मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ात वादळी पावसामुळे नुकसान
- कोल्हापुरातील एलबीटी विरोधातील आंदोलन आजपासून मागे
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- स्थानिक संस्था कर जकातीशी समतुल्य उद्योगांना सवलती कायम
- विद्यार्थिनींच्या गाडीने सुटीत अर्थार्जनाची गोडी लावली
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
मुंबई व आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या वयोगटातील महिलांवर हल्ला झाला आहे. काहींना एकटय़ा गाठून तर काहींवर भर गर्दीत हल्ला झाला आहे. या पाश्र्वभूमीवर महिलांची सुरक्षितता आणि सार्वजनिक जीवनातील त्यांना मिळणाऱ्या सुविधा याबाबत विविध वयोगटाच्या, नोकरी-व्यवसाय करणाऱ्या तसेच गृहिणींची मते जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न.
मुंबईत प्रवास करणे हे कितपत सुरक्षित ठरते, यावर बहुतांश स्त्रियांनी या शहरावर विश्वास दाखवला आहे. कामा-व्यवसायानिमित्ताने रात्री उशिरापर्यंत प्रवास करणे अपरिहार्य असते. रेल्वे वा बेस्टसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करताना या गोष्टीचा ताण जाणवतही नाही. मात्र रिक्षा, टॅक्सीमध्ये बसताना महिला काही गोष्टी लक्षात घेतात, अशी टिप्पणी वित्तीय व्यावसायिक आश्लेषा पै यांनी केली. रात्री उशिरापर्यंत घराबाहेर असताना ओळखीच्या जागी भीती वाटत नाही. मात्र अनोळखी, नवख्या जागी भीती वाटते, असा अनेकींचा सूर होता. छेडछाडीचे प्रकार- यात धक्काबुक्की करणे वा अचकट विचकट बोलण्यासारखे गैरप्रकार जितके निर्मनुष्य जागी होतात, तितकेच ते गर्दीच्या ठिकाणी होतात, याला सर्वच महिलांनी दुजोरा दिला.
आर्किटेक्ट मृदुला सावंत म्हणाल्या की, इतके गंभीर प्रसंग प्रत्येकीवर ओढवतातच, असे नाही. मात्र अशा घटनांमुळे मनात एका प्रकारची भीती बसते आणि 'आपल्या बाबतीतही असं घडू शकते..' असं वाटून जाते.
प्रवासादरम्यान वा रस्त्यावर संकटकाळी छेडछाडीचा प्रसंग ओढवला तर संकटकाळी मदत मागण्यासाठी आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक तुमच्यापाशी आहे का, या प्रश्नावर अशा दूरध्वनी क्रमांकाचा आपण कधीही वापर केलेला नाही, असे उत्तर बव्हंशी महिलांनी दिले तर सुमारे पाच टक्के महिलांनी अशा हेल्पलाइनसंबंधी आपण अनभिज्ञ असल्याचे सांगितले. छेडछाडीच्या घटना रोखण्यासंबंधीची कृती अथवा कारवाई तुम्ही केली का, या प्रश्नावर बहुतांश महिलांचे उत्तर 'नाही' होते. अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करणेच योग्य आणि सोयीचे ठरते, असेही मत या महिलांनी व्यक्त केले. याबाबत विजया गोंधळेकर या शिक्षिकेने सांगितले की, रेल्वे डब्यात चढलेल्या गर्दुल्ल्यांना डब्यातल्या साऱ्याजणींनी एकत्र येऊन अटकाव करणे शक्य असते. मात्र असे करण्यास एकटी-दुकटी महिला सरसावत नाही. स्वत:च्या सुरक्षिततेसाठी काही साधनं सोबत बाळगता का, या प्रश्नाचे महिलांकडून मिळालेले उत्तरही नकारार्थीच होते. मात्र वेळ पडल्यास छत्री, जड बॅग, पिना, नखं याचा उपयोग स्वसंरक्षणासाठी करता येतो, असेही त्यांनी सांगितले. या साधनांच्या पलीकडे पोचत स्वसंरक्षण करण्याच्या दृष्टीने स्त्रीची मानसिकता मोठी भूमिका बजावत असल्याचे खासगी बँकेत व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या उषा नामये यांनी सांगितले. छेडछाड वा तत्सम गैरप्रकाराला सामोरे जावे लागले, तर त्याविषयी घरच्यांशी मन मोकळं करता का, या प्रश्नाचे बहुतांश महिलांनी दिलेले उत्तर 'नाही' होते. बीपीओ क्षेत्रात नव्यानेच नोकरीला लागलेली वैदेही या संदर्भात म्हणाली, 'आधीच नोकरीच्या आडनिडय़ा वेळांमुळे घरचे लोक कावलेले आहेत. त्यात असल्या छेडछाडीविषयी सांगितले तर ते नोकरी सोडायला सांगतील. त्यापेक्षा अशा प्रकारांना फाजील महत्त्व न दिलेले बरे!' छेडछाड वा हल्ल्यासारखा कठीण प्रसंग तुमच्या सहप्रवाशांवर वा भोवताली असलेल्या मुलीवर वा महिलेवर ओढवला तर मदत करायला तुम्ही सरसावाल का, या प्रश्नावर एखाद- दुसरीचा अपवाद वगळता साऱ्या महिलांनी होकार दिला. कामाच्या निमित्ताने मुंबई आणि आसपासच्या परिसरातील स्त्रियांची 'सातच्या आत..'ची डेडलाइन कधीच पार झाली आहे. मार्केटिंग क्षेत्रात वावर असलेल्या सुलभा देसाई म्हणाल्या की, नेहमीच्या, परिचयाच्या जागी रात्री उशिरापर्यंत काम करताना फारसे वावगे वाटत नाही, मात्र नवख्या ठिकाणी प्रवास करताना भीती वाटते अथवा कुणीतरी सोबत असावेसे वाटते.'अशा प्रकारच्या घटना जेव्हा घडतात, तेव्हा गुन्हेगाराला लक्ष्य करण्यापेक्षा प्रसारमाध्यमे बळी पडलेल्या मुलीला लक्ष्य करतात. कुठेतरी पाणी मुरत असेल, म्हणून तिच्याबाबतीत असे घडले, असा विचार केला जातो. अशा स्त्रीच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल भाष्य करणे टाळायला हवे. त्याऐवजी असे प्रकार रोखण्यासाठी काय करता येईल, याकडे लक्ष द्यायला हवे,' असे सामाजिक शास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या शिल्पा जोशीने सांगितले.
एकूणच, अघटितावर चुकचुकण्यापेक्षा अशा घटनांचे साक्षीदार असलेल्यांना पोलीस आणि कायदा यांचा जाच होणार नाही, अशा पद्धतीने गुन्ह्य़ांची उकल होणे अत्यावश्यक ठरते, असा या महिलांचा सूर होता.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















