उपास करणं आरोग्याच्या दृष्टीनं चांगलं. फक्त तो उपास योग्य पद्धतीनं करायला हवा, असं बहुतेक डाएटिशियन सांगतात. आपल्या सेलिब्रिटींना उपासाबद्दल काय वाटतं? सेलिब्रिटींचं ‘फास्टिंग फॉर फिटनेस.’

शृजा  प्रभुदेसाई
नियमितपणे न चुकता तेलकट-तुपकट-खारट पदार्थ टाळणे हाच खरा ‘फिटनेस मंत्र’ आहे. त्यासाठी कोणत्याही सणाची वाट पाहण्याची गरज नाही. मी हरतालिकेचा उपवास आवर्जून करते, त्या दिवशी फक्त फळे व दूध यांनाच प्राधान्य देते. अगदी खिचडीदेखील टाळते. काही वर्षांपूर्वी संपूर्ण श्रावण महिना केलेला उपवास मला फारच फळला. त्यामुळे वजनही कमी झाले व त्यामुळे थोडी सडपातळही झाले. कोणत्याही स्त्रीला असे असणे-दिसणे खूप आवडते. आणि म्हणूनच वाटते, फिटनेसचा मार्ग उपवासातून जात असावा. पण हा धार्मिक कारणास्तवचा उपवास झाला, नियमित फिट राहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा व्यायाम हाच एकमेव पर्याय आहे. अगदी अर्धा तास चालता आले तरी उत्तम. आषाढी एकादशीच्या दिवशीच्या रताळ्याची भाजी, वऱ्याचे तांदूळ व शेंगदाणा आमटी अशा उपवासाच्या पदार्थाचा फिटनेसवर फारसा परिणाम होत नाही.

नेहा हिंगे
मी ‘मिस इंडिया’चा मुकुट जिंकल्याने फिटनेसचे महत्त्व काय असते हे चांगलेच जाणून आहे. त्यासाठीच्या काही फेऱ्यांत फिटनेसची कसोटी असते. व्यायाम व खाण्या-पिण्याची पथ्ये हे फिटनेससाठी गरजेचे आहे. आज पटकन वजन वाढेल अशा खमंग-चुरचुरीत-टेस्टी पदार्थाची आजूबाजूला चलती असल्याने ते खाण्याचा मोह होऊ शकतो. मी मूळची इंदूरजवळच्या देवास येथील आहे. ‘लव्ह यू सोनिया’ या चित्रपटामुळे मी मुंबईत राहिले. अजून मला सणाच्या निमित्ताने उपवास करण्याची गरज भासली नाही. माझा कल अनेक गोष्टींचा भरभरून आनंद घेण्याचा आहे. देवासला कॉलेजमध्ये मी क्रिकेट संघाची कर्णधार होते. कॉलेजच्या अन्य उपक्रमांतही मी मनसोक्त सहभाग घ्यायचे. अशा आनंदाचा फिटनेससाठी नक्की उपयोग होतो.

सई लोकूर
मी वजन, फिटनेस व माझे दिसणे याबाबत कमालीची दक्ष आहे. चार वर्षांपूर्वी बेळगाववरून मुंबईत आले तेव्हा माझे वजन चक्क पंचाहत्तर किलो होते. मुंबईच्या धावत्या व स्पर्धात्मक जीवनशैलीचा विचार करता ते कमी व कसे करणार याची शंका होती. पण चित्रपटसृष्टीत टिच्चूनपणे टिकून राहण्यासाठी ‘स्वत:वर स्वत:च लक्ष देणे’ गरजेचे आहे, हे माझ्या लक्षात आले व मी अंजली मुखर्जी या डायटिशियनचा आहार व आरोग्य यावरचा सल्ला घेणे सुरू केले. व्यायामात मी योगा करते व दररोज सकाळी वरळी सी-फेसवर चालायला जाते. खाण्यात बाहेरचे शक्यतो खात नाही. ब्रेकफास्ट, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण याच्या माझ्या वेळा व खाणे ठरलेले आहे. हे सगळे सांभाळून मी वीस किलो वजन कमी केले, हा एक विक्रम ठरावा. या नियोजनात धार्मिक उपवास ते कधी, कसे व केव्हा करणार? बाहय़चित्रीकरण स्थळावरून आल्यावर नेहमीच वाढणारे दोन किलो वजन पटकन नियंत्रणात आणतेच. देवासाठी उपवास करणारे व तब्येतीसाठी उपवास करणारे असे दोन प्रकार आहेत. मी पौष्टिक खाऊन तब्येत जपणारी आहे. भरपूर सॅलड, ग्रीन टी, चणे-कुरमुरे अशा गोष्टींना माझ्या खाण्यात प्राधान्य आहे.

सोनाली कुलकर्णी
धार्मिक उपवास मी शक्यतो करीत नाही, तसे केल्याचा फिटनेससाठी काही फायदा होतो का वगैरेबाबत मी काहीच बोलू शकत नाही. पण कमी खाल्ले, उपाशी राहिले म्हणजे फिट राहता येते ही संकल्पनाच चुकीची आहे अथवा एखाद्या कलाकाराने एका भूमिकेसाठी फिटनेसची काळजी घेतली व ते त्याच्या कायम पथ्यावर पडले असे समजणेही चुकीचे आहे. योग्य आहार व योग्य व्यायाम यांचा समतोल ठेवल्याने तब्येत उत्तम राखता येते यावर माझा विश्वास आहे, आमच्या व्यवसायात बाहेरचे खाणे मोठय़ाच प्रमाणात होण्याची शक्यता असते. त्याचा तब्येतीवर परिणामही होऊ शकतो. त्यापेक्षा मी घरच्या साध्या जेवणाला जास्त पसंती देते. शाकाहारी जेवण व फळे यावर माझा भर असतो. आठवडय़ातून तीन दिवस व्यायाम करते. हे सगळे नियोजन एकूणच आयुष्य डोळ्यांसमोर ठेवून व्हावे. त्याची सुरुवात खूप लवकर केल्यास अगदी उत्तम.

योगिता दांडेकर
उपवास आणि व्यायाम यांचा योग्य समतोल ठेवल्याने फिटनेस सांभाळता येतो. उपवास करायचा आणि त्यात पटकन वजन वाढेल असे पॅटिस, खिचडी, बटाटा चिप्स वगैरे चमचमीत पदार्थ खावेत हे योग्य नव्हे. उपवास म्हणजे शारीरिक-मानसिक शांतता मिळवावी. ती फिटनेसला उपयोगी पडते व योग्य व्यायामाला पूरक म्हणून केळी, सफरचंद अशी पौष्टिक फळे खावीत. भरपूर पाणी पिणे हेदेखील गरजेचे आहे. मी रोज दीड तास व्यायामशाळेत असते व माझे शरीरसौंदर्य नृत्यातून घडले असल्याने ते टिकवण्याचा प्रयत्न करते. उकडलेल्या पालेभाज्या, अंडय़ातील पांढरा भाग या गोष्टी तब्येतीला उपयुक्त आहेत. मुंबईतील धावत्या जीवनशैलीत जनसामान्यांना फिटनेसचे हे मार्ग स्वीकारणे काहीसे अवघड आहे. पण त्यांनी प्रयत्न करावेत.