मराठी भाषा घेऊन नेमके करिअर कसे आखायची अशी चिंता अनेकांना सतावते. याच प्रश्नांवर मार्गदर्शन करताहेत मराठीतले प्राध्यापक

प्रा. पद्मजा कुलकर्णी, गुरु नानक खालसा महाविद्यालय
भाषा ही माणसं बोलत राहण्यानं समृद्ध करत असतात. आता प्रश्न आहे मराठी भाषेचा. मराठी भाषेलाही विरल उत्तर लागू पडतं. त्यामुळं पुढील भविष्यात चिंता नव्हे तर चिंतन करायला हवं. मौखिक, लिखित अवस्थेत ठेवायची असेल तर ही जबाबदारी ती भाषा जे बोलतात, मातृभाषा त्यांच्यावर आहे. त्यासाठी आपण सर्वानी प्रयत्नपूर्वक त्यातून बोलण्याचा आणि शक्य तिथं मराठीतून लिहिण्याचा, उदाहरणार्थ अर्जलेखन, निवेदनपत्र, पत्रलेखन, आमंत्रण पत्र इत्यादी मराठीतून लेखन केल्यास भाषा वाढीस लागेल.
भाषा ही नेहमी अनुकरणातून ऐकून शिकली जाते. त्यामुळं आपण मोठय़ा माणसांनी उच्चारलेले मराठी शब्द लहान मुलांच्या कानावर सहज आणि सतत पडल्यास उच्चारणाचा सराव होईल. दैनंदिन जीवनाशी निगडित या शब्दांचा त्यांना सराव होईल, ते सवयीचे होतील. सवयीनं उच्चारले जाऊन लक्षात राहतील. पर्यायी शब्दांची सवय मोडून काढता येईल. बाह्य़ समाजात वावरताना मराठीचा वापर जाणूनबुजून करायला हवा. तो तसा सातत्यानं केला गेला तर आपण भाषेशी सतत जोडले जाऊ. साहित्य, कला, चित्रादी माध्यमांतील कला भारतीची जबाबदारी हे मराठीच्या वाढीस जबाबदार ठरतात. वृत्तपत्रांतील व्याकरणकदृष्टय़ा समृद्ध भाषेमुळं योग्य भाषेचं ज्ञान लोकांना मिळेल. संवाद हे सगळं झालं तर आपण पुढं काय या काळजीतून मुक्त होऊ. मातृभाषेसाठी आपण एवढं करू शकतो.  
करिअरसंधीच्या दृष्टीनं मराठीचा विचार करायचा झाल्यास विविध पर्याय उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ- शिक्षक-प्राध्यापक होता येईल. सरकारी सेवा, एलआयसी, बँक आदींत जाता येईल. संगणकीय ज्ञानाच्या अनिवार्यतेमुळं मराठी-हिंदीत माहिती संकलक होता येईल. पत्रकारिता, दूरचित्रवाणी, आकाशवाणी, निवेदन, लेखनादी क्षेत्र निवडता येईल. भाषांतर क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध होतेय. आमच्या महाविद्यालयात भाषांतरविषयक अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार चालू आहे. भाषांतरकार हे खाजगी कंपन्यातसुद्धा लागतात. भाषा ही सुसंवादासाठी आणि ज्ञानवृद्धीसाठी आहे.  इतर शाखा विषय शिकवण्यासाठी भाषेवर प्रभुत्व लागतंच. या सगळ्यासाठी आत्मविश्वास महत्त्वाचा. तो नसेल तर भाषा कशी येणार. तो असेल तर सहजपणं विषय समजून घेऊन आपण समोरच्यावर प्रभाव पाडू शकतो.

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक
Prof. Rupesh Mahadik
ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान
Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई

प्रा. लीना केदारे, मराठी विभागप्रमुख, रामनारायण रुईया महाविद्यालय
फक्त मराठीच नाही, तर कुठल्याही विषयात केवळ पदवी प्राप्त केल्यानं नोकरी लागत नाही, हे वास्तव आहे. मग मराठीत पदवी संपादनानंतर कोणते करिअर निवडाल, हा प्रश्न का उभा राहावा? जो विषय आपल्याला आवडतो, ज्याचं नीट आकलन होतं, त्यात कौशल्य आत्मसात करता येतं, त्यात पदवी मिळवावी.
