# ट्रेण्डिंग
एखादं नैसर्गिक किंवा ऐतिहासिक ठिकाण बघायचं म्हणून पर्यटनाला जाण्याबरोबरच आता ट्रेण्ड आहे आराम करण्यासाठी घराबाहेर पडण्याचा. त्यातून एक मोठी इण्डस्ट्री विकसित होत गेली आहे.

रोजच्या धावपळीतून जिवाला दोन घटका आराम देण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. कुणी घरी लोळत पडेल, कुणी नाटक-चित्रपट पाहायला जाईल, तर कुणी मित्रांबरोबर गप्पा मारत बसेल. जाहिरात कंपनीतल मोठय़ा पदावर असणाऱ्या एका गृहस्थांशी बोलताना समजले की, ते आराम करायला एखाद्या रिसॉर्टमध्ये जातात. तिथे जाऊन सकाळी आरामात उठायचं, रिसॉर्टमध्येच असलेल्या हॉटेलात नाश्ता उरकायचा, तिथल्याच स्पामध्ये जायचं, मसाज घेऊन, आंघोळ वगैरे करून परत आडवं व्हायचं. उठल्यानंतर कधी छोटे-मोठे खेळ खेळायचे किंवा पूलमध्ये डुंबायचं, सायंकाळी रिसॉर्टमध्येच आयोजित केलेल्या छानशा स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आणि परत झोपायचं. पाच-पन्नास हजार खर्चून एखाद्या पर्यटनस्थळी असलेल्या या रिसॉर्टमध्ये दोन-चार दिवस हेच करीत राहायचं, हे वाचून जरा अतिशयोक्ती वाटू शकते. मध्यमवर्गीयांच्या साचेबद्ध पर्यटनात रिसॉर्ट हे आता नवीन राहिलेलं नसलं तरी इतके पैसे घालून केवळ रिसॉर्टमध्येच पडून राहायचं आणि त्या परिसरात असलेल्या पर्यटनस्थळी जायचंच नाही हे पचनी पडायला जड जाऊ शकतं. पण असं करणारे बरेच लोक आहेत हीदेखील सत्य आणि सद्य:स्थिती आहे.

यासारखंच मात्र जरा वेगळंच उदाहरण. ते म्हणजे आपल्याच शहरातल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन दोन-चार दिवस राहणं. दोन-चार दिवस मोकळा वेळ काढून फक्त आरामासाठी जायचं आपल्या घरापासून २०-२५ किलोमीटरवरच्या  हॉटेलात जायचं, तेथील सोयीसुविधांचा आनंद घ्यायचा आणि परत आपल्या घरी परत यायचं. हा प्रकार आपल्याला अगदीच चमत्कारिक वाटू शकतो. पण तसं सध्या सुरू आहे.

आरामाच्या संकल्पना बदलणारी ही दोन वानगीदाखल म्हणावी अशी उदाहरणं. पण ही केवळ वानगीदाखल म्हणावी इतपतच मर्यादित आहेत का? तर त्याचं उत्तर नाही. गेल्या पाच-एक वर्षांत एका ठरावीक वर्गातील आराम करण्याच्या, भटकण्याच्या पद्धतीत होत असलेले हे बदल आहेत. आणि असे बदल जेव्हा वेग पकडू लागतात तेव्हा ते एखाद्या उद्योग-व्यवसायात नव्या घटकाची भर घालणारे असतात.

