सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहनांचा भार हलका झाला असून सध्या दररोज सुमारे ७५ हजार वाहनचालकांकडून या रस्त्याचा वापर केला जात आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू होण्यापूर्वी पूर्व द्रुतगती महामार्गावरून सुमारे सव्वा लाख वाहनांची दररोज ये-जा होत होती. या जोडरस्त्यामुळे पूर्वद्रुतगती महामार्गावरील घाटकोपर ते शीव दरम्यान वाहनांचा ताण कमी झाला आहे.याप्रमाणेच चेंबूर, घाटकोपर या पूर्व उपनगरातून वांद्रे-कुर्ला संकुल, सांताक्रूझ, आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेतही बचत झाली असून हा वेळ एका तासाने कमी झाला असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकणारचे सहप्रकल्प संचालनक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांनी दिली.सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता सुमारे ३.५ किलोमीटर लांबीचा असून येथे भारतातील पहिल्या द्विस्तरीय पुलाचाही समावेश आहे. हा प्रकल्प उभारतांना अनेक खटले आणि पुनर्वसन प्रश्नांना सामोरे जावे लागले होते. एप्रिल महिन्यात सुरू झालेल्या या जोडरस्त्याला वाहन चालकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. पूर्व उपनगरातून पश्चिम द्रुतगती महामार्ग तसेच वांद्रे-कुर्ला संकुल या भागात येणाऱ्या वाहनचालकांच्या वेळेची बचत करण्यात या जोडरस्त्याचा मोठा वाटा आहे. तसेच शीव सर्कल परिसरतील वाहतूक कोंडीही दूर होण्यास मदत झाली असल्याचे कवठकर यांनी सांगितले.