनस्र्थापित करता येणार का? त्यांना आजही वेडी आशा आहे की जोवर विधानसभेवर तिरंगा फडकत आहे, देश संविधानानुसार चालत आहे आम्हाला आमच्या भारतात न्याय मिळेल!! पण त्यांच्या ‘आमचा गुन्हा काय?’ या प्रश्नाचं उत्तर आहे कुणा मुख्यमंत्र्याकडे? तो प्रश्न आज २७ वर्षांनीही सतावत आहे. त्या रात्री काय झालं हे आठवलं तरी आजही त्यांच्या अंगावर काटा येतो. जेव्हा आपल्यांनीही दगाफटका केला तेव्हा ज्या काश्मीरीयतबद्दल अभिमान होता, ती विखरून गेली. उद्ध्वस्त झाली. ‘आमचे पिढय़ानुपिढय़ांचे शेजारी जन्माचे वैरी झाले. आम्ही सोसत राहिलो, परागंदा व्हायला लागू नये म्हणून! पण पाहता पाहता काश्मीरचे खुले, मोकळे वातावरण विषाक्त झाले. १५ ऑगस्टला ब्लॅकआउट, सिनेमाघरांत स्त्रियांना बंदी यांमुळे सहजीवनाची खुली हवा कोंदट होऊ लागली होती. आम्ही आमचं अस्तित्व हरवत चाललो होतो. अनंतनाग आणि इतर ठिकाणची मंदिरं तोडली जात होती. प्रार्थनास्थळांना, घरांना, मठांना आगी लावल्या जात होत्या.’ बर्फाळ हवेने तेथील इमारतीत लाकडाचा वापर जास्त होतो. राहुल पंडिता, शशी शेखर, डॉ. शक्ती भान, तोषखानी, सुशील पंडित, नीस कौल आणि अनेक काश्मिरींनी आपल्या पायाखालची जमीन गेल्याचं दु:ख वर्णन केलं. आपण कुठले हे सांगता येत नाही ही वेदना तरुण वैज्ञानिक असलेल्या तरुणीने बोलून दाखवली. १९ जानेवारी १९९० ही रात्र जगाचा शेवट, कयामत आल्याची भावना देणारी रात्र होती. अंगावरील कपडय़ांनिशी कडाक्याच्या थंडीत लोक स्वत:चा, बायको, मुलांचा जीव वाचवत, आपल्या वाडवडलांच्या वास्तूकडे शेवटची नजर टाकत जम्मू आणि इतरत्र गेले. ते आजही तेथेच राहत आहेत. कुणाही राजकीय पक्षाला त्याबद्दल काही करायचे नाहीय का? अनेक वष्रे ते तंबूत राहत होते. आता स्वकष्टाने त्यांची घरं उभी आहेत. पण तेव्हाही नि आजहि कुणा महत्त्वाच्या राजकीय नेत्यांची त्यांची तेथे जाऊन, काळजीने विचारपूस केली नाही की भरभरून मदत केली नाही. काय आहे या लोकांचा इतिहास नि कर्तृत्व? त्यांना आपल्या पूर्वजांचा अभिमान वाटावा, आपल्या मातृभूमीची ओढ वाटावी असे काय आहे तेथे? इतिहास हा फक्त अहंसाठी नसतो. जसा आज वापरला जातोय, तर तो तुमच्या आत्म्याचा अस्तित्वाचा आधार असतो. आपण मराठी म्हणजे काय तर सातवाहन ते शिवाजी महाराज नि पेशव्यांच्या मराठेशाहीच्या अटकेपार पराक्रमाचे वारसदार!! त्याचं आज राजकारण होतंय, पण तेदेखील काश्मिरी पंडितांबाबत झाले नाही. पण इतक्या वर्षांनी वेगवेगळ्या निमित्ताने ते आता मांडू लागले आहेत. काही कादंबऱ्या, पुस्तकं, डॉक्युमेंटेशन, व्याख्यानं, सेमिनार आयोजित करून विद्वानांचे, सुज्ञ वाचकांचे लक्ष वेधून आपला पर्यायाने काश्मीरचा इतिहास लोकांसमोर ठेवायला उशिरा का होईना ठेवायला सुरुवात केली आहे. त्यात प्रामुख्याने परागंदा अवस्थेत असलेले प्राध्यापक, वकील, डॉक्टर्स, चळवळीतले कार्यकत्रे सामील आहेत. मुळात काश्मीरचे महत्त्व, महत्ता काय? त्याच्या भौगोलिक स्थानामुळे