वयाच्या ऐंशीनंतर सतत पुस्तकांच्या गराडय़ात वावरणारी व्यक्ती अगदी नगण्यच! साधारणत: या वयात व्यक्ती थकलेली नाही तर इतरांच्या आधारानं जगणारी असते. मात्र, या अरण्यऋषीनं वयाची ऐंशी ओलांडली आणि आता ८३ व्या वषार्ंतही त्यांच्या दिनक्रमात कोणताही बदल झालेला नाही. सतत नवकोषनिर्मितीच्या ध्यासात उलगडलेल्या व्यक्तिमत्त्वाशी ज्येष्ठ नागरिक दिनाच्या पाश्र्वभूमीवर साधलेला संवाद तेवढाच प्रफुल्लीत करून गेला.
मारुती चितमपल्ली नावाचे हे व्यक्तिमत्त्व अपरिचित असे नाही, पण त्यांच्या दिनचर्येशी फार कमी व्यक्ती परिचित आहेत. कायम जंगल आणि वन्यजीवांच्या सानिध्यात वावरलेल्या या व्यक्तिमत्त्वाला फारसे माणसांच्या गराडय़ात सतत वावरायला आवडत नाही. कारण झाडे, पाने, फुले, वन्यजीव, पशुपक्षी यांच्यातला निरागसपणा त्यांना अधिक भावतो. म्हणूनच मेळघाटातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी स्वत:ला त्याच निरागसपणाच्या लेखनीत गुंतवून घेतले. प्राणायाम, योगाने पहाटे पाच वाजता सुरुवात करणारे हे अरण्यऋषी नाश्त्यानंतर त्यांची लेखणी हातात धरतात. सतत चार तासांच्या लिखाणानंतर जेवण घेतात. साधारणपणे या वयात दुपारची दीड-दोन तासांची वामकुक्षी ठरलेलीच, पण या अरण्यऋषीला ही वामकुक्षीही नकोशी असते. जेवल्यानंतर पुस्तकांच्याच गराडय़ात ते खुर्चीवर बसलेले असतात. तेव्हा बसल्याबसल्या जो काही आराम झाला तो झाला. या जराश्या विसाव्यानंतर पुन्हा त्यांची लेखणी आणि वाचन सुरू होते. उद्याच्या लिखाणाची तयारी सुरू होते. चष्म्याची साथ नाही, लेखणीचा हात नाही, पण तरीही कामात कधी खंड पडला नाही. त्यांचा पक्षीकोष अलीकडेच प्रकाशित झालाय. प्राणीकोष तयार आहे, फक्त त्यातील सुधारणांवर हात फिरवणे सुरू आहे आणि वृक्षकोष आता निर्मिती प्रक्रियेत आहे. वयाच्या ८३ व्या वषार्ंत ते आहेत, पण कधी त्यांना चष्म्याची गरज भासली नाही. सत्तरी ओलांडली की लिखाण करायचे म्हटले तर लेखणीक लागतो, या अरण्यऋषीला त्याचीही गरज भासत नाही. शुद्धलेखन, भाषेशी तडजोड हा प्रकारच मुळात त्यांना मान्य नाही. त्यामुळे स्वत:ची कामे ते स्वत:च करतात. हे सारे आता अंगवळणी पडले आहे. यात सर्वाधिक मदत होते ती ध्यानधारणेची! या वयातदेखील दिवसातून तीन वेळा ते ध्यानधारणा करतात. माणसांच्या गर्दीची मात्र त्यांना आजही भीती वाटते. अलीकडे त्यांनी बाहेरचा प्रवासदेखील बंद केला आहे. शहरातल्या कोणत्याही कामाला हजेरी लावण्याचे ते टाळतात. मात्र, जंगल आणि वन्यजीवांचा विषय निघाला की त्यांची कळी खुलते.