मराठी सिनेमातली फॅशन फारशी फॉलो होत नसली, तरी मराठी-हिंदी मालिकांमधली स्टाइल मात्र प्रेक्षक लवकर उचलून धरताना दिसताहेत. मालिकेचा विषय ठरवताना ‘टीआरपी‘ची गणितं आधी आखली जातात. टीआरपी अर्थातच प्रेक्षकांच्या आवडीनिवडीवर अवलंबून असतो. अशीच गणितं आखावी लागतात ती मालिकेतल्या व्यक्तिरेखांची वेशभूषा ठरवताना.

‘ए.. आपल्या जान्हवीला बघितलंस का गं कुठे?’’

‘‘ही रुंजीपण बघ ना अजून कशी आली नाही ते..’’

‘‘काय मग आज आदित्य भेटला नाही वाटतं..’’

अहा.. या संवादांमधले जान्हवी, रुंजी कोणी वेगळेच आहेत. म्हणजे ही त्यांची खरी नावं नाहीत, तर काही मालिकेतल्या व्यक्तिरेखांची आहेत. मालिकेतल्या काही व्यक्तिरेखांच्या फॅशनचा सध्या इतका बोलबाला सुरू आहे की, तरुणाईमध्ये अशा अनेक जान्हवी, अस्मिता, आदित्य, रुंजी दिसतील. आता यंगिस्तानमध्ये ही फॅशन झळकतेय म्हटल्यावर चर्चा तर होणारच ना..!

प्रेक्षकांना आपलीशी वाटावी म्हणूनच चकचकीत, झगमगीत देखाव्यांवरून मालिका साधेपणाकडे वळल्या. ‘होणार सून मी ह्य़ा घरची’, ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘रुंजी’, ‘माझे मन तुझे झाले’, ‘अस्मिता’, ‘सपने सुहाने लडकपन के’, ‘ये है मोहब्बतें’, ‘बेइंतेहा’, ‘हम हैं ना’ या मालिकांमधली फॅशन सध्या प्रेक्षकांमध्ये हिट आहे. आजची तरुणाई ‘जो सिंपल है वो अच्छा है’ या फंडय़ावर फॅशन ठरवते. म्हणूनच हिंदूीतल्या काही चकचकीत मालिका नंतर साध्या-सिंपल झाल्या. ‘ये हे मोहब्बतें’मधल्या इशिताचे सुरुवातीचे पंजाबी ड्रेस आणि आताच्या साडय़ा या तरुणींमध्ये लोकप्रिय झाल्या आहेत. याच मालिकेतल्या तिच्या आईच्या साडय़ांनाही चांगली पसंती मिळाली आहे. खरं तर ‘बेइंतेहा’ या मालिकेच्या ‘दिसण्यात’ खूप झगमगाट आहे; पण आलियाच्या अनारकली पंजाबी ड्रेसच्या अनेक तरुणी चाहत्या झाल्या आहेत. अनारकलीची फॅशन तशी जुनी झाली; पण या मालिकेमुळे पुन्हा नव्याने ही फॅशन तरुणींमध्ये दिसते.

मालिका सुरू करताना त्याचा विषय प्रेक्षकांना आवडेल का, पचेल का, असा विचार मालिकेची टीम करत असते. हाच विचार आता व्यक्तिरेखांची वेशभूषा ठरवताना केला जातो. सर्वप्रथम व्यक्तिरेखेचा विचार केला जातोच; पण ‘प्रेक्षकांना आवडेल का’ हा प्रश्न डोक्यात कायमस्वरूपी घर करून राहतो. त्यामुळे वेशभूषाकारांवर व्यक्तिरेखा आणि प्रेक्षक अशा दोघांचा विचार करण्याची दुहेरी जबाबदारी असते. झी मराठीच्या ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ या मालिकेचे वेशभूषाकार संतोष गावडे सांगतात की, ‘‘कलाकाराची वेशभूषा ठरवताना त्या व्यक्तिरेखेची स्वभाववैशिष्टय़े, पाश्र्वभूमी, विचारसरणी याचा विचार केला जातो. त्यानंतर विचार येतो तो प्रेक्षकांचाच.’’ श्री मोठय़ा कंपनीचा मालक असला तरी त्याचं घरात ट्रॅक पँटवर वावरणं हे कोणत्याही तरुण मुलाला चटकन जवळचं वाटेल, तसंच जान्हवीच्या माहेरच्या माणसांचंही. संतोष पुढे सांगतात की, ‘‘मालिकांमधली फॅशन प्रेक्षक स्वीकारतील का, आत्मसात करतील का, अशा सगळ्या शक्यतांची पडताळणी केली जाते. प्रेक्षकांनी हे स्वीकारावं, ते फॉलो करावं, असा त्यामागचा हेतू असतो.’’