त्यांच्या जीवनावर, राहणीवर, संस्कृतीवर झालेले आघात तेथील लोकांनी कसे पचवले? या प्रदेशाचा इतिहास काय, याबद्दल सर्वसाधारण भारतीयांना कितीसे माहीत आहे? आपल्या अज्ञानाचे निराकरण करून घ्यायची गरज आजवर का वाटली नाही? या सगळ्याची उत्तरे शोधताना एक प्राचीन समृद्ध संस्कृती नि इतिहासाचा खजिना दिसू लागला. हा इतिहास म्हणजे काश्मीर या प्रदेशाचे अस्तित्व. हे इतर कुठल्याही भारतीय राज्यापेक्षा जुने आहे. वैभवशाली अशी विद्वत्तेची परंपरा असलेले असे हे राज्य आहे, याचा पुरावा महाभारतात मिळतो. त्यांच्या नीलमत पुराणात मिळतो. हे पुराण काश्मीरबद्दल खूप काही महत्त्वाचे देते. राजा जन्मेजय नि ऋषी वैशंपायन यांच्या संवादातून प्रगट होते. जनमेजय हा अर्जुनाचा पणतू, अभिमन्यूचा नातू, परीक्षिताचा पुत्र आणि वैशंपायन हे वेदव्यासांचे शिष्य. या पुराणानुसार कुरुक्षेत्राच्या युद्धात आर्यावर्तातील अनेक राजांनी आपापले सन्य पाठवले होते, पण काश्मीरच्या राजाने का पाठवले नाही, असा प्रश्न राजा विचारतो. तेव्हा ऋषी सांगतात की, तेथील राजा हा अल्पवयीन असल्याने तो कुणाच्या बाजूने लढायचे हा निर्णय घ्यायला योग्य नाही म्हणून त्याला विचारलेले नाही. त्यामागे जरासंध, गोनंद, दामोदर अशा कंसाच्या बाजूच्या काश्मीरच्या राजांचा, कृष्णाच्या नातेवाईकांचा संबंध आहे. त्या वेळी काश्मीर हे एक जनपद होते. गांधारात विवाहासाठी जाताना (कृष्णाने कंसाला मारले म्हणून) गोनंदाने त्याला आव्हान दिले, पण बलरामाने द्वंद्वात गोनंदचा वध केला नि त्याच्या पुत्राला- दामोदरला- कृष्णाने मारले. यामुळे तेथील राज्य हे राजाविहीन झाले, तेव्हा कृष्णाने दामोदराच्या पत्नीला राज्यकारभार करायचा अधिकार दिला नि तिच्या पोटचा पुत्र गोनंद द्वितीय हा वयात येईस्तोवर ती राज्यकारभार पाहत होती. हे सारे काश्मीरच्या भूमीत झाले. ती बहुधा राज्य करणारी जगातील पहिली स्त्री असावी. त्यानंतर दीदा आणि कोटारानी या दोन काश्मिरी प्रशासक स्त्रियांनी काश्मीर एक ठेवण्याचा, हल्लेखोरांपासून वाचवायचा प्रयत्न केला. त्यांच्याविषयीही इतिहास गप्प आहे. या राज्याचे पुरातनपण समजून घेताना जाणले पाहिजे की तेथे प्राचीन काळापासून कालगणनेची शास्त्रशुद्ध परंपरा आहे. त्यांच्या इथे पंचांगाचे ५०९३ वे वर्ष सुरू आहे. त्यासाठी दरवर्षी ज्योतिषी जमून काटेकोरपणे काळ, तिथी, सणवार, परंपरा यांची नोंद करतात. विक्रमसंवत, शकसंवत यांहून हे जुने पंचांग आहे. ज्याला ते जंत्री वा सप्तर्षीसंवत म्हणतात. काश्मीर हे नाव केशरावरून पडले आहे. दोन्हीचा अर्थ एकच आहे. काश्मीरची प्राचीनता काय हे पाहताना दिसते की या प्रदेशाची विद्वानांचे माहेरघर म्हणून ख्याती होती. अगदी काशीचा शिक्षा- दीक्षापात्र विद्यार्थीही शारदापीठाची प्रातिनिधिक मान्यता त्या दिशेने चार पावले चालून करीत असे! काशीतील शिक्षणापुढे शिकायचे तर शारदापीठाचे महत्त्व होते. दक्षिणेतील शंकर इथे येऊनच आचार्य झाले. म्हणूनच तेथील