स्वच्छता आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग. पण आपल्या देशात त्यासाठी लोकांना सांगावं लागतं की स्वच्छता राखा. विकसित देशांच्या इतर गोष्टींसोबत त्यांची शिस्त आणि सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेची सवय घेणं तितकंच गरजेचं. आता देशभरात स्वच्छता मोहीम ही एक प्रकारची चळवळ झाली असून त्यात तरुणांचा सहभाग दिसतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मधून गांधी जयंतीनिमित्त पुन्हा एकदा स्वच्छ भारत अभियानवर भर देऊन शक्य तितकी स्वच्छता करण्याचं आवाहन केलं. देशभरातून अनेक ग्रुप्स, संस्था यात सहभागी होतायत व त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचून त्यांना कार्यात सहभागी करून घेतायत. फेसबुक पेज आणि वेबसाइटच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपले काम पसरवत आहेत. सोशल मीडियावर गाजलेल्या आणि प्रत्यक्षात स्वच्छतेच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या अशाच काही तरुणाईच्या सोशल मीडिया फॉर सोशल कॉज या प्रकारच्या स्वच्छता चळवळींची ही दखल.. आपल्या देशातील नागरिकांच्या नावानं आणि देशी सिस्टीमच्या नावानं नुसते खडे फोडण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्यात आघाडी घेतलीय काही वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ‘द अग्ली इंडियन’ या ग्रुपनं. या नावाने फेसबुकवर क्रिएट झालेला एक ग्रुप बंगळुरूमध्ये कार्यरत आहे. ‘काम चालू- मूह बंद’ असं म्हणत या ग्रुपच्या सभासदांनी रस्त्यावर उतरून हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा वसा घेतलाय. द अग्ली इंडियन ही एक कल्पना आहे. आपण सगळे भारतीय घाणेरडे आहोत आणि आपण स्व:तला स्वत:पासून वाचवायला हवं असं या ग्रुपचं म्हणणं आहे. अस्वच्छ सार्वजनिक ठिकाणं, रस्ते स्वच्छ करून तिथे रंगरंगोटी आणि तत्सम सुशोभीकरण ‘द अग्ली इंडियन’च्या माध्यमातून ते करत आहेत. यात सक्रिय सहभाग घेणारे तरुण आयटी आणि सेवा क्षेत्रात काम करणारी मंडळी आहेत. हे सगळं प्रसिद्धीपासून दूर राहून त्यांना करायचं आहे. द अग्ली इंडियन्स प्रसिद्धीपासून दूर आहेत. निनावी राहून आणि कोणतेही श्रेय न घेता एक जबाबदारी म्हणून हे कार्य निरपेक्षपणे पार पाडत आहेत. संपूर्ण बंगलोर शहराच्या स्वच्छतेचा वसा जणू त्यांनी घेतलाय. बीबीसीनेसुद्धा त्यांच्या कार्याची दखल घेतलीये. फेसबुक पेजच्या माध्यमातून केलेल्या कामाचा व्हिडीयो आणि फोटोज त्यांनी अपलोड करून इतरांसमोर एक आदर्श प्रस्थापित केलाय. त्यांचे हे कार्य पाहून इतरांनी त्यात सहभाग घेतलाय. इंदिरानगर राईजिंग, दिल्ली, रांची असे त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन प्रकल्प केले जात आहेत. त्याचप्रमाणे छत्तीसगड रायपूरमध्ये ‘बंच ऑफ फूल्स’नी स्वच्छता मोहीम हाती घेतलीये. स्टे फूल, कीप क्लीनिंग हे उद्दिष्ट आहे. या त्यांच्या कार्यासाठी त्यांना पंतप्रधान मोदींच्या टीमकडून गौरवण्यात आले आहे. मेरठच्या ‘पहल एक प्रयास’ या सेवाभावी संस्थेकडूनसुद्धा अशाप्रकारची मोहीम हाती घेतली गेली आहेत. या संस्थेत श्रमदान करणाऱ्यांमध्ये डॉक्टर, इंजिनीअर यापासून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा सक्रिय सहभाग असतो. आपला परिसर हा कुणीतरी साफ करेल, यापेक्षा आपण त्यासाठी काम करणं केव्हाही चांगलंच नाही का? प्रत्येक शहरातून अशी स्वच्छतेची सुरुवात देशाला स्वच्छता मोहिमेत नक्कीच यश देईल. छायाचित्र - द अग्ली इंडियन फेसबुक पेज कोमल आचरेकर - viva.loksatta@gmail.com