दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या व्यंगचित्रास पुष्पहार घालून प्रचारासाठी वापर करणे हा सभ्यतेची पातळी ओलांडणारा प्रकार आहे, अशी टीका हजारे यांचे येथील कार्यकर्ते पां. भा. करंजकर यांनी केली आहे.
संस्कार व संस्कृतीचा जयघोष करणाऱ्या भाजपचे राजकारण फसवे असल्याचे दिल्लीतील प्रचारातून उघड झाले आहे. अण्णांच्या जनलोकपाल आंदोलनाचा भाजपला लोकसभा निवडणुकीत यश मिळण्यात अप्रत्यक्ष मदतच झाली. हे नाकारता येणार नाही. त्याचा भाजपला अल्पावधीत विसर पडल्याबद्दल करंजकर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अण्णांचे समग्र जीवन जनसेवेसाठी समर्पित झाले आहे. त्यामुळेच भाजपचे प्रचार पत्रक निंदनीयच आहे, असे करंजकर यांनी नमूद केले आहे.