अपंग बेरोजगार व पुनर्वसन संस्थेच्या नेतृत्वाखाली उपोषण करीत असलेल्या तिघा आंदोलकांची प्रकृती बिघडल्याने बुधवारी त्यांना छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदाशिव सावंत, आनंदराव तुरूंबेकर, सुजाता जाधव अशी या तिघांची नांवे आहेत.    
अपंगांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अपंग बेरोजगार व पुनर्वसन संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे. सोमवारपासून आंदोलन सुरू झाले असले तरी अपंगांच्या मागण्यांकडे जिल्हा प्रशासनाने अजूनही लक्ष दिलेले नाही. या आंदोलनात सुमारे वीस कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. त्यातील तिघांची प्रकृती बुधवारी दुपारी बिघडली. त्यामुळे तिघांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित आंदोलकांची प्रकृतीही खालावत चालली आहे. प्रशासन अपंगांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल आंदोलकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रलंबित मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.