हॅलो मॅम,
मी २२ वर्षांचा आहे आणि ‘ती’ २० वर्षांची आहे. एका वर्षांपूर्वी आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. तिनं मला विचारलं होतं आणि मीदेखील थोडा वेळ घेऊन ‘हो’ म्हणालो होतो. पण आता वर्षांनंतर आमचं ब्रेक-अप झालंय. म्हणजे ती म्हणाली की, तिला आता या रिलेशनशिपमध्ये काहीच इंटरेस्ट नाहीय. मला तिनं हे सांगितलं तेव्हा खरंच धक्का बसला. कारण मला वाटत होतं, सगळं व्यवस्थित सुरू आहे. अ‍ॅक्च्युअली, तिच्या मते मी तिच्याशी नीट वागलो नाही, रूडपणे बोललो. मी थोडं फार तसं वागलो, मला माहितीय. माझी चूक मी अ‍ॅक्सेप्ट केली आणि पुन्हा तसं नाही वागणार असंही तिला सांगितलं. आपण दोघांनी मिळून हे रिलेशन वर्कआऊट केलं पाहिजे, असं तिला म्हणालो. पण ती परत आली नाही. नंतर माझ्या लक्षात आलं की, तिनं यापूर्वीही काही वेळा मला समजावून सांगायचा प्रयत्न केला होता. पण मला तेव्हा त्यातला सीरियसनेस कळला नाही. खरं तर आमचं दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम आहे. दोघांच्या घरीही माहितीय आणि त्यांचाही याला विरोध नाही. पण आता तिलाच आमचं हे रिलेशन नकोय. ती आता माझे फोनही घेत नाही. मी काय करू? ती परत येईल का?
संदीप

हाय संदीप,
तुझ्या पत्रातली पुन:पुन्हा जाणवतेय ती एक पश्चात्तापाची भावना. ‘आपलं वागणं तिला चुकीचं वाटत होतं, ती ते सांगायचा प्रयत्न करत होती, पण त्यावेळी त्याची तीव्रता आपल्या लक्षात आली नाही.’
स्त्री आणि पुरुषांमध्ये काही फंडामेंटल फरक असतात आणि हे फक्त दिसण्याच्या बाबतीत नाही बरं का. जॉन ग्रे नावाच्या अमेरिकन लेखकाचं एक पुस्तक आहे- ‘मेन आर फ्रॉम मार्स, वुमेन आर फ्रॉम व्हिनस’. त्याचं कन्क्लुजन असं की स्त्रिया आणि पुरुष यांच्या स्वभावात, इमोशन्समध्ये इतका फरक असतो की, जणू ते दोन वेगवेगळ्या प्लॅनेट्सवरून आले आहेत असं वाटावं. जिथे मुली इमोशनल सपोर्ट एक्स्पेक्ट करतात तिथे मुलं ताबडतोब काही तरी प्रॅक्टिकल सोल्युशन काढून हातात ठेवतात. जेव्हा एखादी मुलगी काही तरी तक्रार करत असते तेव्हा ती त्याबद्दल आपल्याला ब्लेम करतेय असं मुलांना वाटतं, पण तिला फक्त शेअर करायच्या असतात तिच्या चिंता. मग मुलांना वाटतं या मुलींचं काही कळत नाही बुवा आपल्याला.
