राजस्थानला जाणारे बहुतेक जण नेहमीच्या परिचित ठिकाणांना भेट देऊन परततात, पण या ठिकाणांपेक्षाही बरेच काही वेगळे राजस्थानात आहे. चार दिवसांचे नीट नियोजन करून ते पाहता येते.

राजस्थान म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर येते ते दूरवर पसरलेले वाळवंट, कलात्मक आणि सुंदर हवेल्या, महाल आणि सुस्थितीत असलेले किल्ले. राजस्थानला फिरायला जायचे म्हटले अनेक जण जोधपूर, जैसलमेर, बिकानेर, जयपूर आणि उदयपूर या परिचित शहरांना भेट देतात. याव्यतिरिक्त राजस्थानात अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. राजस्थान म्हणजे अकबराच्या बलाढय़ फौजेशी सामना करणारे वीर महाराणा प्रताप. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज पूजनीय आहेत, त्याप्रमाणेच राजस्थानात महाराणा प्रताप पूजनीय आहेत. ज्या वेळी राजस्थानचे इतर राजे मोगलांना शरण गेले होते, आपल्या मुली, बहिणी मोगलांच्या जनानखान्यात पाठवून त्यांचे मनसबदार बनले होते, त्या वेळी महाराणा प्रताप आपल्या छोटय़ाशा मेवाड राज्याच्या स्वातंत्र्यासाठी मूठभर फौजेसह लढत होते. त्यासाठी त्यांनी आपल्या आरामदायी आणि विलासी जीवनाचा त्याग केला होता.

Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 
Tejashwi Prasad Yadav eating fish
नवरात्रीच्या काळात मासे खाल्ल्यामुळे तेजस्वी यादव ट्रोल; भाजपा नेते म्हणतात, “हंगामी सनातनी…”
statue of Gond raje Bakt Buland Shah the founder of Nagpur city is Neglected by government
नागपूर नगरीच्या राजाची अजूनही उपेक्षाच!
instead of Kripal Tumane Raju Parve got Candidacy from Ramtek
शिंदेसोबत जाण्याच्या निर्णयाने तुमानेंची अवस्था ‘तेलही गेले अन् …’

मेवाडचे राजे असूनही महाराणा प्रताप यांचे जीवन आपल्या कुटुंबीयांसह राना-वनात, डोंगरदऱ्यात भटकण्यात गेले. स्वधर्म आणि स्वातंत्र्यासाठी लढणारे महाराणा प्रताप आजही अनेकांचे प्रेरणास्थान आहेत. महाराणा प्रताप, त्यांचा बलिदान देणारा घोडा चेतक, हल्दीघाटीची लढाई यावर शेकडो काव्ये रचलेली आहेत. महाराणा प्रताप ज्या किल्ल्यात जन्मले तो कुंभलगड किल्ला, ज्या किल्ल्यात त्यांचा सर्वाधिक काळ गेला तो चितोडगड आणि ज्या भागात अकबराची सेना आणि महाराणा प्रतापांची सेना यांचे युद्ध झाले ती हल्दीघाटी ही सर्व ठिकाणे उदयपूरपासून जवळ आहेत. उदयपूरला दोन दिवस मुक्काम करून आपल्याला ही सर्व प्रेरणादायी ऐतिहासिक ठिकाणे पाहता येतात. त्याबरोबर नाथद्वाराचे श्रीनाथजींचे मंदिर आणि रणकपूरचे जैन मंदिर संकुल पाहता येते.

