वाळूतस्कर व कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांमधील अर्थपुर्ण संबंधामुळे तालुक्याचे महसूल प्रशासन पुरते बदनाम झालेले असतानाच सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते नायब तहसिलदारांची एजंटगिरी करीत असल्याचा खळबळजनक आरोप टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायतीच्या सदस्या अरूणा खिलारी यांनी केला आहे.
खिलारी यांनी यासंदर्भात तहसीलदारांनाच निवेदन दिले आहे. टाकळी ढोकेश्वर परिसरातील पळशी पळसपूर, पोखरी व वनकुटे येथे मुळा नदीपात्रातून दररोज हजारो ब्रास वाळू बेकायदेशीरपणे उपसण्यात येते. या वाळूतस्करांना नायब तहसिलदारांची फूस असल्याचे खिलारी यांचे म्हणणे आहे. या वाळूतस्करांकडून नायब तहसीलदार वेळोवेळी हप्ते घेत असल्याचा दावा करून टाकळी ढोकेश्वर येथील सामाजिक संघटनेचे अध्यक्ष व त्यांचे साथीदार हप्ते गोळा करण्याचे काम करतात. नायब तहसिलदार या भागात नेहमीच फिरत असून त्यांच्या या भागात फिरण्याची चौकशी करण्याची मागणी खिलारी यांनी केली आहे. नायब तहसिलदारांच्या आर्थिक चौकशीही मागणी त्यांनी केली आहे.