निशांत सरवणकर, विकास महाडिक, सतीश कामत, जयेश सामंत, अविनाश पाटील, एजाज हुसेन मुजावर, दयानंद लिपारे, हर्षद कशाळकर, अविष्कार देशमुख वाढत्या शहरीकरणामुळे जागांचे दर गगनाला भिडलेले असतानाच ८ नोव्हेंबर रोजी नोटांबदी आली आणि तिचा सगळ्याच क्षेत्रांवर परिणाम झाला. नोटांबदीमुळे जागांचे चढे दर खाली उतरतील असा या क्षेत्रातल्या जाणकारांचा आशावाद होता. प्रत्यक्षात काय झालं, सध्या राज्यभरात बांधकाम क्षेत्रात काय चाललं आहे, याचा आमच्या राज्यभरातील प्रतिनिधींनी घेतलेला आढावा- नैसर्गिक विकासाच्या टप्प्यावर येऊन ठेपलेल्या सोलापुरात नजीकच्या काळात पर्यटन व वैद्यकीय उद्योगासह इतर पूरक विकासाचा विचार करता येथे रिअल इस्टेट उद्योगाला मोठा वाव आहे. पारंपरिक सोलापुरी चादर, टॉवेल, विडी उत्पादनासह कालानुरूप बदलानुसार नव्याने वाटचाल करणाऱ्या सोलापूर शहराची लवकरच ‘स्मार्ट सिटी’ म्हणून ओळख होणार आहे. त्याची सिद्धता होण्यासाठी सोलापूरची पावले पडत आहेत. त्याचा विचार करता या शहरात स्थावर मालमत्ता खरेदी करणे हे जास्त हितावह ठरणार आहे. मुंबई-हैदराबाद-बंगळुरू-चेन्नई अशा महानगरांना जोडणाऱ्या सोलापुरातून रेल्वे आणि रस्त्यांचे आधुनिक जाळे वाढले आहे. विशेषत: सोलापूर-पुणे या दोन शहरांचे अंतर इतके कमी झाले आहे की, नजीकच्या काळात ही दोन्ही शहरे जुळी शहरे म्हणून एकमेकांना जोडली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पाश्र्वभूमीवर सोलापूरचा साधला जाऊ शकणारा विकास शुद्ध नैसर्गिक स्वरूपाचा असेल असे वाटते. त्यामुळे साहजिकच या शहरात बांधकाम व्यवसायाला चालना मिळू लागली आहे. गेल्या नोव्हेंबर २०१६ मध्ये मोदी सरकारने नोटाबंदी लादून निश्चलनीकरणाचे धोरण आखल्यानंतर घरांच्या किमती स्वस्त होतील, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. काही अंशी त्यात तथ्य होते खरे, परंतु नोटाबंदीनंतर घरे स्वस्त होतील, हा सार्वत्रिक समज आता दूर होतो आहे. कारण शहराच्या नव्या विकास आराखडय़ातील तरतुदीनुसार आणि रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅण्ड डेव्हलपमेंट अॅक्ट २०१६ (रेरा) या येऊ घातलेल्या कायद्यातील तरतुदी पाहता पुढील काळातही घरांच्या किमती वाढणारच आहेत. त्यामुळे घरे स्वस्त होतील, हा समज दूर केला पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या पन्नास-साठ वर्षांत सोलापूर शहरातील घरांचे, जागांचे दर कधीच उतरले नाहीत. बँकांतील ठेवी, सोने यांच्या तुलनेत गुंतवणुकीसाठी सर्वात जास्त परतावा देणारा हा पर्याय ठरला आहे. येत्या वर्ष-दोन वर्षांत घरांच्या, खुल्या भूखंडांच्या किमती २० ते २५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता जास्त आहे. सुमारे १८० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या सोलापूर शहरात आजमितीला सुमारे तीनशे गृहप्रकल्प उभारण्यात येत आहेत. यात रेल्वे स्थानकाजवळील पूर्वीच्या लक्ष्मी-विष्णू कापड गिरणीच्या जागेवर गणेश रामचंद्र आपटे ग्रुपने हाती घेतलेला ‘इंद्रधनू’ गृहप्रकल्प हा