चितोडगड

उदयपूर हे राजस्थानातले महत्त्वाचे शहर आहे. याला तलावांचे शहर असेही म्हणतात. सिटी पॅलेस, जगदीश्वर मंदिर, पिचोला लेक, फतेह सागर लेक ही उदयपूर शहरातली महत्त्वाची ठिकाणे एका दिवसात पाहून होतात. उदयपूर पाहून झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी चितोडगड पाहण्यासाठी सकाळीच निघावे. उदयपूरहून चितोडगड १०९ किमीवर आहे. ट्रेन, बस किंवा खासगी गाडीने चितोडगडला जाता येते. चितोडगड किल्ला प्रचंड मोठा आहे. संपूर्ण किल्ला पाहायचा असेल तर किल्ल्याच्या आतमध्ये १३ किलोमीटर फिरावे लागते. त्यामुळे गाडी घेऊनच फिरणे योग्य ठरते. मेवाडच्या इतिहासात चितोडगड किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मेवाडच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या अनेक घटना या किल्ल्यात घडल्या. अल्लाउद्दीन खिलजीच्या हाती सापडू नये, यासाठी राणी पद्मिनीने केलेल्या जोहारची कथा सगळ्यांनाच ऐकून माहिती आहे. पण या किल्ल्यावर एकूण तीन वेळा जोहार झाले आहेत. पन्नादाई या राजा उदयसिंहच्या दाईने स्वत:च्या मुलाचा बळी देऊन भावी राजाला म्हणजे उदयसिंहाला याच किल्ल्यातून वाचवून कुंभलगडावर नेऊन ठेवले होते. या उदयसिंहाच्या पुत्राने म्हणजेच राणा प्रतापने अकबराशी लढा देऊन इतिहास घडवला. चितोडगड परत जिंकून घेता आला नाही, हे शल्य उराशी बाळगून राणा प्रतापने प्राण सोडले होते. असा हा चितोडगड नीट पाहण्यासाठी अर्धा दिवस लागतो. मदानी भागात आडवा पसरलेला चितोडगडचा एकुलता एक डोंगर दूरवरूनच नजरेस पडतो. नसíगक संरक्षण फारसे नसल्यामुळे किल्ल्याला एकामागोमाग एक सात दरवाजे आहेत. दुहेरी तटबंदी आहे. या दरवाजांना पोल म्हणतात. पाडन पोल, भरव पोल, हनुमान पोल, गणेश पोल, लक्ष्मण पोल, राम पोल ही सात दारे पार करून किल्ल्यावर पोहोचल्यावर अनेक सुंदर मंदिरे, महाल, विजयस्तंभ, कीर्तिस्तंभ हे मनोरे यांच्या साहाय्याने किल्ला आपल्यासमोर उलगडला जातो.

15-lp-ranapratap

चंद्रगुप्त मौर्याचा नातू अशोक उज्जैनचा प्रशासक होता, त्याच्या क्षेत्रात चितोड येत असे. अशोकाच्या काळात ग्रीकांनी पश्चिम भारतावर आक्रमण केले, त्या वेळी चितोड शकांच्या आधिपत्याखाली गेले. जवळजवळ तीन शतके चितोड शकांकडे होता. त्यानंतर आलेल्या गुलोहितांनी हा भाग जिंकून घेतला. त्यांनी स्वत:चे संवत सुरू केले, नाणी पाडली. पाचव्या शतकापासून आठव्या शतकापर्यंत गुलोहित घराण्याच्या ताब्यात हा गड होता. इसवीसन ७३५ मध्ये मुहमद बीन कासिमने चितोडवर आक्रमण केले, त्या वेळी बाप्पा रावळ यांनी त्याला पळवून लावले आणि गुहील राजा मानमौर्यापासून चितोड हिरावून घेतला. बाप्पांनी काबूल, कंधाहार, इराण, उजबेकिस्तान येथील राजांवर विजय मिळवला. शिवपूजक असलेले बाप्पा रावळ यांचे एकिलगजी हे आराध्य दैवत होते. एकिलगजी हे राजे आणि आपण त्याचे दिवाण असे ते मानत असत. बाप्पा रावळ आणि त्याच्या वंशजांनी पुढील काळात परकीय आक्रमकांविरुद्ध कायम लढा दिला. बाप्पा रावळाचा वंश पुढील काळात भारतभर पसरला. बाराव्या शतकात राणा कर्णसिंहानंतर रावळ घराण्याचे दोन भाग झाले. त्याच्या दोन पुत्रांपासून रावळ घराणे आणि सिसोदिया घराणे अशा दोन शाखा तयार झाल्या. छत्रपती शिवाजी महाराज हे याच सिसोदिया वंशाचे होते.  तेराव्या शतकात राणा रावक सिंह यांचा पुत्र कुंभकर्ण हा नेपाळला गेला. नेपाळच्या राजवंशाचा हा मुळ पुरुष आहे असे मानले जाते.