साहित्य आणि भाषेमुळं आपल्या जाणिवा समृद्ध होतात. भाषा विचार करायला शिकवते. तिच्याद्वारे विषयाचं ज्ञान मिळतं. आकलन होऊन अभिव्यक्त होता येतं. त्यासाठी मातृभाषा चांगली येणं गरजेचं आहे. कोणत्याही विषयाची मूलभूत आवड असली, तर त्याला न्याय देता येईल.
शिक्षण क्षेत्रातले अनेक जाणकार मातृभाषेतून शिक्षण देण्यावर विशेषत: शालेय स्तरावरील शिक्षणावर भर देतात. तसं शिकून सव्‍‌र्हाईव्ह कसं होणार? असे काहींना वाटते. पण कोणत्याही वयात, कोणत्याही टप्प्यावर कोणतीही भाषा शिकता येते, असं भाषाशास्त्रज्ञ सांगतात. माध्यमाचा शिक्षणाशी संबंध नसतो. मातृभाषेतून शिकणं हे उपकारक आहे, असं सांगितलं जातं. म्हणूनच विद्यापीठ पातळीवर इंग्रजी विषय सोडून इतर विषय मराठीतून लिहिण्यास परवानगी आहे. मराठीतून शिकलो तरी व्यवहाराला इंग्रजी भाषा लागतेच. तितके इंग्रजी आपण शिकू शकतो.
एके काळी कमी गुण मिळणारे विद्यार्थी कला शाखा निवडत असत, पण आता जाणीवपूर्वक ही शाखा निवडणारे हुशार विद्यार्थीही पुढं येत आहेत. आमच्या महाविद्यालयात मराठीपण टिकवणारं वातावरण आहे. आमच्या संस्थेच्या ध्येयधोरणातून, उपक्रमांतून ते दिसतं. आमच्याकडे कला शाखेत मराठीतून शिक्षण दिलं जातं. विद्यार्थ्यांचं सांस्कृतिक भरणपोषण होतं.
मराठी साहित्य जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन देतं. त्यामुळे सामाजिक भान येतं. मराठीच्या अभ्यासक्रमाचा दर्जा चांगला असला तरी अजून बदलाला वाव आहे. २०२० पर्यंत केवळ महाराष्ट्रातच नाही तर मराठीची नाममुद्रा जगभर उमटू शकेल. परदेशीयांना भारतीय संस्कृतीचं अतीव आकर्षण वाटतं. ते आणखी वाटू शकतं. मराठीविषयी आस्था वाढू शकते. मराठी साहित्याचा अभ्यास केला जाऊ शकेल. आपल्याकडच्या अनेक अमराठी विद्यार्थी आणि सामान्यांना मराठीची आवड असल्यानं ते मराठी शिकताहेत.
अभ्यास विषय कोणता ते महत्त्वाचं आहे. त्यातून मिळणारा आनंद आणि होणारं आकलन यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. समाजशास्त्र, मानसशास्त्रादी जीवनाशी निगडित सगळ्या विषयांना स्पर्श करते. ते फक्त काल्पनिक जग नाहीये. तुम्ही जे शिकता त्यावर विश्वास असायला हवा.
विविध समूह शिक्षणाकडे वळत असल्यानं मराठीची गरज आहे. भाषांतरित कलाकृतींना खूप मागणी आहे. मराठीचं कसं होणार, ही चिंता करायला नको. प्रोफेशनल अभ्यासक्रम, स्किल ओरिएंटेड शिक्षणाची आज गरज आहे. जो पदवीधर या प्रकारचे शिक्षण घेतो. त्यामुळं समाजाला हा प्रश्न पडतो की, याचं पुढं काय? त्यासाठी समाज सशक्त ज्ञानाच्या पायावर उभा राहायला हवा. तरच हे टिकवलं जाईल. फक्त मराठी नव्हे तर प्युअर सायन्सेस इत्यादींसाठीही ते करावं. माणूस म्हणून जे जगणं आहे, अमूर्त पातळीवरचं समजणं हा भाग साहित्य देतं. त्यामुळं विचारांची क्षमता वाढते.
मराठी विषय घेतल्यास बँकिंग, स्पर्धा परीक्षा, शिक्षकी पेशा, समाजसेवा, संशोधन, भाषाविज्ञान, ग्रंथालयशास्त्र, सर्जनशील लेखन, आकाशवाणी, नाटय़क्षेत्रादी अनेक करिअर ऑप्शन आहेत.