सोलापुरातील बांधकाम व्यवसायात मैलाचा दगड ठरावा. सोलापुरात प्रथमच चौदा मजली निवासी संकुलांची उभारणी वैशिष्टय़पूर्ण अशीच आहे. त्यापुढे सलगर वस्ती, रामवाडी, डोणगाव रोड, नवीन आरटीओ कार्यालयाच्या पुढचा भाग अशा बहुतांशी परिसरात काल-परवापर्यंत रात्री बाहेरचा माणूस जाण्यास धजावयाचा. कारण हा सारा माजी गुन्हेगारांची वसाहत असलेला परिसर. परंतु आता सारेच बदलत चालले आहे. बंगले, ब्लॉक, अपार्टमेंट, खुले भूखंड अशा रिअल इस्टेट व्यवसायात ‘अच्छे दिन’ येत आहेत. सोरेगाव, हत्तूर, होटगी रोड, मजरेवाडी या भागाला चांगलेच महत्त्व आले असताना दुसरीकडे मंगळवेढा रोड, पुणे रोडवरील बाळे, केगाव, बार्शी रस्त्यावरील भोगाव, कारंबा, गुळवंची, तुळजापूर रस्त्यावर तळे हिप्परगे, उळे, तर हैदराबाद महामार्गावरील शेळगी, दहिटणे, मुळेगाव, दोड्डी, बोरामणी, तांदूळवाडी यांसारख्या भागात रिअल इस्टेटचा व्यवसाय वधारला आहे. खुल्या भूखंडांसह निवासी बांधकामांच्या व्यवसायाला जोर आल्याचे दिसून येते. शहराच्या गावठाण भागात उत्तर कसबा, दक्षिण कसबा, शुक्रवार पेठ या भागात जुने वाडे मोठय़ा प्रमाणात इतिहासजमा झाले असून त्यात उत्तरोत्तर भरच पडत आहे. दक्षिण कसबा म्हणजे सोलापुरातील ‘सदाशिव पेठ’ समजला जाणारा परिसर. येथे आता काही अपवाद वगळता जुने वाडेच शिल्लक राहिले नाहीत. मंगळवार पेठ, चाटी गल्ली, साखर पेठ, गुरुवार पेठ या भागात व्यापारसंकुलांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. सात रस्ता परिसर तर सोलापूरचा जणू ‘मलबार हिल’ मानला जातो. या ठिकाणी जागांचे दर तेवढय़ाच वाढलेल्या प्रमाणात उपलब्ध आहेत. जुळे सोलापुरातही हीच स्थिती दिसून येते. आपल्या स्वप्नातील घर किंवा भूखंड खरेदी करताना ग्राहकांनी बांधकाम व्यावसायिकांबाबत चोखंदळ असणे गरजेचे आहे. बांधकाम व्यावसायिकाने यापूर्वी पूर्ण केलेले गृहप्रकल्प, बांधकाम करताना वापरलेले साहित्य आणि मुख्य म्हणजे ग्राहकांना घराचा ताबा ठरलेल्या मुदतीत देतो का, या बाबींचा अभ्यास करून खरेदी व्यवहार केले म्हणजे नंतर मन:स्ताप होणार नाही. सोलापुरात स्वप्नातील घर खरेदी करण्याची योग्य वेळ आता येऊन ठेपली आहे. शैक्षणिक, औद्योगिक, व्यावसायिक, पर्यटन अशा जवळपास सर्वच क्षेत्रांत या शहराची भरभराट होण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण आहे. या जिल्हय़ात तब्बल ३८ साखर कारखाने आहेत. देशात सर्वाधिक उत्पादित होणारी साखर आणि उसाची लागवड याच जिल्हय़ात होते. नजीकच्या काळात सोलापूर शहराभोवती एकरूख उपसा सिंचन योजना कार्यान्वित होणार असून त्यामुळे हा परिसर हिरवाईने नटणार आहे. ही एकूणच बलस्थाने विचारात घेता ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या मुलांना शिक्षणासाठी सोलापुरात ठेवताना घरे खरेदी करण्यासाठी रस दाखवितात. सध्या बांधकाम व्यवसाय क्षेत्रात ग्रामीण भागातील बागायतदार शेतकरी हा ग्राहक समजला जातो. अशा ग्राहकांमध्ये आणखी भर पडू शकेल, अशी स्थिती दिसून येते. एजाजहुसेन मुजावर - response.lokprabha@expressindia.com