व्यापार, तीर्थाटन आणि राज्यविस्तारासाठी आपल्या प्रदेशाच्या सीमा उल्लंघून जाणं हीच आपल्याकडची भटकंती होती. चार क्षण मनाला आणि शरीराला ताजंतवानं करण्यासाठी ठरवून वेळ काढावा किंवा केवळ उत्सुकतेपोटी नवीन ठिकाणं धुंडाळावीत अशी मानसिकता तयार होण्याची सुरुवात झाली ती साधारण ९०च्या दशकात. त्यापूर्वी आपली भटकंती ही आपल्या नातेवाईकांच्या गावी जाण्यापुरती किंवा धार्मिक स्थळांना भेटी देण्यापुरतीच मर्यादित होती. मूलभूत गरजा भागल्यानंतर हातात चार पैसे शिल्लक राहिले तर ते पर्यटनावर खर्च करण्याकडे आपला कल वाढला तो जागतिकीकरणानंतर. कारण जास्तीचं असं उत्पन्न या काळात हाती येऊ लागलं. त्यामुळे आज एका ठरावीक वर्गात पर्यटनासाठी तरतूद केलेली असते. ज्यांना शक्य नसतं तेदेखील काहीच नाही तरी एखादी दोन दिवसांची छोटीशी ट्रिप नक्कीच करताना दिसतात. एकंदरीतच पर्यटन हा आज अगदी मूलभूत गरजांमध्ये मोडणारा घटक झाला नसला तरी आवश्यक बाबींच्या यादीत जाऊन बसला आहे.

त्यामुळेच साधारण गेल्या दशकात पर्यटनाकडे एक उद्योग- इंडस्ट्री म्हणून पाहिलं जाऊ लागले आहे. अर्थातच त्यासाठी संघटित पातळीवर विकासाचे प्रयत्न होताना दिसत आहेत. त्याचबरोबर केवळ पर्यटन स्थळी जाऊन प्रेक्षणीय स्थळं पाहायची आणि हॉटेलमध्ये येऊन झोपायचं या एकसाची पर्यटनापेक्षा त्यामध्ये नवनवीन गोष्टींनी शिरकाव केला जातो आहे. पर्यटकाला काही तरी अ‍ॅक्टिव्हिटी हवी अशीदेखील गरज याच काळात निर्माण झाली. त्यानुसार अनेक बदल घडत गेले. नेहमीच्या चौकटीबाहेर जाताना मग नंतरच्या काळात इको टुरिझम, अ‍ॅडव्हेंचर टुरिझम असे प्रकार विकसित होत गेले आणि ते चांगलेच लोकप्रियदेखील झाले आहेत. हे सर्व बदल गेल्या दहा-पंधरा वर्षांतले. जागतिकीकरणानंतर निर्माण झालेल्या नवनवीन संधींचा लाभ घेत जो एक वर्ग वाढत गेला त्यांच्या गरजा वेगळ्या होत्या. तुलनेने नेहमीच्या पर्यटनापेक्षा खर्चीक असणारं साहसी पर्यटनदेखील याच काळात विकसित होऊ लागलं हे त्यामुळेच.

यातूनच नवीन ट्रेण्ड तयार होऊ लागतात. कधी कधी या ट्रेण्डला स्वतंत्र अस्तित्व असतं, तर कधी कधी एखाद्या व्यवसायांतर्गतच तो विकसित होत जातो. काही तरी नवीन पाहण्यासाठी म्हणून पर्यटनाला जाणं याबरोबरच केवळ नेहमीच्या कटकटीतून जरा बाहेर पडावं हादेखील हेतू पर्यटनाचा असण्याचा काळ गेल्या चार-पाच वर्षांत विकसित होऊ लागला. अशा वेळी मग एखाद्या ठिकाणी जाऊन स्थलदर्शन करायचं की केवळ आराम करायचा, असा प्रश्न नक्कीच पडू शकतो. पण त्यासाठी तशी व्यवस्था निर्माण व्हावी लागते, तेव्हाच अशा ट्रेण्डला वाव मिळतो आणि त्यातून एक नवीन यंत्रणा कार्यरत होत राहते. गेल्या साधारण पाचएक वर्षांत हा ट्रेण्ड दोन प्रकारे वाढताना दिसून येतोय. एक म्हणजे एखाद्या पर्यटन क्लबचे सभासदत्व घेऊन अशा सुविधांचा लाभ घेणं आणि दुसरं म्हणजे प्रस्थापित उच्च दर्जाच्या हॉटेल्स अथवा रिसॉर्टमध्ये जाऊन केवळ आराम करणं. यातील पहिल्या प्रकाराचे पर्यटनाच्या क्षेत्रात विशेष असं नामकरण झालेलं नाही, पण दुसरा प्रकार स्टेकेशन या नावाने ओळखला जातोय. सध्या वेगाने वाढणाऱ्या ज्या उद्योगांची दखल ‘लोकप्रभा’ने ‘#ट्रेण्डिंग’ या विभागात घेतली आहे आणि त्यासाठी या दोन्ही प्रकारांचं एकत्रित नामकरण ‘कम्फर्ट इंडस्ट्री’ असं केलं आहे.