मराठी भाषा दीन नाहीये, परंतु एकूणात मराठीपण टिकवण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी आणि समाजाचे पाठबळही हवे.

डॉ. गीता मांजरेकर, मराठी विभागप्रमुख, महर्षी दयानंद महाविद्यालय
मराठी साहित्य हा विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बरेचसे विद्यार्थी असे आहेत की, ज्यांना अन्य विषय जमत नाही, ते मराठी विषय घेतात. त्यांना मराठीची आवड नसते. केवळ परीक्षार्थी या दृष्टिकोनातून ते साहित्य अभ्यासून कसेतरी पास होतात.
‘एमएससीआयटी’सारख्या परीक्षा देऊन डाटा ऑपरेटर म्हणून काम करतात. पुढं मराठी साहित्याशी त्यांचा काही संबंध राहत नाही. मराठी विषयात थोडा रस असणारा विद्यार्थी अध्यापन, प्रसारमाध्यमात शिरण्याचा प्रयत्न करतो. काही थोडे विद्यार्थी एलएलबी, एलएलएम घेऊन बँका-सरकारी खात्यात लीगल ऑफिसर म्हणून काम करतात. अधिक चिकाटी असणारे विद्यार्थी एमपीएसससी-यूपीएससीच्या परीक्षा देतात. त्यात मराठी विषय असतो. मराठीतून पेपर लिहिता येतो. त्यांनतर ते सरकारी सेवेत रु जू होतात. थोडे विद्यार्थी ग्रंथालयशास्त्र अभ्यासून पुढं ग्रंथपाल होतात. काहीजण विशेषत: मुली हिंदी-मराठीच्या शिकवण्या घेतात. इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी ही शिकवणी गरजेची झाली आहे.
काहीजण संगणकावर मराठी अक्षरजुळणीत तरबेज होतात. ते प्रकाशन व्यवसाय, मुद्रितशोधन, संपादकीय कामात मदत करतात. आमच्या कॉलेजमधले काही मुलगे पोलीस, बीईएसटी, महानगरपालिकेत नोकरी करतात. तेथील कारभार मराठीतून चालतो. तिथं मराठी पदवीधर असल्यास प्रमोशन मिळतं. पदव्युत्तर शिक्षण असल्यास इन्क्रिमेंट मिळतं. क्वचित काहीजण सर्जनशील लेखनाकडं वळतात. नाटककार, कथा- कादंबरी-कवितालेखन, मालिकांसाठी संवाद-पटकथालेखन करतात. कुणी रेडिओ जॉकी, निवेदन-सूत्रसंचालन करतात. कुणी एमएसडब्ल्यू होऊन समाजसेवक होतात. समाजातील लोकांशी संवाद साधण्यात त्यांना मराठी भाषेचा उपयोग होतो.
आता भाषांतरकार म्हणूनही चांगली कामं मिळताहेत. त्यासाठी व्यवस्थित अभ्यासक्रम आखायला हवा. विविध ज्ञानशाखांमधली पुस्तकं मराठीत उपलब्ध व्हायला हवीत. कारण आपण जे सर्वशिक्षण म्हणतो आहोत, ते घेऊ इच्छिणाऱ्या समूहाला इंग्रजीतून त्या विषयांचं आकलन होण्यापेक्षा ते मराठीतून पटकन होऊ शकेल. त्यासाठी भाषांतराच्या कामाची योजना शासनानं आखल्यास काही विद्यार्थ्यांना काम मिळू शकेल. विविध मराठी परिभाषिक कोशांचं काम करावं लागेल. आहेत ते कोश अपडेट करण्याची गरज असून त्याअनुषंगानं काहींना काम मिळेल. दूरचित्रवाणीवरील वाहिन्या आणि मराठी शाळांची संख्या वाढल्यास अधिक संधी उपलब्ध होतील. संगणक आणि तंत्रज्ञानात मराठी भाषा अधिक जोमानं यायला हवी. त्यामुळं तिचा प्रसार आणि प्रचार अधिक होऊ शकेल. भाषेकडं बघण्याची दृष्टी आता बदलायला हवी. विविध व्यवसाय, जाती-पोटजाती यांच्यातील शब्द सामावून घेण्याची गरज आहे. त्या संदर्भातले टॅब्यू बदलले तर भाषाही वाढणार आहे. तसं न केल्यास ती विकसित होणार नाही. आम जनतेचे शब्द मुख्य प्रवाहात यावेत. तरच भाषेची अभिवृद्धी होईल. त्यासाठी कोणताही परीघ न आखता दृष्टी संकुचित ठेवली नाही तर मराठीला बरे दिवस येऊ शकतील.

