गेल्या आठवडय़ात ४२ वर्षांच्या वेदनेची, दु:खाची, अपमानाची अखेर झाली.. अरुणा शानबाग गेली. त्याचबरोबर तिच्या सहकारी परिचारिकांच्या मानवतावादाची, त्यांच्या सेवेची कहाणी मात्र अजरामर झाली; पण अरुणा शानबागच्या निमित्ताने आपल्या समाजात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांची जुनी जखम पुन्हा भळभळती झाली. ‘निर्भया’चा लढा आठवला, ‘गुडिया’ची वेदना आठवली, ‘इंडियाज डॉटर’च्या निमित्ताने समोर आलेली मानसिकता आणि त्यावर झालेली फुटकळ चर्चाही आठवली. कधी बदलणार स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन, कधी बदलणार आमचं आयुष्य, कधी संपणार भीती असे अनेक प्रश्न मनात आले. याच प्रश्नांना घेऊन शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून जागृती घडवण्याचा प्रयत्न विभा दीक्षित ही तरुण फिल्म मेकर करीत आहे. विभाच्या ‘डॉटर्स ऑफ मदर इंडिया’ या फिल्मला नुकताच सामाजिक आशयावरील सवरेत्कृष्ट लघुपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. ब्रिटीश फिल्ममेकरने बनवलेल्या ‘इंडियाज डॉटर’च्या चर्चेत या राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या भारतीय फिल्मकडे तसं दुर्लक्षच झालंय. ‘डॉटर्स ऑफ मदर इंडिया’ हा लघुपट निर्भया केस तसंच ५ वर्षांच्या गुडियावर झालेल्या बलात्काराच्या घटनांवर आधारित आहे. अॅकॅडमी अॅवॉर्ड विनर मरियन डी लिओ यांनी याची निर्मिती केली असून ही फिल्म भारतासह अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर गौरवण्यात आली आहे. विभा दीक्षित या मुळात पत्रकार आणि नंतर फिल्म मेकर बनललेल्या तरुणीने ही फिल्म बनवली आहे. ‘निर्भया केसच्या वेळी जनसागर पेटून उठला. महिला सुरक्षा तसंच न्यायासाठी होणारी आंदोलनं-जोरदार मागण्या हे सगळं पाहून एक भारतीय स्त्री म्हणून मला आतून हलल्यासारखं झालं. न्यायासाठी एकत्र आलेला देश पाहून मला अभिमानही वाटला आणि या घटनेवर फिल्म बनवण्याची इच्छा झाली. निर्भयच्या घटनेनंतर एक समाज म्हणून आपल्यात काय बदल झाला हे माझी फिल्म सांगते’, विभा म्हणते.‘पोलीस किंवा सिस्टीम यांच्याबद्दल आपल्या मनात फार प्री-ज्यूडायसेस असतात परंतु शूटिंगदरम्यान मी पोलिसांना भावुक होताना पाहिलं. त्यांनाही आपल्याइतकीच चीड येते परंतु त्यांना संयमाने त्यांचं काम करायचं असतं. अशा घटना घडू नयेत यासाठी पोलीस आणि नागरिक यांच्यातली दरी भरून काढण्याची प्रचंड गरज आहे’, विभा नोंदवते. ‘सामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त लढा हे माझ्या फिल्मचं मोठ्ठं मोटिव्हेशन होतं परंतु या प्रवासादरम्यान मी अनेकांना भेटले.. सामाजिक कार्यकर्ते, पोलीस, वकील, विद्यार्थी आणि काही व्हिक्टिम्ससुद्धा. आपण बदलाला सुरुवात केल्याशिवाय, बदल घडणार नाही हे मला जाणवलं. दरवेळी सिस्टीमकडून अपेक्षा करणं चूक आहे. मी बदलासाठी ‘फिल्म’ हे माध्यम निवडलं, तुम्हीही तुमच्या आवडीच्या माध्यमातून बदलाची पणती पेटवू शकता’, असं विभा आवर्जून सांगते. भक्ती तांबे -viva.loksatta@gmail.com