माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निवडक कवितांचा अर्थ कुंचल्यातून सुलेखन पद्धतीने साकारण्यात आलेला आहे. त्याचे प्रदर्शन डोंबिवलीत भरले असून, त्याला रसिकांनी मोठी गर्दी केली होती. या प्रदर्शनाच्या निमित्ताने अटलजींच्या कविताही जाणण्याचा योग डोंबिवलीकरांना आला. 

– सुलेखनकार राम कस्तुरे यांच्या वेदाक्षरे कलादालन व उपमहापौर राहुल दामले यांच्या वतीनेो अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांचा अर्थ आपल्या कुंचल्यातून यथार्थ प्रकट करणारे सुलेखन कलाकृतींचे प्रदर्शन आनंद बालभवन मध्ये रविवारी भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात वाजपेयी यांच्या ३५ कविता मांडण्यात आल्या होत्या. त्यात अटलजींची आवडती कविता ‘जीवन बीत चला’ ही सुलेखनातून साकारताना वाळूचे घडय़ाळ कालचक्राचं प्रतिक आहे. भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ या तीनही अवस्थेत अक्षरांचे ढिगारे दाखवून वर्तमानाच्या जागी मात्र एक अक्षरकण खाली पडताना दाखविला आहे. ‘ऊचाई’ या कवितेतून व्यक्ती जेवढय़ा अधिक पदावर, उंचीवर जातो तेवढा तो एकाकी असण्याचा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. यासोबतच ‘आओ फिर से दिया जलाये’ ‘पहचान’, ‘अमरआग’, ‘यक्षप्रश्न’, ‘आओ मन की गांठे खोले’, ‘गीत नहीं गाता हू’, ‘न मै चूप हू न गाता हू’, ‘स्वतंत्रता दिवस की पुकार’ अशा विविध निवडक कवितांचा अर्थ राम कस्तुरे यांनी उलगडून दाखविला आहे.
– सुलेखनाकार राम कस्तुरे याविषयी म्हणाले, वाजपेयी यांच्या कवितेत राष्ट्रभावना, मानवी जीवनाची मूल्ये प्रतिबिंबीत झालेली दिसतात. अटलबिहारी वाजपेयी यांची व त्यांच्या कवितांची एक वेगळीच उंची आहे, त्याच उंचीवर जात या कविता सुलेखनाच्या माध्यमातून उलगडल्या आहेत.