गावाला व्यक्तिमत्त्व देणाऱ्या, त्याचं वैशिष्टय़ जपणाऱ्या खाऊगल्ल्या आणि त्या निमित्ताने त्या गावा-शहरांची चवदार सफर या पाक्षिक सदरातून.. भारताच्या निसर्गरम्य दक्षिण किनारपट्टीचा विषय निघाला की, अनेकांच्या तोंडी एकच नाव ऐकायला मिळतं.. केरळ. निळाशार समुद्र, माडाच्या झाडांमधून जाणारी बॅकवॉटरमधली हाऊसबोट, चहाचे मळे, प्रेमळ माणसं आणि अर्थात केळीच्या पानात वाढलेले खाद्यपदार्थ. कोचीन आणि त्रिवेंद्रम ही मुख्य शहरं असली तरी आलेप्पी, मुन्नार, पेरियार अशा ठिकाणांना भेट दिल्याशिवाय आणि त्या ठिकाणच्या खाद्यपदार्थाची चव चाखल्याशिवाय या देवभूमीची सफर पूर्ण होत नाही. त्रिवेंद्रमच्या खाऊगल्लीची ही सफर केवळ उदाहरणार्थ एक. केरळची राजधानी तिरुवनंतपुरम अर्थात त्रिवेंद्रम. कोवालमचा नितांत सुंदर समुद्रकिनारा अनुभवण्यासाठी त्रिवेंद्रमला मुक्कामाला राहायलाच हवं. या राज्याला देवभूमी का म्हणतात ते इथल्या निळ्याशार समुद्राला आणि हिरव्यागार जंगलांकडे बघताना पटतं. त्रिवेंद्रमची हवा आपल्या कोकणासारखीच. पण खाद्यपदार्थातला नारळाचा सहभाग सोडला तर सगळंच वेगळं. त्रिवेंद्रम आणि आसपासच्या परिसरामध्ये ससे पाळले जातात. सहसा कुक्कुटपालन वगरे आपण ऐकलं असेल पण, केरळमध्ये ससेपालन केलं जातं. इथे सशाचं मटण आवडीनं खाल्लं जातं. त्रिवेंद्रमच्या खाण्यामध्ये आंबटाचं प्रमाण जास्त आहे. इथे चिंचेचा वापर मोठय़ा प्रमाणावर होतो. प्रवाशांची गर्दी आणि गजबजलेलं शहर हे त्रिवेंद्रमचं प्रथमदर्शन. त्रिवेंद्रममध्ये किंबहुना संपूर्ण केरळमध्येच शहाळ्याचं पाणी सर्वच ठिकाणी मिळतं, यात नवल नाहीच. इथे केळ्यांचेही विविध प्रकार मिळतात. आपण वेलची केळी म्हणतो ती छोटी पिवळीधम्मक केळी आणि लाल रंगाची केळी इथे आलेल्या खवय्यांचं आणि प्रवाशांचं लक्ष वेधतात. इथे मिळणारी लाल रंगाची केळी औषधी असल्याचंही म्हटलं जातं. त्रिवेंद्रममध्ये फिरत असताना शहाळ्याऐवजी ‘कोल्ड्रिंक’ची तहान लागल्यासारखं वाटलं तर नेहमीच्या एअरेटेड ड्रिंक्सऐवजी एक वेगळं पेय जरूर पिऊन पाहा. ‘शारजा’ नावाचं एक पेय या भागात बरंच प्रसिद्ध आहे. दूध, केळी, सुकामेवा असं सर्व काही अफलातून मिश्रण असलेलं हे एक पेय. इथे काही दुकानांमध्ये शारजाचे विविध फ्लेव्हर्सही मिळतात. त्रिवेंद्रममध्ये आणि केरळमधील इतर काही शहरांमध्ये ताजी फळं आणि त्या फळांचे ज्युस पिण्याला फार प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे इथे कोणत्याही दुकानामध्ये ताज्या फळांचा ज्युस तुम्ही पिऊ शकता. अननस, कोवळा नारळ, कैरी अशी ताजी फळं इथे खायला मिळतात. त्रिवेंद्रमची कॉफी आणि चहा चुकवू नये असाच. त्रिवेंद्रममधील चंद्रन चेत्तन टी स्टॉल हे असंच एक चहाचं प्रसिद्ध दुकान. शंकर रोड येथील आरकेडी एनएसएस हायस्कूलजवळ असलेल्या या दुकानामध्ये चविष्ट अशा चहासोबतच काही हलकेफुलके स्नॅक्सही मिळतात. ‘कोथू पराठा’ (परोटा) हा प्रकारही या भागात प्रसिद्ध आहे. जवळपास संपूर्ण केरळमध्ये हा कोथू पराठा आवडीने खाल्ला जातो. चिकन, अंडं, मसाले, त्याला कांदा-टोमॅटोची जोड देत या सर्व मिश्रणाचा भुगा केला जातो. काही ठिकाणी त्यामध्ये चिकन ग्रेव्हीसुद्धा घातली जाते. त्यामुळे प्रत्येकाची कोथू पराठा बनवायची पद्धत वेगळी असली तरीही ते खाणाऱ्यांना मात्र त्याचा काहीही फरक पडत नाही. इथे मिळणारा आणखी एक प्रसिद्ध खाद्यप्रकार म्हणजे ‘कप्पा बिर्याणी’. भात नसलेला हा बिर्याणीचा एक प्रकार. यामध्ये टॅपिओका किंवा कप्पा किंवा साबुदाण्याच्या कंदाचा समावेश असतो. कप्पा बिर्याणीमध्ये बिफ किंवा चिकन किंवा मटण, केरळी मसाले याचा मेळ साधत एक चविष्ट मिश्रण केलं जातं. त्रिवेंद्रम आणि आसपास बिफ, चिकन-मटण खाण्याचं प्रमाण तुलनेने जास्त आहे. आपल्याकडे ज्याप्रमाणे चपाती किंवा पोळीचं प्रस्थ आहे त्याचप्रमाणे या भागात केरळ पराठा, अप्पम आणि स्थानिक बेकऱ्यांमध्ये बनवलेले ब्रेड खाण्याला प्राधान्य दिलं जातं. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे खाण्याच्या पद्धती प्रांताप्रमाणे बदलतात त्याचप्रमाणे केरळमध्येही खाण्याच्या पद्धतींमध्ये विविधता पाहायला मिळते. म्हणजे त्रिवेंद्रममध्ये खाण्यामध्ये आणि मासे बनविण्याच्या पद्धतीमध्ये नारळाच्या दुधाचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. पण, जरा उत्तरेकडच्या पट्टय़ात गेलो की, अलेप्पी, थेकडी आणि मुन्नारला तेलात मसाल्याची फोडणी देऊन मासे आणि इतर खाद्यपदार्थ बनविले जातात. गोडाच्या पदार्थाचं म्हणायचं झालं तर इथे राईस हलवा आणि पायसम या पदार्थाची चलती आहे. विशेषत: इथेही व्यावसायिकीकरण झाल्याचा अंदाज आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळतो. त्यामुळे तेथील खाण्यातही काहीसा बदल झाल्याचे पाहायला मिळते. महाराष्ट्रात विविध खाद्यसंस्कृती एकत्रित नांदतात, तशा केरळमध्येही आहेत. कोचीमधले खाद्यपदार्थ आणि त्रिवेंद्रमची खाद्यसंस्कृती यामध्ये फरक आहे. कोचीमध्ये शाप्पुकरी किंवा तोडी शॉप नावाचं एक उपाहारगृह आहे. तिथे गेल्याशिवाय केरळची खाद्यसंस्कृती तुम्ही पूर्णपणे अनुभवली नाहीत असेच म्हणावे लागेल. तेथे खानावळ पद्धतीमध्ये जेवण दिलं जातं. शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही पद्धतींचे खाणे तिथे पुरविले जाते. (नाव जरी तोडी शॉप असलं तरीही तेथे ताडी हा प्रकार मिळत नाही.) कोणत्याही प्रकारे फ्रीज किंवा फ्रिजरचा वापर न करता फक्त आणि फक्त ताज्या सामग्रीपासून बनविलेलं जेवण इथे दिलं जातं. तोडी शॉपमध्ये अस्सल केरळची चव असणारे पदार्थ पानात दिसतील. शाकाहारींसाठी तसे प्रकार कमीच. त्या तुलनेत मांसाहारींची जास्त चंगळ आहे. थाळी फार महाग नाही. साधं पण तितकंच चविष्ट जेवण इथे खायला मिळतं. ‘मीन पोलिचट्ट’ म्हणजेच केळीच्या पानामध्ये भाजलेला मासा हा इथला एक प्रसिद्ध पदार्थ. ज्यामध्ये माशाला मसाले लावून सुरेख आणि खरपूस भाजले जाते. यात केळीच्या पानाचीसुद्धा हलकी चव उतरलेली असते. मीन पोलिचट्ट समोर आलं की त्यावरून नजरच हटत नाही आणि जिभेचे पूर्ण चोचले पुरवले जातात. निसर्गसौंदर्याची मुक्तहस्ताने उधळण केलेल्या या केरळमध्ये वणक्कम म्हणत स्थानिक लोक नेहमीच आपल्या स्वागतासाठी तत्पर असतात. त्यामुळे हा अनमोल नसíगक ठेवा अनुभवायला जाताना तुमच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठीही हे ठिकाण सज्ज आहे हे विसरू नका. रस्तोरस्ती मिळणारे बनाना चिप्स, टॅपिओका चिप्स आणि अर्थातच अस्सल मसाले आणि फिल्टर ‘कापी’चा स्वाद चाखण्यासाठीही केरळला जायला हवं. खाऊगल्लीचे फोटो आणि माहिती पाठवा देशभरातील वेगवेगळ्या गावा-शहरांमध्ये भटकंतीदरम्यान/वास्तव्यात तुमच्याही नजरेला (आणि मग जिभेला) असे वैशिष्टय़पूर्ण पदार्थ लागलेच असतील. गावोगावच्या अशा खाऊगल्ल्या आणि त्यातल्या पदार्थाविषयी आम्हाला कळवा. सोबत तुमचं नाव, संपर्क क्रमांक आणि पदार्थाचे/खाऊगल्लीचे फोटोही पाठवा. ५०० शब्दांपेक्षा अधिक मोठा लेख नसावा. लेख आणि फोटो पाठवण्यासाठी आमचा ई मेल - viva @expressindia.com किंवा viva.loksatta@gmail.com सब्जेक्टलाइनमध्ये खाऊगल्ली असा उल्लेख आवर्जून करावा. निवडक लेखांना प्रसिद्धी दिली जाईल. सायली पाटील/तेजल चांदगुडे viva@expressindia.com