किल्ल्यावरील मंदिरे, फतेह प्रकाश महाल, राणा कुंभ महाल पाहत आपण मीरा मंदिरापाशी पोहोचतो. अप्रतिम कोरीवकाम असलेले कुंभशाम मंदिर भव्य आहे. मंदिरावर आतील आणि बाहेरील बाजूंनी दशावतारातील मूर्ती आहेत. मंदिराच्या आवारात मीराबाईचे मंदिर आहे. मीराबाई ही जोधपूरची राजकन्या होती. तिचा विवाह राणा संगाचा ज्येष्ठ पुत्र भोजराज याच्याशी झाला होता. मीरा मंदिराच्या बाजूला विजयस्तंभ आहे. चितोडगडावरील हा विजयस्तंभ दूरवरूनही आपल्या नजरेस पडतो. इसवी सन १४४८ मध्ये राणा कुंभाने माळव्याचा सुभेदार मुहम्मद शहा खिलजी याचा पराभव केला. या विजयाप्रीत्यर्थ हा १२२ फूट उंच आणि ३० फूट रुंद विजयस्तंभ उभारण्यात आला. त्यावर आत आणि बाहेर दशावतार, रामायण, महाभारतातील प्रसंग दाखवणाऱ्या अनेक मूर्ती कोरलेल्या आहेत. या विजयस्तंभाच्या बाजूला जी मोकळी जागा आहे तिला जोहार स्थळ म्हणतात. चितोडगडावर तीन जोहार झालेले आहेत. इसवी सन १३०२ मध्ये चितोडवर अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण केले. किल्ला शत्रूच्या ताब्यात जाण्याची शक्यता निर्माण झाल्यावर राजा रतनसिंहाची पत्नी राणी पद्मिनीसह दुर्गातल्या स्त्रियांनी जोहार केला आणि रतनसिंहाने केसरीया करून ??? प्राणार्पण केले. ‘गढो में गढ चितोडगढ बाकी सब गढीया, राणी मे राणी पद्मिनी महाराणी बाकी सब रणया’ असे इथे म्हटले जाते. इसवी सन १५३५ मध्ये बहादुरशहाने चितोडगडावर आक्रमण केले तेव्हा राणी कर्णावतीने गडावरील स्त्रियांसह जोहार केला. इसवी सन १५६७ मध्ये अकबराने चितोडगडावर हल्ला केला तेव्हा गडावरील स्त्रियांनी जोहार केला होता. विजयस्तंभाजवळ असलेले जोहार स्थान पाहून गलबलून येते.

चितोडगडावर राणी पद्मिनीचा पाण्यातील महाल आहे. त्याच्या पायऱ्यांवर बसलेल्या राणी पद्मिनीचे दर्शन तलावाच्या काठावर असलेल्या महालातील आरशातून अल्लाउद्दीन खिलजी याला झाले होते. आजही या ठिकाणी महालात आरसे लावलेले आहेत. त्यातुन राणी पद्मिनीच्या तलावातील महालाच्या पायऱ्या दिसतात. गडावर ठिकठिकाणी पाण्याचे तलाव आहेत. राजस्थानसारख्या कमी पावसाच्या प्रदेशात गडावरील वस्तीला पाणी पुरावे यासाठी गडावर तलाव, कुंड खोदलेले होते. गडावरील दुसरा मनोरा म्हणजे कीर्तिस्तंभ. हा ७५ फूट उंच आहे. त्यावरही अप्रतिम कोरीव काम असून चारही बाजूला भगवान आदिनाथाच्या मूर्ती आहेत. या जैन स्तंभाच्या बाजूला जैन मंदिर आहे. किल्ल्यावर फतेह प्रकाश पॅलेसजवळ असलेले सतबीस देवी हे बाराव्या दगडात बांधलेले जैन मंदिर शिल्पकलेचा अजोड नमुना आहे. या तसंच रणकपूरच्या जैन मंदिरात अनेक साम्यस्थळे आहेत.

