जिल्ह्य़ातील उमरेड आणि भिवापूर तालुक्यात डेंग्यूचे १० संशयित रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाची धावपळ सुरू झाली आहे. दरम्यान, संशयित डेंग्यूच्या रुग्णांना उपचारासाठी मेडिकलमध्ये हलवण्यात आले आहे.
डेंग्यू हा आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. पावसाळ्यात विशेषत ऑगस्ट, सप्टेंबर व नोव्हेंबर या तीन महिन्यात डासांची उत्पत्ती मोठय़ा प्रमाणात होते. या कालावधीत कचऱ्याचे व घाणीचे साम्राज्य असते. त्याचा परिणाम डास निर्माण होण्यात होतो. आरोग्य विभाग परिसराची स्वच्छता ठेवण्याच्या सूचना करत असतानाही ग्रामपंचायती त्याकडे दुर्लक्ष करते आणि मग डास चावल्याने हिवताप, मलेरिया, डेंग्यू, मेंदूज्वर हे आजार निर्माण होतात. भिवापूर येथे चार संशयित डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये राणी सुरेश पुरी (१०), मंथन ढवळे (१५), लक्ष्मण आत्राम (२२) आणि नम्रता किशोर पुरी (२ वर्षे) यांचा समावेश आहे. या सर्वावर सर्वप्रथम भिवापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. परंतु त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पाठवण्यात आले. त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
उमरेड तालुक्यातील पाचगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ठोबरा गावातही सहा जणांना हिवताप आला आहे. त्यांच्या लक्षणावरून त्यांना डेग्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
स्वाती विवेक रंगारी (१४), शिवाजी मिलिंद मेश्राम (१४), तुजा रामू इंगळे (८), ऐश्वर्या केवलराम शामकुवर (१४), लोकेश प्रभुदास मेश्राम (१८) आणि श्रेया चंद्रप्रकाश मेश्राम अशी संशयित डेंग्यू रुग्णांची नावे आहेत. त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. या सर्वाना उपचारासाठी मेडिकलमध्ये पाठवण्यात आले आहे. ही माहिती मिळताच आरोग्य खाते जागे झाले. या गावात प्राथमिक आरोग्य केंद्राचे एक पथक तैनात करण्यात आले असून गावातील प्रत्येकाच्या रक्ताचे नमुने घेतले जात आहे. तसेच अन्य सोयी सुविधा पुरवण्यात येत आहे.
दरम्यान, ही माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई आणि जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. बी.एच. पारधी यांनी भिवापूर आणि ठोबरा गावाला भेट देऊन आरोग्य अधिकाऱ्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या. भिवापूर आणि ठोबरा गावातील संशयित डेंग्यू रुग्णांचे रक्त नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. नमुन्याच्या अहवालानंतरच त्यांना नेमका कोणता आजार झाला, हे स्पष्ट होणार असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. बी.एच. पारधी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
या गावात धूर फवारणी, नाल्यांची सफाई, शेणखते गावाबाहेर नेणे आदी कामे सुरू करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

विभागात दोन मृत्यू
नागपूर विभागात एकाचा ‘स्वाईन फ्लू’ने तर एकाचा मेंदूज्वराने मृत्यू झाला आहे. गोंदिया जिल्ह्य़ातील तिरोडा तालुक्यातील इंदोरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सी.डी. सूर्यवंशी (३७) यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांना गोंदिया येथे दाखल करण्यात आले होते. परंतु प्रकृती आणखी खालावल्याने त्यांना नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना २८ ऑगस्टला त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात त्यांना ‘स्वाईन फ्लू’ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
गडचिरोली जिल्ह्य़ातील अहेरी तालुक्यातील तांडरा येथील साईविलास नागल्लू राऊत (१३) या मुलाला हिवताप आल्याने त्याला सुरुवातीला अहेरी येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. तेथे त्याला मेंदूज्वर झाल्याचे निष्पन्न झाले. पुढील उपचारासाठी त्याला गडचिरोली येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे त्याचा २९ ऑगस्टला मृत्यू झाला. उपचारादरम्यान रक्त देण्यास विलंब केल्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.