‘होणार सून..’मधलं जान्हवीचं मंगळसूत्र तर यंदा बाजारपेठेत सगळ्यात हिट होतं. ‘जुळून येती..’ ही मालिका म्हणजे तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनली आहे. मेघनाचे पंजाबी ड्रेस असो किंवा अर्चूचे साधे कुर्ता नि सलवार, दोन्हीला तितकीच पसंती. कुर्ता आणि सलवार घरात घालण्याची फॅशनही याच मालिकेतल्या मेघना आणि अर्चूमुळे घराघरांत पोहोचली. याआधी ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेत राधाने या फॅशनला सुरुवात केली होती. आदित्य तर तरुणींची जान. त्यामुळे तसं दिसायला हवं म्हणून प्रयत्न करणारे आपले तरुण दोस्तलोग कमी नाहीत. स्टार प्रवाहवर नुकतीच सुरू झालेली ‘रुंजी’ या मालिकेतली रुंजी ही ‘गर्ल नेक्स्ट डोअर’. तिचे जीन्स-टॉप, जॅकेट, हेअरस्टाइल यांचं अनुकरण होताना दिसतं. या मालिकेच्या वेशभूषाकार भक्ती तागडे सांगतात की, ‘‘वेशभूषा करताना सर्वप्रथम व्यक्तिरेखांचा विचार डोक्यात असतो; पण या विचारांमागे कुठे तरी प्रेक्षकांचाही पुसटसा विचार सतत सुरू असतोच. त्यांना आवडेल का, हा मुख्य प्रश्न असतो; पण व्यक्तिरेखांची वेशभूषा चांगली झाली, की प्रेक्षक ते नक्कीच उचलून धरतील आणि फॉलोही करतील, असा विचार असतोच. त्यामुळे प्रेक्षक महत्त्वाचे असतातच.’’

‘बालिका वधू’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘दिया और बाती हम’, ‘उतरन’ अशा काही चकचकीत मालिकांमधल्या नायिकांच्या भरजरी साडय़ा या प्रेक्षकांमध्ये सणासुदीला दिसून येतात. मग आनंदी स्टाइल साडी दाखवा, अक्षरासारखा घागरा हवाय, अशी वाक्यं ऐकायला मिळतात. विविध प्रकारचे वर्क केलेल्या साडय़ा एरवी तरुणींमध्ये दिसतात; पण, ‘दुर्वा’, ‘अस्मिता’ या मालिकांमधल्या वेगळ्या प्रकारच्या साडय़ा फॉलो केल्या जाऊ लागल्या. टीव्ही या प्रभावी माध्यमात दाखवल्या जाणाऱ्या गोष्टींचा प्रेक्षकांवर प्रभाव पडतो. सध्या प्रेक्षकांवर मालिकांमधल्या फॅशनचा प्रभाव पडतोय. साध्या दिसण्यापासून ते ग्लॅमरस दिसण्याची फॅशन प्रेक्षक मंडळी उचलतायत.

पूर्वी फॅशनच्या बाबतीत हिंदी मालिकांचा प्रभाव प्रेक्षकांवर व्हायचा. त्यांच्या भरजरी साडय़ा, दागिने, हेअरस्टाइल असं सगळं प्रेक्षक उचलून धरायचे. एकता कपूरच्या ‘के’ फॅक्टरीतल्या मालिकांनी तर कहरच केला होता. मग ती ‘क्यूं की साँस भी कभी बहू थी’मधल्या तुलसीची जरदोसी वर्कची साडी असेल किंवा ‘कहानी घर घर की’मधल्या पार्वतीचा सोज्वळ लुक. यात ‘कसोटी जिंदगी की’मधल्या कोमलिकाला विसरून चालणार नाही. तिच्या साडय़ा, बिंदी, नागमोडी टिकली असा तिचा अवतार आजही अनेकांच्या लक्षात राहील. अशी कित्येक ठळक उदाहरणं आजही आठवतात; पण काळ बदलला तसतसा हिंदी मालिकांचा हा ‘देखावा’ही बदलला. कालांतराने त्या वास्तवतेकडे झुकणाऱ्या वाटू लागल्या. ‘जस्सी जैसी कोई नहीं’, ‘अगले जनम मोहे बिटीयाही किजो’, ‘दिल मिल गये’, ‘इंडिया कॉलिंग’ अशा काही मालिका वास्तव दाखवू लागल्या. त्यामुळे प्रेक्षकांच्या जवळ जाणाऱ्या मालिकांमधून फॅशनही तशीच झळकू लागली. मग तुलसीची साडी, कोमलिकाच्या टिकल्या अशा फॅशनची जागा कॉलेज, ऑफिसला घालून जाता येतील अशा पंजाबी ड्रेस, साडीने घेतली. हाच ट्रेंड सध्या मालिकांमध्ये दिसतोय. हिंदी मालिकांमध्ये पूर्णपणे हा बदल झाला नसला तरी उल्लेख करावा अशी मालिकांमधली साधी फॅशन, मग ती नायिकेच्या घरात घालायच्या कपडय़ांची असो किंवा ऑफिसला जाताना घालणाऱ्या कपडय़ांची असो, ती स्वीकारली जाते. मराठी मालिका यामध्ये बाजी मारताना दिसतात. काही मोजक्या मालिका सोडल्या, तर इतर मालिकांमध्ये आजच्या तरुणाई, कुटुंब, ऑफिस संस्कृती या सगळ्यांचं दर्शन होताना दिसतं. प्रेक्षकांना जी गोष्ट अपील होते ती ते चटकन स्वीकारतात, हे त्यांच्या प्रतिसादावरून सिद्ध होतं.