सुरुवातीला क्लब सदस्यत्वाचा मुद्दा. आपल्या देशात सध्या कंट्री क्लब, रॉयल पाम क्लब, महिंद्रा क्लब असे किमान पाचएक क्लब लोकप्रिय आहेत. यांपैकीच महिंद्रा क्लब या तुलनेने अधिक लोकप्रिय असलेल्या क्लबशी या संदर्भात चर्चा केली असता मिळालेली आकडेवारी रंजक आहे. महिंद्रा क्लबची सुरुवात झाल्यापासून म्हणजेच १९९६ पासून ते २०११ पर्यंत त्यांना एक लाख सदस्य मिळाले, तर गेल्या केवळ सहा वर्षांत ही संख्या दुप्पट झाली. यातून एकंदरीतच अशा क्लबचे सभासदत्व घेण्याकडे कल वाढतोय हा मुद्दा ध्यानात घ्यावा लागेल. त्यामागे लोकांकडे असलेले वरकड उत्पन्न हा घटक महत्त्वाचा आहे. एकदाच एकरकमी भरलेल्या पैशातून पुढील २०-२५ र्वष देशभरात विविध पर्यटनस्थळी असणाऱ्या या क्लबच्या रिसॉर्टमध्ये वर्षांतून ठरावीक काळ जाऊन विनामूल्य राहण्याची सुविधा यामध्ये दिली जाते. पण याचबरोबर या सभासदांच्या सुट्टी घालवणाच्या ट्रेण्डमध्ये झालेला बदलदेखील पाहणं महत्त्वाचं आहे.

क्लब महिंद्राचंच उदाहरण घेतलं तर गेल्या दोन-तीन वर्षांत अनेक सभासद हे केवळ रिसॉर्टमध्ये येऊन राहण्यास प्राथमिकता देताना दिसतात. तीन-चार दिवसांची सुट्टी असेल तर  फार तर अर्धा-एक दिवस ते रिसॉर्टच्या बाहेर जातात, उर्वरित सर्व वेळ ते रिसॉर्टमधील सुविधांचा आनंद घेतात. अशा प्रकारे सुट्टी घालवणाऱ्यांची संख्या त्यांच्या एकूण सदस्यांच्या ५० टक्के असल्याचे क्लब महिंद्राचे प्रमुख विक्री अधिकारी गिरिधर सीतारामन् सांगतात.

