लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी लिहिलेल्या ‘गीतारहस्य’ या ग्रंथास पुढील वर्षी जून महिन्यात शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या शताब्दीच्या निमित्ताने ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी या ग्रंथावर शंभर भाषणे देण्याचा संकल्प सोडला आहे. या संकल्पाला चिपळूण आणि रत्नागिरी येथे झालेल्या दोन व्याख्यानांनी सुरुवातही झाली आहे.आपल्या या उपक्रमाविषयी ‘लोकसत्ता’ला माहिती देताना सोमण म्हणाले, लोकमान्य टिळक यांच्यापूर्वी अनेक विद्वानांनी श्रीमद्भगवद्गीतेचा अर्थ ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तीयोग असा सांगितला होता. लोकमान्य टिळकांनी हा अर्थ योग्य नाही, असे प्रतिपादन करून हा ग्रंथ केवळ धार्मिक नाही तर संसारशास्त्र आणि निष्काम कर्मयोग शिकविणारा ग्रंथ आहे, कर्म करताना फळाची आसक्ती असून नये, निष्काम भावनेने कर्म करा, आपले कर्तव्य पार पाडा, असे विचार मांडले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात संपूर्ण समाज निद्रिस्त झाला होता. या निद्रिस्त समाजाला जागे करण्यासाठी टिळकांनी प्रयत्न केले. आज शंभर वर्षांनंतरही परिस्थिती बदलेली नाही. आजचा समाजही निद्रितावस्थेतच आहे. प्रत्येकजण सुखाच्या आणि पैशांच्या मागे धावतोय. असुरक्षितता, जीवघेणी स्पर्धा, कमी श्रमात मोठे यश, महागाई, भ्रष्टाचार वाढला आहे. निष्काम कर्मयोगाचा आणि आपल्या कर्तव्याचा सगळ्यांनाच विसर पडला आहे. त्यामुळे ‘गीतारहस्य’ ग्रंथातून लोकमान्य टिळकांनी मांडलेला निष्काम कर्मयोग आणि कर्तव्याचा विचार सद्यपस्थितीत पुन्हा एकदा समाजात रुजविण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या ग्रंथाच्या शताब्दी वर्षांच्या निमित्ताने आपण शंभर व्याख्याने देण्याचा संकल्प सोडला असल्याचेही सोमण म्हणाले. १९८० मध्ये भारतातून खग्रास सूर्यग्रहण दिसणार होते तेव्हा तसेच १९८६ मध्ये ‘हॅले’ धुमकेतू भारतातून दिसणार होता त्या वेळी आपण दोन्ही विषयांवर शंभर व्याख्याने दिली होती, असेही त्यांनी सांगितले.लोकमान्य टिळक यांनी लिहिलेला ‘गीता रहस्य’ अथवा ‘कर्मयोगशास्त्र’ हा ग्रंथ पहिल्यांदा १९१५ मध्ये प्रकाशित झाला. हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी लोकमान्य टिळक यांनी यावर २० वर्षे चिंतन, मनन आणि अभ्यास केला. मंडालेच्या कारागृहात असताना टिळकांनी या ग्रंथाचे लेखन केले आणि तुरुंगातून सुटका झाल्यानंतर हा ग्रंथ प्रकाशित झाला होता.