विद्वान ‘नमोस्तुते महाशारदे काश्मीरपूर निवासिनी’ म्हणत त्या पीठापुढे नतमस्तक होतात. इथल्या विद्वत्तेची ध्वजा अनेक बुद्धिवंतांनी फडकत ठेवली आहे. भरतमुनींचा नाटय़शास्त्र हा ग्रंथ पाचवा वेद समजला जातो. त्यावरील अभिनवगुप्त या काश्मिरी पंडिताची मीमांसा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या प्रकांड पंडिताचे ४७ ग्रंथ हे विद्वत्तेचे प्रमाण समजले जाते. त्याने लिहिलेला ‘तंत्रालोक’ हा काश्मिरी शैविझमवरील प्रमाणग्रंथ मानला जातो. त्याने लिहिलेली अभिनवगीता, व्याकरणावरील ग्रंथ आजही चíचले जातात. अभिनवगुप्ताचे लेखन जगातील ८० विद्यापीठांमध्ये शिकवले, अभ्यासले जाते. त्याचप्रमाणे शारंगदेव हा संगीतज्ञ् साऱ्या देशात िहदुस्तानी आणि कर्नाटक संगीताचा उद्गाता म्हणून प्रसिद्ध आहे. भट्ट लोलक, क्षेमेंद्र, अवंतीवर्मन असे अनेक काश्मिरी विद्वान होऊन गेले. पाणिनी हा स्वात भागात राहणारा अष्टाध्यायीचा प्रवर्तक, महान व्याकरणकार हा काश्मिरी होता. ६९९-७५० शतक हे एका महान इतिहासकाराच्या परंपरेचा काळ म्हणावा लागेल. कल्हण याने ‘राजतरंगिणी’ या ग्रंथात काश्मीरच्या राजवंशाच्या नोंदीची, कार्याची मुहूर्तमेढ रचली. त्यानंतर जोनराज, श्रीवर असे इतिहासकार तेथील राजवंशाच्या कहाणीचे यथातथ्य दर्शन देतात. त्यातून त्या प्रदेशाचे सांस्कृतिक, राजकीय वैभव अभ्यासकांपुढे येते. त्यात वर्णने केलेली परकीय आक्रमणांची वर्णने, त्या प्रदेशाचा चेहरामोहरा बदलून टाकण्याच्या प्रक्रियेची चाहूल लागते. त्याला दुजोरा मिळतो तो तेहरानमधील वाङ्मयातून. डॉ. काशीराज पंडिताला तो मिळाला. तेथील ग्रंथभांडारात इराणच्या इतिहासकाराने काश्मीरच्या लोकांना बाटवले, त्यांचा धर्म बळजबरीने बुडवला, तेथील मंदिरे तोडून धर्मकार्य (?) केले याचे उतारे मिळाले आहेत. ते त्या पंडिताने अनुवादित केले आहेत. ते इथे लिहिल्या गेलेल्या इतिहासाशी जुळतात. आक्रमणे ही सांस्कृतिक अस्मिता ठेचण्याकरिता केली गेली. आजही तेच होतेय. आपला प्रदेश, आपला परिसर सोडून पारंपरिक अन्न, पूजा, सण- समारंभ, भाषा, आपला भवताल यांच्या अभावी त्यांची ओळख केवळ रंगरूपावरूनच शिल्लक राहतेय की काय असे वाटू लागलेय. तो सारा प्रदेशच सांस्कृतिक आठवणींनी पंडितांना अस्वस्थ करतोय. त्यांचे सतीसर सरोवर (जिथे सती पार्वती स्नानाला जात असे मानले जाते), त्यांचे शंकराचार्य हिलवरील देवालय, शरीका देवीचं मंदिर ही त्यांच्या मर्मबंधातील ठेव आहे. तेथील परिसराची नावेही बदलली गेली आहेत श्रद्धा वसाहतवाद (धार्मिक वसाहतवाद?) नावाच्या वादाने. आíथक, राजकीय, सांस्कृतिक वसाहतवादासारखा हा वाद, पण त्याने संस्कृती, धर्म, माणसे यांची पाळेमुळे उखडून टाकलीत. ‘राजतरंगिणी’मधील बराचसा भाग हा मुस्लीम राजांच्या काळाबद्दल लिहिला गेलाय. तो राजाच्या आश्रयाला असलेल्या लेखकाने लिहिला आहे. त्याच्या मान्यतेने लिहिलाय. त्यामुळे इथल्या लोकांना त्यांचे स्वत्व सोडायचे काय काय उपाय