मग हे असे रिसॉर्टमध्ये थांबणारे पर्यटक काय करतात? भरपूर पैसे मोजून भरलेली एकरकमी सभासद वर्गणी असताना तेथील पर्यटनाचा आनंद बाहेर जाऊन घेण्यापेक्षा त्या वास्तूत का थांबतात? त्यामागे ‘रिलॅक्स अ‍ॅण्ड रिज्युवनेशन’ याकडे लोकांचा वाढता कल दिसून येतो. अशा लोकांना व्यवसायातील वाढत्या ताणतणावापासून मोकळीक हवी असते. ती आज अनेकांची गरज झाली आहे. त्यामुळे असे पर्यटक ही विशिष्ट पद्धत स्वीकारताना दिसतात. त्यातही जे पर्यटक यापूर्वी एखाद्या ठरावीक पर्यटन स्थळाच्या रिसॉर्टला भेट देऊन गेले आहेत, ते पुन्हा येतात तेव्हा त्यांचा अशा प्रकारे केवळ आराम करण्याचा हेतू अधिक असतो. म्हणजेच एक प्रकारे रिसॉर्ट हेच त्यांच्यासाठी पर्यटन स्थळ म्हणावं लागेल. तेव्हा अशा रिसॉर्टमध्ये अगदी कॅरम खेळण्याच्या सुविधेपासून ते स्पा, नवनवीन पदार्थ करायला शिकण्याची सुविधा अशा अनेक गोष्टी पुरवल्या जातात. पर्यटकांना आहे त्याच ठिकाणी गुंतवून ठेवण्याचं काम या सुविधा करतात. इतकंच नाही तर अशा वेळी लहान मुलांसाठी वेगवेगळ्या खेळांची विशेष योजना केली जाते. सकाळी सात ते रात्री दहा-अकरापर्यंत त्या ठिकाणी जे काही करता येईल ते सर्व उपलब्ध करून देण्याकडे या क्लब रिसॉर्टस्चा भर असतो.

त्याचबरोबर एका महत्त्वाच्या मुद्दय़ाकडे आपल्याला पाहावं लागेल. तो म्हणजे आजच्या धावत्या जगामध्ये घरातील लोकांचाच एकमेकाशी कमी झालेला संवाद. त्यामुळे देखील अनेकांना तीन-चार दिवस कुटुंबीयांसमवेत वेळ घालवण्यासाठी अशा पर्यायांचा विचार वाढताना दिसतो. अशा वेळी केवळ आलिशान अशी इमारत किंवा कॅम्पस हाच मुद्दा महत्त्वाचा नसतो, तर त्या ठिकाणची शांतता, इतरांशी संपर्क न येता तेथील निसर्गाचा आनंद घेण्याची व्यवस्था कारणीभूत असल्याचं दिसून येतं.

क्लब महिंद्रासारख्या प्रस्थापित व्यवस्थेचं हे उदाहरण म्हणजे प्रातिनिधिक म्हणायला हरकत नाही. त्याशिवायदेखील अनेक क्लब आहेतच, शिवाय क्लबव्यतिरिक्त देखील स्वतंत्रपणे आपल्या आपण नियोजन करून किंवा एखाद्या पर्यटन कंपनीमार्फत सेवा घेऊन हा मार्ग अवलंबणारेदेखील अनेक जण आहेत. याच संदर्भात एसओटीसी या पर्यटन कंपनीच्या प्रॉडक्ट प्रमुख आमोद थत्ते सांगतात, ‘‘आजकाल लोकांना मोठय़ा सुट्टीपेक्षा छोटय़ा छोटय़ा सुट्टय़ांमध्ये जास्ती रुची दिसून येत आहे. तसंच बहुतांश सर्वसामान्य पर्यटकांचा पर्यटनस्थळी भेट देताना उपलब्ध वेळेत जास्तीत जास्त काय काय पाहता येईल याकडेच कल असतो.’’ मात्र काही ठरावीक ठिकाणी रिसॉर्टच्या बाहेर पाहण्यासारखं काहीच नसतं तेव्हा रिसॉर्टमध्ये थांबावं लागत असल्याचं ते नमूद करतात. अर्थात हा सर्वसामान्य पर्यटकांचा दृष्टिकोन झाला. पण ज्यांना रोजच्या धावपळीतून वेळ काढणं हेच उद्दिष्ट असतं अशांसाठी मग स्वतंत्र पर्याय उपलब्ध असतात आणि त्यांचा लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढती आहे.