त्यातून आपली पडली पुरुषप्रधान संस्कृती. त्यामुळे मुळात काही डिमांड्स करण्याचा मुलींना हक्क आहे याची मुलांना जाणीव नसते. लहानपणापासून घरामध्ये आजोबांचं, वडिलांचं वर्चस्व पाहिलेलं, अनुभवलेलं असतं. त्याचबरोबर आजी, आई, आत्या अशा मंडळींना सतत घाबरून राहिलेलं, दुय्यम वागणूक मिळालेली दिसते. जगात असंच असतं आणि आपण असंच वागायचं असतं मुलींशी असा तुम्हा मुलांचा गैरसमज तेव्हापासून व्हायला लागतो. पण याचा डिसअ‍ॅडव्हान्टेज असा, की मुलांना सतत ‘ऑन देअर टोज’ राहायला लागतं. त्यांनी स्ट्राँग, कणखर, न रडणारं असायला हवं. सगळ्यांची काळजी घ्यायला हवी, कधी कमकुवतपणा दाखवता कामा नये, अशा जबाबदाऱ्या त्यांना कम्पल्सरी घ्यायला लागतात. त्यातून आपल्या भावना कोंडून ठेवायची सवय लागते. इमोशन्स म्हणजे बायकी असा विचार इतका घट्ट असतो मनात, की मुलं हळूहळू त्या नाकारायला लागतात. पण इमोशन्स प्रत्येक व्यक्तीमध्ये, मग ती स्त्री असो वा पुरुष, नॅचरली असतातच. मग त्या नीट मॅनेज करायच्या की नाकारायच्या? बघ ना, ब्रेक-अपच्या वेळी तू खूप घाबरला होतास असं तू लिहिलंयस, तुला खरं तर खूप वाईटही वाटत असणार. पण तुझा रिस्पॉन्स होता रूडपणे वागण्याचा! असा प्रत्येक बाबतीत मुलं आक्रमक रिस्पॉन्स देतात. मुलींकडून नेहमी सेकंडरी भूमिकेची अपेक्षा ठेवतात. खरं सांगायचं तर गेली कित्येक शतकं ही पुरुषी वर्चस्वाची भावना आपल्या समाजात इतकी मुरली आहे, की ती सहजासहजी बदलणं अवघड आहे.
पण संदीप, गंमत अशी झालीये, की मुली मात्र या असमतोलाविषयी अवेअर झाल्यात. त्यांचे स्वत:च्या कमकुवतपणाविषयीचे गैरसमज दूर होतायत आणि पुरुषांकडून असणाऱ्या त्यांच्या अपेक्षा खूप बदलल्यात. अर्थात, याचा परिणाम म्हणजे मुलींमधला वाढता आत्मविश्वास, मुलांच्या मनामधली वाढती असुरक्षितता आणि त्यातून अपरिहार्यपणे उद्भवणारे संघर्ष, यातूनच अ‍ॅसिड फेकण्यासारख्या भीषण घटनाही घडतात. तुमच्या रिलेशनमधल्या या घडामोडी थोडय़ाफार तशाच आहेत नाही का?
पण संदीप, यात सगळी चूक तुझीच आहे असं मात्र समजू नकोस. आपलं वागणं मॉडीफाय करण्याची तुझी जेन्युइन इच्छा आहे, पण हे बदल करण्यासाठी तुला जबरदस्त प्रयत्न करायला लागतील हे विसरू नकोस. हे सारं तिच्यापर्यंत पोचवायला हवंय. तुम्हाला एखाद्या मेडिएटरची गरज आहे, जो तुमच्या दोघांचे व्ह्य़ूपॉइंट्स एकमेकांना समजावेल. इट माइट स्टिल बी अ स्टॉर्म इन द टी कप.
When men and women are able to respect and accept their differences, then love has a chance to bloom.

तरुणपणात निसर्गनियमाप्रमाणे प्रेमात पडायला होतंच. अर्थात ओघानं प्रेमभंगही आलाच. नवीन नाती, नवीन अभ्यासक्रम, नवीन जॉब आणि त्यांमधल्या गुंतागुंती. शरीराविषयी शंका, निर्णयांविषयी शंका असं खूप काही मनात सुरू असतं. खरं तर शंका खूप जेन्युईन असते पण ऐकणारा काय म्हणेल, हसेल की काय असं वाटतं. कुणाला विचारावं हेही कळत नाही. तुम्हाला वाटतंय असं काही? मग हा कॉलम आहे खास तुमच्यासाठी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांना वाट देण्यासाठी. इथे तुम्हाला वाटणाऱ्या शंकेला कुणी नाकं मुरडणार नाहीये की फालतू म्हणून त्या निकालात काढणार नाहीये. बिनधास्तपणे त्या शेअर करा. viva@expressindia.com या आयडीवर. सब्जेक्टलाईनमध्ये ओपन अप असं लिहायला विसरू नका.