केले गेले यांचे अंगावर काटा येईल असे वर्णन त्यात येते. अर्थातच फुशारक्या मारत त्याने सांगितलेल्या घटना म्हणजे स्थानिकांना वठणीवर आणायला काय केले गेले ते त्यात आहे. ते ‘राजतरंगिणी’तील वर्णनाशी जुळतेय. राजतरंगिणीत नंतर जोनराज, श्रीवर यांनी भर टाकली. काश्मीरच्या इतिहासात ललितादित्य नावाचा अत्यंत प्रभावशाली नि विशाल साम्राज्याचा शासक होता. त्याचे राज्य पश्चिमेला कॅस्पियन समुद्रापासून पूर्वेला आसाम आणि खाली कावेरी प्रदेशापर्यंत नि सातवाहनांच्या राज्यापर्यंत पसरलेले होते. परकीय हल्ले सुरू होते त्या काळात तो आपले सामथ्र्य टिकवून होता. त्याने बांधलेले अतिविशाल अलौकिक मूर्तिकलेचे उदाहरण असलेले सूर्यमंदिर- मरतड मंदिर (ज्याला मट्टन म्हणतात) अत्यंत देखणे मंदिर होते. १३३९ पासून इस्लामने काश्मिरात प्रवेश केला तो शाहमीर या राजपुत्रापासून. त्याने उदयराजाकडे राजाश्रय मागितला होता. उदयराजाने तो दिला होता. त्यानंतरच्या काळात तेथे मुस्लीम राजांनी राज्य केले. पण अगदी १४५० पर्यंत त्यांचा राज्याभिषेक राजतिलक मंत्रोच्चाराने केला जात होता. नंतर स्थिती पालटत गेली. अनेक इस्लाम धर्मीयांनी आपण आपल्या िहदू पूर्वजांच्या भूमीत जाऊन तेथील देवतांसमोर नतमस्तक झाल्याचे लिहून ठेवलेय. डॉ. फारुख नाझकी यांचे १४ पिढय़ांपूर्वीचे वंशज हे शारिका मंदिराचे रक्षक होते. त्या स्थानाला भेट दिल्यावर काय वाटले हे त्याने लिहून ठेवलेय. हा काश्मिरियतचा भाग असू शकतो. पण त्या दंगलीच्या काळात अनेक विद्वान पंडितांना ठार केले गेले. स्थानिकांच्या मते हे परकियांच्या चिथावणीने झाले. तेथे िहदू, इस्लाम नि बौद्धधर्मीय सहजीवन होतं. बौद्ध संगीती-धर्मचर्चा होत असत. सहा-सहा महिने देशविदेशांतून भिख्खू येत. आपापल्या पंथांतील, देशांतील, धर्मविचारांवर वादविवाद करीत. महायन पंथाची जननी हीच भूमी आहे. तिथून हा धर्म दक्षिण आशिया, चीन, कोरिया आदी देशांत पसरला. बौद्ध विचारांचा प्रसार विदेशात करणारे कुमारजीव आणि पद्मसंभव काश्मिरी होते. इथला बौद्धिक वारसा आजच्या काश्मिरी तरुणांनाही कितीसा ठाऊक आहे नि देशवासीयांनाही किती ठाऊक आहे देव जाणे. या मंडळींना आपला प्रदेश सोडावा लागला; स्वखुशीने नव्हे जबरदस्तीने. त्यांचे सांस्कृतिक जीवन, खानपान, परिसर, भाषा, सण-समारंभ, मंदिर संस्कृती दुरावली आहे, याची जीवघेणी खंत त्यांच्या नव्याजुन्या पिढीला आहे. काश्मीरकडे एक सुंदर प्रदेश पर्यटन स्थळ म्हणून आपण पाहतो. तेथे राहणाऱ्यांच्या जखमाही आपल्याला दिसताहेत, पण शांतताप्रेमी, बंदुका न घेतलेल्या, अनाग्रही, समृद्ध, संपन्न, घरंदाज काश्मिरी पंडितांची मायभूमीची ओढ, तळमळ का दुर्लक्षित होतेय? इतकी वष्रे हे लोक परागंदा अवस्थेत राहत आहेत. निदान आपण त्यांच्या संस्कृतीचा, संचिताचा, इतिहासाचा परिचय करून घेऊन त्यांच्यामागे त्यांच्या हक्कासाठी मानसिक बळ उभे करायला काय अडचण आहे? संजीवनी खेर - response.lokprabha@expressindia.com