याबरोबरच दुसरा वाढता वर्ग म्हणजे स्टेकेशनचा अनुभव घेणारे. कॉक्स अ‍ॅण्ड किंग्ज या पर्यटन कंपनीचे कॉर्पोरेट व्यवहार प्रमुख थॉमस थोट्टाहल्ली सांगतात, ‘‘स्टेकेशेन ही संकल्पना क्लब सभासदत्वापेक्षा थोडी वेगळी आहे. उपलब्ध मोकळ्या वेळात आपल्या जवळच्या एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन दोन दिवस घालवणं म्हणजे स्टेकेशन. यामध्ये उपनगरांत लांबवर राहणाऱ्यांनी शहरातील हॉटेलात राहायला येणं हा भागदेखील असू शकतो, किंवा दोन-तीन तासांच्या अंतरावरील एखाद्या निसर्गरम्यस्थळी जाऊन आराम करणं असादेखील भाग असू शकतो.’’ हा नेहमीच्या पर्यटनापेक्षा नक्कीच वेगळा प्रकार म्हणता येईल. म्हणूनच असं करण्यामागची मानसिकता पाहणं महत्त्वाचं ठरतं.

मुख्यत: महानगरातील पंचतारांकित हॉटेल्स ही सोमवार ते शुक्रवार या काळात कॉर्पोरेट ट्रॅव्हलर्सनी भरलेली असतात. शनिवार-रविवार या दोन दिवसांत त्यांना असं गिऱ्हाईक नसतं. त्यामुळे या काळात विशेष सवलत देण्याकडे त्यांचा कल असतो. त्याचा लाभ घेणारे अनेकजण असतात. ही संख्या वेगाने वाढताना दिसत आहे. केवळ शहरातीलच अशी तारांकित हॉटेल्स नाहीत, तर शहराच्या हद्दीवरील (पनवेलच्या पलीकडे असणारी) पंचतारांकित हॉटेल्स, रिसॉर्ट यांचा वापर देखील अशा पर्यटकांकडून होताना दिसत आहे. मुख्यत: त्या वास्तूअंतर्गत असणाऱ्या सुविधा वापरण्याकडे त्यांचा कल अधिक असल्याचं यातून जाणवतं. स्टेकेशनच्या वाढीचा वार्षिक वेग ते २० ते २५ टक्के असल्याचं थॉमस सांगतात. पण एकूण पर्यटनाच्या अनुषंगाने अशा प्रकारच्या पर्यटनाचा वाटा सुमारे पाच टक्के असल्याचं ते नमूद करतात. यामध्ये मुंबईतल्याच काही पंचतारांकित हॉटेल्सनी एकत्र येऊन चक्क मेंबरशिप योजनादेखील सुरू केल्याचं समजतं. याचा लाभ घेणारा वर्ग हा अगदी मराठी उच्चमध्यमवर्गीयांमध्येदेखील दिसून येतो. मुख्यत: तेथील वातावरणाचा आनंद घेणं हाच त्यामागील उद्देश असल्याचं असा अनुभव घेणाऱ्यांचं म्हणणं आहे. या क्षेत्राची प्रतिवर्षी होणारी वाढ ही ज्या वेगाने होतेय ते पाहता एकूणच हे पूर्ण क्षेत्र जोमाने वाढणार असल्याचं दिसून येतं.

एकंदरीतच या प्रातिनिधिक प्रतिक्रिया पाहिल्या तर लक्षात येतं यापुढे पर्यटनस्थळी जाऊन एखादी अ‍ॅक्टिव्हिटी करणं किंवा भरपूर स्पॉट फिरणं याबरोबरच केवळ आराम करायला, त्या वास्तूचा आनंद घ्यायला जाणाऱ्यांची संख्या, त्यासाठी दोन पैसे अधिक मोजायची तयारी ठेवून, वाढत आहे. कारण ती त्यांच्या दृष्टीने काळाची गरज आहे. आणि त्या दृष्टीने पंचतारांकित हॉटेल्सपासून ते इतर रिसॉर्टनी सज्ज व्हायला सुरुवात केली आहे. कारण लोकांचा आराम हाच त्यांचा पैसे कमवायचा उद्योग आहे.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com / @joshisuhas2