16-lp-ranakpur-jain-mandir

दिवसभर किल्ला पाहून झाल्यावर चितोडगड किल्ल्याखाली असलेल्या हॉटेलात पोटपूजा करून १५ किमीवरील सावरिया गाठावे. येथे श्रीकृष्णाचे काळ्या पाषाणातील मंदिर आहे. मंदिर पाहून उदयपूरमध्ये शिरतानाच आहार/अहाड म्युझियम दिसते. या ठिकाणी धुळाकोट नावाची टेकडी होती तिथे पुरातत्त्व खात्याने उत्खनन केल्यावर अंदाजे चार हजार वर्षांपूर्वी या ठिकाणी असलेल्या वस्तीचे (तांबावती नगरी) अवशेष मिळाले. त्या काळी जी संस्कृती नांदत होती ती आता आहार/अहाड सभ्यता या नावाने ओळखली जाते. या ठिकाणी  उत्खननात सापडलेल्या ताम्रपाषाण युगातील दैनंदिन वापराच्या वस्तू, लघू अश्म अस्त्रे (microliths), विविध भांडी, चुली, तांब्याच्या कुऱ्हाडी, मासेमारीचे गळ, तसंच इतिहासपूर्व आणि ऐतिहासिक काळातील मूर्ती यांचे पुरातत्त्व विभागाने या ठिकाणी कायम स्वरूपी प्रदर्शन मांडलेले आहे. संग्रहालयाच्या मागे धुळकोट ही टेकडी आहे. संग्रहालयाच्या सुरक्षारक्षकांना विनंती केल्यास ते कुलूपबंद असलेली ही उत्खननाची जागा पाहू देतात. येथे घरांच्या िभती, सोक पिट इत्यादी गोष्टी पाहता येतात.

अशा प्रकारे पहिला संपूर्ण दिवस इतिहासाच्या सान्निध्यात घालवल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी हल्दीघाटी, नाथद्वारा आणि कुंभलगडासाठी निघावे. ही तीनही ठिकाणे एकाच दिवसात पाहायची असल्याने गाडी करणे आवश्यक आहे. रणकपूरचे जैन मंदिरही पाहायचे असल्यास अजून एक दिवस लागतो. त्यासाठी कुंभलगड येथे मुक्काम करावा लागतो. आपल्या लोणावळा- खंडाळा सारखे कुंभलगड हे उदयपूरच्या लोकांचे थंड हवेचे ठिकाण आहे. त्यामुळे येथे अनेक हॉटेल्स आहेत. उदयपूरहून पुढे जोधपूरला जायचे असल्यास दुसऱ्या दिवशी रणकपूर पाहून राणी या गावामाग्रे चार तासांत जोधपूरला जाता येते.

हल्दीघाटी, चेतक स्मारक

हल्दीघाटी येथे १८ जून १५७६ रोजी राणा प्रताप आणि अकबरच्या सन्यात (जयपूरचा राजपुत्र मानसिंह याच्या नेतृत्वाखाली) एका दिवसाचे घनघोर युद्ध झाले. हे युद्ध हल्दीघाटीचे युद्ध म्हणून प्रसिद्ध असले तरी ते युद्ध हल्दीघाटाच्या जवळ असणाऱ्या खणमोर गावाजवळील मदानावर झाले. या युद्धात १८ हजार जणांचा मृत्यू झाला. त्या वेळी तिथे पडलेल्या पावसामुळे तेथे रक्ताचे तळे तयार झाले. तो भाग रक्ततलाई या नावाने ओळखला जातो. तिथे युद्धात कामी आलेल्या सनिकांचे स्मारक बनवलेले आहे. खमणोर गावाजवळ मानसिंहाचा तळ होता. तो भाग शाही बगीचा या नावाने ओळखला जातो. या ठिकाणी सुंदर बाग बनवलेली आहे. दिवस मावळताना युद्धाचे पारडे फिरल्याने राणा प्रताप आपल्या जखमी चेतक घोडय़ावरून हल्दीघाटीत आला. तेथे पावसामुळे वाहणारा ओढा ओलांडताना अतिश्रमाने चेतक घोडय़ाचा मृत्यू झाला. ज्या ठिकाणी चेतक घोडय़ाने प्राण सोडला तेथे राणा प्रताप यांनी चेतक स्मारक आणि शिवमंदिर उभारले आहे. उदयपूरपासून ५० किमीवर चेतक स्मारक आणि हल्दीघाटी संग्रहालय आहे. चेतक स्मारकात छत्री आणि त्यात असलेली घोडेगळ पाहता येते. हा परिसर सुंदर ठेवलेला आहे. चेतक स्मारकाच्या जवळ डॉ. श्रीमाली या माणसाने आयुष्यभर खपून, स्वत:चा पसा खर्च करून, देणग्या मिळवून हल्दीघाटी संग्रहालय उभारले आहे. त्यात  असलेल्या मिनी थिएटरमध्ये हल्दीघाटीच्या लढाईवर दोन ध्वनिचित्रफिती दाखवण्यात येतात. चित्रफिती पाहून झाल्यावर एका

गुहे-सदृश भागातून आपल्याला पुढे नेत प्रतिकृतींच्या द्वारे राणा प्रतापांच्या आयुष्यातले महत्त्वाचे प्रसंग, चितोडगड आणि कुंभलगड या किल्ल्यांची माहिती दिली जाते. त्याला निवेदनाची आणि छायाप्रकाशाची जोड देऊन प्रसंग उठावदार केले आहेत.