– प्रा. वैशाली जावळेकर, मराठी विभागप्रमुख, डी. जी. रुपारेल महाविद्यालय
मराठी घेणाऱ्यांना पुढचा पर्याय काय, हा विचार करताना शिक्षणव्यवस्थेचा विचार करावा लागेल. करिअर ऑप्शन्समध्ये कालही जे पर्याय होते, त्यात फारशी वाढ झालेली नाही. अध्यापन, पत्रकारिता, प्रसारमाध्यमं इत्यादी पर्याय पटकन पुढं येतात. नोकरीचं क्षेत्र म्हणून विकास झालेला नाही. काल हा प्रश्न नव्हता. फाइन आर्ट, प्युअर भाषांनी आपली प्रतिष्ठा गमावलेय. त्यांचा नोकरीशी संबंध जोडतो आणि मग असं वाटतं की हा विषय आपल्या उपयोगाचाच नाही. हा संबंध जोडायचा का, हा प्रश्न आहे. मराठीचा विद्यार्थ्यांला साहित्य-भाषा शिकल्यानं संवेदनशीलता येते. नोकरीच्या बाबत विचार करायचा झाल्यास   प्रसारमाध्यमं, पत्रकारिता इत्यादींसाठी काम करणाऱ्याला आपण सक्षम करू शकतो. त्यांचे  व्यावसायिक कौशल्य विकसित व्हायला मदत होऊ शकते.
आताचं विश्व स्वतंत्र ज्ञानावर आधारित आहे. त्यामुळं भाषेपुढं आव्हान आहे ते तंत्रज्ञानाचं. त्यासाठी भाषा विकसित व्हायला हवी. मात्र इथं भाषा संवादी होत नाही. कॉल सेंटरमध्ये वगैरे वाचिक भाषा असते. त्याला भाषा विषय तोंड देऊ शकत नाही. हे आपल्या हातात नाही तर एकूण व्यवहार आणि भाषेच्या व्यवहारातील उपयोगावर अवलंबून आहे. रोजच्या व्यवहारात भाषा टिकायला हवी. ही भाषा टिकवणं ज्यांच्या हातात आहे, त्या विद्यार्थ्यांच्या साहित्यविषयक क्षमता कमी होताहेत. साहित्याच्या अभ्यासात खोलात जाऊन ते समजून घ्यायची वृत्ती दिसत नाहीये.
नोकरी मिळवण्यासाठी संवेदनशीलता, इतर विद्याशाखांचं ज्ञान, सामाजिक भान हे महत्त्वाचं ठरतं. हे मोठं आव्हान असून त्याला कसं सामोरं जायचं हा भाषा शिक्षकासमोरचा एक प्रश्न आहे. साहित्य आपल्याला विचारशील करतं. पण आजच्या व्यवस्थेचा विचार करता विचारशील माणूस व्यवस्थेला चालणार नसेल तर काय करायचं? हे सगळ्याच लोकांचं होतंय. मुळात ‘मराठी भाषा दिवस’ आपण साजरा करतो. हे साजरा करणं कशासाठी आहे? मराठी भाषा संपलेय म्हणून की तिच्याबद्दल आपण सजग आहोत म्हणून? ते ठरवायला हवं. व्यवहारात, महाविद्यालयातील सांस्कृतिक-भाषिक अवकाशात मराठी भाषेवर विविधांगी परिणाम होतोय. अभ्यासक्रमात मराठी शिकवायचं तर त्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष व्यवहारात कसा होऊ शकेल? यावर विचार व्हायला हवा. बौद्धिकदृष्टय़ा कितीजणांना संधी मिळते? याचं भान ठेवायला हवं. या साऱ्याला समीक्षेची जोड हवी.  एकूणात मराठीला टिकवून ठेवण्यासाठी सामूहिक जबाबदारी घेऊन एकत्रित प्रयत्न होणं आवश्यक आहे.