राज्य शासनाने जिल्ह्य़ात ३५ दुकानांना ताडी विक्रीची परवानगी दिली. ताडीत रासायनिक भेसळ केल्यामुळे यापूर्वी अनेकांचे बळी गेले आहेत. ताडी पिण्याचे प्रमाण मागास समाजात अधिक असल्याने या दुकानावर बंदी घालावी, अशी मागणी नाशिक जिल्हा नशाबंदी मंच या सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. ताडी हे मद्य निराच्या रसापासून तयार करण्यात येते. निरेमध्ये नवसागर टाकल्यानंतर त्याचे ताडीत रुपांतर होते. नाशिक जिल्ह्य़ात ३५ दुकानांना नियमित हजारो लिटर पुरवठा होईल एवढी झाडे अस्तित्वात नाहीत. तसेच शिंदीच्या एका झाडापासून दररोज साधारण अर्धा ते एक लिटरपेक्षा अधिक निरा उत्पन्न होत नाही. त्यामुळे बहुतांश विक्रेते प्रत्यक्षात ‘क्लोरोहाईड्रो’ या घातक रसायनांचा वापर करून कृत्रिम ताडी तयार करतात. अशी कृत्रिम ताडी पिण्यामुळे याआधी इगतपुरी तालुक्यातील एका लोकप्रतिनिधीचा ताडी दुकानासमोरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महाराष्ट्रातील ताडी-विक्री व्यवसायात ९० टक्के परप्रांतीय व्यावसायिक गुंतलेले आहेत. नाशिकमधील सिडकोसारख्या परिसरात ताडी विक्री करणारा परप्रांतीय लोकप्रतिनिधी परागंदा झालेला आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी या ताडी दुकानांचे लिलाव त्वरित रद्द करावेत अन्यथा नाशिक जिल्हा नशाबंदी मंच यांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.आगामी वर्षांत सिंहस्थानिमित्त नाशिकसह त्र्यंबकेश्वर येथे प्रचंड गर्दी होणार असल्याने ताडी विक्रेत्यांना कोटय़वधी रुपयांचा नफा होऊ शकतो. परंतु, या दुकानात विकली जाणारी ताडी ही घातक रासायनिक पदार्थापासून बनविल्यामुळे प्रकृतीस धोका निर्माण होऊ शकतो, असेही निवेदनात नमूद आहे. निवेदनावर अविनाश आहेर, चंद्रकांत बोंबले, मोहन जगताप, सूर्यकांत आहेर आदी पदाधिकाऱ्यांची स्वाक्षरी आहे.