एके काळी रक्ताने लाल झालेली हल्दीघाटी आजकाल गुलाबाच्या रंगाने रंगली आहे. या भागात मोठय़ा प्रमाणावर गुलाबाची शेती होते. हे गुलाब निर्यात होतातच पण गुलाबापासून बनवलेल्या गुलकंद, गुलाबपाणी इत्यादी वस्तू हल्दीघाटीत सगळीकडे तसेच म्युझियममध्ये विकत मिळतात. हल्दीघाटी म्युझियमच्या मागच्या बाजूस एका टेकडीवर राणा प्रतापांचा भव्य पुतळा उभारलेला आहे. या ठिकाणाहून हल्दीघाटी परिसर दिसतो. त्याची दुर्गमता ध्यानात येते. हल्दीघाटी म्युझियमपासून नाथद्वारा २० किमीवर आहे. नाथद्वाराला जातांना रस्त्यात एक छोटासा घाट आणि िखड लागते. या िखडीतली माती हळदीसारख्या पिवळ्या रंगाची आहे. त्यामुळेच या घाटीला हल्दीघाटी या नावाने ओळखले जाते. या रस्त्याने पुढे जाताना शाही बगीचा, खमणोर आणि रक्त तलाई ही ठिकाणे लागतात. नाथद्वाराला श्रीनाथजींचे दर्शन घेऊन आणि पोटपूजा करून ५० किमीवरील कुंभलगड किल्ला गाठावा. किल्ल्याच्या थेट दारापर्यंत गाडी जाते.

कुंभलगड

भारतातल्या सर्वात जुन्या अरवली पर्वतरांगेतला सर्वात उंच किल्ला (तीन हजार ७६६ फूट) म्हणजे कुंभलगड. चीनच्या िभतीनंतर ४४ किलोमीटरची सर्वात लांब मानवनिर्मित तटबंदी म्हणजे कुंभलगड. कुंभलगडाची अशी अनेक वैशिष्टय़े आपण ऐकलेली असतात. त्यामुळे किल्ला पाहण्याची उत्सुकता वाढते. किल्ल्याचे भव्य बुरूज आणि दुहेरी तटबंदी आपले स्वागत करतात. कुंभलगडाचे प्राचीन काळी नाव होते मिच्छद्रगड. ८०० वर्षे अंधारात राहिलेल्या या किल्ल्याचे भाग्य राणा हमीरच्या काळात परत उदयाला आले. हमीरचे बालपण या किल्ल्यावर गेले होते. इसवीसन १४३३ मध्ये महाराणा कुंभाने हा किल्ला नव्याने बांधला. मेवाडमधल्या ८४ किल्ल्यांपकी ३२ किल्ले एकटय़ा राणा कुंभने बांधले आहेत. राणा कुंभने कुंभलगडाला आपली दुसरी राजधानी बनवले. इसवीसन १५९७ ला ज्येष्ठ शुक्ल तृतीयेला (९ मे १५४०) महाराणा प्रतापसिंहाचा जन्म कुंभलगडावर झाला. किल्ल्याच्या मुख्य डोंगरावर चढण्यासाठी व्यवस्थित मार्ग बनवलेला आहे. रामपोल, भरवपोल,  निंबूपोल, पगडापोल हे दरवाजे ओलांडत आपला बालेकिल्ल्यावर प्रवेश होतो. किल्ल्याला याशिवाय तटबंदीत आरेटपोल, हल्लापोल, हनुमानपोल इत्यादी दरवाजे आहेत. बालेकिल्ल्यावर राणाकुंभ महाल आहे. वरच्या बाजूला चढून गेल्यावर महाराणा प्रतापांचे जन्मस्थान आहे. किल्ल्याच्या सर्वोच्च भागात फतेह प्रकाश नावाचा राजवाडा आहे. या राजवाडय़ाच्या गच्चीवरून संपूर्ण किल्ला, तटबंदी आणि आजूबाजूचा दुर्गम परिसर दिसतो. किल्ल्यावर अनेक मंदिरे आहेत. किल्ला उतरून परत पहिल्या प्रवेशद्वारापाशी येऊन मंदिर पाहायला जाता येते. या ठिकाणी दररोज संध्याकाळी लाइट आणि साऊंड शो असतो. यात किल्ल्याचा आणि मेवाडचा इतिहास सांगितला जातो. लाइट आणि साउंड शो संपल्यावर आपल्याला उदयपूरला जाता येते किंवा कुंभलगडला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी रणकपूरचे जैन मंदिर पाहण्यासाठी जाता येते.

रणकपूरचे जैन मंदिर

कुंभलगड ते रणकपूर हे अंतर ३३ किमी आहे, पण घाटरस्ता असल्यामुळे पोहोचायला साधारणपणे दोन तास लागतात. रणकपूरचे जैन मंदिर पर्यटकांसाठी दुपारी बारा वाजता उघडते. घाट रस्त्याने निसर्गाची शोभा पाहात आपण रणकपूरच्या सूर्यमंदिरापाशी पोहोचतो. रणकपूरच्या जैन मंदिर संकुलाबाहेर हे मंदिर आहे. मंदिरावर अप्रतिम कोरीवकाम आहे. या मंदिराच्या बाहेरच्या बाजूस गजपट्टीबरोबर अशवपट्टीही आहे. सूर्याच्या रथाचे घोडे यावर कोरलेले आहेत. सूर्यमंदिर पाहिल्यावर आपली उत्सुकता वाढलेली असते. तशात हिरव्यागार डोंगराच्या पाश्र्वभूमीवर भव्य मंदिर आणि अनेक कळसांची रांग दिसायला लागते. मेवाडचा राजा कुंभ याच्या प्रधान संघवी धारनाथ पोरवाल याने १५ व्या शतकात हे सुंदर जैन मंदिर बांधले. अरवली पर्वत रांगेत मघई नदीकाठी असलेले हे जैन मंदिर म्हणजे संगमरवराला पडलेले अप्रतिम स्वप्न आहे. या मंदिराच्या गर्भगृहाला चार प्रवेशद्वारे असून या मंदिरात भगवान आदिनाथांच्या चार मूर्ती आहेत. त्यामुळे मंदिराला चतुर्मुख मंदिर या नावाने ओळखले जाते. याशिवाय मंदिरात सर्व र्तीथकरांच्या मूर्ती आहेत. मंदिराला मुख्य कळस आणि इतर ७६ छोटे कळस आहेत. मंदिराच्या आतल्या बाजूला संगमरवरावर जे कोरीवकाम केले आहे, त्याला तोड नाही. ८४ कोरीव खांब, चार महामंडप, २० रंगमंडप यांच्या छतावर आतल्या बाजूने केलेले कोरीवकाम नाजूक आणि सुंदर आहे. रणकपूरचे मंदिर कलाकुसरीत ताजमहालापेक्षा कांकणभर सरसच आहे. मुख्य मंदिराबरोबर या ठिकाणी पाश्र्वनाथांचे मंदिर आहे. मंदिर पाहून आपण १७० किमीवरील जोधपूर गाठू शकता किंवा १६० किमीवरील उदयपूरला परत येऊ शकता.

चार दिवसांची ही सहल आपल्याला राजस्थानचे एक वेगळे रूप दाखवते. या परिसरात फिरल्यावर अरवली पर्वतरांगा, त्यातील निबिड अरण्ये यांच्या साहाय्याने महाराणा प्रताप यांनी कशा प्रकारे अकबराच्या बलाढय़ सन्याशी आयुष्यभर सामना केला, हल्दीघाटीचे युद्ध लढले याची आपल्याला कल्पना येते आणि त्यांच्याबद्दलचा आदर दुणावतो.

जाण्यासाठी – उदयपूर हे शहर रस्ता, रेल्वे आणि हवाईमार्गाने देशातील सर्व शहरांशी जोडलेले आहे. उदयपूरला राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था आहे. उदयपूरला राहून चार दिवसात अशा प्रकारे कार्यक्रम बनवता येईल.

दिवस एक – उदयपूर दर्शन, मुक्काम उदयपूर
दिवस दोन – उदयपूर- चितोडगड -सावरिया – आहार/अहाड म्युझियम – उदयपूर (मुक्काम उदयपूर)
दिवस तीन :- उदयपूर- हल्दीघाटी- नाथद्वारा- कुंभलगड  (मुक्काम कुंभलगड)
दिवस चार :- कुंभलगड – रणकपूर – उदयपूर किंवा जोधपूरला मुक्काम
अमित सामंत – response.lokprabha@expressindia.com